राजसा, आता

राजसा,
आता
कुणाची चोरी !

जरासा थांब
सख्या, तू सांब
उमा मी गोरी !

कशाची लाज:
बुडाली आज
जगाची थोरी

कशाची रीत
उफळली प्रीत
करीत शिरजोरी

धरू ये फेर
इथे चौफेर
हवा ही भोरी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ती कळी आणि ती साखळी

फुलून हसताच तूला मी दिली नवी कळी
खुडून एक एक तू झुगारलीस पाकळी
कितीतरी जपून मी दुवा दुवाच जोडला
करून घाव तू मधे दुभंगलीस साखळी

सुरंग कोवळी कळी, कशी जुळेल ती पुन्हा?
जुळेल एकदा, तरी कशी फुलेल, सांग ना?
दुवा दुभंगलास तू, कसा मी अभंग करु?
पुन्हा अखंड साखळी कशी जुळेल, साजणा!

विशीर्ण, जीर्ण पाकळ्या तशाच वेचते पिशी
दुभंग साखळी तरी जपून ठेवते अशी
कळी तशीच साखळी विलोकते पुनःपुन्हा
पुसून ऊन आसवे विसावंते कशीबशी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हुरहूर

मी धरुं धिरावा कसा? वखत हा असा
दे मला जरा भरवसा, हरिणपाडसाऽऽ रे!

हरवला सखा सोबती
हुरहुरू बघावं किती?
थरथरुन किती मी भिले बघून हा ससाऽऽ रे!

ही समदी शेती सुनी
भवताली नाही कुणी
मग फिरुं कशी मी अशी नवी राजसाऽऽ रे!

नवतीत शोक आगळा
बघ, भरुन आला गळा
आतले कुणाला पुसू मुक्या दशदिशाऽऽ रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ओढ

स्वार्थसंगर हा म्हणा अथवा म्हणा व्यवहार की
चालली हिरहीर अन किरकीर ही तर सारखी
ओरडो विव्हळो कुणी तुडवून या पतितांस हे
धावतात पुढे पुढे सगळे करून धकाधकी

येथल्या मुलखात मी तर एक वाटसरु नवा
मानवेल कशी मला पण येथली जहरी हवा?
स्नेहशून्यच लोक हे सलगी करु भलती कशी?
देश हा परका इथे ममतेस मोबदला हवा

चाललो इकडून मी तिकडे असाच किती तरी
शेवटी पण ही कधी सरणार सांग मुशाफिरी!
एक आपुलकी हवी, असला नको परकेपणा
लागली हुरहूर रे, पण पोहचेन कधी घरी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

फार नको वाकू

फार नको वाकू
जरी उंच बांधा
फार नको झाकू
तुझा गौर खांदा

दोन निळे डोळे
तुझे फार फंदी,
साज तुझा आहे
जुईचा सुगंधी

चित्त मऊ माझे
जशी रानकाळी
धुंद तुझी आहे
नदी पावसाळी

श्वास तुझे माझे
जसा रानवारा
प्रीत तुझी माझी
जसा सांजतारा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ


नेमके परत जाताना

भेटताच, मी हासते जुई सारखी :
राहतेच तरीही त्यांची ती नजर जरा पारखी

मी पुन्हा पुन्हा सारखी पाहते, गडे !
ते परंतू, बाई, डोळे वळवितात, दुसरीकडे !

मी पुसले काही तरी नवे अन जुने
तेवढेच चोरावाणी चुकवितात गऽ बोलणे !

का सदाकदा धरतात अबोला असे ?
सारखे, तरी इतरांशी बोलतात, बाई, कसे ?

छे ! कसा सहू मी असा दुरावा मुका ?
चांगलेच सारे सारे, वाईट फक्त मीच का?

मग, दूर मुक्याने बसून बघते जरी,
नेमके परत जाताना हसतात कशाला तरी ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

हा पदर शिरावर, नव्या उरावर तुला गळाभर सरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

तू लावण्याची कळा
नजरेत कसब आगळा
उरानुरावर नवी नव्हाळी, चिरी कपाळी जरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

ये उगीच जरासं रुसू
अन मुक्यामुक्यानं बसू
मधेच खुदकन हसू नये तू अशा पराण्या घरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

तू नको धिटाई करु
अन लहरी नजरा भरु
हसून जराशी तुझ्या सख्याशी नको करु हिरहिरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

धनगरी गाणे

या माथ्यावरती ठळक चांदण्या नऊ
ही अवती भवती हिरवळ हिरवी मऊऽऽ जी !

ही झुडुपे, झाडे, रानवेल साजरे
चांदणे हिवाळी, मंद, धुंद, झांजरेऽऽ जी !

रानांत भोवती खचून भरले धुके
हातात कोकरू थकून निजले मुकेऽऽ जी !

हुरहुरु नको गऽ, नकोस दचकू, सरू,
चिवचिवते चुकले एक रानपाखरूऽऽ जी !

या झाकळलेल्या सबंध खो-यामधी
कुजबुजते गाणे धुंद एकली नदीऽऽ जी !

हा सबंध माझातुझाच सवता सुभा
भोवती मुक्यानं कळप राहिला उभाऽऽ जी !

या निजल्या मेंढ्या मुक्यामुक्यानं जुनू
हळुवार लावणी हळूहळू गुणगुणूऽऽ जी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

पुन्हा

नको ह्रदय हासवूं, पुन्हा हे नको ह्रदय हासवूं

उगवताच सुकली मुळी
फुलविताच सुकली कळी
सरकताच जिरली खळी जळावर – कशी पुन्हा नाचवू?

तू दिलीस वचने जरी
ठरविलीस लटकी तरी
जी मुळांत नव्हती खरी प्रीत ती नको पुन्हा भासवू

ही नकोच भलती हमी
पहिलीही नव्हती कमी
भरभरुन पुनरपि सुरंग नंतर नको पुन्हा नासवूं


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

विमान

किति मौज दिसे ही पहा तरीहे विमान फिरतें अधांतरीं. ध्रु.

खोल नदींतुन कापित पाणी
मत्स्य धांवतों चहुंबाजूंनी,
घारच अथवा फिरते गगनीं,
हुबेहुब हें त्याच परी. ।।१।।

रविकररंजित मेघांमधुनी,
स्वच्छ चांदण्यामधें पोहुनी,
घुमघुम् नादें दिशा घुमवुनी,
प्रवास करि हें जगावरी. ।।२।।

परंतु केव्हा पाउस गारा
प्रांत वेढुनी टाकिति सारा
त्यांतूनहि हें जाइ भरारा,
नवल नव्हे का खरोखरी? ।।३।।

पहा जाउनी विमानांतुनी,
दिसेल शोभा अपूर्व वरुनी,
डोंगर, रानें,ओहळ, तटिनी
आणि कुठे सागरलहरी; ।।४।।

ग्रहनक्षत्रें आकाशांतिल
विमान बघुनी मनांत म्हणतिल,
"भेटाया अपणां पृथ्वींतिल
येति माणसें कुणीतरी." ।।५।।

नको सूर्यचंद्रावर जाया;
नको जगाची सफर कराया,
नेइं विमाना, मज त्या ठायां
जेथ माय मम वास करी. ।।६।।


- गोपीनाथ

पुणेरी किस्सा

पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता.

एक माणूस त्याला म्हणतो, “काय कर्वे…??”

तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो, “माझे आडनाव कर्वे नाहीये.”

तो माणूस : “मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस….”

पैज जिंकली

दोघा मित्रांनी एकमेकांशी पैज लावली. एकाचे म्हणणे होते की गावाजवळच्या जंगलात वाघ आहेत, तर दुसर्‍याचे म्हणणे होते की वाघ नाहीत. त्यांनी जंगलाबाहेर तंबू ठोकला. वाघ नाहीत म्हणणार्‍या मित्राने दोन तास जंगलातून फ़ेरफ़टका मारुन यावे व तो सुखरुप परत आला तर त्याने पैज जिंकली असे ठरले. वाघ आहेत म्हणणारा मित्र तंबूतच थांबला.

एक तासांनंतर तंबूत वाघ आला आणि तंबूतल्या मित्राला म्हणाला " अभीनंदन !!, तु पैज जिकंलास !!
गण्या - मैत्री करणार काय ?
.
.
.
चिंगी - माझे पालक परवानगी देणार नाही.
.
.
गण्या - वा लय भारी ... जसे माझ्या बाबाने मला पोरी पटवण्याचा लायसन काढून दिलाय

थापाडे मित्र

पहिला मित्र :- दुसर्या मित्राला माज्या पंजोबाचे घड्याळ या तळ्यात १०० वर्षापूर्वी पडले होते आणि काय आचर्य काल तळ्यातील गाळ काढताना सापडले आणि ते अजून चालू आहे


दुसरा मित्र :- अरे मी पण सागायचे विसरलो माजे पंजोबा याच तळ्यात १०० वर्षापूर्वी पडले होते ते काल सापडले तर ते जिवंत होते

पहिला मित्र :- अरे पण ते इतके वर्षे काय करत होते


दुसरा मित्र :- तुज्या पंजोबच्या घड्याळाला चावी देत होते म्हणूनच अजून ते चालू आहे

प्रिय मैत्रीण

मी तुला फुल मागितले तू मला पुष्पगंध दिला
मी तुला माती मागितली तू सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितले तू मोर दिलास .
.
.
.
.
एक विचारू तू बहिरी आहेस का ?

कोण, कुठे आहेस तरी!

उगाच फिरते तरल कल्पना बहुरंगी अनिवार पिशी
वस्तुशून्य प्रणयांत अशी

फलकावर फिरवली कुंचली स्वैर गतीने कशी तरी
चित्र निघाले रम्य परी

आवरतो पण तरी चालतो पुनःपुन्हा मी पुढे पुढे
कुण्या तरी चांदणीकडे

निशीगंधाचा परिमळ भरला फूलच नाही दिसत तरी
ही भरली हुरहूर उरी

धुक्यांत भरले मधुर चांदणे, दिसतच नाही कोर कशी?
ढगांत दडली चोर जशी

पुरे तुझी अव्यक्त त-हा, तुलाच भुलला जीव पुरा
कधी सांग येशील घरा?

तुझेच, ललिते, अधीरतेने चित्र चिंतितो परोपरी!
- कोण कुठे आहेस तरी!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

साद ही नाही तुम्हाला

धुंद या वाणीत येते पाखरांची स्वैरता
साद ही नाही तुम्हाला, का तुम्ही वेडावतां?

मुग्ध संध्याराग माझा, अन उषा ही सावळी -
काय, हो, हातात येते तोलता ? ही अंधता

गूढ अव्यक्तात आहे चारुतेची चांदणी
चर्मचक्षुनी कुणाला काय येते पाहता?

अंतरी व्याकुळ होतो ऐकता आरोप हे
मर्मभेदी हे विषारी घाव का, हो, घालता?

‘हेच गा अन तेच गा ‘का घालता ही बंधने?
मोहना माझी आसवी ना कुणाची अंकिता

पूजितो निष्पाप माझी देवता प्रेमोज्ज्वला
दूर जा, मंदीरदारी पाप का हे ठेवता?

नेटकी विक्री कराया सज्जले भोंदू निराळे
मी असा हा प्रेमयोगी काय दावू दीनता?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

उत्कंठा

खोल जमिनीमधून अश्रुत, तरी असावा असा -
झ-याचा नाद जसा चालतो
नील तरल तिमिरांत झाकल्या पुष्करिणीचा जसा -
निळा थर हळूहळू हालतो

धुक्यात भुरक्या, दूर, निवळत्या सांध्यरंगामधे -
भासते मात्र जशी चांदणी
असून ही न आठवणारी ह्रदयतरंगामधे -
जशी कल्पना विविधरंगिणी

परिमळ भरते सभोवार, पण अगोचरच रहाते -
जशी घनवनांत फुलती कळी
सर्वांतीत तरी सर्वंकष निरंतरच वाहते -
जशी वास्तवामधे पोकळी

अगम्य असला असा, तरी वाटते असावास तू!
सख्या, वाटते दिसावास तू!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अर्पण

चहूंकडे आघात, घात, अपघातच झाले मला
जन्मलो त्याचकरता जणू!
तरी असू दे तुझा जिव्हाळा, जीव वाहिला तुला
दयाळा, फिरव कुठेही तनू!

पाय जरासे सुखाशेकडे चुकून वळले तरी
तरीही – तरी नीट नेच तू!
अजाणतेने या डोळ्यांना पाणी आले तरी
पुसावे आपुलकी नेच तू!

या जीवाचे भलेबुरे ते तुलाच कळते, सख्या,
कशाला घालावी भीड मी!
सुटला झंजावात, कुठेही जहाज जावो, सख्या,
सुकाणू तू नुसते शीड मी!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

जीवनाचे गाणे

जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !

आकंठ करून प्रीतीचे पान
सौख्यात हिंडलो सोडून भान
आता या दुःखात झिंगू
जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !

क्षणैक मोहक पाडून भूल
सुकले साजूक नाजूक फूल
आता हे निर्माल्य हुंगू
जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !

देऊन कोवळा सोनेरी संग
लोपले सांजेचे राजस रंग
काजळी लागली पांगू
जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

काल, आज आणि उद्या

फळाफुलाला आला होता खरोखरच, साजणे
हिवाने अखेर झडला तरु!
क्षणभर खुलले, नंतर सुकले सुधामधुर चांदणे
नको वनवास जिवाचा करु

आणभाक घालून सारखा तुझाध्यास लावला
अबोला हा धरला शेवटी
अनन्य प्रीतिशिवाय जगणे अशक्य झाले मला
आणखी जग हसले भोवती

हसते जग पण अजून आहे मला तुझा भरवसा
तरुला फुटेल, बघ, पालवी
आज जरी अंधार भासतो गगनावर या असा
उद्या बहरेल चंद्रिका नवी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

असाच

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऐक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऐकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे

काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे
आलीस तू एकटी बांधून सारे चुडे

वारा किती मंद गऽ!
होते किती कुंद गऽ!
होता किती धुंद गऽ अंधार मागे पुढे!

