पोपट आणि ड्रायव्हर !

एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले



कवी - कुसुमाग्रज
(वीज म्हणाली धरतीला)

राष्ट्रपिता

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.

नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.

त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.

हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले. लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?"
गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात?"

हदग्याच्या एखाद्या पावसात

हदग्याच्या एखाद्या पावसात
उलगून जाते विस्मरण
आणि नादावल्या काळाचे अंगण पुन्हा दिसू लागते
पाय नाचू लागतात
जुनी हरवलेली गाणी मिळतात
आभाळाच्या हत्तीभोवती फेर धरण्याइतके
पुन्हा लहान होतो आपण
हातावर टेकवलेली खिरापत, तसे हसावे कुणी
आणि गोड व्हावा सरता दिवस
असे आपसूक मिळतात सुखाचे क्षण
सगळ्या भवतालावरचा बाळविश्वास
नकळत आपल्यात रुजून मोठा झालेला दिसतो पुन्हा
आणि करावासा वाटतो परत एकदा
आभाळाएवढ्या आयुष्याभोवती फेर धरत
आतबाहेर चिंब भिजण्याचा सचैल गुन्हा


कवियत्री - अरुणा ढेरे

आधार

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.

ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्‍यासारखा
शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.

जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.

सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
रमेश : माझ्या प्रेयसीने अशी मागणी केली ज्यामुळे मी तिला सोडून दिले .
दिनेश : पण तिची मागणी तरी काय होती ?
.
.
.
... .
.
.
.
.

रमेश : लग्नाची !

निरोप

बाबा रे,

निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?

कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !

असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारी, जशी गुलबशी

ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.

म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हण, एवढेच पुरे.


कवियत्री - अरूणा ढेरे

सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !


कवयित्री - पद्मा गोळे

फुकटात केस कापुन

एक माणुस मुलाला घेऊन सलुन मध्ये गेला. स्वता:चे केस कापुन घेतल्यावर तो दुकानदाराला म्हणाला, "मी पंधरा मिनटात येतो. तो पर्यंत याचे केस मस्त कापुन ठेव."

दुकानदाराने मुलाचे केस कापुन ठेवले. दोन तास झाले तरी तो माणुस परत आला नाही. दुकानदार त्या मुलाला म्हणाला, "अरे बाळा, तुझ्या बरोबर जे गृहस्थ होते ते कुठे गेले? कोण होते ते तुझे ?"

मुलगा म्हणाला, "मला ते कुठे गेले हे माहीत नाही, आणि ते कोण होते हे सुद्धा माहित नाही. मला ते म्हणाला, चल तुला फुकटात केस कापुन देतो. बाकी मला काही माहित नाही."

CCTV चा फायदा

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का...?"

निसर्ग

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श !

हास हास बाई कलिके एकदा

आपुल्या सुगंधा सोड सोड

लडिवाळपणे केल्या गुदगुल्या

परी काही केल्या हासेना ती

तिला फुलवाया हवा रविकर

वायूची लहर खेळकर

व्यर्थ हे करिती गाण्याचा आग्रह

नाही अनुग्रह देवा, तुझा

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श

गाईन सहर्ष वाडेकोडे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अजुनी चालतोचि वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा


कवी - ए.पां.रेंदाळकर

दत्ताचा पाळणा

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.


कवी - कुसुमाग्रज

कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

एकाकी

’तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?


कवियत्री - शांता शेळके

पालखीचे भोई

पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

ती माणसेच होती..!

ती माणसेच होती..!
देहाविना जळाली..ती माणसेच होती..
पुन्हा फुलून आली..ती माणसेच होती..!!

गोळी समोर छाती देण्यात अर्थ नाही --'
...हे सांगुनी पळाली..ती माणसेच होती..!!

फासावरी खुन्यांना देवू नका परन्तू--
ज्यांची शिकार झाली..ती माणसेच होती..!!

माझा तुझ्या लढ्याशी संबंध काय येतो ?
...ऐसे मला म्हणाली..ती माणसेच होती..!!

चवचाल उंदरांना साऱ्या बिळात जागा..
जी पोरकी निघाली..ती माणसेच होती..!!

घनदाट पावसाचे केले तुफान वादे..
..अन कोरडी निघाली..ती माणसेच होती..!!

आता कुणाकुणाचे मांडू हिशेब बोला..?
जी आरशास भ्याली..ती माणसेच होती..!!
                                             

कवी - ज्ञानेश वाकुडकर

हा असा पाउस पडत असताना

हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहीजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्शं कसं सारखं तिथेच घोटाळतंय…

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमूक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

शेवटचे पान

आवर पद हे मत्त प्रवासी,

पहा जरा परतून प्रवासी, पहा जरा परतून्

घेत सुगंधाचा मागोसा

अलीपरी आलास विलासा

आणि फुलोरा लुटून जासी नव वेलीवरतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

कलेकलेने चान्द खरोनी

आवस आली माझ्या गगनी

तोच उदेले दोन सुधाकर सुन्दर नयनातून्

प्रवासी, पहा जर परतून्

आणि चान्दणे सवे घेउनी

दुणावुनी तम जासी निघुनी

कशी साहुं रे धुन्द रात ही बाहेरून आतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

क्षणभर येउन क्षणभर राहुन

क्षणभर हांसुन क्षणभर पाहुन

क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालून

प्रवासी, पहा जरा परतून्

वाळवण्टि तू एक पदाती

ना कुणि सोबत ना साङ्गाती

पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन्

प्रवासी, पहा जरा परतून्

परत पाखरा, खन्त कशाला

घालिन तनुची तुला दुशाला

उन्नत माझे ऊर उशाला घोष तुझा ज्यांतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

जाणारच का-सुखात जा तर

बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून्

प्रवासी, पहा जरा परतून्

शेवटले जा पान मिटू दे

सुखेनैव यापुढे तुटू दे-

ह्रदयाचे रेशीम पदी तव बसलेले गुंतून

प्रवासी, पहा जरा परतून्


कवी - कुसुमाग्रज
ठिकाण - पुणे
सन - १९३८

प्रेमयोग

प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....
सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं
प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............


कवी - कुसुमाग्रज
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।

अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।

तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥

आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥

ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥


- संत कान्होबा महाराज
भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥

तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥

माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥

निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥


- संत निवृत्तीनाथ
चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥

चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥


- संत वंका/ संत बंका
सर्व हा गोपाळ भरियेला.
काढले कुटाळ वासना वरळ ।
सर्व हा गोपाळ भरियेला ।।१।।

गेले पै परते शरीर दिसे ।
नाशिवंत भूते दूरी केली ।।२।।

स्थावर जंगम स्थावरिला राम ।
सर्वगत शाम नि:संदेहे ।।३।।

सोपान निवटे परब्रह्म घोटे ।
प्रपंच सपाट निवाटियेला ।।४।।


- संत सोपानदेव

वासुदेव

टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन ।
आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥

रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा ।
द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥

आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास ।
नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥

एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें ।
करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥

नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥




- संत सेनान्हावी
संपवून कामधाम यावें तुझियाजवळ

पापणीशीं झेपलेंलें जरा सारावें जावळ

आवराया बाळचाळे कवळावें दोही हातीं

रागारागावत गाल कुस्करावे भुक्या ओठीं

घ्यावें बळेंच कुशींत गात अंगाई लाडकी

काऊ चिऊंची धाडावी हट्टी झोपेला पालखी !

गंध पाकळींत रात सांजावल्या क्षितिजांत

तशी यावी नीज डोळां रेशमाच्या पावलांत

जड मिटतां पापणी घ्यावें ओढून उबेंत

मायकुशीला लाभावें शिंपपण भाग्यवंत !

मंगलाष्टक

दारी मंडप हा असे सजविला लावुनिया तोरणे
वाद्ये सुस्वर वाजती सुखवती आलाप आवर्तने
येती सर्व सुवासिनी प्रमुदिता लेउनिया भूषणे
आहे मंगल कार्य आज सदनी, "कुर्यात सदा मंगलम

कुणी टाकला डाका

कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे


कवी - चित्तरंजन भट

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?

आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा

"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा


कवी - चित्तरंजन भट

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

पटवती साऱ्या पुरातन ओळखी
कुठुन हे आले नवे माथेफिरू ?

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)


कवी - चित्तरंजन भट

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


कवी - चित्तरंजन भट

शिल्प

जे सांगायचे
ते हवे कसे अगदी घट्ट
बांधेसूद्;
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द,
खुंट्या पिरगाळून
जागच्या जागी सुतंत्र
टांगलेला;
एकंदर ठाण कसे अगदी
वास्तुशिल्पित.
पण मध्येच
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात,
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली
नक्षी वेल्हाळते,
वार्‍याची पताका चित्रावते,
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते
- मनासारखी.
शब्दांना
पटत नाही आपली पहिली ओळख.
ते बिथरतात
भलत्याच खुंट्या धरून बसतात्;
म्हणतात :
आम्हाला एक नवी भाषा
घालून द्या.
मी म्हणतो : हो, हो;
उगाच त्यांना चुचकारीत.


कवी -  पु.शि.रेगे

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज

आधार

चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते….
पुन्हा एकदा सांधते आहे

अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार…



कवि -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

जखमांचं देणं

आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर

सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी

गहाळ झाला

उरलेल्या सहांच्या गळ्यातून

प्रथमच

अनावर हुंदका फुटला

‘ ती असती तर’ – ते उद्गारले,

तो हरवला नसता

मीही अनावरपणे

सातवा चमचा झालो

आणि त्याची रिकामी जागा घेउन

सहांच्या हुंदक्यात

सामील झालो – आणि

पुटपुटलो;

खरं आहे, मित्रांनो

ती असती तर

मी हरवलो नसतो.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

वास्तव

परवाच्या पेपरात एक बातमी वाचली
बातमी:
कालच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले ,
बुडून मेले.

बुडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही पाच तारयांचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम नाही बुडाले

झोपडपट्टीतील एका उघड्या-नागड्या मूलाचे
असे मूल्य ते किती?
साधे गणित येत असेल तर करता येईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच
आणि हे मत तुमचे किंवा माझेच आहे असे नाही
त्याच्या आईचेही तेच असावे

कारण मुलाचे कलेवर मांडीवर घेउन
ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा
एक वार्ता वस्तीवर येऊन कोसळली.
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा घशातच आवरला अर्ध्यावर
मूलाचे कलेवर जमिनीवर टाकून ती उठली
आणी घरातल्या सगळ्या पिशव्या गोळा करुन
बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी.


कवी - कुसूमाग्रज

शिळा

भावनांची कोवळीक
आज गोठुनिया गेली
माझ्या हृदयात तिची
थंडगार शिळा झाली

अंतरीचा घनश्याम
बसून त्या शिळेवरी
वाजवितो कधी कधी
जुन्या स्मृतींची बासरी

ऐकूनही संगीत ते
शिळा निश्चल राहते
शून्य दगडी डोळ्यांनी
संथ सभोती पाहते!


कवियत्री - शांता शेळके
सेवेकरी मुद्रा असों नये बाशी
पहाटेस नेमें कातरावी मिशी

फाइलीची फीत रक्ताहून लाल
बाइलेची प्रीत सेकंदांशीं तोल

नको उमटाया स्तनावर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ

कानाच्या भोकाशीं फक्त लाव फोन
इमानी ठेवावी धडावर मान

अश्रूंनाही म्हण वाळणार घाम
घाल आंतडीचा उरास लगाम

हृदयास म्हण हालणारा पंप
लाळेच्या तारेशी सदा असो कंप

गळ्यांतली वांती गळ्यांत ठेवून
पिंकदाणीतले शब्द घे वेचून

थोरांनी टाकिल्या श्वासां लाव नाक
कण्यासही हवे किंचीतसे पोक

सहीस जाताना मालवावी छाती
भ्रांतींत ठेवाव्या डोळ्यांतल्या वाती

नको पाहूं दूर भ्रमातला प्रांत
तुझ्या पायांसाठी कचेरीची वाट


कवी - आरती प्रभू
- ०७ - ०६ - ६० 

तेव्हा

पहाटेच्या काळोखी फांद्यातून
अवेळी जागलेल्या कोणाएका
कोकिळेने
भ्रमिष्टपणे
दिली भिरकावून आकाशावर
कोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी
चौधारी
पल्लेदार स्वरावळ
नंतर सारं स्तब्ध….
संगमरवरी स्तंभाला टेकून
उभी राहिलेली व्याधाची चांदणी
किंचित हसली,
आणि रुपेरी वस्त्राचे हेम
अलगद उचलून
उतरायला लागली पहिली पायरी
क्षितिजाच्या तळाकडे…..
तेव्हा चारही वाजले नव्हते


कवी -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

प्रवास

क्षितीजाचे तट फोडून धावे
अश्व सनातन मार्गावरती.
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती.

रवी-शशीचे परजीत पलिते
स्वार तयावर बसला आहे.
अश्व न जाणे स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे

कवी - कुसुमाग्रज

न्याय जिवंत झाला! (१९४१)

"मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस!" केशवचंद्र म्हणाले.
"माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा!" भीमा म्हणाला.
"भीमा, जमीन नाही ना देत?"
"कशी द्यायची?"
"द्यायची की नाही ते सांग!"
"नाही, त्रिवार नाही!"
"याद राख! तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!"
"देव काही मेला नाही, केशवबाबा!"
"जेथे सत्ता नि संपत्ती असते तेथे देव असतो, समजलास! देव माझ्या तिजोरीत आहे!"
"माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!"
"बघतो तुला वाचवायला कोण देव येतो ते! हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही न मिळता. आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू तरी काय करशील? ठीक तर!" असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले.
शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता. त्याचे ते लहानसे शेत; परंतु खरेच सोने पिकवी. भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती. त्यानेही दोन-चार कलमे लावली होती. विहिरीच्या कडेला फुलझाडे होती. पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता. भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची. खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते. ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. केशवचंद्रांनी गावातील जवळजवळ सारी जमीन गिळंकृत केली होती. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. पाचाचे दहा झाले, दहाचे शंभर झाले आणि मग ते देणे कधी फिटायचे? शेताचे मूळचे मालक मजूर झाले. अजून हा भीमाच काय तो तेथे स्वाभिमानाने आपल्या शेताचा मालक म्हणून नांदत होता. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. गोडीगुलाबीने भीमा शेत विकतो का ते ते बघत होते; परंतु काही केल्या जमेना. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार? या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.
इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.
"बाबा, आईने घरी बोलावले आहे." ती म्हणाली.
"कशाला ग, पोरी?"
"सावकार आला आहे घरी."
"काय म्हणतो तो?"
"आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.' बाबा, शेत का तुम्ही विकणार?"
"प्राण गेला तरी विकणार नाही. तुझी आई काय म्हणाली?"
"ती म्हणाली, 'त्यांना विचारा.' आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची. ती विकून कुठे जायचे?' "
"शहाणी आहे तुझी आई!"
भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
"साप आहे तो मेला! तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!" तो म्हणाला.
"गावातील सारे शेतमालक मजूर झाले. त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!"
"त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला! जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस?"
काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले. पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले. केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता. भीमाची बाजू कोण मांडणार? तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला,
"महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे. वाडवडिलांपासून ही चालत आली आहे. सावकाराला बघवत नाही. हजार रुपये द्यायला तयार झाला होता..."
"हजार रुपये? थापा मार! त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?"
"देवाला माहीत आहे!"
"देव दूर आहे आभाळात. येथे तुम्ही आम्ही आहोत. कागदपत्रं काय सांगतात? हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?" वकील म्हणाला.
न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला,
"तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?"
"न्याय आमच्या हातात असतो, भीमा. देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो." वकील कुऱ्याने म्हणाला.
भीमा दु:खाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला.
"काय लागला निकाल?" बायकोने विचारले.
"आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला. आपण उद्यापासून मजूर झालो." तो दु:खाने बोलला.
त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते. परंतु करतात काय?
या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता. केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले. गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला. तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते. राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती. सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते. तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती. केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती. राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती. म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका. राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
सभामंडप भरून गेला होता. आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते. नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती. आणि बारा वाजले. राजा आला वाटते? हां, हे बघा घोडेस्वार! आणि वाद्ये वाजू लागली. जयघोष कानावर आले. सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे? गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती. गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.
"कोण मेले?" म्हाताऱ्या गुरवाने विचारले.
"न्याय मेला." भीमा म्हणाला.
"खरेच, न्याय उरला नाही." देवीचा तो पुजारी म्हणाला.
घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले, 'कोण मेले' म्हणून विचारू लागले. 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.
"मोठ्याने घंटा वाजवा. न्याय मेला!" तरुण म्हणू लागले. एक थकला की दुसरा वाजवू लागे. तो थकला की तिसरा. सारा गाव दणाणून गेला.
तिकडे सभामंडपात राजाचा सत्कार होत होता. मानपत्र वाचले जात होते. परंतु त्या घंटेचा दाणदाण आवाज तेथे ऐकू येत होता आणि मानपत्र मात्र कोणालाच ऐकू जाईना.
"कसला हा आवाज?" राजाने विचारले.
"कोणी तरी मेले असावे. गावचा रिवाज आहे की, कोणी मेले तर घंटा वाजवायची." केशवचंद्र नम्रपणे म्हणाला.
"आमचे येणे म्हणजे अपशकुनच झाला म्हणावयाचा. कोण मेले, चौकशी तरी करा." राजा म्हणाला.
दोन घोडेस्वार चौकशीसाठी पाठवण्यात आले. देवीच्या देवळाजवळ अपार गर्दी होती.
"काय आहे भानगड? कोण मेले!" घोडेस्वारांनी विचारले.
"न्याय मेला!" लोक गर्जले.
ते घोडेस्वार आश्चर्य करीत आले. त्यांनी येऊन राजाला सांगितले, "महाराज, न्याय मेला!"
"मी जिवंत आहे तोवर न्याय कसा मरेल? चला, मला पाहू दे काय आहे भानगड ती!"
राजा रथातून निघाला, त्याबरोबर सारेच निघाले. कोणी घोड्यावरून, कोणी पायी निघाले. तिकडे भीमाने काय केले ते ऐका. तो लोकांना म्हणाला,
"आपण न्यायदेवाची एक प्रतिमा करून ती तिरडीवर ठेवू या. खांद्यावरून ती नेऊ या. 'न्याय मेला, हाय हाय; न्याय मेला, हाय हाय' असे दु;खाने म्हणू या!" सर्वांना ती कल्पना आवडली. एक तिरडी तयार झाली. तिच्यावर न्यायदेवतेची एक प्रतिमा निजवण्यात आली. खांद्यावर घेऊन लोक निघाले. 'न्यायदेव मेला, हाय हाय,' असे करीत ती प्रेतयात्रा निघाली.
तिकडून राजा हजारो शेटसावकारांसह, शेकडो सरदारजहागीरदारांसह येत होता आणि इकडून ती न्यायदेवाची प्रेतयात्रा येत होती. दोघांची वाटेत गाठ पडली. राजा रथातून खाली उतरला व तो शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणाला,
"तुम्ही हे काय म्हणता? मी जिवंत असताना न्याय कसा मरेल?"
"या गावात तरी न्याय नाही!" भीमा म्हणाला.
"काय आहे तुमची तक्रार?" राजाने विचारले.
"महाराज, या गावचे शेतमालक आज मजूर झाले. ज्या केशवचंद्राने तुमचे स्वागत आज मांडले आहे, त्यानेच आमचे संसार धुळीला मिळविले. पाचाचे पन्नास केले नि साऱ्या जमिनी तो बळकावून बसला. महाराज, या गावातील सर्वांच्या जमिनी गेल्या तरी माझी उरली होती. केशवचंद्र म्हणे, 'हजार रुपये घे परंतु ती मला विकत दे!' मी जमीन विकायला तयार नव्हतो. तेव्हा खोटा खटला भरून माझ्याजवळून जमीन हिसकावून घेण्यात आली. न्यायाधीश पैशांचे मिंधे. वकील म्हणाला, 'देव आकाशात नसतो, पैशाजवळ असतो!' महाराज, खरेच का देव उरला नाही? न्याय उरला नाही? तुमच्याभोवती दागदागिन्यांनी सजलेली ही बडी मंडळी आहेत, आणि ही इकडची गरीब मंडळी पहा. या आयाबाया, ही आमची मुले. ना पोटभर खायला, ना धड ल्यायला. कसे जगावयाचे? श्रमणारे आम्ही. परंतु आम्हीच मरत आहोत. आम्ही सारे पिकवतो आणि हे खुशालचेंडू पळवतात. न्याय, कोठे आहे न्याय? वाडवडील म्हणत, 'जो नांगर चालवील तो खरा मालक.' परंतु आज गादीवर बसणारा मालक ठरला आणि आम्ही श्रमणारे चोर ठरलो, अन्नाला महाग झालो. महाराज, कोठे आहे न्याय? या केशवचंद्राने आम्हाला आज घरातून बाहेर पडू नका म्हणून बजावले. आम्ही तुमच्या कानांवर गोष्टी घालू अशी त्याला भीती वाटली; परंतु मला घंटेची आठवण झाली. न्याय मेला, तुम्हास कळवावे म्हणून आम्ही सारे घंटा वाजवीत बसलो."
"चला त्या मंडपात. मी सारी चौकशी करतो." राजा म्हणाला. सारी मंडळी सभामंडपात आली. एकीकडे श्रीमंत बसले. एकीकडे गरीब बसले. राजाने सारी चौकशी केली. केशवचंद्राचे गुन्हे सिद्ध झाले. तो पैसेखाऊ न्यायाधीश, तो वकील, सारे तेथे अपराधी म्हणून उभे राहिले.
"यांना कोणती शिक्षा देऊ? तोफेच्या तोंडी देऊ?" राजाने विचारले.
"त्यांना मारण्याची जरुरी नाही. ते आमच्यात राहोत. आमच्याबरोबर खपोत, श्रमाचे खावोत, त्यांची बुद्धी आमच्या कामी पावो, आमचा हिशोब ठेवोत. महाराज, या गावची जमीन साऱ्या गावाच्या मालकीची असे करा. सारे मिळून श्रमू. येथे स्वर्ग आणू. येथे नको कोणी उपाशी, नको कोणी चैन चालवणारा." भीमा म्हणाला.
"तुमचा प्रयोग यशस्वी करा. भरपूर पिकवा. नवीन नवीन उद्योग शिका. तुमचा गाव आदर्श करा. तुम्हाला छळणाऱ्यांवरही तुम्ही सूड घेऊ इच्छित नाही, ही केवढी उदारबुद्धी! मला राजालाही आज तुम्ही खरी दृष्टी दिलीत. सूडबुद्धीनं शेजारच्या राजाशी मी युद्ध करायच्या विचारात होतो; परंतु आता दुसऱ्या भल्या मार्गाने जाईन. शाबास तुमची! तुमचे समाधान झाले ना?" राजाने प्रेमाने विचारले.
"होय, महाराज!" लोक आनंदाने उद्गारले.
"मग आता काय घोषणा कराल?" राजाने विचारले.
"न्याय मेला होता, परंतु जिवंत झाला, अशी घोषणा करू." लोक म्हणाले.
राजा निघून गेला. केशवचंद्र व भीमा प्रेमाने एकमेकांस भेटले. तो गाव सुखी झाला, तसे आपण सारे होऊया.


लेखक - पांडुरंग सदाशिव साने

अनाम वीरा

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !


गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?

तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”


कवी - कुसुमाग्रज

निवास

खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारख्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा
ज्वालामुखीच्या उद्रेकांनी,
उसालेली उद्यानं
दग्ध होतात
किंवा कोकीळांची कूजनं
बाकीच्या प्रपातात,
गोठून पडतात,
तेव्हा
माझा निवास
त्या तारकेवर असतो,
व्यवहारापुरत
मी येथे
वावरत असलो तरी




कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

अन्यथा

तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा -
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्‍या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
- अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.


कवी - कुसुमाग्रज

दिवाळीच्या बहुभाषिक शुभेच्छा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाली की शुभकामनाएं
ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಷಯಗಳು (Deepavali Habbada Shubhashayagalu )
దీపావళి శుభాకా౦క్షలు (Deepavali Shubhakankshalu)
ദീപാവലി ആശംസകള്‍ (Deepavali Aashamsagal )
தீபாவளி நல்வாழ்த்துகள் (Deepavali Nalvazhthukal )
শুভ দীপাবলীর প্রীতি ও শুভেচ্ছা (Subho Deepabalir Preeti O Subechsha )
ଦୀପାବଳିର ଅନେକ ଶୁଭେଛା (Deepavalira Anek Shubhechha)
ਤੁਹਾਨੂੰ ਦਿਵਾਲੀ ਦੀਆਂ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਵਧਾਈਆਂ ਹੋਣ  (Tuhanu diwali diyan boht boht vadhaiyan )
Happy Diwali

|| श्री हनुमान स्तुती ||

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||१||

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे |
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ||
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||२||

गिळायासी जाता तया भास्करासी |
तिथे राहु तो येउनी त्याजपासी ||
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||३||

खरा ब्रह्मचारी मनाते विचारी |
म्हणोनी तया भेटला रावणारी ||
दयासागारू भक्तीने गौरविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||४||

सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा |
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा ||
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||५||

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी |
समस्तांपुढे तापसी निर्विकारी ||
नमू जावया लागी रे मोक्षपंथा |
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||

दिन दिन दिवाळी

दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवळी
गायी म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या
नरशा आला पिवून गेला
खंडोबाच्या आड लपला
खंडोबाचं तोंड तुटलं
त्याच्या मागं घोडं सुटलं
घोडयाला होती लगाम दोरी
कान्ह्या भिल्ल हाती धरी
काळा कुट्ट कान्हया भिल्ल
त्याच्या कमरेला सात तीळ
एक तीळ उपसिला
बगलेला मारुन हल्ला केला
समोर गावाचा पाटील दिसला
पाटील बघून सलाम केला

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो

वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती

काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते

असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे

माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज

शुभ दीपावली !!

तेज दिपांचे उजळुन आले
दिप मनींचे झणी प्रकाशले..
तेजाळलेल्या ज्योतींमधुनी
ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!!

दिपवाळीच्या आनंदामध्ये
आर्त मनांचे विरुनी गेले..
सुख-दु:खाच्या गंधात सारे
आयुष्य सुखे गंधावून गेले..!!

गाणे मनातले ओठी आले
दिपावलीसह फुलून गेले..
सुमन सुगंधी दिपावलीचे
दिपांसवे जिवनी दरवळले..!!

कानी निनादती तेच तराणे
सदैव एक ते आनंदी गाणे..
आले दिन सौख्याचे आले
सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!!

शुभम भवतु ! शुभ दीपावली !!
मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलानेमच्छर खाल्ले.
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस डाँक्टरला बोलाव..
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले..

अच्चल काठी

अच्चल काठी, मच्चल काठी
गई का वेली, डुबा झाला
घरचा धनी हारकला
पाची बोटं चिराकली
एक चिरका फाटुन गेला
त्येच्या झाल्या बारा बात्या
मागं म्होरं चंदर ज्योत्या!
एक हुती बाग बाग
तिथं हुता नाग
नागाची फडी फडी
वाघाची ऊडी
वाघाचं किराण किराण
रेडयाच धराण
वाघाचा पाई पाई
गया जमल्या लई
एक गई कूशी कूशी
पाण्यात बसल्या म्हशी
म्हशीच शिंग शिंग
लावा दिवाळीला भिंग
व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही …

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला 'शब्द' तिला आठवायचा नाही ..!! 

श्रीमंत योगी

समर्थ रामदासांचे छत्रपतींस पत्र

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.