एक संवाद

चिमुकल्याच चांदण्या चमकती स्फूर्तिकणाच्या परी-

'होती लुप्त अनन्तोदरी !'

वर्षाकाली जलमय भूतल निर्झरगण तो करी-

'राहे धूळ निदाघी खरी !'

बालतृणांकुर वेलबुटीची शाल महीची करी-

'विटते निमिषाच्या अवसरी !'

नाजुक फुल जाईचे भारी वासे भुवना भरी-

'एका श्वासे सुकते परी !'

सौंदर्याची मूस ओतली नार अशी साजरी-

'होतो रंग फिका लौकरी !'

नवकाव्ये कवि करिती, असती मोत्यांच्या जणु सरी-

'पाणी क्षणिकचि त्यांचे परी !'

सख्या खोडिसी मला असे का? सान चांदण्याविना

निशेची काही कर कल्पना.

बालासम हे स्वैर नाचरे ओढे नसते तरी

होती रुक्ष मही मग पुरी !

कोमल मधुरोज्ज्वल भावांची खाण न जरि सुंदरा

जिणे मग दुःसह होते नरा !

नभाएवढा भानु एकटा पृथ्वीभर की तळे

कल्पिता कल्पनाच मावळे !

चंद्र एकटा रम्य; वेष्टिता असंख्य तारांगणी,

शोभा होते का रे उणी ?

स्तुतिनिंदेची अभ्रे येती सामान्याच्या वर,

सत्कवि दोहींच्याही पर.

क्षणभर अमुचे जीवित म्हणशी, असोचि ते क्षणभरी

चमकुनि जाऊ 'कोठे तरी.'

भाग पाडुनि तोल जाता काळाचे एकदा,

गोंधळ संपेना मग कदा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा