यमदूतास

अखिल जगतात- आनंद नांदतो मूर्त ॥ध्रु॥

स्वर्णरसांकित गिरिशिखरात,

अरुणरागरंजित मेघात,

स्निग्ध शांत की शशिप्रभेत,

शब्द होतात- 'उठ भाग्य लूट जगतांत ।'

प्राप्तस्थिति असता विपरीत

भग्न जीर्ण निर्जल विहिरीत

उगवुनि पिंपळ वर येतात

ते म्हणतात- 'चल जाऊ उंच नभात !'

कंदुक आपटता ईर्षेने

उसळुनि वर येतो वेगाने;

वाढे बल संप्रतिरोधाने,

जिव्हाळा भेटे- मग जीवन कैसे आटे ?

'दासोऽहं' हा जपता मंत्र

लोटुनि गेला काळ अनन्त,

तृप्तता न झाली संप्राप्त,

दोष कोणाचा ?- हा दासो‍हंवृत्तीचा.

परिस्थितीचे कल्पुनि भूत

कंपित होते दुर्बल चित्त,

निष्क्रियतेच्या मसणवटीत-

शून्य ह्रदयात-संचार करी ते भूत !

अशेष भुवनांतिल जीवन ते

वेचुनि घेउनि जावे वरते,

आत्मभूत मन करुनी त्याते

द्यावे सकला-अनुसरुनि जलद-रीतीला !

थेंबे थेंबे बनला सागर,

भूगोलाला कण आधार,

कार्य करावे लहान थोर,

निश्चित मिळते-फळ योग्य काळ येता ते ?

तप्तान्तःकरणा निववावे,

पतितांचे उद्धार करावे,

जानपदभ्युदयार्थ झटावे,

साधक व्हावे- प्रगतीच्या आड न यावे !

आत्मा स्वामी तू निभ्रान्त

शाश्वत तू अस्तोदयरहित

उठता विवेक हा ह्रदयात

दूर पळतात-ते भ्याड यमाचे दूत !

प्रेमाची प्रभु निर्मळ ज्योत.

जीवदशेची तिजवर वात

पेटवुनी विचरे जगतात,

विश्व हे सारे- शुचि, मंगलमय मुळचे रे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा