प्रतिमाभंग

ज्यांनी भारतपुण्यभूमिवरती फोडोनिया डोंगर

लेणी निर्मुनि दाविले निज कलानैपुण्य लोकोत्तर;

वज्रप्राय कठोर भेदुनि महायत्‍ने शिलाप्रस्तर

तो कैलास अगम्य आणुनि दिला आम्हास पृथ्वीवर !

ज्यांनी मूर्ति अनेक निर्मुनि नव्या रंगावली रेखिल्या,

ज्यांच्या पाहुनि त्या कलाकृति जगे सोत्कंठ वाखाणिल्या;

हा नेत्रोत्सव पाहण्यास जमले ते तृप्त झाले जन

धीरोदात विभुत्व, ते परतले, तेथील संपादुन.

त्यांनी मूर्ति अनेक यत्‍न करूनी होत्या श्रमे निर्मिल्या

गर्वोन्माद भरात नीच यवने येवोनि त्या भंगिल्या !

हा विध्वंस समोर एक, दुसरे अद्यापिही चालता -

राष्ट्रात्मा खवळोनि जाय न कसा विच्छेद हे साहता !

प्रज्ञावंत विचारशील असती आम्हात जे संस्थित

साक्षेपे म्हणती समस्त विसरा ही दुष्टता सांप्रत.

सारे यद्यपि शान्तिपाठ पढतो सप्रेम येथे सदा

आहो मानव हे कसे विसरता आम्हास येते, वदा ?

ज्या सन्मूर्तिवरी मनोविहग हा फेरे असे घालित

ते अत्यंत सखोल वाच्य करिता येते कसे ह्रद्गत ?

कोणी निष्ठुर येउनी जरि तिला भंगोनि टाकीतसे

या निर्माल्य जगात, राहुनि अशा, त्याने जगावे कसे ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा