सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।


कवी - म. म. देशपांडे.

घाल घाल पिंगा वाऱ्या

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !


कवी - कृ. ब. निकुंब

घाटातील वाट

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।


कवियत्री - सरिता पदकी
 दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी

बायको पाहिजे कशी

बायको पाहिजे कशी तर म्हणतात..
जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी..

"तिला समजू नका हो तुमचा नौकर..
जीन जीवन भर कराव तुमची चाकर.".
"पुरुषाच्या मना येव्हडे कसे कळेना..
आणि बरोबर जागेवर लक्ष्य त्याचे वळेना.".
"मग ती कशी पण असो..चालेल.."

अहो कस चालेल..काळी असली तर..
नाही हो देखणी असायला हवी..
आणि हातात लेखणी असायला हवी..
नुसती लेखणी चालणार कशी..
कपा खाली लागत नाही का बशी..

"आता काय नौकरी वाली चालणार.".
मग घरात भाकरी कोण घालणार ..
अहो पाहिजे तर कशी..?

जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी.
असावी ती दहावी पास..
आणि दिसायला पण खूपच खास..

"आधी बघा किती झालाय तुमच वय..
तुम्हा बघूनच वाटेल हो तिला भय.".

वाटूद्याना हो तुमच काय जातंय..
आणि तुमच्या बापच कोण खातंय

"अहो तिचे माय-बाप ऐकून काय म्हणतील..
आणि लोक पण तुम्हा जोड्याने हाणतील"

मग नौकरी वाला म्हणून सांगा ..
बघा कश्या लागतील माझ्या पुढे रांगा.

"थोडी तर वातुद्याहो हो तुम्हाला लाज..
एव्हडा कसा सुटला हो माज."
"दिसायली असली तरी खूपच साजूक..
तीच मन खूप असतंय हो नाजूक.".

मग मला काय करायचंय ..
 फक्त माझ पोट भरायचंय ..
मग नाजूक असो व लहान..
ठेवा म्हणा माझ्या कडे गहान...

"पैश्या चा दाखवून हो नाद..
आयुष्य करू नका तीच बरबाद.."
"वयाला शोभेल अशी बघा..
मग नेसवा तिला झगा
ती पण दिसेल लहान..
आणि लोक पण म्हणतील महान.."

न्हाय न्हाय न्हाय..
मला बायको पाहिजे अशी .
जशी कपा खाली बशी
आणि डोक्या खाली उशी..

"मग काढून टाका तुमची मिशी..
आणि हाकत बस म्हशी"
"तुम्ही म्हणता बायको जशी..
आता  मिळणार नाही तशी..
आता पोरी लय भारी शिकल्यात..
आणि तुमच जग त्या जिंकल्यात..
तुमचा नाद सोडा खुळा
आणि चांगल्या रस्त्यावर वळा"
राहील नुसताच खुळा कप..
मग संन्याश्या सारख करा जप.."


कवी - बळीराम भोसले

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी

मिळेल सांजा, साबूदाणा
खडिसाखर, मनुका, बेदाणा
संत्री, साखर, लींबू आणा
जा बाजारी, मौज हीच वाटे भारी

भवती भावंडांचा मेळा
दंगा थोडा जरि कुणि केला
मी कावुनि सांगेन तयाला
‘जा बाहेरी’, मौज हीच वाटे भारी

कामे करतिल सारे माझी
झटतिल ठेवाया मज राजी
बसेल गोष्टी सांगत आजी
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ ?
हे मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारी, मौज हीच वाटे भारी


गीत - भानुदास
संगीत - श्रीधर फडके

आई तुला प्रणाम

वंदे मातरम ----- मराठीत

आई तुला प्रणाम ॥ धृ ॥

सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम

कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम

तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम

तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम


मराठी रुपांतर - श्री. नरेंद्र गोळे

वृंदावनी वेणू

वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे ।
वेणूनादे गोवर्धन गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनी मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरू विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायी झाली ।
पक्षीकुळे निवांत राहिली ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे ।
रविमंडळ चालता स्तब्ध होय ।
शेष कूर्म वराह चकीत राहे ।
बाळा स्तन देऊ विसरली माय ॥४॥

ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ।
बाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनी स्तुति गाती ।
भानुदासा पावली प्रेम-भक्ति ॥४॥


रचना – संत भानुदास
स्वर – अजित कडकडे

बेमालूम

खरा प्रार्थनेत असणारा
कधी सावध नसतो.
पण त्या दिवशी आमचं तसं नव्हतं.
नाही म्हटलं तरी आम्हाला चाहूल होतीच.
आम्हांला करायची होती पारध.
तुझी उभी काठी कोसळली
अन् आम्ही त्याच्यावर झडप घातली.
बोटं दाखवायला कुणीतरी
हवाच होता आम्हाला
तो अनायासे सापडला.
खरं तर केव्हाचे आम्ही सारे
गोळी होऊन दडून बसलो होतो
त्याच्या पिस्तुलात ....
पण कसे दोघेही फसलात !


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह - वेड्या कविता

प्रकाशक

हि कविता २१ सप्टेंबर १९८२ ला सदानंद रेगे ह्यांचा मृत्यु झाल्यानंतर दिलीप चित्रे यानी 'अभिरुची' च्या जानेवारी १९८३ च्या अंकात प्रकाशित केली होती. रेग्यांच्या कोणत्याही संग्रहात ही कविता आलेली नाही.

प्रकाशक हा मदारी असतो
लिहिता ना येणार्‍यांना तो लिहिते करतो.
पाणीपुरीला जसे जिर्‍याचे पाणी
तसा तो लेखकांना अटळ असतो.
त्याच्याकडे एक भली मोठी बॅटरी असते.
काळोखातल्यांना तो प्रकाशात आणतो.
प्रकाशक हा पेटीतल्या मिठाईसारखा सुसंकृत असतो.
कशासाठी तरी तो सारखी झीज सोशीत असतो.
लेखकाप्रमाणेच तोही वरचेवर सेमिनारला वगैरे जातो.
लेखकातले जे गाणारे असतात त्यांचे गाणे करतो.
सटीसहामासी लेखकाना घरी बोलावून
तो त्याना रॉयल टी देतो.
प्रत्येक प्रकाशकाच्या देवघरात शॉयलॉकचा फोटो असतो.
या चित्रातला शॉयलॉक साईबाबांसारखा दिसतो.
दिवसाचे तेवीस तास तो वात्सल्यरसाने ओथंबलेला असतो.
पण केव्हा केव्हा तो खणखणीत परखडपणाही दाखवतो.
'कोळशाच्या दुकानातले कोळसे' तशी तुमची पुस्तकं
ही त्याची गर्जना ऐकून् भले भले लेखक शब्दगळीत होतात.
प्रकाशकाचे गणित रँग्लर परांजप्यांसारखे असते.
पै पैच्या हिशोबागणिक तो नाथांसारख्या टाळ्या वाजवतो.
प्रत्येक प्रकाशक हा मॉमपेक्षाही अधिक पैसे लेखकाला वाटतो.
देवळाच्या पायर्‍या उतरीत तो खाली येऊ लागला
की धट्टेकट्टे लेखकही लुळ्यापांगळ्याचं सोंग घेऊन उभे राहतात.
ज्या लेखकाना आयुष्यात एकदा तरी मोटरीत बसायचे असते,
त्याना प्रकाशकावरच मदार ठेवावी लागते.
प्रकाशकाचा स्वतःचा असा दरबार असतो.
या दरबारात बसून प्रकाशक लेखकाना शहाणे करूनी सोडतो.
या दरबारात येताना लेखकाना मानेला स्प्रिंगा लावून घ्याव्या लागतात.
टाळ्यांचे टेपरेकॉर्डिंग त्याने खास अमेरिकेहून आणलेले असते.
लेखक म्हणजे कारकून या सत्याचे प्रूफ प्रकाशक प्रत्यही देत असतो.
पुस्तके बांधून घेण्यापलीकडे कसलंच बायंडिंग प्रकाशकावर नसते.
लठ्ठ् लेखकांना तो नित्य नेमे डायेटवर ठेवतो.
मठ्ठ लेखकांना तो फटकन् बोलतो.
हा़डकुळ्या लेखकांच्या बेडकुळ्या काढून दाखवतो.
भांडकुळ्या लेखकांच्या तोंडाला लागायला याला लाज वाटते.
अशा या परमदयाधन प्राण्याला,
परमेश्वरा, जन्मोजन्मी प्रकाशकाचाच जन्म दे.
त्याला कुत्रं, मांजर् वगैरे करून आम्हा लेखकांची कुचंबणा करू नकोस.
तो कुत्रं झाला तर आम्हाला मांजर व्हावं लागेल.
तो मांजर झाला तर आम्ही उंदीर होऊ.
पुस्तकं खाणार्‍या झुरळांना कधीकधी
प्रकाशकाचा चेहरा फुटलेला वाटतो
म्हणून ही प्रार्थना एवढंच.
सहस्त्रयोन्या वगैरे आम्हा कर्मदरिद्रांना.
त्याला एवढी एकच ठेव,
पुस्तके छापण्याची...."


कवी - सदानंद रेगे
(आभार :-अशोक पाटील)

खरेच का हे?

तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?

मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?

खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?

आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?


कवी - अनिल

दुपार

या ग्रंथसंग्रहालयात
निःशब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली बॉबकट केलेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटे झोपी गेलेले दिसतात ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईन्स्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळू बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत...


बाहेर...
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली

घेऊ लागली आहे डुलक्या
अन् तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे ग!
मला झोप येते आहे!


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह -  गंधर्व

वैराग्याचा मेळा

मृत्यू इतक गूढ काही नाही. अंत्य यात्रेत सुद्धा  मनाची  एक वेगळीच अवस्था होते. ह्या विषयावर हि कविता आहे.

जमला जन समुदाय अपार
मूक, उदास, गंभीर
कोणी उधळती अबीर बुक्का
कोणां  मुखी राम

राग, लोभ, नाती, गोती
काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी
निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भरी जो दिसला
तो देह समोर निजला
गेला सोडून जो देहाला
तो न कधी बघितला

अज्ञाताच्या या प्रवासाला
आत्मा नंगाच गेला
तिरडी वरी केवळ पसरला
देह रुपी अंगरखा

जमविला गोतावळा जरी
सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर
अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी
सखे, मित्र, सोबती
संपणार साथ तयांची
स्मशान प्रवेश द्वारी

प्रवासी आपण घडीभरचे
पाव्हणेच या जगी
काढले तिकीट परतीचे
जन्मा आलो ज्या क्षणी

ना  रद्द व्हायचे तिकीट
ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती
वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे
चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी
भिंती वर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा
तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे
जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला, देह
न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून
तो, देह जळला  चिते वरी

राखले शरीर जन्म भरी हे
राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती
राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता
वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे हि अंत्य यात्रा
जमला वैराग्याचा मेळा


कवी - केदार
कवितासंग्रह - गमन

बाई या पावसानं !

बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !

दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं !

फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !

नदीनाले एक झाले, पूर भरुनीया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन !
बाई या पावसानं !


कवी     -    अनिल
संगीत    -  जी. एन्‌. जोशी
स्वर    -    पु. ल. देशपांडे

निर्दयी

तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

थकले रे डोळे

थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता

सुकला रे कंठ माझा
तुज आळविता
तुज आळविता रे
नाम तुझे जपता

आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
वाहता वाहता रे
आठवणी काढता

शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता


कवी     -    अनिल
संगीत   -    यशवंत देव
स्वर    -    उषा मंगेशकर

गगनि उगवला सायंतारा

गगनि उगवला सायंतारा
मंद सुशीतळ वाहत वारा

हाक तुझी मज स्पष्ट ऐकु ये
येइ सखे ये, बैस जवळि ये
गगनि उगवला सायंतारा

घाल गळा मम तव कर कोमल
पसरु दे श्वासाचा परिमल
घेई मम हृदयात निवारा
गगनि उगवला सायंतारा

बैस जवळि ये, बघ ही पश्चिम
कोमल रंगी फुलली अनुपम
ये नेत्री ते घेउ साठवुनि
गालावरती गाल ठेवुनी
गगनि उगवला सायंतारा

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि, बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर !
गगनि उगवला सायंतारा


कवी     -    अनिल
संगीत  -    गजानन वाटवे
स्वर    -    गजानन वाटवे

क्षण

क्षण एक आसुसलेला, शांत, गहिवरला,
क्षण एक उगाच थांबलेला, अडखळलेला,
क्षण एक पुरेसा स्वप्न पंखलाउनी उडायला,
क्षण एक पुरेसा धरेस कोसळायला,

क्षणाक्षणात क्षण निघाले,
जीव लावायला, जीव गुतायला,
रंग रांगोटयांनी आकाश रंगवायला,
क्षण एक बलत्तर, वादळ उडवायला,
सजवले घरटे मोडायला.

क्षण एक कोलमडलेला, तुटलेल.
क्षण एक उरी दाटलेला, लोचनी साठलेला,
क्षण एक ओठान पलीकडे दडलेला,
स्थिर,स्तब्ध, पण आत काहूर माजलेला.

क्षण विचारी, क्षणच सोडवी,
क्षण क्षणात रडवी, क्षणच क्षणात हसावी,
क्षण घायाळ करी, क्षणच औषधी,
क्षण एक प्रश्न, आणी तेच त्याचे उत्तर.

क्षण प्रेमाचे साठुनी, झाले आठवणी,
क्षण विरहाचे, गेले रात्र जागवुनी,

क्षण माझे, क्षण तुझे,

क्षण भेटीचे, लाजरे, लपलेली, बिथरलेले,
एकत्री घालावलेले, रमलेले, ज्वलंत पेटलेले.

चित्र कधी रंगवलेले, क्षणात अश्रू तून वाहले.
तरीही, शेवटी क्षणच राहले, हसरे, गोजिरे.
क्षण पुन्हा पुलवी जीवन, क्षणात पुन्हा बहरेल आंगण.
क्षण एक बल्तर,
बाकी सगळे निरुत्तर, बाकी सगळे निरुत्तर.

जुई

पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती
इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती

आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला

तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे
जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे

कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत

मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते!


कवी - अनिल

माणूस माझे नाव

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...


कवी - बाबा आमटे
कवितासंग्रह - ज्वाला आणि फुले

आठवून पाहायचो मी...

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णतेतही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

प्रीतिच्या फुला

वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला रे

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला रे

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला रे

माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला रे

दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला रे

प्रीतीवरी विश्वासून, घडीभरी सोसू ऊन
नको टाकु खाली मान, माझ्या प्रीतीच्या फुला रे

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला रे


कवी     -   अनिल
संगीत  -   यशवंत देव
स्वर     -   उषा मंगेशकर
राग     -    खमाज

डोळ्यातून ओतलो इथे.

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
राहीलो एकटा सगळ्यास मुकलो इथे.

राहीली ताट मान त्या मोठ्या मनाची
मी तर कणा मोडलेला सदा वाकलो इथे.

आता कुठे सुरवात म्हणे झाली सुखांची
त्या सुरवाती आधीच मी तर संपलो इथे.

होती आशा मला वादळास मिठीत घेण्याची
तीच्या इवल्याशा श्वासात मी गुतंलो इथे.

ना कळाल्या तीच्या भाषा ना कळाल्या दिशा
मी वाट चुकलेला असाच भरकटलो इथे.

मागे वळून पाहता शुन्य होता सोबतीला
दमडीच्या मोलाने भगांरात विकलो इथे.

कोणी आल होत दुःखं विकत घेण्यासाठी
मी घेउन टोपली मग बाजारात बसलो इथे.

हो असच संपल जीवन उद्याच्या प्रतिक्षेत
उद्यासाठी आजचा प्रत्येक क्षण मुकलो इथे.

काल म्हणे तीला खरच माझी आठवण आली
आठवणीत तीच्या मग मीही डोळ्यातून ओतलो इथे.

उघड दार उघड दार

उघड दार उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रिच्या नभात
शांत चांदणे खुले
पांघरूनी रश्मिजाल
गाढ झोपली फुले

अजुन हा निजे न भृंग
मरंद-गुंगिने भुलून
मंजु गुंजनात दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्यां


कवी      -    अनिल
संगीत    -   जी. एन्‌. जोशी
स्वर     -    जी. एन्‌. जोशी

फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

वाटेवर काटे वेचीत [दशपदी ]

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकून देऊन अता परत चाललो


कवी     -    अनिल
संगीत  -    यशवंत देव
स्वर     -    पं. वसंतराव देशपांडे
झेपावणार्‍या पंखांना क्षितिजं नसतात,
त्यांना झेपेच्या कवेत येणारे आकाश असते.
सृजनशील साहसांना सीमा नसतात,
त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते.
अशी सृजनशील साहसे हवी आहेत,
जी बीजे पेरून बाट पाहू शकतील,
जी भाग ठेऊन भविष्य आखतील,
अन् बेभान होऊन वर्तमान घडवतील.....


कवी - बाबा आमटे

काव्यात

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

पाऊस

आज सार्या देहावरी तिने झेलला पाऊस
देहाच्याही आत आत जणू पोचला पाऊस

देह झाला कस्तुरीचा केवडाही घमघमे
इथेतिथे ठायीठायी गंधभारला पाऊस

देह मनाच्या या रेषा किती धुसर अस्फ़ुट
मनाच्या या अंगणात मस्त फ़ुलला पाऊस

आभाळाने दान द्यावे धरित्रीच्या पदरात
सोसाट्याने घेता दान किती झुलला पाऊस

पावसाच्या धुंदवेळा मन तिचे सावरेना
स्वातीच्या या शिंपल्यात बघ रुजला पाऊस.

कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?


कवी - बा. भ. बोरकर
अंगणातील पारिजातावर
छानसे घरटे चिमण्यांचे
त्या घरट्या खाली सांडते
रोज आभाळ चांदण्यांचे

वेचून त्या चांदण्या
फुले माळ केसात लांब तुझ्या
चांदणे पसरेल निशेवर
भिनेल रुधीरात गंध माझ्या

सांज रूप घेउन यावस
मग विझतील रवीकिरणे म्लान
सांजेच्या उंबरठ्यावर निशा
घेत असेल चांदण्यांचे स्नान

असेल हात तुझा हातात
सर्वदूर चांदण्यांचे आभाळ
होइल चांदणेही रुपेरी
पाहून रंग तुझा गव्हाळ

मग क्षण येइल तो
हळूवार सोडवून घेशील हात
मग कित्येक रात्री जागवणारी
हासत निरोप घेइल रात. . .

पराठे



साहित्य :
१ कप गव्हाचे पीठ
०.५ कप तांदुळाचे पीठ
०.५ कप बेसन
०.५ कप ज्वारीचे पीठ (नसेल तर गव्हाचे पीठ घालावे)
१ मध्यम आकाराची काकडी खिसुन
...१-२ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे)
०.५" आले
१-२ पाकळ्या लसुण
१ टेबल्स्पून जिरेपूरड
१ टेबलस्पून धणेपूड
मीठ - चविप्रमाणे
हळद, चिरलेली कोथिंबीर, एक छोटा खडा गूळ
तेल लागेल तसे
पाणी लागेल तसे



कृती :  सगळी पीठे एकत्र करुन एका बेकिंगडिशमधे ठेवावीत. ओव्हन ३५० डिग्री फॅरेनहाईट वर चालू करुन त्यात ही पीठाची डिश ठेवावी. ओव्हन प्रीहीट होत असताना एकदा मधे पीठ हलवावे. ओव्हन प्रीहीट झाला की बंद करुन टाकावा, अजुन एकदा पीठ नीट हलवावे आणि डीश तशीच अजुन ५ मिनीटे ओव्हनमधेच ठेवावी. दरम्यान मिरच्या, आले, लसूण एकत्र वाटावे. काकडी खिसुन घ्यावी. त्यात वाटण, गुळ, मीठ, कोथिंबीर, हळद, जिरे-धणेपूड घालुन नीट मिसळुन ठेवावे. ५ मिनीटाने बाहेर काढुन काकडीच्या मिश्रणात घालावे. चमच्याने सारखे करुन ५-७ मिनीटे तसेच ठेवावे. काकडीला सुटलेल्या पाण्यात बरेचदा पीठ नीट भिजते. पण गरज लागली तर थोडे पाणी लावून पीठ थापता येण्याजोगे भिजवावे. गॅसवर तवा तापत ठेवावा. पोळपाटावर ओले फडके/पंचा/रुमाल घालुन त्यावर एक मोठ्या लिंबाएवढा पीठाचा गोळा घेउन पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे. थापलेल्या थालिपीठाला मधोमध एक आणि त्याच्या कडेने ४ अशी ५ भोके पाडावीत. यामुळे थालीपीठ नीट भाजले जाते.आता फडक्यासहीत थालिपीठ उचलून तव्यावर उलटे टाकावे आणि हलक्या हाताने फडके सोडवून घ्यावे. पाडलेल्या छिद्रातून एकेक थेंब तेल तव्यावर सोडावे. गरज असेल तर कडेने ३-४ थेंब तेल सोडावे. एका बाजुने भाजुन झाले की उलटवून दुसरीबाजू देखील नीट भाजावी. मस्त खमंग थालीपीठ काकडीच्या कोथिंबीरीबरोबर, लोणच्याबरोबर खावे.



टीप -

१. दिलेल्या प्रमाणात ६ मध्यम आकाराची थालिपीठे होतात.
२. मिरची, लसूण न घालता नुसते आले आणि थोडे लाल तिखट घालून ही थालीपीठे करता येतात.
३. काकडीऐवजी कांदा घालुनही मस्त लागते.
४. अगदी बांगडीएवढी लहान थालीपीठे केली तर अपेटाईझर म्हणुन मस्त लागतात.