काळी निनावी भिती
होती उभी भोवती
वाटेत होते किती काटेकुटे अन खडे!

होऊन वेडीपिशी
आली अवेळी अशी
नाजूक प्रीती तुझी, धारिष्ट हे केवढे!

माझी तुझी चोरटी
जेव्हा मिळाली मिठी
झाले जगाचे कडे माझ्यातुझ्याएवढे.

हुंकारला पारवा
तेजाळला काजवा
हालून गेला जरा काळोख चोहीकडे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

वाटते लाज रे!

एक होतास रे तू उभा संगती
स्नेहमय सोबती!
आणि होते, सख्या, गूढमय ते अती
दाट तम भोवती!

या तनुभोवती पाश होता तुझा
भाव नव्हता दुजा
कौतुकानेच तू ऐकला, राजसा,
बोल माझा पिसा!

आणि होता तरी ऊर नव नाचरा
नूर लव लाजरा
धुंद होतो उभे दूर एकीकडे
अन्य नव्हते गडे!

काय, बाई तरी, चंद्र आला वारी!
चल, सजणा घरी!

एक झाले सख्या, चंद्रमुख हासरे,
वाटते लाज रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

माझी गाणी

दिसेना, आंधळ्यावाणी किती पाहू तरी चौफेर !
जराही स्पर्श होईना, किती घ्यावे तरी मी फेर
पुरे हा छंद, कानोसा कितीदा हरघडी घ्यावा
किती मारू तूला हाका, नको राहू असे बाहेर

मनःसंवेद्य ऐकावे किती हे पंचरंगी सूर!
किती शोधू तरी आता, कळेना हा कुणाचा हूर
उसासे मी किती टाकू ? किती होऊ तरी कष्टी
अघोरी, उष्ण अश्रूंचा निघाला पावसाळी पूर

निळ्या दिग्वर्तुळामध्ये, परत्री अंतराळी दूर -
निघाला चंद्र चंदेरी, उडाला चांदण्यांचा चूर
असे मी पाहिले तेव्हा मला झाला तुझा आभास
वृथा मी पाहिले झाली पुन्हा जागी जुनी हुरहूर!

विझाव्या का बरे आता नभाच्या तेवत्या वाती?
सुचेना मार्ग काहीही ढगाळी आंधळ्या राती
अरेरे हा असा आला तुफानी, उग्र झंझावात
कसे मी आवरू तारू? सुकाणू घे तुझ्या हाती

इथे कोणी पिता-पुत्रे, कुणी आजा, कुणी नातू
कुणी मामा, कुणी भाचा, निराळा मी, निराळा तू
दुरावे हे किती सोसू जगाचे हरघडी आता
इथे या शांत एकांती जीवाला दे जिव्हाळा तू

नको जाऊ, जरी आहे खरी सारी तुझी शंका
चुकीचा, त्याज्य, बेपारी, पहा, आहे तुझा हेका
दिवाण्या, श्रांत चित्ताला जरी केव्हा चुकूनमाकून -
जराशी विस्मृती झाली, तरी तू विस्मरावे का ?

निशेने व्यापिली सारी धरित्री मंत्रामोहाने
पहा, झोपी कसे गेले, सुखात्मे, या दिशा, राने!
उदासी शून्य ही माझी निराशा जागृती आता
हसवी मुग्ध, मायावी, तुझ्या निःशब्द हास्याने

किती मी या झळा सोसू? उन्हाळा उष्ण आहे फार
निवाराही कुठे नाही, कुणी नाही मला आधार
पुढे आता कसा हिंडू? कुठे आहे तरी सिंधू?
कशाने सर्व जन्मांची अघोरी ही तृषा जाणार?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

चिरलांच्छित ही आपुलकी !

चल, भेट निमिषभर, चंद्रमुखी !

कोण, कसा हे
न पुसता ये ;
गोंधळून कर एक चुकी

ओळख, नंतर
पुन्हा दूर कर
कायमचा, बघ, कोण सुखी ?

परतशील तर -
तरी तुझ्यावर
खिळेल माझी नजर मुकी

असा निरंतर
तिरस्कार कर :
तूच तरी पण जीवसखी

शिणले जीवन,
मी धरली पण -
चिरलांच्छित ही आपुलकी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

रंगबावरी


म्रुगजळ


दिवेलागण

१. ये रे घना
२. नुक्ता प्रारंभ
३. व्यथा गात गात
४. दिशा…व्योम…तारे
५. अर्थ
६. अनुप्रासलो मरणे
७. मीं श्वास पेरिले होते
८. मन
९. शिशीरामधल्या
१०. व्रत
११. राजा
१२. नादली दुरांत घंटा
१३. चंद्र
१४. अंगाई
१५. एक इच्छा
१६. अश्रु दे तुं
१७. शुभ्र रुमाल इवला
१८.सज्जन
१९. वाट
२०. एक
२१. एक पक्षी
२२. ह्ट्ट
२३. उंट
२४. पाणी
२५. गाणें
२६. उत्सव
२७. नातें
२८. छोटे
२९. तू नको
३०. आम्ही पुण्यवंत
३१. पूजा
३२. अहेवपण
३३. विमानउतुंग
३४. देहत्व
३५. वेचुं ये गोवऱ्या
३६. विजेच्या वितींनी
३७. दुभंगता ऊर
३८. मूळ भिंतिंचे
३९. जन्म नि मृत्यू
४०. कधी तो कधी मी
४१. पूर
४२. केवळ वास
४३. नुस्ती
४४. पाषाण
४५. मायदुधउष्ठे ओठ
४६. पान पडतांच
४७. ऊर भरू येतां खोल
४८. घर
४९. मन
५०. झरा
५१. कडेलोट
५२. पावरी
५३. शांताकार
५४. मी आणी मी  
५५. चंद्र : सोहळा
५६. चंद्र : व्यथा
५७. नुस्तीं नुस्तीं रहातात
५८. सूर
५९. स्वगत
६०. जुनें गाणें
६१. एकाचा मृत्यु
६२. चौफेर बंद

निराकार


पाथेय


कुसुमाग्रज

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.


कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कविता संग्रह
जीवन लहरी(१९३३)
जाईचा कुंज (१९३६)
विशाखा (१९४२)
समिधा ( १९४७)
किनारा(१९५२)
मेघदूत(१९५६)
मराठी माती (१९६०)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)
वादळ वेल (१९६९)
रसयात्रा (१९६९)
छंदोमयी (१९८२)
मुक्तायन (१९८४)
श्रावण (१९८५)
प्रवासी पक्षी (१९८९)
पांथेय (१९८९)
माधवी(१९९४)
महावृक्ष (१९९७)
चाफा(१९९८)
मारवा (१९९९)
अक्षरबाग (१९९९)
थांब सहेली (२००२)

निबंध संग्रह
आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद(पुस्तक) - लघुनिबंध संग्रह

नाटक
दूरचे दिवे
दिवाणी दावा
आमचं नाव बाबुराव
वैजयंती
नाटक बसते आहे
बेकेट
आनंद
राजमुकुट
देवाचे घर
एक होती वाघीण
मुख्यमंत्री
वीज म्हणाली धरतीला
ऑथेल्लो
विदूषक
जेथे चंद्र उगवत नाही
दुसरा पेशवा
कौंतेय
ययाति देवयानी
नटसम्राट

कथासंग्रह
फुलवाली
काही वृद्ध काही तरुण
सतारीचे बोल
अपॉईंटमेंट
बारा निवडक कथा

कादंबरी
वैष्णव
जान्हवी
कल्पनेच्या तीरावर

आठवणीपर
वाटेवरच्या सावल्या(पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)

लिंबोळ्या

समर्पण
घाटमाथ्यावर
स्वप्न
मैत्रिणी
पुनरागमन
उशीर उशीर
उत्कंठा
पुष्पांचा गजरा
 जकातीच्या नाक्याचे रहस्य
 वेळ नदीच्या पुलावर
बालयक्ष
आजोळी
आजोबा
 डराव डराव
मागणे
बगळे
माझी बहीण
बाजार
मेघांनी वेढलेला सायंतारा
मानवीं तृष्णा
बहरलेला आकाश-लिंब
विचारविहग
 भटक्या कवी
वेताळ
नांगर
इंफाळ
गस्तवाल्याचा मुलगा
रानफुले
सोनावळीची फुले
प्रचीति
ते आम्ही
दूर दूर कोठे दूर
हे स्वतंत्र भारता
गुरुवर्य बाबूरावजी जगताप
अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे
त्रिपुरी पौर्णिमा
कागदी नावा
ध्येयावर
प्रतिभा
जाईची फुले
लिंबोळ्या
प्रभो मी करीन स्फूर्तीने कूजन
किती तू सुंदर असशील
विराटस्वरुपा, ब्रम्हाण्डनायका
कोण तू?
लाडावले पोर
हवा देवराय, धाक तुझा
उजळेल माझे जीवन-सुवर्ण
घरातच माझ्या उभी होती सुखे
तुझी का रे घाई माझ्यामागे ?
तुझ्या गावचा मी इमानी पाटील
देव आसपास आहे तुझ्या
देवा, माझे पाप नको मानू हीन
सर्व हे नश्वर, शाश्वत ईश्वर
अपूर्णच ग्रंथ माझा राहो
कळो वा न कळो तुझे ते गुपित
देवा, तूच माझा खरा धन्वंन्तरी
 नका करु मला कोणी उपदेश
वाळवंटी आहे बाळ मी खेळत
चिमुकले बाळ आहे मी अल्लड
सुरेल वाजीव बन्सी पुन्हा
कोण माझा घात करणार ?
केव्हाची मी तुझी पाहताहे वाट
प्रभो, तुझ्या एका मंगल नामात
कोण मला त्राता तुझ्यावीण ?
कृतज्ञ होऊन मान समाधान
वल्हव वल्हव प्रभो, माझी होडी
यापुढे मी नाही गाणार गार्‍हाणे
आता भीत भीत तुला मी बाहत
बाळ तुझे गेले भेदरुन भारी
वसुंधरेवर खरा तू मानव
भयाण काळोखी एक कृश मूर्ति
पाउलापुरता नाही हा प्रकाश
सांगायाचे होते सांगून टाकले
उत्तम मानव वसुंधरेचा हा
युगायुगाचा तो जाहला महात्मा
 हरे राम ! किती पाहिला मी अंत
स्वातंत्र्य म्हणजे ईश्‍वराचे दान
फार मोठी आम्हा लागलीसे भूक
आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी
आता हवे बंड करावया
कोटिकोटि आम्ही उभे अंधारात
परदेशातून प्रगट हो चंद्रा
अरे कुलांगारा, करंटया कारटया
आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र
तोच का आज ये सोन्याचा दिवस ?
जगातले समर्थ
नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात
दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा
हे फिरस्त्या काळा
संस्कृतीचा गर्व
असा तू प्रवासी विक्षिप्त रे
रामराज्य मागे कधी झाले नाही
आई मानवते
मानवाचा आला पहिला नंबर
जातीवर गेला मानव आपुल्या
अभागिनी आई
आरंभ उद्यान, शेवट स्मशान
आता भोवतात तुमचे ते शाप
यंत्रयुगात या आमुचे जीवित
अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी
असे आम्ही झालो आमुचे गुलाम
मार्ग हा निघाला अनंतामधून
कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र
माउली
जुनेच देईल तुज तांब्यादोरी
निसर्ग
महात्म्याची वृत्ति आपुल्या पावित्र्ये
धन्य नरजन्म देऊनीया मला
दूर कोठेतरी
माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो !
क्षितिजावरती झळक झळक !
फार थोडे आहे आता चालायचे !
शिशिराचा मनी मानू नका राग
आपुले मन तू मोठे करशील
कुणी शिकविले
लुटा हो लुटा
खरा जो कुणबी
चाळीसाव्या वाढदिवशी
कुटुंब झाले माझे देव
वाटसरू
शुद्ध निरामय
सहज
स्वप्न
एकतारी
पाखरास
पिंजरा
अपराध
नाटकी मी
आई
तुमच्या प्रेमाची हवी मला जोड !
नाही मज आशा उद्याच्या जगाची !
सांत्वन
तिळगूळ
आता निरोपाचे बोलणे संपले
बळ
नाहीतर उरी फुटशील !
कुर्‍हाडीचा दांडा
उमर खय्यामा
गायक

ग. ह. पाटील


गर्भरेशीम

१. तुझ्या केतकी रंगांत
२. अडाणी
३. प्रळ्याच्या पैल
४. मऊ रेशमाची घडी
५. डोंगरावरी गांव

चंद्रमाधवीचे प्रदेश


रंग माझा वेगळा


संदीप खरे


मौनाची भाषांतरे


सुरेश भट

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते.


काव्यसंग्रह

एल्गार
झंझावात
रंग माझा वेगळा
रसवंतीचा मुजरा
रूपगंधा
सप्तरंग

ग्रेस

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७; - २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते.


संध्याकाळच्या कविता

 संध्याकाळच्या कविता हा सुप्रसिद्ध मराठी कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांचा १९६७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे.

एकूण सहा काव्यगुच्छांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे. आषाढबन, चंद्रधून, मरणगंध, स्मरणशिल्प, ऊर्मिलेच्या कविता आणि बर्फाच्या कविता हे संग्रहातील काव्यगुच्छ आहेत. संध्याकाळी, सूर्य अस्ताला जात असताना निसर्गात उठणाऱ्या रंगतरंगांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कविता मानवी दुःखाचे अपूर्व चित्रण करतात आणि जड व चैतन्याच्या संगमावर तरळणाऱ्या संधिप्रकाशात इंद्रियगोचर सृष्टीपलीकडील अज्ञात प्रदेशाच्या लोभस खुणाही दाखवितात. या संग्रहात स्वतः कवीने पुस्तकाच्या अखेरीस दिलेल्या कालक्रमानुसार 'रंग' (जानेवारी १९५८) ते 'रंगास्त' (नोव्हेंबर १९६५) अशा सुमारे ८० कविता समाविष्ट आहेत.

१. आषाढबन
२. रंग
३. उखाना
४. ओळख
५. हळवी
६. पहांट
७. आकाश
८. हिमगंध
९. निर्मिती
१०. पाउले
११. पार्श्वभूमी


पांढर्‍या शुभ्र हत्तींचा
वाट

तो प्रवास सुंदर होता

आकाशतळी फुललेली
मातीतिल एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी ?

तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती

सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधुनी
गीतांचे गेंद उदेले

पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदणे होते


कवी - कुसुमाग्रज

जात्यावरील ओव्या

न्हाननी माझा घर,
सप्या लोट्यांनी दिसे थोर.
कापसाच्या गादयेवर
पटी वाचिता माझो बाळ.
दारातले केळी,
वाकडा तुझा बौण
नेणता तान्हा बाळ
शिरी कंबाळ त्याचा तौण
जायेच्या झाडाखाली,
कोण निजलो मुशाफिर,
त्याच्या नि मस्तकावर,
जायो गळती थंडगार,

गौरी पुत्र गजानन

गौरी पुत्र गजानन देवात महान हा शिवपुत्र गजानन देवातं महान , मंगल मंगल बोला मंगल मंगल ॥धृ॥
मुगुटाला हिरे शोभे रत्‍नजडितांचे , कानात कुंडल तेज पडे सुर्याचे, हो पडे सुर्याचे, गणपतीच्या गळ्यामध्ये शोभे पुष्पमला ॥१॥
गणपतीच्या भाळी शोभे केशराचा टिळा पिवळा पितांबर कटी शोभुनी दिसला पायात पैंजण आवाज रुणझुण झाला ॥२॥
शमी पत्री दुर्वा हरळी आवड मनाची सर्वांगी उटी शोभे लाल शेंदुराची , हो लाल शेंदुराची,पुढे गुळ खोबर्‍याचा नैवेद्यदाखविला ॥३॥
सोन्याच्या सिंहासनी गणेश विराजला, शारदा सरस्वति दोन्ही बाजुला , शांताने हा गणपति हृदयी ध्यानिला ॥४॥

उषा

होतो पुस्तक घेउनी सहज मी दारात त्यांच्या उभा,

बाला तोंच समोरूनी कुणीतरी आली त्वरेने पुढे

वार्‍याने उडुनी पुनःपुनरपी चंद्रास जे झाकिती

मागे सारित-सांवरीत पदरा-ते मोकळे कुंतल,

किंचित हासूनि बोलली मजसि ती अस्पष्ट काही तरी,

किंवा स्पष्ट असेल ते, समजले माते न तेव्हा पण;

होतो स्तब्ध तसाच मी, मजकडे डोळे तिचे लागले;

त्यांचे तेज खुले मुखावरी; रवी जाताच खाली जरा

त्याची मावळती प्रभा पसरूनी रंगे जशी वारूणी,

गोर्‍या, नाजुक या तनूवर तशी शोभे छटा तांबुस;

नाही पार्थीव भाव ज्यास शिवले, स्वर्गीय जे शैशव

त्याची ही रमणीय मूर्तिच उभी माझ्याकडे राहिली.

मी त्यानंतर पाहिले नच तिला,-वर्षे किती लोटली?

चित्ताच्या क्षितीजावरून परि ती नाही उषा लोपली.


- ग.त्र्यं.माडखोलकर

बायको आपल्या नव-याला म्हणते....
बायको : खिडकीला पडदे लावा......
नवीन शेजारी मला नेहमी लपून पाहण्याचा प्रयत्न करतो....
नवरा : एकदा त्याला नीट पाहून घेऊ दे....
तो स्वतःच त्याच्या घराच्या खिडकीला पडदा लावेल....

शेणाची चव

एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते....
"अगं ए बाई..हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण?"
.
.
.
.
.
सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते....
ती लगेच म्हणते,
"अरे देवा! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय....!!

तुझे रुप नेत्री पाहता

तुझे रुप नेत्री पाहता ध्यान लागले रे ॥धृ॥

युगे अठ्ठावीस उभा विटेवरी पुंडलिकासाठी बससी अजूनी भीमातीरी ।
भावभक्ति पाहूनी ज्याची त्यासी उद्धरी रे ॥१॥

समचरण सुंदर कासे पिवळा पिंताबर । कर ठेवोनिया करी उभा राहे विश्‍वंभर ।
रुप सावळे ते माझ्या नयनी साठले रे ॥२॥

भाळी कस्तुरीचा टिळा तुळशी हार शोभे गळा तुरा तुळशीचा शोभे बुक्का वाहु घननीळा ।
लिंबलोण उतरु माझ्या सावळा विठ्ठला ॥३॥

जनाबाई सखूबाई उद्धरीली बहिणाबाई ज्ञानदेव चोखामेळा उद्धरीला तुक्याही चरणी ठाव देई तुझीया याच पामरा रे ॥४॥
चौदेहांची घेऊनी दीक्षा ।
आम्ही मागू कोरान्न भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्ष ।
प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
देही असून होऊ विदेही ।
कामक्रोध बांधू पायी ।
आशा मनिषा करु दिशा दाही ।
मदमत्सर उडवू भाई ॥२॥
प्रपंचाची लावूनी राख ।
तोडू जन्ममरणाचा पांग ।
एका जनार्दनी अनुराग ।
अक्षय संग संताचा ॥३॥
बाळ संतोष बाबा ॥

आम्ही परात्पर भिकारी ॥
वेगे आलो संताद्वारी ।
द्या मज भक्‍तीची भाकरी ।
म्हणूनी नाचतो नामगजरी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
युगे अठ्ठावीसांचा जोगी ।
विभूति चर्चित सर्वांगी ।

गळा अनुपम्य शैली शिंगी ।
वाजती सो हं शब्दजगी ॥२॥
त्राहे त्राहे त्राहे त्राही ।
हे तो नमगे मी काही ।
एका जनार्दनाचे पायी ।
काया वाचा मन राही ॥३॥

मथुरेच्या बाजारी

गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी .
दही  दुधान  भरा  घागरी.
अन   गौळणीनो  जाऊ , मथुरेच्या  बाजारी ,

लवकर  चला,
बाई बिगी  बिगी  चला,
नाहीतर  अडवेल नंदाचा  हरी .
गौळणीनो जाऊ, मथुरेच्या  बाजारी,

अवघड  घाट,
बाई  दूर  यमुनेचा  काठ.
बाई  पकडेल   कान्हाची  स्वारी.
गौळणीनो जाऊ  ,मथुरेच्या  बाजारी.

आला  जवळ  फार,
बाई  मथुरेचा  बाजार.
चला  गाठेल  हरीची  बासरी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी ,

मनास  माझ्या  चैन  पडेना .
कुठे  पाहू  मज  दर्श  घडेना.
ऐकून  माझ्या  हाक  अंतरीची.
ऐकू  दे  तान  तुझ्या  बासरीची.

लवकर  चला,
बाई बिगी  बिगी  चला ,
बाई  मारू  हरी  नामाची  ललकारी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी.

भवानी

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

दादला

मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

भूत

भूत जबर मोठे ग बाई ।
झाली झडपड करु गत काई ॥१॥

सूप चाटूचे केले देवऋषी ।
या भूताने धरिली केशी ॥२॥

लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥३॥

भूत लागले नारदाला ।
साठ पोरे झाली त्याला ॥४॥

ऊत लागले ध्रूवबाळाला ।
उभा अरण्यात ठेला ॥५॥

एकाजनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥६॥  






रचनाकर्ते - संत  एकनाथ

विंचू

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥

पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥

मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥

ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥

सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

नाथाच्या घरची

नाथाच्या घरची उलटी खूण ।
पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥

आंत घागर बाहेरी पाणी ।
पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥

आजी म्या एक नवल देखिले ।
वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥

शेतकऱ्याने शेत पेरिले ।
राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥

हांडी खादली भात टाकिला ।
बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥

एकाजनार्दनी मार्ग उलटा ।
जो तो गुरुचा बेटा ॥६॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

संसार

सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥
संसार करिता शिणले भारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥
संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कैशी ॥४॥
संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥
एकाजनार्दनी संसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

जोगवा

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥

नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥

पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥

ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ

जोशी

तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

बहिरा

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥

 नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥

नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥

माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

मुका

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥

होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥

जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।
निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥

साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली ।
तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ

एडका

एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥

धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्रचंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥

धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥२॥

भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी ।
विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला जेणे । तो केवळ पंचानन ॥३॥

शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी ।
एकाजनार्दनी चरणी । बांधिला जेणें । तो केवळ पंचानन ॥४॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

फकिर

हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ल। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

वाघ्या

अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी ।
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥

मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥

इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।
बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥

आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।
एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ

रामाचा पाळणा

जोजोजोजो रे कुलभुषणा ॥ दशरथनंदना ॥
निद्राकरिबाळा ॥ मनमोहनारामालक्ष्मणा ॥ धृ० ॥

पाळणा लावियेला अयोध्येंसी ॥
दशरथाचे वंशीं पुत्र जन्मले हृषिकेशी ॥
कौसल्येचे कुशीं ॥ १ ॥

रत्नजडीत पालख ॥ झळके अमोलिक ॥
वर ते पहुडले कुळदीप ॥ त्रिभुवननायक ॥ २ ॥

हालवी कौसल्या सुंदरी ॥ धरूनी हस्तीं दोरी ॥
पुष्पे वर्षती सुरवर ॥ गर्जति जैजैकार ॥ ३ ॥

विश्वव्यापका रघुराया ॥ निद्रा करि रे सखया ॥
तुजवरी कुरवंडी करूनिया ॥ सांडिन आपुली काया ॥ ४ ॥

येउन वसिष्ट सत्वर ॥ सांगे जन्मांतर ॥
राम परब्रह्म साचार ॥ सातवा अवतार ॥ ५ ॥

याग रक्षुनियांअबधारा ॥ मारुनि निशाचरा ॥
जाईल सीतेच्या स्वयंवरा ॥ उत्धरि गौतमदारा ॥ ६ ॥

परणील जानकीस्वरूपा ॥ भंगुनियां शिवचापा ॥
रावण लज्जित महाकोपा ॥ नव्हे पण हा सोपा ॥ ७ ॥

सिंधूजलडोहीं अवलीला ॥ नामें तरिली शिळा ॥
त्यांवर उतरूनी दयाळा ॥ नेशी वान्नरमेळा ॥ ८ ॥

समुळ मर्दुनी रावण ॥ स्थापिला बिभीषण ॥
देव सोडविले संपूर्ण ॥ आनंदेल त्रिभुवन ॥ ९ ॥

ऐशीं चरित्रे अपार ॥ करील मनोहर ॥
इतुकें ऐकोनी ॥ उत्तरा राहिलें रघुवीर ॥ १० ॥

रामभावाचा भुकेला ॥ भक्ता अधिन झाला ॥
दासविठ्ठले ऐकिला ॥ पाळणा गाईला ॥ ११ ॥

जाणिव

सांध्यरसाने रंगत रंगत
वाहत होता कोमल वारा
अवकाशाचे अंतर उजळत
उमटत होती एकच तारा

तू आणिक मी बसून तेथे
बोलत होतो सहजच काही
सहजच सारे वाटत नव्हते
त्या दिवशी पण तुला मलाही

उमजत नव्हते हे की ते वा
ती तर सजणे; होती प्रीती
होती प्रीती; परंतु तेव्हा
जाणिव नव्हती, जाणिव नव्हती!

दैवगतीने वाहत वाहत
अनेक वर्षांनंतर सजणी
असेच आलो, बघ अनपेक्षीत
आपण दोघे एक ठिकाणी!

पुन्हा तू नि मी बसलो येथे
बोललीस तू, मी पण काही
सहजच वाटत नाही पण ते
आज खरोखर तुला मलाही

अजाण होतो मागे आपण
नव्हती जाणिव होती प्रीती
उरली आहे आज, सखे पण
जाणिव नुसती, जाणिव नुसती !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तूंच भिला तर

कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसला आहे तो मृत

कर हिरिरीने अन त्वेषाने
आवेशाने उंच तुझा स्वर
गगन धरेला कंपवून तू
प्रतिरोधाचे आवाहन कर

चिडून आता तुझ्या सकलही
शक्तीने अन या दुष्टांवर
न घाबरता न चळताना
घाल तुझा हा घाव अनावर

भिऊ नको रे! तूच भिला तर
बुडेल लवकर जग हे सारे
हे होतीलच विजयी दुर्जन
अगणित सज्जन अगतिक सारे

तूच भिला तर या जगतावर
दिसेल सत्यच खोट्यावाणी
तूच भिला तर कपटी खोटे
ख-याप्रमाणे म्हणेल गाणी

तूच भिला तर बघ वाढेलच
मत्त खळांची रुधिरपिपासा
विश्वजयाची खळ अधमांची
न शमणारी दुष्ट दुराशा

सत्य पुकारत झगडत झगडत
हाका मारत जागोजागी
ही चिरनिद्रा जगदांतर्गत
नीतिमती कर सत्वर जागी

कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसला आहे तो मृत


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

देवधर्म

तुला न कळले, मला न कळले, तरी वाढली प्रीत अशी
चंद्रकोर शुद्धात जशी!

