शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,
भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली
भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,
गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,
भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे
शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

माळ

हिरव्या माळापुढे निळा गिरि
गिरवित काळी वळणे काही
छप्पर झाले लाल अधिकच
धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर
काठावरति ढग थोडासा
थोडासा पण तीच हेळणा
पिवळा झाला फ़क्त कवडसा

हिरव्या माळापुढे निळा गिरि
मावत नाही इतुका फ़िक्कट
अबरळ्त चाललि पुढेच टिटवी
माळ ओसरे मागे चौपट


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

कविता

या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?

माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.
आहे तयारी?
ज्या आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून.
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत.

मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दोन मी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठेचाळतो
तरीही मी का चालतो ? तो बोलतो ना थांबतो

वाकणारया अन मला तो पाहुनिया मोडतो
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखतो

अग्निज्वालेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन अजून आहे ती खरी

कोणते पोशाख त्याचे चोरले मी भर्जरी
विकित बसलो येत हाटीं, आणि खातो भाकरी

तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो
राख होतानाही ओठी गीतगाणी ठेवितो

मैफलीला तो नि मी दोघेही जातो धावूनी
एकतो मी सूर , तो अन दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,

गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.

वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,

कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.

कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?

प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?

कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे
उभा तू उभा तू असा पाठ मोरा
किती जन्म गेले त्वचेचे तमाला
तरी बाहुली रे जपे अश्रु खारा

कहाणी मनाची तुझा शब्द पाळी
मुक्याने वहातो तमी देहमेणा
जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी
नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा

कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबर्‍याशी दिवा रात रात
धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि
किती ऊर ठेवू व्यथा गात गात


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
- १०-५-५९

अश्रु दे तूं

लाविशी तूं कां खुळ्याने येथ वाती?
जा तुझीं तूं लाव दारें; कां उभी तूं?
जागती या अजगराच्या येथ राती;
पालवाया ऊर माझा कां उभी तूं?
तेवत्या डोळ्यांतल्या या बाहुल्यांना
एक साधा अन खरासा अश्रु दें तूं!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

पूर

तुझे गात्र गात्र:
पावसाळी रात्र;
सारे. क्षेत्र ऐसें
झालें पूरपात्र

माझे दोन्ही डोळे:
गाव झोंपलेले;
मला नकळत
पुरांत बुडाले

हृदयाचें बेट:
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

अर्थ

हा भार हा शिणगार
हा उत्सव ही वाटचाल
या सगळ्यावर पसरलेल
अफवेसारख आभाळ

याचा अर्थ सांगण्यासाठी
कुठल्या तरी झाडावर
बसलेला असेल का
एखादा पक्षी उत्सुक-पर? 


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

तिचे गाणे

किति गोड गोड वदलां,

हृदयी गुलाब फुलला.

खुडुनी तया पळाला,

कांटा रुतून बसला !

स्मृतिचा सुवास येई,

जिव हा उलून जाई.

कांटा हळूच हाले,

कळ येई- जीव विवळे.

फुलला गुलाब तसला,

कांटा कुठून असला !

छे, छे नको ग बाई,

राहूं कशी अशी ही ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ फेब्रुवारी १९२६.

त्याचे गाणे

एकहि वेळा न तुजला भरूनि डोळे पाहिलें,

परि जिव्हारी घाव बसुनी हृदयी जखमी जाहले !

मी फिरस्ता चुकुनि कोठे दारि तुझ्या पातलो;

सहज तुजला निसटतांना पाहिलें ना पाहिलें

नेसली होतीस तेव्हां शुभ्र पातळ रेश्मी,

त्यांतुनी आरक्त कांती और कांहींशी खुले!

रर्विकरीं सोनेरि उड्ती केस पिंगट मोकळे;

तपकिरी तेजांत डोळे खोल अर्थ भारिले !

पायिं त्या नाजूस गोर्‍या रूळ्त होते पैंजण,

रक्त तापे , अंग कांपे , हृदय पेटूं लागलें !

न कळता तुं प्रीतिचा खंजीर हृदयी मारिला,

ध्यानिंही नाहीं तुझ्या कीं काय माझें जाहलें !

स्मृति जशीच्या तशि असे ही-काळ कितिही लोटला;

हसत तुं असशील, परि या अश्रु भालीं रेखिले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ डिसेंबर १९२४

पंचप्राण

तेज पांढरे सांडत होते कृष्ण निळ्या लाटांत.

नांव आमुची वहात चाले वार्‍यावर भडकून

प्राणभीतीने जवळ येउनी मज बसला बिलगून

"पोहण्यास मज , भाऊ,येतें भिंवू नको बघ आंता."

धीराचे किति शब्द बोललों कांपतची तरि होता.

काळ-लाट तो एक येउनी नाव उलथुनी गेली !

फोडुनिया हंबरडा त्यानें काया मम वेढियली.

क्षण हृदयाचे स्पंदनही जणु बंद जाहलें आणि-

-विकार सगळे गोठुनि झालो दगडाचा पुतळा मी !

"याला धरूनी मरणे, कां जगणार लोटुनी याला ? "

विचार मनिंचा विजेसारखा मनांत चमकुन गेला.

दगडाच्या पुतळ्याने झर्कन नेले दगडी हात;

कमरेची ती मिठी हिसडुनी लोटियला लाटांत !

'दा-आ-आ-दा' शब्द करूणसा लाटांमधुनी आला ;

भुतासारखा हात पांढरा लाटावर क्षण दिसला.

दगडाचे पारि डोळे होते - कांही न त्याचे त्यांना !

करही भरभर कापित होते उठणार्‍या लाटांना !

वळुनि पाहिलें-काळ्जांत जी धड्की बसली तेव्हा,

भूत होउनी उरावरी ती बसते केव्हा केंव्हा !

कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२६

जोडपे

तो आणि ती शय्येवरी होती सुखानें झोंपली;

आपापल्या किति गोडशा स्वप्नांत दोघे गुंगली.

जिव भाळला होता तिचा ज्याच्यावरीअ लग्नाआधी

तिज वाटले जणु येउनी तो झोंपला शय्येमधी

म्हणुनी तिने कर टाकिला पडला परी पतिंकांठी

क्षणि त्याच कीं पतिही तिचा कंठी तिच्या कर टाकितो.

त्यालाहि स्वप्नीं भेटली त्याची कुणीशी लाडकी;

आनंदुनी हृदयी सुखे कवळावया अपुली सखी--

कर टाकिला त्याने परी पडला तिच्या कंठ्स्थली !

कर कंठि ते जागेपणी बघती तदा आनंदली !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ जानेवारी १९२६

एके रात्रीं

टप टप टप टप वाजत होता पाउस पानावरी

दाटली काळिकुट्ट.शर्वरी,

काळोखांतुनि अंधुक अंधुक उजळत कोठेंतरी,

दिव्यांच्या ज्योति लालकेशरी.

काळोख्या असल्या निर्जन वाटेवरी

जातांना भरते भय कसलेंसे उरीं !

असलीच मृत्युच्या पलिकडली का दरी ?

अज्ञाताच्या काळोख्या त्या दरींत कोठेतरी,

कसले दिवे लालकेशरी ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ जानेवारी १९२६

ऐरण

घाव घालुनी पहा एकदा सोशिल सारे घण

माझ्या हृदयाची ऐरण !

दु:ख येउनी कधी हिच्यावर कपाळ घे फोडुन !

कण्हतसे शोस-गीत ऐरण

हर्षबाल खिदळुनी करितसे स्वैर कधी नर्तन;

नादती मंजुळ नृत्य्स्व्न.

प्रीतिदेवता लाथ हाणितां ध्वनी उठे भेदुन;

हळवा सूर घुमवी ऐरण.

कुणि कधीं येउनी घाला येथे घण;

सौदर्य-ज्योतिचे उडतिल तेज:कण!

या अशा कणांचे गीत-हीर बनवुन,

घाव घालिता, हार हिर्‍यांचा तुम्हालाच अर्पिन !

असली माझी ही ऐरण !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ डिसेंबर १९२५

नि:श्वासगीत

प्रेमाचें मजला नकोच आतां नांव !

कां व्यर्थ कांचणी, फसवुनि भोळा जीव ?

हांसली मंद मधु पाहुनि कोणी रमणी.

भुलविलें जिवाला कुणि साखरबोलांनीं !

रंगवीत मोहन चित्र मंद हास्याचें,

गुंगीत आठवुनि गीत गोड बोलांचे ,

कंठणे तळमळत भकास सारी रात;

ढग खिन्नपणाचे दाट हृदयिं जमतात !

हांसती पांढ्र्‍या तारा काळ्या राती

नि:श्वास सोडणे लावुनि दृष्टी वरती !

'त्या' मुखचंद्राचें एकच वेड जिवाला

लावुनी जीव हा उदास रडवा केला

तिजसाठी दुखविला बापुड्वाणा ऊर;

ती असेल चुंबित तिच्या जिवाचा प्यार !

छे ! नकोच मजला तें प्रेमाचे नांव !

बंबाळ विवळतो भोळा हळवा जीव !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २३ जुलै १९२५

सावल्यांचे गाणें

तेजाची आम्ही बाळे,

रूप जरी अमुचें काळें !

लहान वा कोणी मोठी

ससेमिरा अमुचा पाठी !

जनी स्मशानीं कुठे तरी,

अशी तरळतों पिशांपरी.

मेघांच्या काळ्या पंक्ती

निळ्या नभीं जेव्हां फिरती

राक्षसरूपांना धरुनी

मंद मंद आम्ही फिरतों;

निळ्या जळा काळें करितों

पीतारुण संध्या बघुनी

वंदन दिर्घ सरूं पडुनीं !

मग येई रजनीमाई

पदराखालिं अम्हा घेई.

चांद्ण्यांत अमुची माया

भुताटकी गमते हृदया.

पांढुरक्या तेजांतून

कुठें कुठे बसतों दडुन.

पांढुरक्या वाटेवरुनी

एकलेच फिरती कोणी,

लपत छपत पाठुनि त्यांच्य़ा

फिरत असूं आम्ही वेड्या !

पानांचें पसरुनि जाल

आणिक पारंब्या लोल,

वट कोणी ध्यानस्थ बसे;

मंद अनिल त्या डुलवितसे.

मग अमुचीं रुपे डुलति;

बाळांना बागुल दिसती



जुनाट हे पड्के वाडे,

पर्णहीन त्यांतिल झाडें

धवल चंद्रिका रंगविते;

आम्ही मग त्यांतील भुतें !

जर का कुणि चुकुनी आला

वाटसरू रात्रींमधला,

बघुनि विकट अमुचे चाळे

चरकुनि तो मागेंच वळे !

प्रेम स्थल अमुचें एक;

त्यासाठी विसरुनि भूस,

दाहि दिशा मागुनि फिरणें

ही अमुची वेडी प्रीत

झिडकारा - मारा लाथ !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ मे १९२५

एक स्वप्न

रमणिला कवळुनि हृद्यीं । असें मी जाहलों दंग ;

स्वप्न तो गूढ पाहोनी । समाधी जाहली भंग !


गुलाबी गाल रमणीचे । सुकोनी सुरकुत्या झाल्या;

मृदुल घन कृष्ण केसांच्या । लोंबती पांढर्‍या दोर्‍या!

तिच्या त्या गोठल्या नयनी । पाहिलें रूप मी माझें,

पाहुनी जीर्ण मुखडा तो । चरकुनी हृदयिं-मी लाजें.

कांहिसें चरकुनी हृदयी । रमणिला घट्ट मी धरिलें:

गळाले पाश देहाचे । शांत मग श्वासही झाले !

निसटल्या दिव्य दो ज्योती । आमुचे देह सांडून,

तळपुनी नील आकाशी । जाहल्या तारका दोन !

उराला ऊर भिडवोनी । स्तब्ध मातींत पडलेल्या

पाहुनी आपुल्या देहा । खदखदा तारका हंसल्या !

बसुनिया एअकमेकांच्या । सन्निधीं तारका गाती,

'येउं दे काळ काळाचा । तयाची कोण धरि भीती !'

स्वप्न हें गूढ पाहोनी । समाधी जाहली भंग !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ऑगष्ट १९२५

गुलाबांचा हार

गुलाबांचा घेऊनि एक हार,

ह्रदयदेवीचें गांठियलें दार.

अर्पियेला सोत्कंठ तिच्या हातीं;

(अनुष्टुप्‌) मनीं आनंदुनी गेला युवा तो प्रणयी घरा ;

शब्द हे वदली चित्तीं, हांसुनी तरुणी जरा:

"आज आहे येणार नाथ माझा ;

त्यास अर्पिन हा हार बरा ताजा !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २९ जून १९२५

संध्यासंगीत

सिंधूचे मर्मरगीत

फेंसाळे कानीं शांत.

संध्येची पिवळी माया

रंगविते डोंगर--काया.

शुभ्र अभ्र दाटे गगनीं,

मोत्यांचे चढवुनि पाणी.

फिकट पांढरा रविराणा

मंद हांसला बुडतांना !

दडले मग पिवळे किरण

तरल निळ्या पाण्यांतून.

लेवुनि तें पिवळें तेज

जग गमलें यक्षिणी-कुंज !

मधुनि मधुनि जन जे फिरती

गूढ कुणी यक्षचि गमती !

पीत विरल वातावरणीं

जिव गेला वेडावोनी !

स्वप्नफुलें रंगित फुललीं;

दिवसाही स्वप्नें दिसलीं !

नारळिच्या झाडांतून

रजनि बघे डोकावून.

रजनीची काळी काया

घट्ट ह्रुदयिं आलिंगुनिया,

रजनी-रमणीच्या ह्रुदयीं

दिवस-रमण विरुनी जाई !

काळवंडलीं हीं रानें,

झाडांचीं हिरवी पानें.

आणिक त्या काळ्या छाया

माझ्याही ह्रुदयीं शिरल्या !

ह्रुदयिं दाटली हुरहूर ;

कां न कळे दुखतो ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ११ मे १९२५

एकलेपणाची आग

एकलेपणाची आग लागली ह्रुदया ;

घनदाट दाटली विषण्णतेची छाया.

तडफडे जिवाचें पांखरु केविलवाणें,

होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें !

जोडीस शोधितें उदात्त अपुल्यावाणी;

प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी !

गुम्फीत कल्पनाजाला । गुंगणें,

गुरफटुनि त्यांत जीवाला । टाकणें,

रंगीत स्वप्नसृष्टीला । उठविणें ;

ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेडया;

ही सुवर्णलंका दिपवित अवघी ह्रुदया !

परि इंद्रजाल हें जात जघीं विरुनीया,

एकलेपणाची आग लागते ह्रुदया !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १९ जानेवारी १९२५

भावबंधन

चित्ताला रमवावया पहुडलों होतों खुल्या सैकतीं;

तों दृष्टी सहजींच जाइ वरती गंभीर नीलांबरी.

तेजाला उधळीत कोणि चमके तारा तिथें सोज्वळ,

माझी दृष्टि खिळे विशाळ गगनी त्या रम्य तारेवरी.

पाहोनी तिजला मनांत रमलों चित्तास ये शांतता,

चाटे ती जणु हांसली सुखविण्या संत्रस्त माझ्या मना !

चित्ती कांहि तरंग अद्रुत उठे - अश्रु उभे लोचनीं !

वाटे या हृदयास काय नकळे - तें जाहलें तन्मय.

ती कोठें सुरबालिका !----कुणिकडे मी येथला पामर !

नाहीं का सुरलोकिंचा रवि परी उत्फुल्लवी पद्मिनी ?

कैसा ये कवळावया धरणिला पर्जन्य पृथ्वीवरी ?

तारा स्नेहलता मधुस्मित करी--हें खूप आहे मला.

कोणी जीव कुण्या जिवावरी रमे--कैसें कुणी सांगणें !

कैसें अन्तरि भावबंधन जडे--तें अंध वेडें खरें !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

बाजू उलटली !

मनीं भोळया चोरटा भाव नाहीं.,

मुग्ध आणि निर्व्याज तुझ्या ठायीं.

प्रणयचंचल तुज ठावुक्या न लीला

कसलि नाही दरकार तव मनाला !

आजवेरी पाहिल्या खूप बाला,

नजर कितीकींच्या लाविली मुखाला,

लाजलाजुनी आरक्त किती झाल्या

आणि हरिणीसम पळुनि किती गेल्या !

लोचनांना भिडवून लोचनांशीं

धीट मजला पाहून अशी घेशी!

तुझी कांही न्यारीच रीत बाई,

मींच गेलों लाजून तुझ्यापायीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ११ ऑक्टोबर १९२४

चटका

तंद्री लागुनि गुंग मी हळुहळू होतों पथीं चालत,

तुंही मग्न विचारिं चालत पुढें आलीस सामोरुनी.

देहाला मम देह लागत तुझा-दोघांसही ना कळे !

दोघेही चमकून पाहत क्षणी त्या एकमेकांस कीं !

होवोनी मनि बावरा बघतसें मी तेथ वेडयागत,

वेड्याला मज वाटलें सहजची तूं शाप देशीलसा ।

कांही धीर करोनी शब्द तुटके ओंठांवरी नाचले,

डोळे मात्र गयावया करुनिया होते तुला सांगत ।

तुंही अस्फुट कांहिसें वदुनियां माझ्याकडे पाहिलें,

तों डोळांत तुझ्या मला चमक ती न्यारीच कांहीं दिसे !

ओंठानी कितिही जरी अडविलें आलें तरी बाहीर-

-तें मंदस्मित- आणि तूं निसटुनी गेलीस केव्हाच गे ।

एका दिव्य क्षणात खेळ सगळा हा गोड आटोपला ,

जों जों आठवतो मनास चटका लागे कसासा मला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १७ नोव्हेंबर १९२४

प्रेम आणि पतन

कुठ्ल्याशा जागी देख

बिल्डिंग मोड्की एक । पसरली.

चाळीत अशा वसणारी।

पोरगी कुणी्शी होती छबकडी !

जाताना नटुनी थटुनी

कुणी तरुण पाही ती तरुणी । एकला.

त्या क्षणी

त्याचिया मनी,

तरड:ति झणीं,

गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी । नकळतां.

तो ठसा मनावर ठसला ।

तो घाव जिव्हारी बसला । त्याचिया

वेड पुरे लावी त्याला ।

चाळीतिल चंचल बाला बापडया !

अकलेचा बंधही सुटला ।

संबंध जगाशीं तुटला । त्यापुढें.

आशाहि,

कोणती कांहि,

राहिली नाहिं.

सारखा जाळी । ध्यास त्यास तिन्ही काळी । एक तो.

ही त्याची स्थिति पाहुनियां,।

चाळींतिल सारी दुनिया बडबडे.

इष्काचा जहरी प्याला।

नशिबाला ज्याच्या आला । हा असा.

धडपडत चाळिंतुनि फिरणें ।

तें त्याचें होतें जगणें । सारखें !

लोकांना नकळत बघणें ।

पिउनिया चहाला जगणें । गरमशा.

पटत ना,

त्याचिया मना,

जगीं जगपणा,

डाव तो टाकी । मनुजांतुनि दगडची बाकी । राहतो.

यापरी तपश्चर्या ती

किति झाली न तिला गणती । राहिली.

सांगती हिताच्या गोष्टी।

हातांत घेउनी काठी । लोक त्या

तो हंसे जरा उपहासें ।

मग सवेंच वदला त्रासें । चिडुनियां

'निष्प्रेम चिरंजीवन तें।

जगिं दगडालाही मिळ्तें । धिक तया'



निग्रहें,

वदुनि शब्द हे,

अधिक आग्रहें,

सोडिना चाळे । चाळीचे चढला माळे । तरुण तो.

पोरगी आलि मग तेथ ।

जोड्यांना धरुनि करांत । फाटक्या.

धांवली उताविळ होत ।

जोडा झणिं थोबाडांत । मारिला.

तिरमिरुनी खालीं पडला ।

परि पडतां पडतां हंसला । एकदां !

तो योग ।

खरा हटयोग ।

प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । लागतें पडावें त्याला । हें असें !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ डिसेंबर १९२४

स्मृती माझी परि नसे तुला बाई '

मंद अनिलावरि वाहतो सुगंध,

सुवासानें मी होत असें धुंद.

तुझ्या प्रीतीनें ह्रुदय भरुनि जाई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

रोज फुलती गोजिरीं फुलें येथें

खुडुनि त्यांना आणितों मी गृहातें;

गमे ओतावीं सर्व तुझ्या पायीं

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

निशादेवीचें हास्य जणूं कांत,

खुले जेव्हां चांदणें शुभ्र शांत

ह्रुदय तळ्मळतें--स्मृती तुझी होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

नील गगनीं चमकती रम्य तारा;

मधुर गुंगीनें देह भरे सारा !

नयन दिसती तव-विध्द जीव होई ;

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

खिन्न होउनि बागेंत भटकतांना,

गुलाबांचा हो स्पर्श कपोलांना;

ह्रुदय दचके-तनु कंटकिता होई ,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

ध्वनी मंजुळ कधिं कर्णपथीं येती

तुझी हांकच जणुं !---गोड पडे भ्रांती.

निराशेनें मम ह्रुदय भग्न होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ सप्टेंबर १९२४

थांब थांब, बाले आतां

थांब, थांब बाले आतां, ठेव दिलरुब्याला !

सूरसागराच्या लाटा बुडविती जिवाला !

विश्व शांत, रजनी शांत, चांदणेंहि फुललें शांत,

शांतिचेंच घुमतें का हें गीत दिलरुब्यांत ?

दिव्य तुझ्या संगीताची साथ आणि त्यांत !

देहभान सुटलें आतां, ठेव दिलरुब्याला !

ह्रुदयाच्या तारा माझ्या होति एकतान !

एकसुरीं लागुनि गेलें सृष्टिंचेंहि गान !

जीव उडे दिव्यीं करुनी नादमय विमान !

धराखर्ग मिळुनी गेलीं सूर सागराला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २४ ऑक्टोबर १९२४

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

'तूं माझी अन्‌ तुझा मीच,' ही खातर ना जोंवरी,

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

गालाला पडते खळी मला पाहुनी,

ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी !

भयभीत प्रीत थरकते लीन लोचनीं,

ऒंठाची थरथरत पाकळी,----बोल गडे, झडकरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

जिवाजिवाची अभंग जडली जोड असे ही जरी,

भिति मग कोणाची अंतरीं ?

ही गांठ भिडेची तांत गळ्या लाविल ;

हिरव्याचीं पिवळीं पानें हीं होतिल !

प्रीतिच्या फुलाचा वास उडुन जाइल ;

फसाल पुरत्या, बसाल गाळित घळ्घळ अश्रू-झरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

३१ डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र

 रातकाळची पसरे शांती,

मुलें माणसें स्वस्थ घोरती;

धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;

फ़िकट पांढरी दीप्ति पसरितो.

मध्यरात्रिचा निर्जन रस्ता,

प्रकाशांत त्या वितरि विकटता.

दचकचुनी तों-बारा ठणठण

घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,

" वर्षाची या सरती घटिका,

पहा,चालली सोडुनि लोकां !"

वर्ष बिचारें गेलें, गेलें

करपलों जणूं वियोगानलें !

अन्त:करणीं ये कालवुनी,

विषादतमिं मी गेलों बुडुनी !

अगणित वर्षे आली गेलीं,

कितीक लोकें जन्मा आलीं;

हंसली, रडली, म्हुनी गेलीं,

'उदो' 'उदो' हो त्या त्या कालीं ,

स्मृतिहि न त्या अमरांची उरली !

आजहि अगणित जगती मरती,

त्यांत कुणी अजरामर होती !

किति अमरत्वा परि पचवोनी,

काळ बसे हा ' आ ' वासोनी !

उदास असले विचार येती,

लाज परी मज वाटे चित्ती.

असेल काळाहाती मरणें,

परी आमुच्या हाती जगणें !

कां नच मग वीरोचित जगणें,

अभिमानाने हांसत मरणे ?

विचार असले जो मनिं आले,

अंत:करणहि पार निवळलें,

दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,

झोंपी गेलों अश्रू पुसुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

नावात काय आहे ?

का आग्रह ? रसिका ! नाव सांग मज म्हणसी ?

नावात मोहिनी भासो सामान्यासी !

घननीलमणिप्रासादचंद्रशालांत,

ते असंख्य सुंदर तारे चम्‌चम्‌तात,

अनिवार इंद्रजालाते-टाकिती,

वसुधेस मंत्रमुग्धते-भ्रमविती,

संगूढ नेत्रसंकेते-वाहती,

हे विलास हरिती वस्तुजातह्रदयासी,

वद ! त्यांची नावे काय पुसाया जाशी ?

तरुलता प्रसूनान्विता राहती रानी,

संपूर्ण भारिती वनश्रेणी गंधांनी,

ह्या प्रमदवनांतरि शिरले-जे जन,

तरुलताचि अंगे झाले-आपण,

निज नामरूपही गेले-विसरुन,

आनंदसमीरण डोल देतसे त्यांसी,

टपटपा पडति खालती लूट कुसुमांसी !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कविनंदन

कविजनसंस्तुत काव्यदेवते वंदन तव पायी
क्षराक्षराचे जननी, व्यक्त प्रणवाचे आई !

’बालकवीचा’ जीवननिर्झर जाता ओसरुनी
दूर्वांकुरपुष्पांची त्यावर चादर पसरूनी,

चंदेरी दरियाचे काठी प्रेमप्रळयात,
निजल्या ’रामा’ अक्षयतेच्या वेष्टुनि शेल्यात,

ह्या दोघा रस-रंगा घेउनि अंतर्हित होशी
कोठे ? मागे टाकुनि उघडा कविजन परदेशी.

जाशी का तू पडली पाहुनि तख्ते दोन रिती
चिरंतनाच्या निर्झरिणीवरि पैलाडापरती ?

शाश्वतेचे भरूनि पाणी आणावा कलश
कुणा भाग्यवंताचे तेणे न्हाणावे शीर्ष,

अम्लान प्रतिभेची अद्वय लेणी लेववुनी
स्वानंदाचे लगबग उतरुनि लिंबलोण वरुनी,

दोन्ही सिंहासनी तया एकाते बसवावे
प्रयाण करिती झालिस का तू देवी या भावे ?

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही !

आधुनिकांचे कविते बाई ! अझुनी तुजवरचा
रोष न सरता होई काही विद्वद्वर्यांचा.

नूतन चालीरीती नूतन भूषावेषांना
भावाविष्करणाच्या नूतन घेशी धाटींना.

बाळपणे तू उथळ जराशी, अल्लड वृत्तीची,
सौंदर्याची अस्फुट अंगे कोर्‍या रंगाची,

लाजेच्या सांजेचा नाही मुखमंडळि मेळ
अवगत नाही अझुनि चोरटा नेत्रांचा खेळ,

नटचंचल बावरा झडे फुलछडीचा न नाच
जाणपणाची अझुनि लागली नच मंदहि आच,

कोमल कलिकेमधली अस्फुट मधुसौरभसृष्टी
बादलछायेआडिल किंवा चंद्राची दृष्टी,

अथवा, दृष्टीपुढची अस्थिरसृष्टी बाळाची
लाट जणो तू स्वर्भूःसरितासंगमलीलेची.

प्रौढ कलाढ्यत्वाचे वारे अंगि न जरि वाजे
मुग्धदशेची चंचलता तुज कुलजेते साजे.

कारकसंधीरूपे व्याकरणातिल सूक्ष्मतर
रसरीत्यादिक साहित्यांतिल दगडांचा चूर,

बूझ कशी या नियमे व्हावी तव माधुर्याची,
अगाध लावण्याची, निस्तुळ रूपारीतीची ?

ह्रस्वदीर्घवेलांटीमात्राशास्त्री जी घेती
जुनी मापकोष्टके जराशी बाजुस सारा ती.

होता केव्हा, काही, किंचित्‌, संप्रदायभंग
रंगाचा बेरंग काय हा अथवा बेढंग ?

कवितेच्या साम्राज्यामधली ही का बंडाळी
तेणे होते काहो त्याची राखरांगोळी ?

शुद्ध मराठी धाटी साधो कोणा अथवा न
गीर्वाणप्रचुरा रचना ती केव्हाही हीन.

शब्दरूपसंपदा ’रांगडी’ वाळावी म्हणुनी,
’रांगड’ अथवा ’नागर’ हे तरि ठरवावे कोणी ?

संस्कृतभाषानियमांची का तुजवरि बळजोरी
स्वतंत्र अस्तित्व न तुजला की झाली वाढ पुरी ?

नागर कुल तव, नागर लोकी सारा व्यवहार,
नागर वाङ्मयदेशी सतत करिशी संचार.

इथुन आणखी तिथुनि आणिशी रत्‍नांचे हार
समृद्ध आम्हाकरिता करिशी भाषाभांडार

बिंदु बिंदु रक्ताचा, कण कण देहाचा, उमले,
विकास सौंदर्याचा र्‍हासानासाविण चाले !

अथांग अव्यक्तांतुनि होशी निजलीला व्यक्त
तुझे तूच निर्मिशी प्रसाधनशासन अभियुक्त.

मृगजळ पाणी भरुनि रांजणी पढिका फुंजू दे
सौंदर्याच्या कुंजी आम्हा रुंजी घालू दे.

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही

काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नादमधुर मेळ
अर्थचमत्कृतिचाही नोहे डोंबारी खेळ.

निसर्गसृष्टीची सादृश्ये, नीतिपाठ भव्य,
थाटदार घाटाची रचना केवळ नच काव्य.

ऐश्वर्यात्मक सामर्थ्याची निर्माणक्षमता
अंतरंग ओथंबुन ओसंडे ती ’सुंदरता’

केवळ सौंदर्याची स्फुरणे प्रस्फुरणे दिव्य
जिव्हार हेच स्वानंदाचे. -’सौंदर्यचि’ काव्य.

या सौंदर्यस्फुरणा म्हणती ’चैतन्य-स्फूर्ती-
प्रसाद-भगवंताचे देणे-नैसर्गिक शक्ती’.

देवी शारदा हीच. न हे स्थल अभ्यासा साध्य
लोकोत्तर काव्याचे हेचि प्रसवस्थल आद्य.

यास्तव कविजन अहंभाव सोडोनी संपूर्ण
प्रसादसिद्धीसाठी पहिले करिती तुज नमन.

देवि ! जशी तू, तसे तुझे ते भक्तहि, मज पूज्य
वंदन माझे गतास, त्यासहि असती जे आज.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रणयपत्रिका

प्रणति मम सख्याच्या पूज्य पादद्वयासी,
विजय सतत चिंती आपुली लीन दासी.

कितिक दिवस झाले ! आपले पत्र नाही
म्हणुनि बहुत चिंताग्रस्तचित्ता असे ही

सकल कुशल आहो श्रीहरीच्या दयेने,
किमपिहि न करावी काळजी मत्प्रयाने.

परि मम मन आहे खिन्न अत्यंत बाई !
कुशल कळविणारे पत्र ते कान येई?

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.

सुखकर सखया ती आपली रम्य मूर्ती
निशिदिनि दिसताहे पूर्ण साठूनि चित्ती

क्षणभर अपुल्या मी दृष्टीच्या आड होता
करमत नव्हते ना आपल्या होर चित्ता ?

विविध मिष करावे काम काही करिता
मजविण मग कैसा कंठिता काळ आता ?

दिनभरि सरकारी काम सारूनि येता
लगबग गृहभागी भागले, सांज होता

कवण तरि प्रतीक्षा सेर्ष्य दारी करील
श्रम मधुर विनोदे कोण सारा हरील ?

मदितर असताना जेवता वाढण्याला
खचित, खचित गेला घास ना आपणाला ?

निरलस दिनरात्री आपणाला जपाया
नच जवळ कुणीही काळजी योग्य घ्याया.

रजनिसमय येता झोप घ्यावीत भारी
परि कर नसताना आपुल्या त्या शरीरी

दचकुनि किति वेळा नित्य तुम्ही उठावे
गति कशि अपुली हो संप्रती, हे न ठावे.

प्रकृति कितितरी ती सत्य नाजुक आहे
विरम मम तुम्हाला, जाणते मी, न साहे

सुतनु अमित बाई ! क्षीण झाली असेल
मजसम अपणाला ध्यास माझा असेल.

तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

सदय, पण, सख्याच्या मानसा पूर्ण जाणे
तिळभर असली ही कल्पना व्यर्थ घेणे !

मम विरह तुम्हाला जागवी शीण देई
स्थिति जरि असली का आपुली सत्य होई

तरि मग मज आहे इष्ट ही गोष्ट साच
सतत छळ सख्याचा हो मदर्थी असाच

जपुनि सतत वागा. काळ्जी सर्व सोडा.
प्रणय मजवरीच आपुला होन थोडा.

लिहुनि सकल धाडा वृत्त सोडूनि काम.
बहुत नच लिहिणे, हा मदीय प्रणाम.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

वेडगाणे

टला-ट रीला-ई

जण म्हणे काव्य करणारी.

आकाशाची घरे

त्याला प्रकाशाची दारे

ग्रहमाळांच्या वर अडसरी ग,

जन म्हणे काव्य करणारी.

पाचूंच्या वेली

न्हाल्या लावण्याच्या जली

दारी उभ्या स्वर्गीय नरनारी-ग,

जन म्हणे काय करणारि.

उडुगणांच्या यानी

बसुन विश्वाची राणी

अनंताची प्रदक्षणा करी-ग,

जन म्हणे काव्य करणारी.

चंद्राचे हसणे

वायूचे बरळणे

सृष्टिसुरात सुर मी भरी-ग,

जन म्हणे काव्य करणारी.

मी न तुझी-त्याची

मी न माझी-कुणाची !

ब्रह्मांडाच्या घडामोडी करी-ग,

जन म्हणे काय करणारी.

दिव्य भोगांच्या खाणी

गाय मनोमय वाणि

कशी वदेल राठ वैखरी-ग,

जन म्हणे काव्य करणारी.

टला-ट-रीला-री

जन म्हणे काव्य करणारी


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रमिला

राहे सत्कविकल्पनेत, सवितातेजात, जी दिव्यता
जीच्या ती नयनी वसूनि वितरी मांगल्यसंपन्नता

ती निद्रावश होय आज रमणी एकान्त शय्येवर.
वाटे की निजले निरभ्र गगनीनक्षर हे सुंदर !

येता दृष्टिपथात मी, मिटुनि जे संकोच पावे अती,
ते निद्रेत मुखारविंद फुलले मंदस्मिताने किती !

स्वच्छंदे प्रतिकरिता मजप्रति, प्रोत्साह ये ज्या नव,
हाले हात मृणालनालसम, तो माझा करी गौरव !

त्वा कैलास विरोध आजवर जो माझा सखे-साजणी !
त्याचा हा अनुताप काय दिसतो झाला असे त्वन्मनी ?

हे ओष्ठ स्फुरतात, आतुर जणो माझ्यासवे भाषणी,
निद्रा ही उपकारिणी प्रगतली, घाली हिला मोहनी !

माझी मूर्ति असेल सांप्रत हिच्या ह्रन्मंदिरी स्थापिली,
न्हाणोनि प्रणये, सुनर्म सुमने अर्पून आराधिली,;

झाले सस्मित आस्य, नेत्र उघडे ईषत्‌, कपोली कर,
रामा मंगलदेवता रमतसे निर्वैर शय्येवर

वाहे तो सरिदोघ, जोवै असे त भूवरि भूधर,
नक्षत्रांसह चंद्रसूर्य असती व्योमात की जोवरः

राहो तोवर ही अशीम विषमा निद्रिस्त रामा स्थिर,
मी राहीन असाच पाहत उभा हे चित्र लोकोत्तर !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पिंगा

माझा पिंगा गोड गडे
अद्वयरंगी रंग चढे.

नाचण मी मुळची मोठी,
उद्भवल्या माझ्या पोटी

कोमल नवनीतापरिस,
ज्योत्स्नेहुनि कान्ती सरस

दिक्‌रागाहुनि दिव्यतर,
चंचल चपलेच्याहि पर

वृत्ति गोरट्या अकलंकी-
माय तशा झाल्या लेकी !

प्रसन्न ह्रदयाच्या कोशी
असती सौरभसराशी

त्यास लुटाया पोटभरी
वृत्ती झाल्या हो भ्रमरी !

गोंगाटाला थांबविले,
श्रवणमनाला कळु न दिले

कौशल्याची नवलाई
रस चोरुनि प्याल्या बाई !

तो प्रमदांचा संभार
लोटुनि आला अनिवार,

बळेचि माझा धरुनि कर
मज केले वृत्याकार

धुंद नशा भरली नेत्री,
जीवन मुसमुसले गात्री.

गुरुलघुतेची कृत्रिम ती
पार उडाली मम भ्रांती.

मिळून आम्ही सर्वजणी
नाच मांडिला एकपणी.

अनेक नेत्रांचे बघणे,
अनेक कंठांचे गाणे

अनेक चरणांचे जाणे,
अनेक चित्ताचे स्फुरणे,

दृष्टी, वाणी गती, मती
एकच येथुन तेथुन ती.

प्रवाह बहुमुख जो होता
वाहे एकमुखे आता,

वृत्तीचे बळ मज मिळता
विश्व सहज आले गिळता.

पिंगा माझा सोन्याचा,
पंजर रत्‍नाचा त्याचा,

पहा ! उघडिले दाराला,
पिंगा आकाशी गेला !

पिंगा माझा अलौकिक
शोधुन आला भूलोक.

चारी खाणी मी वाणी
सांगितले त्याने कानी !

पिंगा गेला स्वर्गाला.
भूवरि घेउनि त्या आला.

अंघ्‍रितली दडपुनि त्याला
नाच वरी म्या मांडियला !

दानव मानव सुरासुर
मी, मजविण ते निःसार !

मी येता उदयोन्मुख ते
जग तेव्हाची संभवते !

दुर्बलपण पहिले गेले,
क्षुद्रपणातुन मी सुटले,

जीर्णबंध सारे तुटले,
मी माझी मज सापडले !

स्वार्थजनित सद्‌गुणभास
जडले होत अंगास

ते गुण झाले मम धर्म
प्रेमास्तव आता प्रेम !

तारा सारंगीवरल्या
सम सुरी लागुन गेल्या;

भूते आली साम्याला
मोहर आनंदा आला !

विश्वबंधुता एकांगी
न पुरे माझ्या पासंगी,

भूते मी मजला नाते-
द्वैत कसे हे संभवते ?

मज कसले जाणे येणे !
भाव-अभावाविण असणे.

बुदबुद हो की कल्लोळ
अर्णवपद माझे अढळ !

काय करू पण कसे करू !
मीपण माझे का विसरू ?

’दीपकळीगे ! दीप्तीला
सोड-’ म्हणे का बुध तिजला ?

म्लानपणाविण लावण्य,
क्षीणपणाविण तारुण्य,

मंगलमांगल्यायतन,
नित्यानंद निरावरण,

विश्ववैभवालंकरण,
ते माझे ते-स्वयंपण !

पिंगा आला भर रंआ,
आत्मभाव भिडला अंगा.

नाच परी मम राहीना,
स्वभाव मुळचा जाईना !

नाचा माझ्या वृत्तींनो !
नाचा भुवनसमूहांनो !

नाच आपला भूताला
होवो शान्तिप्रद सकला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रणयप्रयाण

भंगता दीप तेजाची मृत्तिकेत कलिका नमते.

देवेंद्रचापचारुश्री, विखरता मेघ, ओसरते.

विच्छिन्नतंतुवीणेची श्रुतिरम्यरवस्मृति नुरते.

प्रस्फुट प्रीति नंतर ती, उद्गारमाधुरी सरते.

नष्टता दीप वीणा ती

सुप्रभा न सुस्वर उरती,

निर्मिती न अंतःस्फुरणे, संपता प्रणय, गीताते !

रागोर्मिरक्तचित्ताचे मग मधुर काव्य ते कुठले ?

नैराश्यजन्य नादांचे चिर निलय ह्रदय ते बनले.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

उध्वस्तसदनशालेच्या रंध्रांत वायु जणु बोले !

सागरी निमाले कोणी,

त्यावरी घोर घोषांनी

जणु आक्रंदन वीचींनी मांडिले विकलचित्ते ते

ह्रदयांचे मेलन होता पाखरू नव-प्रीतीचे

त्यागिते प्रथम त्यामधले कोटर प्रबलबंधांचे;

अबलांतरि वसते घाले सोसाया पूर्वस्मृतिचे.

बा प्रणया ! भंगुर सगळे

वस्तुजात म्हणसी इथले,

का क्षीण सदन मग रुचले स्वोद्भवस्थितिप्रलयाते ?

तुज विकार आता ह्रदया ! आंदोलन देतिल खासे,

शैलाग्रकोटरी गृध्रा हालवी प्रभंजन जैसे.

तुज हसेल तीव्र प्रज्ञा अभ्रांत जसा रवि हासे

तव तुंग नीड ते कुजता,

कोसळूनि आश्रय नुरता,

हिम पडता, पल्लव झडता, उपहासित होशिल पुरते !

दीपज्योतीस

सोन्याची तनु जाळितेस अपुली पाषाणमूर्तीपुढे,

मुग्धे ! ते वद कोण पुण्य तुझिया हातास तेणे चढे ?

सारे विश्व बुडे तमात तिकडे भांबावुनी बापुडे,

गे ! निष्कंप, तुला परंतु इकडे, ही ध्यानमुद्रा जडे.

घ्याया कोंडुनि मंदिरात जगदुद्यानी न तू जन्मली,

वाया नासुनि जावया नुगवली बागेत चाफेकळी !

व्हाव्या वर्धित वस्तु ज्यात वसते सौंदर्य अत्युत्कट,

इच्छा केवळ की ! न वस्तुसह ते पावो जगी शेवट.

प्रत्यंगी अवघ्या प्रकर्षभर ये ज्यांच्या पुरा मोडुन

त्यांच्या पूर्णपणास सुस्थिरपणा येथे न अर्धक्षण,

पूर्णोत्थानपनकाल तोच पतनप्रारंभही होतसे,

ऐसा निष्ठुर कायदा सकल या सृष्टीत शासीतसे !

येथे नूतनजीर्ण, रूप अथवा विद्रूप, नीचोत्तम;

न्यायान्याय, अनीतिनीति, विषयी संभोग का संयम;

जाती ही भरडोनि एक घरटी, एकत्र आक्रंदत,

आशा भीतिवशा म्हणूनिच मृषा स्वर्ग स्रुजी शाश्वत.

हे विषम्य असह्य ’होतसमयी’ स्थापावया साम्यता,

तेजोवंत यदा यदा त्यजुनी ती प्रेतोपमा स्तब्धता;

अन्यायप्रतिकारकार्य करिती नाना प्रकारान्तरे,

दारी बंड ! घरात बंड ! अवघे ब्रह्मांड बंडे भरे !

हे लोकोत्तर रूप तेज तुजला आहे निसर्गे दिले,

की तू अन्य तशीच निर्मुनि जगा द्यावीस काही फले;

दाने दे न कुणा निसर्ग ! धन तो व्याजे तुम्हा देतसे,

ते त्याचे ऋण टाक फेडुनि गडे ! राजीखुशीने कसे !

होता वेल रसप्रसन्न फुटुनी येतो फुलोरा तिला,

ती आत्मप्रतिमास निर्मुनि हसे संहारकालानला;

’वाडा आणि जगा’ निसर्ग म्हणतो सृष्टीस भूतात्मिका,

डोळ्यांनी उघड्या पहात असता होशी गुन्हेगार का ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

वात्सल्य

पूर्वेला स्पर्शुनि शशि अस्तंगत झाला,

उदरस्थ बिंब तदनंतर ये उदयाला.

पाहता पुत्रमुख अश्रु तिचे ओघळले.

हिम होउनि होते ते सृष्टीवर पडले.

व्योमस्थ दृश्यसाम्य ते तदा महिवरले

पाहिले; नष्ट शैशवस्मरण टवटवले.

निष्कलंक मुख, विस्तीर्ण भाळ तेजाळ,

तनुवर्ण धवल, करुणालय नयन रसाळ.

ती मातृदेवता उंच समोर करात

शिशु धरूनि होती तन्मुखदृक्‌सुख पीत.

या निखळ सुखाचा सहकारी प्रेमाचा

तो होता तिजला अंतरला जन्माचा.

दामिनीदामसम दारुणतर ते स्मरण

हदरवी स्फुरुनिया तदीय अंतःकरण.

ह्रदयाच्या दिसला खोल कपारी आत

शून्याचा अंधुक देश अपार अनंत;

दुःखाचा अन्तःप्रवाह वाहत होता,

ओलावा त्याचा स्फोट मुखी हो करिता.

पूर्णस्थ बिंदु म्रुदु गंधवाह हलवोनी

दो बिंदूंचे करि एकजीव मिळवोनी;

या विश्वकदंबी तेवि मातृबिंदूते

शिशुबिंदु मिळे जगदंबदयामृतवाते

आरक्तरेणुरविहास्य उधळले तिकडे,

ते उदित बालसुमहास्यपरागहि इकडे.

ते बालभानुपदलास्य नभावर चाले,

ते मातृह्रदावर चंचल शिशुपदचाळे.

पाहता प्रभाती बालजगा वर खाली

कृष्णस्मृति संपुनि मातृमुखी ये लाली,

सद्‌गदित ह्रदय तद्‌गात्रांसह थरथरले,

नेत्रातुनि अविरत वात्सल्याश्रु गळाले;

वात्सल्य दिसे ते बहुविध विश्वविकासी,

ते विश्वात्म्याचे विमल हास्य अविनाशी,

ते स्वार्थसमर्पण धन्य परार्थासाठी

प्रत्यक्ष निर्मिते स्वर्ग धरेच्या पाठी.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

चाफा

चाफा बोलेना, चाफा चालेना,
चाफा खंत करी काही केल्या फुलेना ॥ध्रु०॥

गेले आंब्याच्या वनी

म्हटली मैनासवे गाणी

आम्ही गळ्यात गळे मिळवून.

गेले केतकीच्या बनी

गंध दर्वळला वनी

नागासवे गळाले देहभान.

आले माळ सारा हिंडुन

हुंबर पशूंसवे घालुन

कोलाहलाने गलबले रान.

कडा धिप्पाड वेढी

घाली उड्यावर उडी

नदी गर्जुन करी विहरण.

मेघ धरू धावे

वीज चटकन लवे

गडगडाट करी दारुण.

लागुन कळिकेच्या अंगा

वायु घाली धांगडधिंगा

विसरुनी जगाचे जगपण.

सृष्टि सांगे खुणा

आम्हा मुखस्तंभ राणा

मुळी आवडेना ! रे आवडेना !!

चल ये रे ये रे गड्या !

नाचु उडु घालु फुगड्या

खेळु झिम्मा, झिम्‌ पोरी झिम्‍-पोरी झिम्‌ !

हे विश्वाचे आंगण

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण

जन विषयाचे किडे

यांची धाव बाह्याकडे

आपण करू शुद्ध रसपान.

दिठी दीठ जाता मिळुन

गात्रे गेली पांगळुन

अंगी रोमांच आले थरथरून

चाफा फुली आला फुलून

तेजी दिशा गेल्या आटुन

कोण मी-चाफा ? कोठे दोघे जण ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

निवेदन

रम्य संध्येसम बालपल्लवांनी

मधुस्यंदी माकंदमंजरीम्नी

गुंफिलेल्या एकान्त निकुंजात

कूजनप्रिय रमतात खगव्रात !

मंद विचरे मधुमत्त गंधवात,

शान्ति विश्रमली ज्या स्थली नितान्त,

चाल कुंजी त्या; गूढ इंगिताला

कथिन तुज मी अव्यंग शुभांगीला.

दिशा उत्कंठित अंबर प्रसन्न,

उदय पावे शशिबिंब रसक्लिन्न;

रूप पाहुनि हे सृष्टिसूंदरीचे

स्तब्ध झाले चांचल्य निसर्गाचे

दिव्यगंगातीरस्थ वल्लरीला

मुकुल आले त्या एक निर्मलेला;

वाहुनी ते मद्भाग्यगंधवाहे.

दिले येथे आणून वाटताहे.

अपार्थिव जे संगूढ भाव चित्ती

व्यक्त संज्ञेने मात्र करू येती;

स्पष्ट करिता ते बळे, सर्व जाते-

कान्ति, मार्दव, सौरस्य त्यातले ते !

ओढ तत्रापि स्तब्ध बसू दे ना,

समुत्सुक मन संकल्प करी नाना,

भ्रमति ऐक्या विशयीच ते क्रमाने

रत्‍नसानु-ग्रहमालिकांप्रमाणे !

होय खळबळ जी अंतरी मदीय,

भ्रमणवेगाची तीव्रता तदीय

स्पंद ह्रदयाचे स्तब्ध निकुंजात,

काहिबाही करितील तुला ज्ञात !

कुंज आधी सम्मोहनीय भारी,

वरी रमणीसहवास मनोहारी !

भ्रान्त होउनि बरळेन जरी काही

दोष माझा तिळमात्र त्यात नाही !

नभी दोषाकर हा पहा उदेला,

भ्रंश मनुजाच्या पाडितो मनाला;

गोड इंदूचा आणि पिसाटाचा

सिद्ध आहे संबंध अनादीचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आशादेवी

झाली पश्चिम लाल लाल सगळी रक्तामधे माखुन,

गेली माजुन मानदर्पमदिरा बेहद्द ती प्राशुन;

प्रेतांनी भरले नभातिल दरेकोरे तयांच्यावर

मांसाच्या चिखलात मुक्त फिरते ही भैरवी भेसुर.

होती पूर्व ! उषासखी, गुणवती, सत्वाढ्य, तेजोवती,

जीचे नित्य मृदुत्व लज्जित करी जाईजुईशेवती;

ती हा प्राणिविनाश घोर बघुनी उद्विग्न झाली पुरी

शिंतोडे पडले अशुद्ध उडुनी तन्मंगलश्रीवरी.

रक्ते रंजित भोग काय करणे प्रीत्यर्थ त्यांच्या रणे ?

येथे सात्त्विक संपदा न मिळती का रक्तपाताविणे ?

आहे मानवजाति आक्रमित का उत्क्रान्तिपंथाप्रती ?

शंका त्रासविता अशा, दिसुनि ये तो चित्राकृति.

"होते सर्व सभोवती पसरले संदिग्ध श्यामाम्बर,

काळ्याशार ढगात थेट शिरता भूगोल हो गोचर;

तारा लोपुनि सर्व एक सरसा अंधार हो वाढता

तेथे पश्चिम पूर्व कोण कुठल्या ? सार्‍या दिशा आटता.

विश्वातील समस्त वस्तुमधले सौंदर्य जे जे असे,

नेत्रींच्या पुतळीकडून जपुनी वेचूनि घ्या ते कसे !

चित्ताची बनवून मूस, तुमच्या सत्कल्पनेच्या करे

ओता मूर्ति तुम्हीच, कारण गिरा लाजोनि येथे सरे !

भूगोलावर त्या अधिष्ठित अशी कोणी कुमारी असे,

रुपा आत नव्या छटा उफळता ’न्यारी’ खुमारी दिसे !

अंगांगे गळली, तशीच मळली खेदे मुखश्री, किती,

स्कंधिचा सरला जरी पदर तो नाही तिला शुद्ध ती.

आकांक्षा, असहायता, अबलता, चर्येवरी रेखले

होते भाव, तयास पाहुनि झणी पाणी मुखीचे पळे;

स्नेहस्निग्ध नसे तिची नजर, ती शून्याकडे लागली,

वाटे स्वप्नदशेत चूर सगळी वृत्ती तिची जाहली !

वीणा एक जवाहिरे जडविली होती, जियेच्या वरी

तारा सर्व तुटोनि एक उरली बाकी, तियेला जरी

होती छेडित ती तशीच बसली काढीत तारेतुनी

नाना सुस्वर मालिका, मृत मना चैतन्य दे तो ध्वनि !

हे चेतोहर चारुचित्र विरले त्या चारुगात्रीसह,

झाला जीव विषादजन्य ह्रदयग्लानीमुळे दुस्सह;

आहे सर्वविनाश ’आ’ करुनिया आता समीपशित,

यत्‍नाच्या परमावधीविण टळेना, तो असे निश्चित.

होते कार्य न हो, तरीहि पडल्या काळात या कष्टद

गाणे पूर्वपरंपरादि महती हे शुद्ध हास्यास्पद;

तेणे काय फसेल धूर्त जग हे वाटे असे आपणा ?

हे तो केवळ आत्मवंचन ! पुरे आता जुन्या वल्गना !

विज्ञाने निगमागमात असती किंवा पुराणातली,

ती तेथेचि असोनि द्या ! गरज ना त्यांची कुणा राहिली

शान्तिप्रेम समत्व पाठ नसते गाऊची द्या आजला,

जे का मोहनमंत्रबद्ध असती माझे कवी त्यांजला.

आहे हा व्यवहाररूप अखिल व्यापार जो जो दिसे,

हे आहे जर मान्य, कायम ठसे त्याचे घडावे कसे ?

निर्मावे जग अन्यथा, त्यजुनिया वस्तुस्थितीला सदा

राष्ट्रात्मा अति पंगु पोकळ बने तेणे; नसे फायदा.

आहे बाल्यदशा दिसंदिस जरी वाढीस हा लागला

चालू मानववंश, हे न समजा की पूर्णता पावला,

हा तो नित्य चुके, प्रसंग पडती बाके, सदा काळजी !

खात्रीचा न उपाय एक म्हणुनी योजू नये काय जी ?

आयांचेच नसानसात उसळे ते रक्त जे दुर्धर.

ना बाहेर न आत खास जगती आम्हास जे दुष्कर;

देऊ तोंड नवीन काळ जर हा होऊन आम्ही नवे,

येते पालटता अम्हांसहि पुढे आल्या स्थितीच्या सवे.

आहे जोवरि एक तंतु उरला वीणेवरी शाबुत,

आशा अद्‍भु रम्य बोल असले राहील तो काढित;

ती होऊनि निराश, उज्ज्वल तिची स्वप्ने लया पावती

रक्षो एक तदा दया भगवती आम्हा प्रभूचीच ती !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

मनोहारिणी

पदन्यास लावण्यप्रान्ती ही करिते रमणी;

तारामंडित निरभ्रांबरी जशी रम्य रजनी !

शुभ्र कृष्ण वर्णातिल सारी मोहकता आली

नेत्री, गात्री, एके पात्री, ह्रदयंगम मेळी.

सम्मीलित ती कान्ति दिसे अति शान्त सरस नयना,

शशिकरंजित रजनीसम, जी प्रखर दिना ये ना.

उषा किरण, की अधिक झाक, जर या रूपी पडती

अनिर्वाच्य ती संगमशोभा अर्धी तरि जाती !

कृष्णकेशपाशावरी येती श्याम श्याम लहरी,

शुभ्र तेज मुखसरसिरुहावरि सुरुचिर लास्य करी.

मृदुमंगल मधुभाव आननी जे मुद्रित होती-

किती शुद्ध, किती रुचिर, उगम निज ते प्रस्फुट करिती

मृदुल कपोली हास्य मनोहर जे क्रीडा करिते,

भास्वत्‌ भाली शान्त तेज जे संतत लखलखते.

मूकचि त्यांच्या वक्‍तृत्वाने हिजविषयी पटते

साक्ष मनोमय पवित्र चारित्र्याची ह्रदयाते.

निर्वैर भूतमात्राच्या ठायी हिची चित्तवृत्ति

निर्व्याज प्रेमलभावाची ही रमणी मूर्ति.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आम्ही

अस्ताव्यस्त इतस्तता पसरली हाडे, युगे लोअली,

होते कोण कसे न आठवण ही कोणा जरा राहिली;

गोळा होउनि ती पुनश्च उठती, शून्ये बसू लागती,

होते कोण, किती असे जगऋणी, प्रत्यक्ष ते सांगती.

हे फुंकीसरसे घडोनि आमुच्या एकाच ये अद्‌भुत,

सामर्थ्ये पुरवीत आजवरती आलो जगा शाश्वत;

अंगा फासुनि राख खंक बनलो आम्ही फिरस्ते जरी,

आज्ञा केवळ एकटीच अमुची राणीव विश्वी करी.

श्रीरामात पहा प्रताप अमुचा, ऐश्वर्य कृष्णी पहा,

रुद्री उग्र कठोरता, सदयता बुद्धात साक्षात पहा;

ते आम्हीच महंमदास दिधली खैरात पैगंबरी,

ते कारुण्यहि आमुचेच उठवी जे ख्रिस्त मेल्यावरी.

भावी सत्कवि, ते चिकित्सक पटु, प्रख्यात अध्यापक

मंत्री नाविक वीर दार्शनिक ते व्युत्पन्न वैज्ञानिक;

आहे ह्या घडवीत आज अमुची चिच्छक्ति या भारती

मत्तां मर्दुनि द्यावया अभयता संत्रस्त भूताप्रति.

हिंदूस्तान पहावयास अमुच्या नेत्रे शिका, या कसे,

रोखायास तुम्हांस शक्ति मग या जंजाल काला नसे !

होते सृष्टि नवी, कलेवर जुने टाका, तुम्ही व्हा तसे,

हे ना होय तरी मरा ! न तुमची कोणास पर्वा असे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गिरीगान

उदयगिरीवरच्या पृष्ठी उदयोन्मुख सारी सृष्टि.

नित्यविकासपरायणता ही काळावर दे सत्ता.

ब्रह्मांडा घालुनि फेरी वायूंचा येती लहरी.

लपेटती त्या रणत्करा कणखर शैलाच्या शिखरा.

तेजाच्या लहरी येती उन्नतवक्षी आदळती,

परावृत्त तेथुनि होती भोताली प्रान्तोप्रान्ती.

अस्फुट वर्णाच्या पंक्ति अव्यक्तातुनि कोसळती,

उघडपणे रूपा येती हिमस्नात कलिकांवरती.

नेत्रास न अग्रे दिसती आढ्य द्रुम जेथे असती,

गवताचे छोटे पाते उत्साहे तेथे डुलते.

प्रचंड खगपंक्ती जेथे आकाशा फोडित जाते.

पतंग तेथे निःशंक फडकावी चिमणे पंख.

तुंगनगोत्संगी ललिता गंधलता दिसती झुलता,

कुसुमित कोरांटिहि पसरी निजरंगच्छबि-तनुलहरी.

एकेका हिमबिंदूची पाकसुरत लावण्याची

अत्यद्‌भुत अंतःसृष्टि गिरिशीखरी येते दृष्टी.

गत झाले ज्यांचे प्राण त्यास मिळे पुनरुत्थान

या शाश्वत प्राणागारी ऐश्वर्याच्या माहेरी.

विद्युन्मय स्वातंत्र्याचे श्वास वाहती अद्रीचे.

विशालता ही विकसविते व्यक्तिदृष्टिसंकोचाते.

परम सूक्ष्म अंतःकरणी निजकिरणी साक्षी कोणी.

रेखी दिव्ये; काही ती साम्राज्ये होउनी येती.

तडिलुताहास्यप्रभव उग्रवीर्य मारुतदेव

अजस्रबल वीरप्रवर दानवहंता वज्रधर

वरुण, सोम, पावक तरुण, अरुणादिक निजजनकरुण

सुरगण ते अनुदिन रमती गिरिशिखरश्रेणीवरती.

पुरा आर्यशस्त्रा यांनी विजय दिले संपादोनी,

ज्ञान देउनी अपरिमित त्रस्त जगा केले मुक्त !

उषःकाल तो आर्यांचा जनिता परमाश्चर्यांचा.

महोदार नवघटनेचा मानववंशविकासाचा.

भाग्याची ही उषा पुनः जरी प्राप्त व्हावी अपणा,

चला जाउ या गिरिगहनी महा सिद्धिमुलस्थानि !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

तू देशी न तुझे

तू देशी न तुझे, कशास मग मी द्यावे तुला आपले

दे माझे परतोनि चित्त मज जे ठायी तुझ्या गुंतले.

छे ! ते ठेव तसेच. नाहक नको तो शीण का की, हटे

माझे चोरुनि चित्त नेतिल पुन्हा डोळे तुझे चोरटे.

एका संकुचितान्तरी उगिच का चित्तद्वया दाटणी

दोघांना मिळणी जरी न घडते एकान्त एकासनी ?

कोठे ते सदयत्व सांग, ह्रदये फोडोनिया, आपणा

ठेवाया सजलीस दूर जरि तू स्नेहानुबंधाविना ?

वाटे प्रीति मला महा बिकट ही कूट स्वरूपे असे.

ती निर्धार मनास एकहि धरू देना. करावे कसे ?

भासे, आकळिले रहस्य सगळे प्रेयप्रमेयातले

तो तो चंचल होउनी मन पुनः शंकेमुळे गोंधळे.

चिन्ते, यास्तव जा त्यजून मज, तू खेदाहि जा, या क्षणी.

नाना व्यर्थ करूनि तर्क तुमच्या संगे झुरावे कुणी ?

माझे लंपट चित्त- तेवि सखिचे माझ्या ठिकाणी-असे

ऐसे भावुनि वाट पाहिन तिची निःशंक मी मानसे.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

विचारतरंग

नीलप्रभ निर्मल गगनी विशुद्ध वाहे सुरतटिनी

पारावारि समवटुनी रमती विबुधरमणरमणी.

चंद्र सुधामय पुष्करिणी गगनाला शोभा आणी

दीप्तींची लेवुनि दुकुले तारांगण तेथे जमले.

क्षुब्धार्णव जल मग्नाला दाखविती हे मार्गाला

भोगाचा कर्तव्याचा मेळ मनोहर हा साचा !

वाटे, तारा होवोनी विचारावे अवघ्या भुवनी

धरणीच्या ह्रदयावरती ठेउनि कर हसवावी ती !

विहंगमोत्तम की व्हावे आकाशी वरवर जावे !

नूतन नूतन प्राम्ताते आक्रमुनी जावे वरते.

उदयगिरीच्या पलीकडे बालरवीचा किरण पडे

प्रथम करुनि त्याला प्रणती शुभवार्ता कळवू जगती-

"घोर निशा संपुन गेली ! मंगल वेळ जवळ आली !

खंत सोडुनी कामाला लागा, रवि उदया आला

हताश जे झाले स्वजन चैतन्याचे संचरण

करणे त्यांच्या देहात भाग्य हे थोड्यांना प्राप्त !

सोप्या सोप्या शब्दांनी, स्फुर्तिसूत्राने गुंफोनी,

मंजुळ मंजुळशी गाणी रचुनी रसिकान्तःकरणी

हळू शिरावे चोरोनी जावे मीपण लोपोनी,

हौस मनी ही असे परी टीका तीते विफल करी !

अंतःकरणपटावर ती आत्यंतिक वेगे उठती

दिव्य लेख उन्मेषाचे धरावया ते स्मृति काचे.

बुद्धीच्या भिंगावरती बिंबित ज्या प्रतिमा होती

शब्दचित्र त्यांचे कसले नकळे काढिल मन दुबळे

सरस्वती कंठा भरण वाचुनि हे वरचे कवन

गद्गद वदला हासोन धन्य कवी ! कविता धन्य

शब्दचमत्कृति यात नसे, गांभीर्याचा लेश नसे,

सत्याचाही गंध नसे हनुमंताचे पुच्छ जसे !"

वानर होता नर झाला ग्रहण लागले ग्रहगोला

धूमकेतु गगनि आला विषय असे घ्या कवनाला.

सिद्धान्त घेउनि शास्त्रांचे करा कथन त्या सत्यांचे

पुरे पुरे कल्पना पुरे काळ मागला आज सरे.

थांबा थांबा रसिकवरा ! गदारोळ हा पुरे करा !

प्राण कल्पना काव्याला न कळे हे मतिमंदाला

एक न धड भाराभर ती चिंध्यांची खोगिरभरती

तुटपुंज्या ज्ञाने फुगती रसज्ञ अपणाला म्हणती.

पंडितपन ते रसिकपण बहुधा असती ही भिन्न

दोहोंचा अन्वय एकी सांप्रत दुर्मिळ ह्या लोकी !

महाराष्ट्र कवि परंपरा खंड न पडला तिला जरा

उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी.

भौतिक शास्त्री या काव्यी कल्पनाच वैभव मिरवी

अभेद मज दोहोत दिसे कोण शहाणे, कोण पिसे ?

जे जे विश्वी ज्ञेय असे त्यात कल्पना मात्र वसे

करा कल्पना वजा बरे म्हणजे बाकी शून्य उरे

संगम ह्रदयंगम साचा मृणाल अलि या युगुलाचा

अथवा सज्जन रसिकाचा सहजमनोहर कवितेचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अनुकार

दोष कुणाला ? एकदा निखालस बोल.

भूभृत्कटकावृतवनखंडी,

कटु वाग्‌जल्पनतांडव मांडी,

प्रतिध्वनिप्रति परिसुनि सांडी,

निज भानाला. एकदा निखालस बोला.

