निरोप

(घरी फार बिकट परिस्थिती असलेल्या उत्तम पाटील या मित्रास धाडलेला हा निरोप.)

निरोप धाडू काय तुला मी बांधो गुणसुंदरा
त्वत्स्थिती रडवी मम अंतरा
असहाय तुझी दशा बघोनी मन्मन हे गहिवरे
सुटती नयनांतुन शत झरे
बघतो सत्त्व तुधे ईश्वर
त्याचा असशी तू प्रियकर
म्हणुनी येई आपदभर
कृपा प्रभुची होइ जयावर जगि सुख ना त्या नरा
घण हाणुन तो बघती हिरा

जसे जसे हे दूर करितसे धिक्कारुनी जग कुणा
घडि घडि करुनि मानखंडना
जसे जसे जगदाघात शिरी बसती निशिदिन मुला
भाजिति अंगार जसे फुला
होउनि निरहंकृति तसातसा
बनतो निर्मळ जणु आरसा
पाहिल तो प्रभुपद- सारसा
भाग्य मिळे त्या भेटायाचे जगदीशा सुंदरा
होइल मुक्त निरंजन खरा

नको घाबरु नको बावरु अभंग धीरा धरी
करुणा वितरिल तो श्रीहरी
जगात त्याच्याविण कोणाचा खरा आसरा नसे
बाकी फोल सोलपट जसे
दे तू सुकाशणु त्याच्या करी
तोची विपत्समुद्री तरी
नेइल सांभाळून बंदरी
सूत्र प्रभुकरि देइल धरुनी श्रद्धा अचलाऽमरा
नाही नाश कधी त्या नरा।।

श्रद्धा जिंकी श्रद्धा विकळवि संकटमय पर्वता
श्रद्धा अमृतधारा मृता
विपत्तिमिर संहरी चंद्रमा श्रद्धेचा सोज्वळ
श्रद्धा दुर्बल जीवा बळ
श्रद्धा असेल यन्मानसी
तो जगि होइल ना अपयशी
संजीवनीच श्रद्धा जशी
श्रद्धा धरुनी गडबडलेल्या मतिला करि तू स्थिर
होइल विपद्दशेचा चूर।।

कर्तव्याचा पंथ बिकट हा उत्साहा वाढवो
निश्चय तिळभर ना हालवो
जशी संकटे येतील तशी त्वदीय चमको प्रभा
येइल मंगल वेळा शुभा
तुज मी सहाय्य करु काय रे
पामर निर्धन मी दीन रे
झरती माझे लोचनझरे
त्वदर्थ निशिदिन आळवीन परि सखया जगदीश्वरा
जो जोडितसे उभयांतरा।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

भारतमाता

हे भारतमाते मधुरे!
गाइन सतत तव गान।।

त्याग, तपस्या, यज्ञ, भूमि तव जिकडे तिकडे जाण
कर्मनीर किति धर्मवीर किति झाले तदगणगा न।। गाइन....।।

दिव्य असे तव माते करिता इतिहासामृतपान
तन्मय होतो मी गहिवरतो हरपून जाते भान।। गाइन....।।

देउन देउन दीन जाहलिस तरिही देशी दान
परजीवन सांभाळिशि संतत अर्पुन अपुली मान।। गाइन....।।

सत्त्वाचा सत्याचा जगती तूचि राखिशी मान
तुझ्या कथा ऐकाया उत्सुक भगवंताचे कान।। गाइन....।।

एकमुखाने किति वर्णु मी आई तव महिमान
थकले शेषहि, थकले ईशहि, अतुल तुला तुलना न।। गाइन....।।

धूळीकण, फळ, फूल, खडा वा असो तरुचे पान
तुझेच अनुपम दाखविती मज पवित्र ते लावण्य।। गाइन....।।

मांगल्याची माधुर्याची पावित्र्याची खाण
परमेशाच्या कृपाप्रसादे नुरेल तुजला वाण।। गाइन....।।

समरसता पावणे तुझ्याशी मदानंद हा जाण
यश:पान तव सदैव करितो करितो मी त्वद्धयान।। गाइन....।।

बहुभाग्याने बहुपुण्याने झालो तव संतान
तव सेवा मम हातुन होता हरपो माझा प्राण।। गाइन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

मनमोहन मूर्ति तुझी माते

मनमोहन मूर्ति तुझी माते
सकल जगाची माय माउली
गोड असे किति नाते।। मनमोहन....।।

कुरवाळिशि तू सकल जगाला
निवविशि अमृत-हाते।। मनमोहन....।।

स्नेहदयेचे मळे पिकविशी
देशी प्रेमरसाते।। मनमोहन....।।

सकळ धर्म हे बाळ तुझे गे
सांभाळिशि त्याते।। मनमोहन....।।

भेदभाव तो तुजजवळ नसे
सुखविशि तू सकळांते।। मनमोहन....।।

श्रद्धा देशी ज्ञाना देशी
सारिशि दूर तमाते।। मनमोहन....।।

थोर ऋषी तव थोर संत तव
शिकविति शुभ धर्माते।। मनमोहन....।।

सरिता सागर सृष्टि चराचर
गाती तुझ्याच यशाते।। मनमोहन....।।

तव शुभ पावन नाम सनातन
उचंबळवि हृदयाते।। मनमोहन....।।

त्वत्स्मरणाने त्वदगुण-गाने
भरुनि मदंतर जाते।। मनमोहन....।।

तव सेवा मम हातुन होता
मरण सुधारस वाटे।। मनमोहन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

माझी एकच इच्छा

एक मात्र चिंतन आता एकची विचार
भाग्यपूर्ण होईल कधी हिंदभूमि थोर
दु:ख दैन्य जाउन विलया होउ हे स्वतंत्र
जन्मभूमी माझी, ध्यानी मनी हाच मंत्र।।

देशदेवसेवेसाठी सर्वही करीन
चित्त वित्त जीवन माझे सर्व हारवीन
प्राणपुष्प माझे माझ्या मातृभूमिकामी
जरी येइ उपयोगाला कितिक होइ नामी।।

मेघ जेवि जीवन सारे देइ या धरेला
जीवना समर्पुन जाई तो परी लयाला
परार्थार्थ जीवन त्यांचे, तेवि हो मदीय
मायभूमिसाठी माझे सर्व काहि होय।।

कदा तुला पाहिन आई! वैभवी अपार
पारतंत्र्यपंकांतुन तू होशिल कधि पार
चैन ना मुळी मज पडते, घोर हाच माते
त्वदुद्धारकार्यी केव्हा कृति करीन हाते।।

थोडि फार सेवा होवो या मदीय हाती
घडे जरी, होइल मजला सौख्य जीवनांती
याच जन्मि याची डोळा मी तुला स्वतंत्र
बघेन का? न कळे कैसे असे दैव-तंत्र।।

तुझे भाग्य पाहिन डोळा मायभूमि काय?
मम प्राणज्योति आधी मालवेल काय?
असो काहि होवो घेइन फिरुन अन्य जन्म
तुझी करुन सेवा जाइन होउनी सुधन्य।।

जरी देह पडला माझा तरिहि मी फिरून
इथे जन्म घेइन आई निश्चये करून
पुन:पुन्हा त्वत्सेवेचा सदानंद-मेवा
मला मिळो, माते! पुरवा हेतु देव-देवा!।।

पुष्प, पर्ण, तरु, वेली वा शिलाखंड हीन
पशु, प्राणि, पक्षी कोणी सर्प, मुंगि, मीन
कोणताहि येवो मजला जन्म कर्मयोगे
दु:ख नाही त्याचे, परि ते दु:ख त्वद्वियोगे।।

तुझ्या धुलिमाजी वाटे लोळणे सुखाचे
इथे पाय पावन फिरले रामजानकीचे
इथे नामघोषे फिरले संत ते अनंत
तुझ्या धुळीमधला झालो कीट तरि पसंत।।

तुझी धूळ आई प्रेमे लावितो स्व-भाळी
इथे जन्मलो मी म्हणुनी प्रेम-नीर ढाळी
कितीकदा जातो आई हृदयि गहिवरून
राहतो धुळीत पडूनी साश्रु सदगदून।।

तुझ्या धुळीपुढती मजला मोक्ष तुच्छ वाटे
तुझ्या धुळीमध्ये मजला मोक्ष नित्य भेटे
तुझी धूळ म्हणजे आई सर्व भाग्य माझे
तुझ्या धुळीसाठी आई झुगारीन राज्यें।।

तुझा आई! न वियोग मला जन्मजन्मी व्हावा
कोणताहि जन्म मला येवो तो इथेच यावा
सदा तुझ्या चरणांपाशी आइ! मी असेन
स्वर्ग मोक्ष त्यापुढती मी तुच्छ ते गणीन।।

तुझे पवन पावन, आई! तुझे पुण्य पाणी
तुझे निळे आकाश किति स्वच्छ रत्नखाणी
तुझे चंद्र तारे दिसती किति सुरम्य गोड
तुला नसे सा-या भुवनी खचित आई! जोड।।

तुझे पाय सागर माते अहर्निश क्षाळी
तुझ्या शिरी शुभ कर ठेवी शंभु चंद्रमौळी
तुझ्या रुपलावण्याला ना तुला जगात
तुझे चराचर हे अवघे स्तोत्र नित्य गात।।

तुझा थोर महिमा माते! मंगले! उदारे!
तुझी कीर्ती वर्णून धाले थोर थोर सारे
ऋषी वदे ‘दुर्लभ आहे जन्म भारतात’
देव तेहि जन्मुन येथे आई! धन्य होत।।

तुझे भाग्य न दिसे म्हणुनी विश्व खिन्न होई
तुझे भाग्य गेले म्हणुनी सृष्टी खिन्न होई
तुझी मुले परि का अजुनी उदासीन, आई!
त्वदुद्धारकार्यासाठी उठति का न भाई?।।

उठा सकळ बंधूंनो! या करुच मुक्त माय
रुपिभुजंगपाशांत तिचे ते पवित्र पाय
पक्षिराज गरुड बनू या मुक्त ही स्वमाता
झणी करु, न विलंबाची वेळ आज आता।।

विलंबास जरि का क्षणही बंधुंनो कराल
माय ही मरेल अहा हा! तुम्हिहि रे मराल
उठा, झोप सोडा, तळपा सूर्यसे प्रभावे
करा कार्य नेटे दास्या झुगारुन द्यावे।।

चला, उठा, मी तरि आता चाललो पुढारा
मातृलोचनींच्या मजला बघवती न धारा
तुझे अश्रु आई! माझ्या मी करी पुशीन
प्रतिज्ञेस करितो तुजला मुक्त मी करीन।।

आइ! धायिधायी रडतो त्वद्विपत् बघून
पुन:पुन्हा कार्याला मी लागतो उठून
बुद्धि हृदय गात्रे माझी चंदनासमान
झिजोत गे द्याया तुजला जगी श्रेष्ठ स्थान।।

दिगंतात वृद्धिंगत मी कीर्ति तव करीन
तुझी मूर्ति मधुरा दिव्या अंतरी धरीन
तुझे नाम सतत ओठी गान गोड कंठी
तुझी प्रीति अतुला अचला साठवीन पोटी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?

प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
राष्ट्र हे दिसे मेलेले
तो भाग्याचा भास्कर अस्ता गेला
अंधार भरुनी उरला
ती सिद्विद्या सकल कला मालवली
दैन्याची पाळी आली
गोकुळे येथली गेली
विपुलता येथली गेली
अन्नान्नदशा ही आली
हे कठिण कसे दिवस असे रे आले
कोणते पाप ते झाले।। प्रभु...।।

श्रीरामांनी भूषविली ही भूमी
सत्त्वाढ्य हरिश्चंद्रांनी
शिबि, मांधाता, राजे येथे झाले
परि दुर्दिन आजी आले
श्रीशिव, बाजी गाजी रणशार्दूल
येथेच खेळले खेळ
ती राजर्षींची भूमी
ती ऋषीश्वरांची भूमी
ती वीरांची ही भूमी
नि:सत्त्व अजी काहि नसे उरलेले
दु:खाचे भांडे भरले।। प्रभु...।।

जरि जगि झालो अस्पृश्य अम्ही सगळे
तरि काहीच चित्ता न कळे
निजबंधूंना दूर लोटितो अजुनी
ठेवितो पशुच त्या करुनी
जरि जग थुंके तरिही श्रेष्ठाश्रेष्ठ
मांडिती बंड हे दुष्ट
उपनिषदे जेथे झाली
तेथेच विषमता भरली
सद्धर्मा ग्लानी आली
हे सनातनी अनृतदेव जणु झाले
माणुसकी विसरुन गेले।। प्रभु...।।

या भूमिमध्ये मरणाचा डर भरला
बाजार किड्यांचा झाला
ती मृति म्हणजे वस्त्र फेकणे दूर
करि गीता जगजाहिर
परि मरणाला भिणार आम्हांवाणी
जगतात कुणी ना प्राणी
जन्मले जिथे अद्वैत
मरणाला तेथे ऊत
ते मोठाले शब्दच ओठी उरले
भयभेद अंतरी भरले ।। प्रभु...।।

बहुभाग्याने नायक गांधी मिळती
परि डरती घरि हे बसती
तो राष्ट्राचा ओढि एकला गाडा
झिजवीत अहर्निश हाडा
तो मूर्त महान यज्ञ, मूर्त तो धर्म
मोक्षाचे दावी वर्म
परि वावदूक हे भितरे
हे भुंकत बसती कुतरे
कुणि कर्मक्षेत्रि न उतरे
हे शब्दांचे पूजक हरहर झाले
दुर्दैव घोर ओढवले।। प्रभु...।।

प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
हलु देत मढी ही सारी
निजकर्तव्या करावयाला उठु दे
मरणास मिठी मारू दे
निज बंधूंना अस्पृश्य न लेखोत
रूढीस दुष्ट जाळोत
तत्त्वांस कृतित आणोत
ओठिंचे करुन दावोत
सद्धर्म खरा आचरुत
ते रुढींचे राज्य पुरेसे झाले
प्रेमाने होवो ओले।। प्रभु...।।

प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
मति जागृत होवो अमुची
प्रभु! येऊ दे गुलामगिरिचा वीट
होउ दे समस्तां धीट
ते हिंदु तसे शीख मुसल्मानादी
होउ दे बंधुसे आधी
विसरु दे क्षुद्रता सारे
विसरोत मागचे सारे
ऐक्याचे खेळो वारे
किति लागे तो त्याग करा रे सगळे
परि ऐक्य पाहिजे पहिले।। प्रभु...।।

प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
करु देत मुक्त निज माता
मन विमल असो, स्वार्थ दुरी राहू दे
निजमाय- कार्य साधू दे
ते होउनिया वेडे मातेसाठी
उठु देत बंधू हे कोटी
घेऊ दे उडी आगीत
घेऊ दे उडी अब्धीत
ओतु दे विष तोंडात
परि मातेचे वदन दिसो फुललेले
मोक्षश्रीने नटलेले।। प्रभु...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई!

स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई। सुखवू प्रियतम भारतमायी।।

देशभक्तिचा सुदिव्य सोम
पिउन करु प्राणांचा होम
कष्ट, हाल हे अमुचे भाई।। स्वातंत्र्याचे....।।

धैर्याची ती अभंग ढाल
त्यागाची ती वस्त्रे लाल
निश्चयदंडा करांत राही।। स्वातंत्र्याचे....।।

समानतेची स्वतंत्रतेची
पताकेवरी चिन्हे साची
दिव्य पताका फडकत जाई।। स्वातंत्र्याचे....।।

ऐक्याचा झडतसे नगारा
कृतिरणशिंगे भरिति अंबरा
चला यार हो करु रणघाई।। स्वातंत्र्याचे....।।

कळिकाळाला धक्के देऊ
मरणालाही मारुन जाऊ
प्रताप अमुचा त्रिभुवन गाई।। स्वातंत्र्याचे....।।

विरोध आम्हां करील कोण
सूर्यहि आम्हांसमोर दीन
प्रतापे दिशा धवळू दाही।। स्वातंत्र्याचे....।।

विरोध आम्हां करील कोण
करु सर्वांची दाणादाण
जोर आमुचा कुणी न साही।। स्वातंत्र्याचे....।।

असत्य अन्यायांना तुडवू
दुष्ट रुढिंना दूरी उडवू
घाण अता ठेवणार नाही।। स्वातंत्र्याचे....।।

जशी पेटलेली ती चूड
तसेच आम्ही भैरव चंड
औषधास दास्यता न राही।। स्वातंत्र्याचे....।।

परकी अथवा स्वकीय झाला
जुलूम आम्हां असह्य झाला
जुलूम जाळू ठायी ठायी।। स्वातंत्र्याचे....।।

जाच काच गरिबांना नुरवू
झोपड्यांतुनी मोदा फुलवू
मक्त तयांना करु लवलाही।। स्वातंत्र्याचे....।।

श्रेष्ठकनिष्ठत्वाचे बंड
मोडू करुन प्रयत्न चंड
अस्मादगण या शपथे घेई।। स्वातंत्र्याचे....।।

देश अमुचा करु स्वतंत्र
मनोबुद्धिला करु स्वतंत्र
स्थापन करणार लोकशाही।। स्वातंत्र्याचे....।।

अनंत यत्ने अखंड कृतिने
परमेशाच्या कृपाबलाने
सफल मनोरथ निश्चित होई।। स्वातंत्र्याचे....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३०

आमचे कार्य

अम्ही मांडू निर्भय ठाण। देऊ हो प्राण
स्वातंत्र्य-सुधेचे निजजननीला घडवू मंगलपान।। अम्ही...।।

स्वार्थाची करुनी होळी
छातीवर झेलू गोळी
करु मृत्युशि खेळीमेळी
मातृभूमिच्यासाठी मोदे करु सारे बलिदान।। अम्ही...।।

श्रीकृष्ण बोलुनी गेला
जय अखेर सत्पक्षाला
ना पराभूति सत्याला
जयजयकारा करुनी पुढती घुसु होउन बेभान।। अम्ही...।।

ही मंगल भारतभूमी
करु स्वतंत्र निश्चय आम्ही
हा निश्चय अंतर्यामी
मातृमोचना करुनी जगी तिज अर्पू पहिले स्थान।। अम्ही...।।

येतील जगातिल राष्ट्रे
वंदितील भारतमाते
करतील स्पर्श चरणाते
धन्य असा सोन्याचा वारस दाविल तो भगवान।। अम्ही...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, मार्च १९३०

देशभक्त किति ते मरती

धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती। देशभक्त किति ते मरती
त्यागराशि मंगलमूर्ती। देशभक्त किति ते मरती।।

मातृभूमि हसवायाते
मायभूमि सुखवायाते
निजबंधू उठवायाते
बलिदाना मोदे देती।। देशभक्त....।।

निजमातृ-मोचनासाठी
निजबंधु समुदधृतिसाठी
निज सकल सुखाचे वरती
ठेवून निखारे हाती।। देशभक्त....।।