हळूहळू हळुवार सख्या, तू प्रेमबोल लागला म्हणू
सारंगीचे सूर जणू!

भिरभिर फिरते प्रीत आतली, प्राणसख्या अनिवार अशी
आभाळावर घार जशी!

मनांतले अन जनातले हे दुवे, सख्या, जुळतील कधी?
सांग मळे फुलतील कधी?

मलाही कळते सगळे पण हे मन होते भयभीत तरी
कशी त्यजू जनरीत तरी?

तशात आहे मी कुलवंता पापभीरु सुकुमार अशी
देवधर्म सोडूच कशी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हसेल रे जग

लगबग लगबग
लगबग लगबग
चल लगबग, साजणा!

फारच आता उशीर झाला
लवकर ने परत घराला
करते तगमग
करते तगमग
चल लगबग, साजणा!

घाबरले मी: झाकड पडली
वीज तश्यातच वर कडकडली
झगमग झगमग
झगमग झगमग
चल लगबग, साजणा!

सूडच साधत वै-यावाणी
थयथय नाचत आले पाणी
मी भिजते, बघ
मी भिजते, बघ
चल लगबग, साजणा!

तूच चुकविली वाट खरोखर
उगाच आले तुझ्या बरोबर
हसेल रे जग
हसेल रे जग
चल लगबग, साजणा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नील जलांनो!

ओसाड दऱ्यांतून वहा, नील जलांनो !
रानातच हसून फुला, रानफुलांनो
प्राशून पुराणी मदिरा धुंद रुपेरी
अज्ञात विदेशात फिरा ,चंद्रकलांनो

सौंदर्य, उषे, झाक तुझ्या रम्य तनुचे !
हे रंग, ढगांनो, लपवा इंद्रधनुचे
हे सर्व तुम्ही दूर रहा, दूर रहा, जा !
पापीच निघाले सगळे पुत्र मनुचे

आचार विरोधी सगळे जाचक यांचे
हेतूच मुळाशी सगळे घातक यांचे
यांना नसते कोमलता वा ममताही
जाळील जगाला सगळ्या पातक यांचे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

किती उशीर हा !

किती उशीर हा, किती उशीर हा !

हा प्रणयकाळ ठेपलाच शेवटी;
पाचळा जळून ही विझून शेगटी -
राहिला इथे असा उदास गारवा
किती उशीर हा, किती उशीर हा !

आस सारखी धरून वाट पाहिली
आटली अखेर, हाय, उर्मी आतली !
आज धावलीस तू धरून धीर हा
किती उशीर हा, किती उशीर हा !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आलीस कशाला?

आलीस कशाला, गऽ,
आलीस कशाला !

चाहूल मलाही,
कळली पण नाही :
बगिच्यातच माझ्या, गऽ, शिरलीस कशाला?

दावून शहाणे
लटकेच बहाणे
जवळून जराशी, गऽ, फिरलीस कशाला?

कलवून फुलारी
जमिनीवर सारी
सांडून फुले तू, गऽ, लवलीस कशाला?

म्हटलेस दिवाणे
मधुसूचक गाणे ;
लडिवाळपणाने, गऽ, हसलीस कशाला?

परतून अखेरी
गेलीस, किशोरी!
हृदयातच, पोरी गऽ, उरलीस कशाला?

आलीस कशाला, गऽ,
आलीस कशाला !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ना. घ. देशपांडे

नागोराव घनश्याम देशपांडे (ऑगस्ट २१, इ.स. १९०९ - इ.स. २०००) हे मराठी कवी होते.

काव्य संग्रह
१. शीळ (इ.स. १९५४)
२. गुंफण (इ.स. १९९६)
३. खूणगाठी (इ.स. १९८५)
४. कंचनीचा महाल (इ.स. १९९६)
५. अभिसार (इ.स. १९६३)

शीळ

१. शीळ                                     २९. पिसाट मन                       ५६. नेमके परत जाताना
२. कंचनी                                  ३०. समाधि                             ५७. कशाला, सखू, रुसावंऽ तरी
३. निद्रा                                    ३१. अजून                                ५८. धनगरी गाणे
४. तुझ्यामाझ्यात गंऽ!              ३२. आता सुटला धीर!               ५९. पुन्हा
५. तळमळ                               ३३. म्हणूं दे, ह्रदया                    ६०. कोण, कुठे आहेस तरी
६. तुम्ही                                   ३४. माझी गाणी                        ६१. साद ही नाही तुम्हाला
७. मालन                                  ३५. रंकाची राणी                       ६२. उत्कंठा
८. सुगी                                     ३६. आता                                  ६३. अर्पण
९. ये शेवटी तरी तू                     ३७. जीवनकथा                         ६४. जीवनाचे गाणे 
१०. ओसाडीत बसून                  ३८. नदीकिनारी                        ६५. काल, आज आणि उद्या
११. येशील का रे?                      ३९. आज जाऊ दूर रानी             ६६. असाच
१२. इशारा                                ४०. एक वेळी                             ६७. काळ्या गढीच्य जुन्या
१३. तुझ्यासाठी                         ४१. त्याला नाही कदर                ६८. वाटते लाज रे!
१४. ये जरा जवळ, राजसे गऽ!   ४२. पावसाळा                            ६९. माझी गाणी            
१५. सखू                                   ४३. तुला किनी गऽ                     ७०. चिरलांच्छित ही आपुलकी!
१६. मोटकरी                             ४४. सांज हसली !                       ७१. जाणीव
१७. उन्मनी                              ४५. हे जीवन                              ७२. तूच भिला तर
१८. मी आले लडिवाळ              ४६. तुटू दे!                                  ७३. देवधर्म
१९. किशोरी                             ४७. चुकलेले कोकरु                     ७४. हसेल रे जग
२०. कधी व्हायचे मीलन?          ४८. प्रेमपीठ                                ७५. नील जलांनो      
२१. या रामपहारी                      ४९. किती                                   ७६. किती उशीर हा!
२२. गरगरा फिरे भिंगरी            ५०. खरी प्रीती                              ७७. आलीस कशाला?
२३. अपमृत्यू                            ५१. राजसा, आता                        ७८. कुणकूण
२४. रानराणी                            ५२. ती कळी आणि ती साखळी     ७९. नको येऊ तू
२५. सुंदरता                              ५३. हुरहूर                                    ८०. कधी रे आता?
२६. मनोगत                             ५४. ओढ                                      ८१. नाही आनंद पाहिला
२७. फुला रे                               ५५. फार नको वाकू                      ८२. तू!
२८. कदाचित                                     

कुणकुण

वाळली सारी फुले, उरला तरी पण वास हा
लोपली वनदेवता, पण राहिला वनवास हा

पालवी झडली, तरी उरले जुने पण पान हे
गाव ते उठले, तरी उरले अजून वसाण हे

अग्नि तो विझला जरी, निघतो तरी पण धूर हा
वेदना सरली जरी, सुकतो तरी पण नूर हा

घोर वादळ संपले, पण राहिली हूरहूर ही
चंद्रिका विझली, तरी उरलीच रात्र निसूर ही

वाद ते मिटले, तरी पण राहिलेत विषाद हे
साद ओसरले तरी पण राहिले पडसाद हे

घाव तो बुजला जरी, उरली तरी पण खूण ही
ते रहस्यच लोपले, पण राहिली कुणकुण ही


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

जेव्हा कोनी शेपूट घालून वागेल...

जेव्हा त्यांना ठार मारले जात होते,
तेव्हा माझे मन स्वार्थी बनले होते.
जेव्हा ते जवान शहीद झाले होते,
तेव्हा मी ते गोड भोजन केले होते.

जेव्हा त्यांची शहीद माय रडत होती
तेव्हा माझी माय भांग पडत होती.
जेव्हा तो पिता सहारा शोधात होता,
तेव्हा माझा बाप सिगारेट पीत होता.

जेव्हा त्यांची ती पोरं रडत होती,
तेव्हा माझी पोरं जीने चढत होती,
जेव्हा त्यांची बायको कुंकू पुसत होती.
तेव्हा माझी उंची साडी नेसत होती.

जेव्हा त्यांची सरने जळत होती,
तेव्हा आमची धोरणे जुळत होती.
जेव्हा त्यांची चूल विझली होती,
तेव्हा आमची मटने शिजली होती.

जेव्हा ते राखेतून उभे रहात होते,
तेव्हा माझे दरवाजे पोखरले होते.
जेव्हा ते मजबूत उभे राहिले होते,
तेव्हा माझे मदतीचे दोर कापले होते.

जेव्हा आता माझा बंगला जळतोय,
तेव्हा तो मला दहशतवाद कळतोय.
जेव्हा आता मी मोठ्याने रडतोय,
तेव्हा मी कायम पायात लोळतोय.

जेव्हा आता माझी मस्ती गेलीय,
तेव्हा शहिदांची आठवण आलीय.
जेव्हा त्यांच्या मदतीला गेलो असतो,
तेव्हा मी आता ठार मेलो नसतो.

जेव्हा जेव्हा सैनिकांना मदत लागेल,
तेव्हा सांगतील तसे कोणीही वागेल.
जेव्हा कोनी शेपूट घालून वागेल,
तेव्हा तो समजा सरनाला लागेल.


कवी - सुभाष सोनकांबळे

विशाखा

१.  दूर मनो~यात                          २१.  सहानुभूती                    ४१.  ध्यास
२.  हिमलाट                                  २२.  सात                            ४२.  निर्माल्य
३.  स्वप्नाची समाप्ति                   २३.  माळाचे मनोगत          ४३.  जीवन लहरी
४.  ग्रीष्माची चाहूल                        २४.                                    ४४.  पावनखिंडीत
५.  अहि नकुल                              २५.  उमर खैयाम                ४५.  सैगल
६.  किनार्‍यावर                             २६.  विजयोन्माद               ४६.  कुतूहल    
७.  अवशेष                                    २७.  शेवटचे पान               ४७.  अससी कुठे तू
८.  मातीची दर्पोक्ति                      २८.  उष:काल                     ४८.  भक्तिभाव      
९.  गोदाकाठचा संधिकाल              २९.  तू उंच गडी राहसी        ४९.  नेता   
१०.  स्मृति                                   ३०.  प्रीतीविण                    ५०.  बालकवी
११.  जालियनवाला बाग               ३१.  नदीकिनारी                 ५१.  वनराणी
१२.  जा जरा पूर्वेकडे                     ३२.  पाचोळा                       ५२.  देवाच्या दारी १
१३.  तरीही केधवा                        ३३.  बंदी                             ५३.  देवाच्या दारी २
१४.  मूर्तिभंजक                           ३४.  आव्हान                       ५४.  देवाच्या दारी ३
१५.  कोलंबसाचे गर्वगीत              ३५.  बायरन                        ५५.  टिळकांच्या पुतळ्याजवळ
१६.  आस                                    ३६.  प्रतीक्षा                         ५६.   समिधाच सख्या या
१७.  बळी                                     ३७.  आश्वासन                                   
१८.  लिलाव                                 ३८.  प्रकाश-प्रभू                                
१९.  पृथ्वीचे प्रेमगीत                    ३९.  मेघास 
२०.  गुलाम                                  ४०.  भाव कणिका 

नको येऊ तू!

नको येऊ तू:
कारण की ही सुकली सुमने;
सुगंध सारा ओसरला गऽ !
झाडावरली झडली पाने,
कोकीळ गीतच विस्मरला ग!
नको येऊ तू !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कधी रे आता?

राजसा माझ्या
प्रीतीनंऽ येशील
मला तू हौशीनं घेशील
- कधी रे आता ?

अंगणी लावू
तुळशीच्या पंक्ती
सख्या रे! लावू शेवंती!
- कधी रे आता ?

पडावे राया
दो पैसे गाठी
निघावं बाजारासाठी!
- कधी रे आता ?

जरीची घ्यावी
तू साडी-चोळी
हसावी मी साधी भोळी!
- कधी रे आता ?

सराव्या केव्हा
या आटाआटी
रुसावंऽ मी गोफासाठी!
- कधी रे आता ?

भरावं राया
मी सारंऽ पाणी
हसावं मी राजसवाणी!
- कधी रे आता ?

अन निगोतीनं
फक्त तुझ्याखातर
सख्या मी भाजावी भाकर!
- कधी रे आता ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नाही आनंद पहिला

नाही आनंद पहिला गऽ
नाही आनंद पहिला!

मेघामधून
गेली निघून
स्वच्छंद चपला गऽ
नाही आनंद पहिला!

झाली सूनी
प्रीती जुनी
निर्व्देव्द विमला गऽ
नाही आनंद पहिला!

माझा तुझा
आता दुजा
मी छंद लिहिला गऽ
नाही आनंद पहिला!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तू !

निम्न्गोरी अंगकांती, उंच आहे तुझा बांधा
जादुगरी तुझा धंदा.

या बटा आल्या कपाळी, मुक्त काळी तुझी वेणी;
सौम्यासाधी तुझी लेणी.

या उभारी भोवयांची रम्य जोडी उभी काळी;
रम्य कुंकू तुझ्या भाळी.

आदराचे सौम्य हसू आणि नाही बरे भोळे;
भावगर्भी तुझे डोळे.

भाषणे अत्यंत साधी अर्थ नाही तरी साधा!
तू जणू की सखी राधा!

सप्त सुरांची, जनानी मंजुळे गऽ, तुझी प्रीती !
सप्तरंगी तुझी प्रीती !!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