अंतर्वीणातंतुततींना

कठोर हस्ते करी ताडना,

कर्कश रव कर्णी पडताना

येत रळीला. एकदा निखालस बोला

निःस्वार्थी सारस्वत तीर्था

पंक त्यावरी फेकी जाता,

कोणी या स्वैरास वारिता

निंदी त्याला. एकदा निखालस बोला.

प्रकृति-सद्‌भिरुचीचे युग्म

आहे प्राक्तन संस्कारासम.

विसरुनि तद्वैचित्र्य मनोरम

कोपा आला. एकदा निखालस बोला.

व्यासोच्छिष्ट जरी जग सारे

का झाले होतात पसारे ?

उष्ट्या जगती जन्म हरे ! रे !

का सर्वाला ! एकदा निखालस बोला.

विश्वविभूषण पुष्प हवे ना ?

दुखवुनि लघुगुरु तरुलतिकांआ

न मिळे ! आता पुरे विघटना.

जीव तान्हेला ! एकदा निखालस बोला.

अमोघ बळ शब्दांचे पाही,

आत साठवी अनन्तासही

शब्दे शब्द कसा मग जाई

हा हारीला ? एकदा निखालस बोला.

अंधार नगरचा उलटा न्याय,

अदंड्य दंडा भाजन होय;

पय घटिका परी, घड्याळ, हाय !

खाई टोला. एकदा निखालस बोला.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

नागेश

स्वैरालापमनोज्ञभावनिवहा तारस्वरे क्षेपुनी,

टाकी त्या मधुरे निनादनिकरे दिक्प्रांत संव्यापुनी,

तो प्रेमाकुल कोकिल स्वरमणीसाठीच ह्या रंजना

आरंभी यदि, काय ते न करिते सानंद अन्या जना ?

का होतोस विषण्ण काव्यविटपाग्रारूढ हे कोकिला ?

लागावा तुज वामने वद कसा पाषाण जो फेकिला ?

पादाघात- सरागवीक्षण - सुहास्यालिंगन -प्रोक्षणी

आहे वाग्वधुने सुमान्वित तुझा उद्यान केला क्षणी.

माते रानवटास ये न विविधालंकारनामावलि

गुंजा-कांचन-काचर‍त्‍न-निचये हो वा न हो वाकली

व्यापारी जन आदरोत असली लेणी; मदीयांतरी

आहे ती रुचिरा निसर्गमधुरा नागेशवागीश्वरी !

आहे भुषणहीन वाग्वधु तुझी ना व्यंजना का मुळी ?

हे आश्चर्य ! वधू विरक्त न कधी म्या ऐकिली पाहिली !

मुग्धा शास्त्र विदग्धधींस न पुसे, ते पूज्य हे तो खरे

व्हावी ही गुरुमंडळी पण- ? पुढे बोलू कशाला पुरे !

टीकाकारमतानुसार रचना जाता करू सत्वर

रम्योद्यान उजाड रान अवघे होईल, शंका नको !

व्हावा नष्ट ’विशेष’ इष्ट न मुळी वैचित्र्य याच्यामुळे

त्यांना काय रुचे मला न बहुधा त्यांचे न त्यांना कळे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

चांदणी

चकाके ’चुनी’ मुदीवरची, चांदणी तसलिच नवलाची !

साज नव तेजाचा करुनी लखाके किति कोमल किरणी

तिचे ते उदित तेज पिउनी जनवन गेले वहकोनी !

प्रौढपण निज निपत त्यजुनि बनली पोरच जणु धरणी !

गिरि गंभीरपणा त्यजुनी पाहतो शिर वरवर करुनी.

नेत्रपुट तृण झटपट मिटुनि खिळले चुळबुळ विसरोनी.

खगगण शब्दविषय फितुनी गेले ठायिच विरघळुनी !

जटिल वनदेव बावचळुनी भ्रमे वनि शमदम गमवोनी !

कुठे तो स्वर्ग, कुठे धरणी ! चांदणी त्यांची नच कोणी !

मग ही ह्रदयंगम करणी काय ये ’निष्कारण’ घडुनी ?

कर्कश शुष्क तर्कनिपुण प्राज्ञवर पंडित परिपूर्ण

मात्र हे विशाळ ’मणिगोटे’ भिजले नच सद्रसलोटे !

नजर न त्यांचेवर ठरते, उरावर जड दडपण पडते.

गहन विद्वत्ता परितापे प्राकृत जग थरथर कापे !

सुंदर मंजुळ मधु मृदुल भूतिबलमुदमंगल-मूल

भावमय सत्‌चित जग असले, त्यास हे प्रज्ञाघन मुकले.

चमक गे तारे ! तू गगनि आपुल्या शीतळ किरणांनी

शान्त सम शुद्ध तुझे तेज, रुक्ष जीवन रंगवि सहज.

खाच निज ह्रदय साच करुनी गाडिला जगदीश्वर ज्यांनी,

तुज ते ’अल्पतेज’ म्हणती, क्षुद्रपण उघडे निज करिती !

उंच अति-मनुजशिरावरती असे तव सतत सहज वसती.

तेज-अभिषिक्त ज्यांस करिते, तयांचे स्वय्म समर्थन ते

प्रौढपण मज निज विसरू दे, दिव्य तव तेज तेजी मिसळू दे;

शुद्ध अद्‌भुतरस उसळू दे, जगज्जीवन जगि कवळू दे.

काव्यगगनांगणगत नवल ’बालकवि’ तारा अति विमल.

हाहि सरसोज्ज्वल कविताही जीव मम बुडवी सुखडोही !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रभात पोवाडा

शूर मर्द महशूर देश दख्खनचे सरदार,

मानकरी बारगीर बाणेदार शिलेदार.

गावगावचे मिळोनि भरली मजलस भरदार,

कवन कोणते गावे करितो फिकीर शाहीर.

रूप भयंकर, सुंदर, वाग्बळ थोर जोरदार,

पुराणकाळाचे अंगावर झगे चमकदार.

पूर्वकवीश्वर तेही सादर सदरेला झाले,

सिद्धरसाची गिरा तयांची नागर वच बोले-

"विचार करणे कशास" म्हणती "कवन म्हणायाचा?

काय शिरस्ता तुम्हा न ठावा शाहिरपेशाचा?"

चिरंजीव गत शाहीरांनो ! हीच धरून शिस्त

विद्यमान शाहीरमंडळी जाते नेमस्त.

यशःप्रशस्त्या, विजयकथा, ते समरचमत्कार

वीरपुरुष पुरुषार्थ निर्मिले आपण साचार.

अजब, मातबर, अगाध याहुनि भारदस्त काही

फिरोनि ऐसे, मान्य अम्हाला की होणे नाही.

गतास वंदुनि, गफलत सोडुनि, निजमार्गे चालू

वर्तमानकाळाची बाजू आम्ही सांभाळू.

चौशतकांची दीर्घ झटापट ही चालू आहे,

महाराष्ट्रजनसागर सगळा खळबळला आहे.

हिंदूयवनशीलातिल जो जो भिन्न भाव आहे

त्या दोहोतिल उत्तमतेचा हा झगडा आहे.

भरतखंड रणाअखाडा, झुंजार मल्ल दोन्ही,

निर्वाणीची दारुण त्यांची चाले झोंबी ही.

स्वदेशजनधर्माचा जीर्णोद्धार करायाते

झुंज मातबर सभोवार ही घनचक्कर होते.

हुल्लड हल्ला दौड गराडा घाला अवचीत,

शिकस्त खाणे, दुष्मन करणे चौमुंडी चीत,

मोड पळापळ झोड, जयाची आशा हिरमोड,

फसली मसलत, अंगा आली बाजू बिनतोड,

वीर यशस्वी, वीर अपेशी, वीर रणी पडला,

सामाज नावाजितो कडाकुन या सकळीकाला.

सर योद्धे करितात लढाई कमाल शर्थीने.

पतन सोशिती त्याहुन जास्ती जबर्‍या हिमतीने.

यास्तव आम्ही हार मानितो जीतीसम थोर

रणखंदाळी कडेविकट ही गातो घनघोर.

जीव कुडीसम शाहीराची मर्दाची जोडी

एकामागे दुजा तगेना लगे प्राण सोडी.

सभाजनांनो ! असे प्रार्थना तुम्हा शाहिराची

खबरदार होऊन खबर ऐकावी दुनियेची.

नुरो पैरवी पृथ्वीवरती हिंदूंची काही

जणू मनसुबा असा करी की सालिम दुनिया ही.

चौकिपहारे उत्कर्षाच्या ठेवुन हमरस्ती

हिंदुस्थानी बंदी केली हिंदूला पुरती.

कहीकवाडा वाढुन किंवा वेठबिगारींनी

पोट भरावे दुनिया म्हणते हरदम हिंदूंनी.

विसर विसर मस्तानी दुनिये ! तुझी बात पहिली

नजरबंद हिंदूंची आता नजर खुली झाली.

हिम्मत हिकमत धमक जोम निर्धार तडफ नेट,

धाडस धोरण हुरूप अक्कल पोच अटोकाट.

स्फूर्ति कल्पना प्रताप अघटित घटनासामर्थ्ये

पूर्वी होती, आता असती बघता सत्यार्थ्ये.

समुळ बुडावा हिंदू मर्जि असेल देवाची,

राजी आम्ही. करून जाऊ करणी मर्दाची.

जनचित्ताचे समुद्रमंथन दिशा दक्षिणेने

चालविले बहु काळापासुन हिरशी चुरशीने.

’स्वतंत्रता’ शिरताजरत्‍न वर उदरांतुनि येई

चतुर मराठ्याकरी प्रबल अभिमाने ती देई.

काळ मागला शोधुन बघता दृष्टीला दिसतेः

एके वेळी एक राष्ट्रची इतरांचे नेते;

पुढिल पिढ्यांना मानवतेच्या आस-भरोशाला

एका वेळी जामिन एकच देश होत आला.

देश मराठा लोक मराठा कुल वरकड देशा

नेता जामिन आज एक हा, नाही अंदेशा.

जय अपजय या स्वातंत्र्याचे युद्धी येतो की,

म्हणाला नकळे याचा शेवट कैसा होतो की.

कोण यशस्वी युद्धे झाली मागे सर्वस्वी ?

काय जगी निर्भेळ यशस्वी सांगा आम्हासी ?

आर्यराष्ट्र कृतकार्य कधी का ते होते झाले ?

कार्य निसर्गाचे का सांगा पूर्णतेस आले ?

विजयाचेही पोटी मोठी कार्ये उद्भवती

अधिक झटापट करणे लागे ज्यांच्या सिद्ध्यर्थी.

जनचित्ताला खळबळणारे एक ध्येय काही

जगदन्तापर्यंत टिकेसे कायमचे नाही.

ग्रहगोलांच्या निर्मळ ज्योती खुल्या हवेवरती

अंतराळागर्भांतुन पोहत पृथ्वीसह जाती.

काय तयांचे रहस्यमय ते साध्य न हे कळते

अचाट सुखमय आहे ’काही ते’ निष्ठा म्हणते.

जीवितगंगा त्याच एक आनंदसमुद्राते

प्रचंड वेगे गाठायाते धूमधडक जाते.

दैव मानवा साध्य सहज ते मिळवुनिया देते,

विपरित होता हिसकुन नेते असे असेना ते.

देशकार्य मागल्या पिढ्यांचे थांबुन का पडले?

धडे मागले गडी मराठे विसरुन का गेले ?

वृद्ध शुद्ध हतबुद्ध आपले कोणी का झाले ?

रस्ते भुलले, चळू लागले मागे रेंगळले ?

सरा पुढे पिळदार मराठे गति दुसरी नाही

तरुणाविण तो कार्यभार मग कोण शिरी वाही ?

उठा उठा नरनारी ! आता रात्र होय सरती

सूर्योदयकाळाचे शाहिर ललकारी देती.

नाथोदय चिन्हिता कंचुकी गात्री तटतटली

कणोकणी वसुधाङ्गी चंचल विद्युत्‌ संचरली.

सौंदर्याचा चढतो जणु की सत्यावर उजळा

लोकनाथ तो उदया येतो, वंदू या त्याला.

महाराष्ट्रपार्वती उग्रतप आजवरी तपली

परम कृपेची पाखर तिजवर परमेश्वर घाली.

दुःस्वप्नाची निशा चेटकी ओसरून गेली

उत्कट उत्कंठेने जनता उत्साहित झाली.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडक्याने.

महाराष्ट्रभाग्याची आता पहाट ही फुटली

दैन्यकाळिमा मराठमंडळवदनाची फिटली.

वैगुण्याच्या हिडिस ढगांनी दिग्बंधन होता

अवनति वाहुन चहोकडोनी शिगेवरुन जाता,

किरण पूर्ण तेजाचा कोणी कडकुन निकडीने

करित चुराडा त्यांचा येतो भूवर धडाक्याने.

महाराष्ट्रभूमंडन कंकण बांधुन विजयाचे

राय शिवाजी आला; वंदू चला चरण त्याचे !

स्थापायाला स्वराज्य दंडायाला मत्ताला

मदत करी तुळजा; हा राजा अवतारी झाला.

डाव मांडिला पांची प्राणा लावुन पैजेला

कोण जिवाचे साथी ? या ते साहस कर्माला.

स्थैर्याचे धैर्याचे क्षत्रिय वृत्तीचे असती

वाण सतीच त्यांनी घ्यावे हे उचलुन हाती.

पुरुषार्थाची एक सिद्धि की सर्वस्वी घात

साहसात या शिवरायाची तुमच्यावर भिस्त.

अमर्याद सत्ताबळ अगणित दळबळ शत्रूला

रणोन्माद उद्दाम जिद्द बेहोष करी त्याला.
विक्रमसागर त्याचा बुडवी उत्तर देशाला

लोट तयाचे धडका देती दक्षिण दाराला.

थोप थांबवायाला ती सह्याद्रि पुढे सरला

प्रचंड तो गिरिराज खरा पण आला टेकीला.

करुन चढाई फौजा आल्या भिडल्या दाराला

गड किल्ले कापती साहता त्यांच्या मार्‍याला.

महाराष्ट्रधर्माचे आहे क्षात्रकर्म बीज

'आब आज जाताहे' राखा भाई हो ! लाज.

शत्रुसंघ पाहता दाट बेछूट शूर होती

शिरा शिरा ताठती, अचाट स्फुरणे संचरती.

समरशूर गर्दीत एक बेधडक भिडुन मिसळे

शत्रुभार संहारकर्म विक्राळ परम चाले.

तुच्छ तनुब्रह्माण्ड चंड संग्रामकैफ चढतो

प्रशंसिता तुंबळ त्वेष लंगडा शब्द पडतो.

डंक्यावरती टिपरी पडली; हुकुम जमायाचा.

चला मराठे चला ! वख्त हा आणीबाणीचा.

हेटकरी मावळे, देशमु, पांडे रणबहिरी,

दरकदार, रामोशि, धारकरि सराईत भारी;

एक एक हंबीर वीर हा वर्णवे न काही

जय करण्याची चिंता अंबा जगदंबा वाही.

स्वधर्मकाव्यज्योति अखंडित तुम्हामुळे जळती,

राख तयांची होती सुरता तुमच्या जर नसती.

प्रबळ शत्रु खेटता तेज ये मुळचे प्रगटोनी

चला दाखवा तया मराठी भाल्याचे पाणी.

धर्मशिळेवर पाय ठेविला तो मागे घेणे

पूर्वजास ते उणे, आपुले हसु होइल तेणे.

पहा पहा ते पितर आपले काय बरे म्हणती-

"आभाळातुन पडला का हो ! तुम्ही धरेवरती ?

"भरीव छात वळीव भुज हे दिले तुम्हा आम्ही

"स्वोदपूर्तीकरिता केवळ आणु नका कामी.

"डोळे वाणी अमुची बघते वदते त्यात तुम्ही

"जीवलतेची नवती अमुची फुलली, तेच तुम्ही.

"स्वप्नाजागरी पडछायेसम आम्ही सांगाते

"करित मोकळे आहो तुमचे विजयाचे रस्ते."

काल बदलला, ध्येय बदलले, पूर्वपुण्य फळले;

अभिनवभारत जन हो ! आता जन्माला आले.

चित्र मागले तुम्हापुढे मी एक उभे केले

ओळख तुमची पटते का हो वदा त्यात पहिले.

चढती दौलत, बढता होवो वेल मराठ्यांचा

जय मराठे ! जय मराठे ! जय बोलो त्यांचा !

नव्या उमेदी, नवे जिव्हाळे, नव्या मराठ्यांचे

नवे भरोसे, नवे कवन हे नव्या उमाळ्याचे


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

क्षणभर

काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

काव्यानंद

दैत्यांनो ! न समुद्रमंथन, वृथा येथे बाळाची कथा

येथे वायुसुता ! हतप्रभ तुझी उड्डाणदर्पप्रथा.

होते अक्षमवेग यद्यपि जगच्चक्षो ! तुझे दर्शन

वाया केवळ वादपाटव न हे वाचस्पते ! वाग्रण.

येथे अद्‌भुतरम्य नित्य पडले स्फूर्तिप्रभेचे कडे,

अम्लान प्रतिभा-कळ्या उमलल्या आहेत चोहीकडे.

वोसंडे दुथडी भरूनि सरिता संकल्पना पावन

वृत्तींची रसलीन चंचळ खराश्रेणी करी क्रीडन.

सारीही जड इंद्रिये न शकती येथे प्रवेशावया

बुद्धिग्राह्य न वाव त्यास, न कळे ठाव प्रमाणत्रया.

वृत्त्यन्तर्गत टाकणे कठिणता, तद्रूपता पावणे,

काव्यानंदरसप्रसंग मग निस्संग संभोगणे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बंडवाला

"शोभिवंत भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

आलापित घाला हे होती मंजुल गीतस्वर

गडाच्या बसोनि टोकावर.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी"

नगर गोपुरे सोडुनि सारे म्हणसी येइन वनी

अगोदर विचार कर साजणी

दर्‍या आणि दरकुटीत आम्ही क्रमितो दिनयामिनी

यातले मर्म समज कामिनी.

वनविहरण मग मनोहारिणी ! करणे वदलो तरी

गातसे तेच गीत सुंदरी.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी."

"वारु पंचकल्याणी अबलख, करी शिंग ह्या खुणा

दाविती उघड करुनि आपणा.

"नृपमृगयावनरक्षक आपण स्वामिभक्त 'बनकरी'

दिसोनी ये हे वरच्यावरी !"

बाले ! बनकर शिंग मजेने वाजे आरुणागमी

आमुचे घोर निशेच्या तमी.

तरिहि सखी गातसे. "तीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे बसणे वनी"

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

"अंगि ऐट; चमकती हत्यारे; रक्त करी रंवरंव

भेरिचे झडता भैरव रव.

"नित्य असे पाहते; वाटते शिलेदार फाकडे

असावे खास हुजुरचे गडे."

रणभेरी कर्ण्याचा आता नाद न कर्णी पडे

किर्रती रात्रींचे वनकिडे;

संकेतध्वनि तो परिसुनि सरसावुनि भाले करी

सज्ज मन्मित्र होति झडकरी.

खरे, रम्य भीवरातीर ते ! खळखळ जळ वाहते !

खरे ते प्रमोदवन भोवते !

मम स्वामिनी होउनि अपुले जीवित मज अर्पिणे

कर्म हे अति साहस साजणे !

मत्त यवनकिंकरत्व-चिन्ही रति तव, मज संप्रती

शहाचा गुन्हेगार बोलती.

नाव गाव ठाव न मुळि आम्हा, घडीचा न भरवसा

कळेना अंतहि होइल कसा;

यास्तव अमुचा सुभगसुन्दरी ! संग न श्रेयस्कर

आम्हाहुनि पिशाच बरवा वर !

विकटविपिनवाटिकेनिकट विस्तृतविटपांच्या तळी

मंडळी मिळते टोळीतली;

होतो मागे कोण तदा ते आता आहो कसे

फिकीर न याची आम्हा असे !

"प्रफुल्ल भिवरातीर, तरीहि, गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट-वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी

सख्याच्या संगे बसणे वनी."


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बकुल

जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, मीहि ते घेतले.

स्वच्छंदे दिन दोनचार मग ती तत्संगमी रंगले.

रूपोन्मादभरागमे मज गमे सौम्दर्यलोकेश्वरी-

मी, माझा सहजाधिकार सुमनस्व्कार हा यापरी !

येताहो करभार घेउनि पुढे अन्य द्रुमांचा थवा.

चाकाटे मम चित्तवृत्ति बघुनि तो थाट त्यांचा नवा !

प्रारंभीच निशा वनात अपुला अंधार पाडीतसे,

हातीचे बकुलप्रसून गळले, केव्हा कळेना कसे !

सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे.

जाणे चित्त परंतु नित्य गगनी अस्तित्व त्याचे असे.

चेतोगर्भनभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे;

ते माते अथवा तयास विसरे मी- हे घडावे कसे ?

श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे,

चित्ता छंद जडे, अनावर मिठी प्राणास याची पडे,

स्फूर्तीच्या उठती अखंड लहरी याच्याच जीवातुन;

ठावे काय मला स्वभावचि असे याचा असा दारुण

पाहू वाट किती? 'क्षमस्व' म्हणते ! लाचार माझी स्थिति !

नेत्री प्राण उरे, कसूनि बघणे आता परीक्षा किती ?

नारीधर्मरहस्यभाग नव्हता ठाऊक माते जसा

नारीचा ह्रदयस्थभाव कळला नाही तुलाही तसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बुलबुल

निबिड तिमिर वर नभी संचरे

तळी उष्ण निश्वसती वारे,

सरणांचे भोवती निखारे,

स्थली या देख- एकटाच पिंपळ एक

चिरव्यथित तरुजीवज्योति

खिन्न तेज वितरिते सभोती,

जीर्ण विरल तत्‌पर्णावरती

दुःख निर्वाण-उमटवी ठसा निज पूर्ण !

उपेक्षिलेली पहिली प्रीति

रम्योदास तसे एकान्ती

एकस्थल या रौद्र प्रान्ती

तरीहि आहे-दरवळूनि परिमळ वाहे.

पांडुर मृदु लावण्यद्युतिजल

स्थलपरिसर करि ढाळुनि निर्मळ

जातिलता कुणि एकच केवळ

अदय नियतीने-लाविली तिथे स्वकराने

देह तिचा कृश फिकट पांढरा

पाहुनि होई जीव घाबरा,

वाटे सुटता उडविल वारा

पर्णसंभारा-वर भिरभिर सैरावैरा.

लागो वारा पाउस पाणी,

कुणी धृष्टकर टाको चुरडुनि,

तरि वरि भर ये वोसंडोनी

विकासश्रीला-ती अखंड मंडित बाला.

करुणामय स्वर्ललना कोणी

दिव्याश्रूंचे शिंपुनि पाणी

खचित करी संगोपन जपुनी

असे चित्ताला-वाटते बघुन वेलीला.

मृदुल धवल नव कुसुमशालिनी

व्रतस्थेस जरि बघतिल नयनी

सहजोद्‌गारे वदतिल रमणी-

"अगाइग, नवल- ही जाई नच येथील !

"वसंत न करी चैत्रशिंपणे,

"डोलत रविकर न करी येणे,

"झुरे न अंतरि तरिही तेणे

"अगाइग, नवल- ही जाई न या महिवरिल !

"साहुनि राहे कडक हिवाळा

"कुंजाचा आधार न इजला

"तरी भोगकल्लोळ सोहळा

"फुलांचा भोगी- ही जाई नवल जोगी !"

आश्चर्य एक की कुणि अलबेला

पक्षी पडता नच दृष्टीला

येई तत्सन्निध रात्र्ला

प्रेमघायाळ-भटकोनि रानोमाळ !

चाले त्याचा दीर्घ निशेभर

गूढ भावमय मृदु गीतस्वर

जणु निर्जर वीणाझंकार

की बुलबुल बोले-वनराई मोहुनि डोले !

ह्रदयि खवळला शोकसागर

कंठातुनि तरि निघती सुस्वर

येती ऐकुनि होती ते नर

स्वच्छंदी फंदी - नादाच्या ब्रह्मानंदी !

पक्षी आपण, प्रीती केली

भासे त्यांना वाया गेली

नयनाश्रू ओघळती खाली

चाखिती धुंद-दुःखाचा परमानंद !

उदास रजनी नच संपावी,

जागर दुःखे ही सोसावी,

चित्त तयांचे असेचि भावी

विलक्षण भारी-विरुताची जादूगारी

दिशा फाकती, तेज उगवते,

प्रभात होते, गीत थांबते;

त्यासरसे ते दृश्य वितळते

तेजबंबाळी-रम्याची होते होळी !

उत्कटतेने ह्रदय फोडिती

ते स्वैर स्वर रूपा येती;

कोणी म्हणती त्यात उमटती

स्पष्ट साचार-रमणीचे नामोच्चार !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

एक संवाद

चिमुकल्याच चांदण्या चमकती स्फूर्तिकणाच्या परी-

'होती लुप्त अनन्तोदरी !'

वर्षाकाली जलमय भूतल निर्झरगण तो करी-

'राहे धूळ निदाघी खरी !'

बालतृणांकुर वेलबुटीची शाल महीची करी-

'विटते निमिषाच्या अवसरी !'

नाजुक फुल जाईचे भारी वासे भुवना भरी-

'एका श्वासे सुकते परी !'

सौंदर्याची मूस ओतली नार अशी साजरी-

'होतो रंग फिका लौकरी !'

नवकाव्ये कवि करिती, असती मोत्यांच्या जणु सरी-

'पाणी क्षणिकचि त्यांचे परी !'

सख्या खोडिसी मला असे का? सान चांदण्याविना

निशेची काही कर कल्पना.

बालासम हे स्वैर नाचरे ओढे नसते तरी

होती रुक्ष मही मग पुरी !

कोमल मधुरोज्ज्वल भावांची खाण न जरि सुंदरा

जिणे मग दुःसह होते नरा !

नभाएवढा भानु एकटा पृथ्वीभर की तळे

कल्पिता कल्पनाच मावळे !

चंद्र एकटा रम्य; वेष्टिता असंख्य तारांगणी,

शोभा होते का रे उणी ?

स्तुतिनिंदेची अभ्रे येती सामान्याच्या वर,

सत्कवि दोहींच्याही पर.

क्षणभर अमुचे जीवित म्हणशी, असोचि ते क्षणभरी

चमकुनि जाऊ 'कोठे तरी.'

भाग पाडुनि तोल जाता काळाचे एकदा,

गोंधळ संपेना मग कदा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

यमदूतास

अखिल जगतात- आनंद नांदतो मूर्त ॥ध्रु॥

स्वर्णरसांकित गिरिशिखरात,

अरुणरागरंजित मेघात,

स्निग्ध शांत की शशिप्रभेत,

शब्द होतात- 'उठ भाग्य लूट जगतांत ।'

प्राप्तस्थिति असता विपरीत

भग्न जीर्ण निर्जल विहिरीत

उगवुनि पिंपळ वर येतात

ते म्हणतात- 'चल जाऊ उंच नभात !'

कंदुक आपटता ईर्षेने

उसळुनि वर येतो वेगाने;

वाढे बल संप्रतिरोधाने,

जिव्हाळा भेटे- मग जीवन कैसे आटे ?

'दासोऽहं' हा जपता मंत्र

लोटुनि गेला काळ अनन्त,

तृप्तता न झाली संप्राप्त,

दोष कोणाचा ?- हा दासो‍हंवृत्तीचा.

परिस्थितीचे कल्पुनि भूत

कंपित होते दुर्बल चित्त,

निष्क्रियतेच्या मसणवटीत-

शून्य ह्रदयात-संचार करी ते भूत !

अशेष भुवनांतिल जीवन ते

वेचुनि घेउनि जावे वरते,

आत्मभूत मन करुनी त्याते

द्यावे सकला-अनुसरुनि जलद-रीतीला !

थेंबे थेंबे बनला सागर,

भूगोलाला कण आधार,

कार्य करावे लहान थोर,

निश्चित मिळते-फळ योग्य काळ येता ते ?

तप्तान्तःकरणा निववावे,

पतितांचे उद्धार करावे,

जानपदभ्युदयार्थ झटावे,

साधक व्हावे- प्रगतीच्या आड न यावे !

आत्मा स्वामी तू निभ्रान्त

शाश्वत तू अस्तोदयरहित

उठता विवेक हा ह्रदयात

दूर पळतात-ते भ्याड यमाचे दूत !

प्रेमाची प्रभु निर्मळ ज्योत.

जीवदशेची तिजवर वात

पेटवुनी विचरे जगतात,

विश्व हे सारे- शुचि, मंगलमय मुळचे रे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

फुलांची ओंजळ

ऐशी प्रेमाची ती जाती, लाभाविणे करी प्रीती - तुकाराम

सृष्टीचा लडिवाळ बाळ वेल्हाळ कवी धाकटा

अफाट जगहाटात पाहिला हिरमुसला एकटा.

कळवळली कनवाळु मनी असमाय मायमावली

बाजारातुन काढून मायापाखर वर घातली.

चंद्रसूर्य खेळनी दिली खेळाया तेजागळी,

कुरवाळी हळुवारपणे पण फुले कविमनकळी.

नक्षत्रांची, चटक फुलांची, माळ टपोरी नवी

जरतारी तारात गुंफुनी लेकरास लेववी.

आकाशाचे अंगण झाडुनि अवीट रंगे वरी

विचित्र रेखा लिही लिही ती कळाचतुर सुंदरी.

'बाळ उदासी वणवण भटकुन अपार निष्टुर जगी.

असेल थकला, -विचारात या क्षणभर झाली उगी.

प्रेमासम निज अमर्याद, अक्षय्य, विनिर्मित करी

शुद्ध दुधाची नदी; पाहती अझुनी जन अंबरी.

एकाहुनि आगळी एक, रुचिरत्वे निस्तुळ खरी,

दृश्याची ती असंख्य लेणी पुढे मुलाच्या करी.

शिशुमन रमावायास करी आयास माय ती असे,

अगाध माया मोठ्यांनाही नाचवितसे भलतसे !

अळुमाळ परंतु न तो रिझला, काळोख दाट दाटला,

अजाणपण-जाणिव उपजता दृश्यलोभ आटला.

दृश्याचा अवडंबर अंबर पदर दूर सारुन

विशाळ वक्षी घट्ट धरी मग कवीस कवटाळुन.

सान्त अनन्ताची मिळनी ती, अगम्य अद्‌भुत स्वारी !

मायलेकरे अभिन्न झाली निजानंदसागरी.

सृष्टीशी कवि समरस झाला, प्राण तिचा आतला;

ह्रत्कमळाची तिच्या कळाली फुलती-मिटती कळा.

बोजड बाह्यालंकाराची झण्‌काराची रति

नुरली, अर्थाकार तयाची झाली प्रेमळ मति.

कवीच झाला सृष्टी, सारी सृष्टी झाली कवि,

दिसण्याचे-लपण्याचे गारुड अपूर्ण हा भासवी.

आकाशाचा अणू घेउनी त्यात विश्व दाखवी,

फुंकर घालुनि अजस्त्र विश्वा क्षणार्धात लोपवी,

हा हासता हसते ती, अथवा हा रडता ती रडे.

पहाट फुटते हा उठता हा निजता झापड पडे.

पूर्णापासुनि ढळलेले जग जाते पूर्णाकडे,

लांबण मोठी, वाट बिकट ती उतार चढ वाकडे.

सृष्टीचक्र हे तोल जाउनी कलते भलतीकडे,

खडतर मार्गी दीर्घकाळ ते केव्हा केव्हा अडे.

चक्र सचेतन, सतेज, पण कीटाच्या काळ्या पुढे

चक्र काळ, हा काळवंडुनी करी कधी हिंपुटे

उंचवट्यावर केव्हा जाता प्रकाशकण पाहते

पूर्णत्वाच्या भ्रांतीने तेथेच स्वैर नाचते.

पाणथळीचा खोता तेजोभास पाहता कधी

सैराटपणे भडकुनि तिकडे फसते चिखलामधी.

स्नेहाभावे एक्या जागी फिरूनि घरघर करी

तेव्हा वाटे मार्ग कंठिला आपण हा किति तरी !

जाणिव आणि नेणीव मिळोनी स्वभाव याचा घडे;

तेजोन्मुखता परी न मोडे सदा ते पडे;

सुखाभिलाषे अंग चोरणे, थंडपणे थांबणे,

लाभालाभा तोलुनि मोजुनि रूढीने चिकटणे,

या अधमेहुनि त्या अविचारी बुद्धीचे थोरले,

पात निपात अनन्त बरे तेजोभिमुखत्वामुळे.

आनंदाला म्लानपणा नच सौंदर्याला क्षय

स्थलाकडे त्या जाताहे हे विश्वचक्र निर्भय.

मार्गाची रुक्षता न याला यत्किंचित जाणवो,

परिश्रमाची प्रचंडता नच अनुत्साह उपजवो.

काव्यरसामृत यास्तव कारुण्याने निर्मुनि कवि

मृदुमधुरोज्ज्वल गीते गाउनि तेजोबल वाढवी.

भूतकाळचे वैभव किंवा सांप्रतची हीनता

प्रकर्ष भावी समोर दावी कवी समय जाणता.

हित केव्हा कटु बोल बोलुनी, हातभार लावुनी

सृष्टिचक्र हे नीट चालवी वाट उजू दाउनी.

भुताधारे समजुनि चालू काळ नीट, निर्मितो

सोज्ज्वल भविष्यकाळाला, कवि धन्य नव्हे काय तो ?

काव्य अगोदर झाले, नंतर झाले जग सुंदर,

रामायण आधी, मग झाला राम जानकीवर.

झाले कवि होतील पुढे, ह्या विशाल कालोदरी

अघटित घटना घडुन राहिली, कोण कल्पना करी ?

भारतराष्ट्रनभोमुकुरावर, सार्‍या पूर्वेभर,

चिन्हे दिसती महाकवीच्या आगमनोत्सवपर.

'राजनिष्ठ' कवि सांप्रतचे ते सर्व चला या मिळा,

या रायाचा मार्ग झाडुनी रचा चारुतर फुला.

तुमच्या परंपरेतचि याचा व्हायाचा संभव

जनकत्वाचे पद ते तुमचे, तुमचे ते वैभव !

सृष्टीचे लाडके तुम्ही संलाप तुम्हांशी करी

प्रलाप किंवा विलाप त्याला म्हणोत कोणी तरी.

"अद्वितीय उत्तम न सर्व ते अधम" म्हणुनि लेखिती

दूषक तुमचे अपूर्व त्यांची तर्काची पद्धति !

विजय असो तुमचा, तुमचे जे दूषक त्यांचा तसा

रानफुले ही तुम्हा वाहिली, नंदनवनसारसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पिकले पान

पद्य मजला येईल करू जाता,
त्यात ओतू मी काव्य कसे आता ?

अंगि नुरता निर्माणशक्ति लेश
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

स्फूर्तिशक्तीचा होय लुप्त 'मंत्र'
तिथे झाले विकलांग वहन 'यंत्र'

'तंत्र' विस्मरलो, होय मी उदास !
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

एक नैसर्गिम जन्म सर्वमान्य,
अन्य होतो संस्कारकर्मजन्य

छटा यांच्या होता न एकजीव
काव्यसौंदर्यी भासते उणीव !

काव्यदेवी देउळी गर्भभागी
शिरू शकलो मी ना कधी अभागी !

मुखश्रीचे, एकान्त-दर्शनाचे
सुख स्वप्नांतहि ते न मिळायाचे

भाग्य नसता मज रसिकरंजनाचे
कसे काढू उद्‌गार धन्यतेचे ?

कुणा सांगू या कर्मकहाणील ?
मला वाटे हा जन्म फुकट गेला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गाविलगड

सातपुडा जवळीच बोडखे वर डोंगर घाट,

खालते जंगल मोकाट.

इतस्तता पसरुनी भरारा उंचविती माथे

आक्रमशील सकळ येथे.

पहा वृक्ष-वेली की, खग-पशु-कीटकगण सारा.

सदा संनद्ध प्रतिकारा,

मुक्तछंदलीलेचे निष्टुर शासनविधिलेख

निसर्गी जीवनीहि एक.

मंगलोग्र शक्तींचा गिरिवर सदा सिद्ध मेळा

जीवनमरणाच्या खेळा.

विरुद्धेहि एकत्र नांदवी सत्तेचा व्याप

भयानक तिचे आद्यरूप.

जीवसृष्टि जीवनात तेची रूपबिंब नाचे

जणू ते चलत्‌चित्र तीचे.

द्वितीय पुरुष न जाणिव येथे प्रथमाचा थाट

जिवाचा तो पहिला पाठ.

द्वितीयतेची जाणिव मुकुरित होता ते ज्ञान

सृष्टिचे पहिले बलिदान.

समष्टीत तद्विकास व्हावा विस्तारित अझुनी

युगे किति जातिल की निघुनी !

साध्य न हे तोवरी अवश्यचि जीवितरणकर्म

घोर तरि तो मानवधर्म

विश्वपुरुष हा विश्वाहितास्तव त्रिगुणात्मक कुंडी

पाशवी-अंश-हवन मांडी.

त्याग आणि उत्सर्ग समुत्कट उद्दीपित करिती

महत्तम अंतर्हित शक्ति.

ती आत्मोन्नति, संस्कृति ती, ती मानवता विहित

अल्पतर तामसपण जीत.

संस्कारशील संस्कृति वदशी तू सर्व भ्रममूल

मना ! मग तूहि एक भूल.

तर्कवितर्कात्मक बुद्धीचे अति अस्थिर तेज

बुद्धिची श्रद्धा ही शेज.

जाणु शके ती शक्ति वाळल्या मात्र लाकडाची.

न जाणे शाद्वल हरळीची.

प्रचंड चाले स्थूलान्तरि तो व्यापार न विदित

मनुजमतिगति परिमित अमित.

ज्ञान सरुनि संस्कार उरे ते तेवढेच तूझे

बाकी भारभूत ओझे.

समवाय संस्कृति संस्कारांचा तदनुसार शील

जिणे तिजविण बाष्कळ खूळ.

क्षितिजाच्या कंकणी ललित लघु तारा जणु विमल

वेलिच्या पालवीत फूल.

तसे गाव एक हे नदीच्या वाकणात्राहे

पाणी बारमास वाहे.

विभुत्व गिरिचे अखंड पुरवी नवजीवन तीस

खळाळे म्हणुनि समुल्हास

कडेवर टेकडी सतीचे रम्य स्थळ परम

साभिमुख भैरव बलभीम.

खडा असे सन्मुख 'गाविलगड' साहत तप करिता

आतप-हिम-वर्षा-वाता.

दिसे अस्थिपंजर केवळ तो उरे प्राण कंठी

आर्त गतवैभवार्थ पोटी.

पूर नदीचे येती पायी लोटांगण घेती

निरामय मळ टाकुनि होती.

रिघ-निघ चाले, उधळण चाले हळदकुंकवाची

गर्दी होते नवसांची.

देती नेणत सद्‌भावांचे दृढतर संस्कार

सतीचे ते जयजयकार.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