निज यौवन निजधनमान
निज आप्त सकल बंधु-गण
हे जात सकल विसरून
करतळी प्राण निज घेती।। देशभक्त....।।

करि घेति सतीचे वाण
होऊन मनी बेभान
घेतात उडी धावून
मरण दिसे जरि ते पुढती।। देशभक्त....।।

ना चैन पडे जीवास
देश दिसे रात्रंदिवस
त्या देशभक्तिचा ध्यास
देशविचाराने जळती।। देशभक्त....।।

सहन तो विलंब होई
जीवाची तगमग होई
करपून तन्मती जाई
मरणाचा पथ मग धरिती।। देशभक्त....।।

तेजाला कवटाळावे
हे ध्येय पतंगा ठावे
मरुनीही त्यास्तव जावे
ही दिव्य वृत्ति तच्चित्ती।। देशभक्त....।।

अजगरसे पडले सुस्त
निजबंधु, बघुन अस्वस्थ
त्या जागति देण्या त्वरित
प्राणांचा बळि ते देती।। देशभक्त....।।

चर्चेने काहि न लाभ
याचनेत काहि न लाभ
स्वावलंबनाने शोभ
घोषणा वीर ते करिती।। देशभक्त....।।

अजुन तरी झापड उडवा
स्वातंत्र्यध्वज फडफडवा
देशकार्य करण्या धावा
झाला का केवळ माती।। देशभक्त....।।

घ्या स्वदेशिच्या त्या आणा
मनि धरा जरा अभिमाना
जगताला दावा बाणा
उद्धरा माय निज हाती।। देशभक्त....।।

सुखविलास सारा राहो
आलस्य लयाला जावो
कर्तव्य-जागृती येवो
संपु दे निराशा-रात्री।। देशभक्त....।।

आशेचा होवो उदय
कार्याचा आला समय
भय समूळ पावो विलय
निष्कंप करा निज छाती।। देशभक्त....।।

वरुनिया पडो आकाश
वा होवो अशनि-नि:पात
कार्याला घाला हात
घ्या करुन मोक्षप्राप्ति।। देशभक्त....।।

देशभक्त किति ते मेले
चंदनापरी ते झिजले
तत्कार्य अजुन जे उरले
ते पूर्ण करा निज हाती।। देशभक्त....।।

तडफडत वरी असतील
पाहून तुम्हां सुखलोल
त्या शांती-लाभ होईल
जरि उठाल मातेसाठी।। देशभक्त....।।

ही वेळ नसे निजण्याची
ही वेळ नसे हसण्याची
ही वेळ असे मरण्याची
ना मोक्षाविण विश्रांती।। देशभक्त....।।

जरि नसाल तुम्ही क्षुद्र
तरि उठाल जैसे रुद्र
ती चळवळ करणे उग्र
घ्या रक्तध्वज निज हाती।। देशभक्त....।।

आरती निजप्राणांची
ओवाळा मंगल साची
ही पूजा निज मातेची
सत्प्रसाद मिळवा मुक्ति।। देशभक्त....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

भारतसेवा

प्रिय भारतभू-सेवा सतत करुन
जाईन सुखाने मरुन
जरि मातेचे कार्य न करितिल हात
तरि झणी झडुन जावोत
जरि मातेचे अश्रु न पुशितिल हात
तरि झणी गळुन जावोत
प्रिय बंधूंच्या उद्धृतिच्या कामात
हे हात सदा राबोत
हातांस एक आनंद
हातांस एकची छंद
तोडणे आइचे बंध
हे ध्येय करी करिता, तनु झिजवीन
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।

जोवरि बंधू पोटभरी ना खाती
ना वस्त्र तदंगावरी
जोवरि त्यांना स्वपरमत्त रडविती
शतमार्गांनी नागविती
जोवरि त्यांना ज्ञानकिरण ना मिळती
अंधारी खितपत पडती
तोवरि न झोप घेईन
अंतरी जळुन जाईन
सौख्यास दूर लोटीन
मी सुखावया झटेन बांधव दीन
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।

या शरिराचे जोडे, भारतमाते!
घालीन त्वत्पदी होते
या बुद्धीला त्वदर्थ मी श्रमवीन
सेवेत हृदय रमवीन
जरि देहाचे करुन, आइ! बलिदान
स्वातंत्र्य येइ धावून
तरि झुगारीन हा जीव
ही तुझीच, आई! ठेव
तव फुलो वदन-राजीव
मी घेत अशी, आइ! तुझिच गे आण
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।

मी प्राशिन गे मृत्युभयाचा घोट
होइन आइ! मी धीट
मी खाइन गे भेदभाव हे दुष्ट
होईन, आइ! गे पुष्ट
मग करण्याते, माते! तुजला मुक्त
सांडिन मी माझे रक्त
त्वच्चिंतन निशिदिन करिन
त्वत्सेवन निशिदिन करिन
सुखगिरिवर तुज चढवीन
मग भाग्याचे अश्रु चार ढाळून
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

जा रे पुढे व्हा रे पुढे!

झोपू नको झणि ऊठ रे
पाहे सभोती जे घडे
घनगर्जना उठते नभी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

रणभेरि शिंगे वाजती
ध्वनि काय ना कानी पडे?
पडलास मुर्दडापरी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ललनीहि सजल्या संगरा
नर केवि मागे तो दडे?
चल, ऊठ, जागृत सिंहसा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ना मेष तू तर मानुष
बें बें करोनी ना रडे
निजकर्मशक्तिस ओळख
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

बांधून, मर्दा! कंबर
तू अंबरी वरती उडे
निजपंख-बल भुललास तू
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जावो खचोनी धीर ना
लंघावयाचे हे कडे
दे हात मर्दासी खुदा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

हे दुर्ग दुर्गम दुष्पथ
तरि ते फिरोनी तू चढे
पडण्यात ना अपमान रे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शतदा पडे तो रे चढे
बसुनी न काही ते घडे
पशु तो, न जो यत्ना करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

पसरुन आ येती जरी
पथि संकटे तरि ना अडे
बलभीम हो तू मारुती
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

गिळि राक्षसी तरि ना डरे
ये पोट फाडुन ना रडे
मग हाक फोडी वीर तो
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

लाटा कितीही आदळो
शतचूर्ण त्या करिती कडे
गिरि ना खचे घन पाऊसे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जरी कष्ट-वृष्टी होइल
डोके करि मारापुढे
अभिमन्यु हो अभिराम तू
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

चैतन्य खेळो जीवनी
तू ना पडे जेवी मढे
हो स्फूर्ति मूर्त प्रज्वला
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कृतिपंथ तू अवलंबुनी
करि बंद हे वाक्बुडबुडे
वाणी पुरे करणी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

बाहु स्फुरो ना ओठ ते
तव पिळवटू दे आतडे
हा मृत्यु नाही गंमत
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ओठांवरील प्रेम ते
ज्वाळेपरी ना धडधडे
ना पेटवी ते अंतर
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ती तोंडदेखी आरती
ओवाळ ना तू यापुढे
स्वप्राण करि पंचारती
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

लागे दिव्याने रे दिवा
राखुंडि कामी ना पडे
तो देत जीवन, जो जिता
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

मोक्षामृताचे मंगल
आणी भरोनी रे घडे
पाजी तृषार्ता आइला
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

माते स्वहाते लेववी
स्वातंत्र्यलक्ष्मीचे चुडे
सत्पुत्रधर्मा आचर
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

बघ मोक्षनगरद्वार हे
दिसते पुढे उघडे फुडे
तो भीरु कातर जो नुठे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कर्माबुधीमधि घे बुडी
त्या मुक्तिमौक्तिक सापडे
पापी करंटा जो नुठे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

वरिते जयश्री त्या नरा
कमी निरंतर जो बुडे
ना कर्महीना वैभव
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

नरवीर-वृंद उठावती
निज कर्मतेचे चौघडे
हेएक गंभिर वाजती
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शिर धूस टिप्पर घाईत
ना वाचवी निज कातडे
सेवेत मरतो तो जगे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कुरवाळितो स्वप्राण जो
मेलाच तो जरि ना सडे
जो प्राण दे, तो ना मृत
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

काळा कुरोंडी ही तनू
जरि मातृकामी ती पडे
सोने तिचे होई तरी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ज्या स्फूर्ति ना तिळ अंतरी
ती काय जाळावी धुडे
जरि न स्फुल्लिंग, न जीवनी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ठिणगी पडू दे जीवनी
वीरापरी व्हा रे खडे
रक्तध्वजा धरुनी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जरि मूठभर तरि ना भय
व्हा छातिचे ना बापुडे
व्हा सिंह व्हा नरपुंगव
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

खाऊ न केव्हाही कच
माघार शब्द न सापडे
कोशात बोला आमुच्या
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कर्मात आत्मा रंगवा
आत्मा जरी कर्मी जडे
स्वातंत्र्य तरि ते लाभते
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

सेवेत आत्मा ओतणे
मांगल्य-मोक्ष श्रीकडे
हा पंथ एकच जावया
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

स्वार्थी निखारा ठेवुनी
रमतो स्वकर्मी जो मुदे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शिवते निराशा ज्यास ना
लोभाशि ज्याचे वाकडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कर्मी अहोरात्र श्रमे
परि मान कीर्ति न आवडे
ते मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

न विलास घे, स्व-विकास घे
निंदादिके जो ना चिडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जे अंबरात उफाळती
ना लोळती शेणी किडे
ते मुक्त होती आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

सर्वत्र करि संचार जो
कोठेच काही ना नडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

करुनी महाकृतिही जया
अवडंबराचे वावडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शिर घेउनी हातावरी
जो कर्मसमरी या लढे
करि माय अमरा तो निज
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जरि व्हाल योद्धे संयमी
तरी मोक्षफळ हाता चढे
फाकेल भुवनी सु-प्रभा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

नवमंत्र घ्या तेजे नटा
व्हा सिद्ध सारे सौंगडे
चढवा स्वमाता वैभवी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

बलसागर भारत होवो!

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो।।
बलसागर....।।

हे कंकण करि बांधियले
जनसेवे जीवन दिधले
देशार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो।।
बलसागर....।।

वैभवी देश चढवीन
स्वातंत्र्य त्यासि अर्पीन
हा तिमिर घोर संहरिन
या बंधु साहाय्याला हो।।
बलसागर....।।

हातात हात घेऊन
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।।
बलसागर....।।

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।।
बलसागर....।।

या उठा करु हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।।
बलसागर....।।

ही मुक्त माय होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल
तो सोन्याचा दिन येवो।।
बलसागर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री

हा देश वैभवी न्यावा!

जगदीश दयाघन देवा
हा देश वैभवी न्यावा।।

तू सुंदर मंगलमूर्ती
पुरवावी मनीची आर्ती
हे दीन धरावे हाती
तू सकळ सिद्धिचा ठेवा।। हा देश....।।

बलदाता तू मतिदाता
तू गणपती ऐक्य-विधाता
भयहर्ता तू सुखकर्ता
आम्हांस समयि या पावा।। हा देश....।।

तू कलह सकळ हे मिटवी
तू प्रेम आम्हांला शिकवी
तूत्याग तपस्या शिकवी
जनमनि न तिमिर उरवावा।। हा देश....।।

करु देत माय निज मुक्त
उठु देत सर्व सत्पुत्र
ते सकल निज समर्पोत
हा लोभ सकळ हटवावा।। हा देश....।।

जरि होइल भारत मुक्त
तरि होइल जग सुखभरित
पावेल विषमता अस्त
आनंद जगी पिकवावा।। हा देश....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

भूषण जगताला!

भूषण जगताला होइल, भूषण जगताला
भारत मिळवुन श्रेष्ठ पदाला।। भूषण....।।

विद्या येतिल कलाहि येतिल
भारत जरि हा स्वतंत्र झाला।। भूषण....।।

शिकविल समता, स्नेह, सुजनता
देइल जगता शांतिसुखाला।। भूषण....।।

प्रेमाच्या स्वर्गास विनिर्मिल
पूजिल मग शुभ प्रभुपद-कमला।। भूषण....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

भारतजननी सुखखनि साजो

भारतजननी सुखखनि साजो
तद्विभवाने स्वर्गहि लाजो।। भारत....।।

स्वातंत्र्याची अमृतधारा
प्राशुन निशिदिन रुचिर विराजो।। भारत....।।

विद्यावैभववाङमयशास्त्रे
कलादिकांचा डंका वाजो।। भारत....।।

पावन मोहन सुंदर शोभून
नाम तिचे शुभ भुवनी गाजो।। भारत....।।

दिव्य शांतिची अमृत-सु-धारा
संतप्त जगा सतत पाजो।। भारत....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२९

हृदय जणु तुम्हां ते नसे!

हृदय जणु तुम्हां ते नसे।।
बंधु उपाशी लाखो तरिहि
सुचित विलास कसे।। हृदय....।।

परदेशी किति वस्तू घेता
बंधुस घास नसे।। हृदय....।।

बाबू गेनू जरि ते मरती
तरिही सुस्त कसे।। हृदय....।।

खादी साधी तीहि न घेता
असुन सुशिक्षितसे।। हृदय....।।

माणुसकी कशि तीळ ना उरली
बसता स्वस्थ कसे।। हृदय....।।

जगतामध्ये निज आईचे
हरहर होइ हसे।। हृदय....।।

कोट्यावधी तुम्हि पुत्र असोनी
माता रडत बसे।। हृदय....।।

देशभक्त ते हाका मारिति
त्यांचे बसत घसे।। हृदय....।।

स्वदेशिचे ते साधे अजुनी
तत्त्व न चित्ति ठसे।। हृदय....।।

बंधू खरा जो बंधुसाठी
प्राणहि फेकितसे।। हृदय....।।

पुत्र खरा जो मातेसाठी
सर्वहि होमितसे।। हृदय....।।

बंधू रडता आई मरता
कुणि का स्वस्थ बसे।। हृदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, सप्टेंबर १९३१

माझा महाराष्ट्र भाग्ये सजो

माझ्या महाराष्ट्रभूमीत मोठे
प्रतापी पुन्हा वीर निर्मी विभो
शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, वागीश, शिल्पी,
कलाविद् खरे थोर निर्मी प्रभो
श्री, नीति, संपत्ति, सदबुद्धि, सहकार्य
आरोग्य, ऐक्यादि येथे रुजो
धावो यशोगंध देवा! दिगंतात
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२९

भारतमाता माझी लावण्याची खाण!

(नाचून म्हणावयाचे गाणे)

भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
करिन तिचे ध्यान, मी करिन तिचे ध्यान
भारतमाता माझी लावण्याची खाण
प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण
भारतमाता माझी लावण्याची खाण।।

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, मी देइन माझे प्राण
हातात घेतले आहे सतिचे मी वाण।। गाइन...।।

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रुढिरान, मी छाटिन रुढिरान
हसवीन आइचे जे मुख झाले म्लान।। गाइन...।।

उडविन दाणादाण, मी उडविन दाणादाण
करिन धूळधाण, मी करिन धूळधाण
स्वातंत्र्य-विरोधकां देतो मी आव्हान।। गाइन...।।

विसरेन देहभान, मी विसरेन देहभान
कापुन देइन मान, मी कापुन देइन मान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान।। गाइन...।।

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, मी काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान।। गाइन...।।

सर्वस्वाचे दान, करिन सर्वस्वाचे दान
घेतो आज आण, मी घेतो आज आण
मातेला घडविन माझ्या मोक्षामृतपान।। गाइन...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मरणही ये तरी वरिन मोदे

मरणही ये तरी वरिन मोदे
जननिचे परि जगी यश भरु दे।। मरणही....।।

वीट वन्हित पडे
दृढ तरी ती घडे
तेज कष्टे चढे
हे कळू दे।। मरणही....।।

हाल होवोत ते
चित्त ना मुळि भिते
दास्य जे जाळते
नष्ट करु दे।। मरणही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

दिव्य मी स्वर्ग निर्मीन

ध्येय देईन
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
सचिंत सगळे दिसती लोक
जिकडे तिकडे भरला शोक
करुन तयांवर अमृतसेक
तया उठवीन।। दिव्य....।।

मेल्यापरि हे दिसती बंधू
उरला न दिसे जीवनबिंदु
निर्मुन मी संजीवनसिंधु
तया जिववीन।। दिव्य....।।

गुलामवृत्ती जिकडे तिकडे
दुबळी वृत्ती जिकडे तिकडे
चैतन्याचे भरभरुन घडे
तया पाजीन।। दिव्य....।।

स्वातंत्र्याची लाविन ज्योत
स्फूर्तीचा मी निर्मिन स्त्रोत
तेजाचा मी सोडिन झोत
दैन्य दवडीन।। दिव्य....।।

भेदभाव मी जाळिन सारे
ऐक्याचे मी सोडिन वारे
दिव्यबळाच्या जयजयकारे
राष्ट्र उठवीन।। दिव्य....।।

करिन त्यागा ते उद्युक्त
निर्भयतेचे शिकविन मंत्र
नि:शस्त्राचे देइन शस्त्र
पंथ दावीन।। दिव्य....।।

आळस दवडून सेवा देइन
विलास दवडून विकास देइन
खेदा दवडून बोध देइन
भाग्य देईन।। दिव्य....।।

कळकळ शिकविन तळमळ शिकविन
सदगुण संघटना मी वितरिन
सत्याचा सत्त्वाचा शोभन
ध्वज उभवीन।। दिव्य....।।

रुढी जाळुन विचार देइन
हृदयमतीला निर्मळ करिन
श्रद्धा सद्धर्माला देइन
मोक्ष देईन।। दिव्य....।।

मंगल उज्वल ते देइन
पावन निर्मळ ते देइन
सुंदर सत्य शिवा देइन
देव देईन।। दिव्य....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

देशासाठी मरु!

देश आमुचा वैभवशाली वाली सकलहि जगताचा
तद्ध्यानामधि रंगुन जाऊ गाऊ त्याला निज वाचा
पराक्रमाने निजमातेला मिरवू सा-या जगतात
कीर्तिध्वज विश्वात उभारु निजतेजाने दुर्दांत

वीरापरि तरि उठा झणी
दिगंत जिंकू चला क्षणी
निजमातेला स्मरुनि मनी
मुकुंदपादांबुज वंदुनिया प्राणांवर हाणू लाथ
कोण करी जगी विरोध आता करु सर्वांचा नि:पात।।

धन्य मावळे पावन झाले देशासाठी निज-मरणे
जगणे भूषण आम्हां कायसे भीति कशाला मनि धरणे
दों दिवसांची तनु तर साची वाचवुनी तरि काय मिळे
देशासाठी उदार होऊ मृत्यु कुणाला जगी टळे

हसू यमाचा फास जरी
हसू जगाचा जाच जरी
हसू सदोदित निजांतरी
धैर्य हासत तेजे तळपत निजमातेचा सन्महिमा
त्रिभुवनि अवघ्या पसरु दावू मातेचा वैभवगरिमा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२७

तेव्हा घडे उन्नती!

उत्साही मुखमंडले भुजगसे दोर्दंड दिव्याकृती
नानापत्ति पथी जरी दिसती ना लोपे यदीया धृती
मोठे कार्य करावयास बघते दिव्या सदा यन्मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

स्नेहाने भरले परस्पर सदा विश्वास जे दाविती
सर्वांची सहकार थोर करण्यासाठी असे संमती
ऐक्याचे कळुनी महत्त्व न कधी जे मत्सरे भांडती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

ज्यांच्या निर्भय अंतरी सतत जो सत्स्वाभिमान स्फुरे
ज्यांच्या दृष्टिसमोर जाच जुलमी दुष्ट जनांचा नुरे
भीती एक जगत्पतीस, न दुजा कोणाहि, जे सुव्रती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

तेजाला कवटाळिती परि सदा जे शिस्त सांभाळिती
अन्याला सुखवावया स्वसुखही नि:शंक जे होमिती
चित्ती उज्वल भावना परि विचाराला न जे सोडिती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

देशाची अतुला निरंतर वसे भक्ती यदीयांतरी
देशाचे हित ज्यात तीच करिती कार्ये सदा जे करी
भूमातेस्तव जे सदा झिजविती वाणी, वपु, श्री, मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।

देशासाठि सचिंत अन्य कसली चिंता न ज्यांना असे
देशासाठि फकीर नित्य हृदयी ती मातृमूर्ती वसे
सेवा नित्य रुचे, सुचे न दुसरे सेवेत जे रंगती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।

जेव्हा ऐक्य सहानुभूती उदया येतील आम्हांमध्ये
त्यागी उद्यममग्न होतिल यदा, बंधुत्व चित्ति जडे
जेव्हा स्वार्थ असेल दूर, हृदया वाटेल सत्यीं रती
जेव्हा निर्भयता दिसेल नयनी, तेव्हाच राष्ट्रोन्नती।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

तुफान झालो!

नाही आता क्षणहि जगणे भारती या गुलाम
मारु सारे भय हृदयिचे निर्मू स्वातंत्र्यधाम
नाही एक क्षणहि खपते दास्य विश्वंभराला
स्वातंत्र्याला मिळउन चला जाउन तत्पूजनाला।।

जो या आहे क्षणिक शरिरी अंतिम श्वास एक
भूमातेला सुखविन सुखे होउ मद्रक्तसेक
माता आता क्षणभरिहि ना बंधनी ह्या बसू दे
जावो माझी तनु परि मम म्लान माता हसू दे।।

कैसे साहू? सतत जरि ते आइला नागवीती
कैसे पाहू? सतत जरि ते बंधुंना गांजिताती
बैसावे का विलपत? न का पौरुषाचा स्फुल्लिंग
न श्वानाचे वरु हत जीण, होउ या धीरधिंग।।

झालो का हो सकळ इतुके श्वान पस्तीस कोटी
कैसे दास्यी सतत पिचतो नाहि का त्वेष पोटी
आहो का हो हृदयि बघणे मेष मानूष वा ते
सारे तुम्हां जग भरडिते धान्य ते जेवि जाते।।

आता ओठी मधुरतम त्या गाउ या मातगीता
आता सारे उठुन करु या बंधमुक्त स्वमाता
ना लावावे क्षणहि पळहि भारते मुक्त व्हावे
लोकी आता वर करुनिया मस्तकाते जगावे।।

या रे सारे मिळून करु या आधि ऐक्यावलंब
स्पृश्यास्पृश्ये सकळ उडवू जाळु हे भेददंभ
हालक्लेशा मुळिहि न भिणे स्वीय स्वातंत्र्य घेणे
तेजे पेटू अनलसम ही वैभवी माय नेणे।।

या देहाचे करिल तुकडे राईराईसमान
कोणी क्रोधे तरि सतत मी उंच राखीन मान
ओठी माझ्या प्रियजननिचे दिव्य नाचेल गान
माझ्या मातेस्तव करित हो मी मुदे देहदान।।

मारी माते कुणि जरि न ती मन्मनोमातृमूर्ती
कंठा कापी कुणि जननिचि ती न कंठस्थकीर्ती
हालांची ना लवहि उरली आज आम्हां गुमान
आता गेलो खवळून खरे आम्हि झालो तुफान।।

केला विरोध जरि या सगळ्या जगाने
ना गांगरुन मुळि जाउ आता भयाने
मोक्षार्थ जे ज्वलित राष्ट्र उभे असेल
त्याच्यापुढे न जगती कुणिही टिकेल।।

या भारतास हसवू करुनि स्वतंत्र
ते देशभक्तिमय या म्हणु दिव्यमंत्र
सर्वस्व-होम करणे सगळे उठा रे
वारे पहा प्रबळ, हे झडती नगारे।।

ही वेळ बंधु न असे तुमच्या निजेची
ही वेळ बंधु न विलास-विनोदनाची
स्वातंत्र्य वेळ शुभ दिव्य अपूर्व आली
आता उठा सकळही झणि याच काळी।।

आली घडी पुनरपि परतोन ये ना
जो जातसे क्षण कधी फिरुनी मिळेना
ना आळशी तुम्हि बना न बना उदास
या आइचे सकळही झणि तोडु पाश।।

उत्साहसागर बना दृढ धैर्यमूर्ती
स्फूर्ति प्रचंड उसळो मिळवा सुकीर्ती
होईल माय अपुली शतबंधमुक्त
तेजे उठाल सगळे जरि रे सुपुत्र।।

हे राष्ट्रतेज सगळे भडके उफाळे
हे देशभक्तिस पाहा शतपूर आले
हे ठेउनी निज सुखावरती निखारे
दास्या पदी तुडविण्या सुत सिद्ध सारे।।

झालो तुफान सगळे न अता गुमान
झालो तुफान सगळे नच देहभान
झालो तुफान करु हासत देहदान
स्वातंत्र्य आणु अथवा मरु हीच आण।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

प्रिय भारता सुंदरा!

प्रिय भारता सुंदरा!।।
ज्ञानविहारा! परम उदारा!
कुदशा जाइल तव कधि दूरा?।। भारता....।।

सत्त्व कुठे तव? त्याग कुठे तव?
तोडी कवण तव सुयशो-हारा?।। भारता....।।

पुत्र न दिसती, वैरी गमती
जे तुज लोटिति दुर्गति-दारा।। भारता....।।

शोक न करि तू प्रभुला प्रिय तू
अवतरुन तुला तारिल, मधुरा!।। भारता....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

दुबळी मम भारतमाता!

दुबळी मम भारतमाता
दीन विकल दिसते अनाथा।। दुबळी....।।

कोट्यावधि हे पुत्र असोनी, येति न कोणी ते धावोनी
आज तिला कुणि देइ न हाता।। दुबळी....।।

ये करुणाकर, ये मुरलीधर, भारतभूमी तुज ही प्रियकर
ये नतनाथ! खरोखर आता।। दुबळी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

आला पाऊस

आला पह्यला पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परमय

माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

आतां सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

आला पाऊस पाऊस

आतां धूमधडाख्यानं

घरं लागले गयाले

खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस

आला लल्‌करी ठोकत

पोरं निंघाले भिजत

दारीं चिल्लाया मारत

आला पाऊस पाऊस

गडगडाट करत

धडधड करे छाती

पोरं दडाले घरांत

आतां उगूं दे रे शेतं

आला पाऊस पाऊस

वर्‍हे येऊं दे रे रोपं

आतां फिटली हाऊस

येतां पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी

आतां खा रे वडे भजे

घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस

तुझ्या डोयांतले आंस

दैवा, तुझा रे हारास

जीवा, तुझी रे मिरास


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

देशभक्ताची विनवणी!

सन्मित्रांनो! सुबांधवांनो! परिसावी मदगिरा
यथार्था परिसवी मदगिरा
गारगोटीच्या परी न व्हावे, व्हावे सुंदर हिरा
धवळावे निज-यश:सुरंगे विश्व सकल सुंदर
उठा रे, विश्व सकल सुंदर
मुकुंद पूजुन निजान्तरंगी करा यत्न दुर्धर
यत्नास यश प्रभु देई
श्रद्धेस यश प्रभु देई
आशेस फळ प्रभु देई
कर्तव्याचे कंकण बांधुन करी, न उदरंभर
बनावे, केवळ उदरंभर
महायशाते बलविभवाते संपादा सत्वर।।

ज्ञान नको, बळ नको, नको ते शील, नको ते धन
आम्हाला नको नको ते धन
निरस्तविक्रम होउन दुर्बल ऐसे म्हणती जन
खरे न हे वैराग्य, बंधुंनो! खरे तपस्वी बना
तुम्ही रे खरे तपस्वी बना
देण्यासाठी मिळवा ज्ञाना मिळवा दौलत धना
भाग्यास जगी मिरवावे
वैभवी राष्ट्र चढवावे
कीर्तिने विश्व वेधावे
स्वाभिमानधन अनंत सतत संचवून अंतरी
सख्यांनो, संचवून अंतरी
स्वर्गसुखाते संपादावे राहोनी भूवरी।।

मेंढ्यापरि ना पडा बापुडे, मरण त्याहुनी बरे
खरोखर मरण त्याहुनी बरे
मेल्यापरि हे जीवन कंठुन कोण जगी या तरे
लोखंडाची कांब त्यापरी देह करा कणखर
अगोदर देह करा कणखर
देहाहुन निज मग उत्साही करा धीरगंभिर
आकाश कोसळो वरी
पदतळी भूमि हो दुरी
मज फिकीर नाही परी
ध्येयोन्मुख मी सदैव जाइन पतंग दीपावरी
जसा तो पतंग दीपावरी
ऐसा निश्चय करा, भस्म हो, जाउ न मागे परि।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये जीवात्मा रंगवा
बंधुंनो! जीवात्मा रंगवा
पारतंत्र्यशृंखला कडाकड बलतेजे भंगवा
निजांतरंगी अखंड अशादीप पाजळोनिया
गडे हो दीप पाजळोनिया
नैराश्याची निशा नाशकर सत्वर न्यावी लया
तर उठा झडकरी अता
लावा न मुळि विलंबता
द्या धीर दुर्बला हता
विजयाचा जयनाद घोषवा दुमदुमोन अंबर
जाऊ दे दुमदुमोन अंबर
स्वर्गी गातिल युष्मन्महिमा मग नारद-तुंबर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

मातृभूमिगान

हे शुभकीर्ते जगद्विश्रुते भारतमाते विमलतरे
मंगलमूर्ते मानसपूर्ते त्वन्नमने जन सकल तरे।।
अतिकमनीये शुभ रमणीये नमनीये स्तवनीयवरे
विद्यानंदे वैभवकंदे वंदेऽहं त्वां प्रेम-भरे।।
जगदभूषणे मनस्तोषणे विपच्छोषणे मधुरतरे
सकलपावने अघविनाशने कलिमलदहने पुण्यपरे।।
तत्त्वपंडिते सुमुनिमंडिते वाङमयसरिते विजयवरे
शुभगिरिभूषित सुसरित्-पूरित सुवनालंकृत अतिरुचिरे।।
सदय-मानसे वात्सल्यरसे प्रसादपूर्णे दैन्यहरे
अजरे विश्वंभरे देवते कविस्तुते परमार्थपरे।।
अन्नदायिनी ज्ञानदायिनी जगन्मोहीनी प्रभुप्रिये
तपोभूमि तू, कर्मभूमि तू, निस्तुल निरुपम निरंतरे।।
त्वदगुणगायन, त्वत्पदवंदन, त्वत्सेवन, मत्कर्म खरे
त्वत्सुत हे मदभूषण माते! परमोदारे स्नेहसरे।। हे शुभ...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

गाऊ मी कसले गाणे?

हे जीवन केविलवाणे।
गाऊ मी कसले गाणे?।।

जगि झालो आम्ही दीन
जीवनावीण जणु मीन
ही अमुची स्थिति किति हीन
मन जळते मम अपमाने।। गाऊ..।।

आमुचे असे ना काही
सत्तेची वस्तू नाही
सुतळीचा तोडा नाही
दुर्दशा देखणे नयने।। गाऊ..।।

ना गायिगुरे ती दिसती
वासरे न ती बागडती
दूध तूप शब्दची उरती
दुर्मिळ ते झाले खाणे।। गाऊ..।।

जी अन्न जगाला देई
ती उदार भारता मायी
किति रडते धायीधायी
मिळती ना चारहि दाणे।। गाऊ..।।

अन्नास माय मोताद
घेई न तिची कुणि दाद
सुत घालित बसती वाद
पोट का भरे वादाने।। गाऊ..।।

उद्योग सकलही गेले
बेकार सर्वही झाले
जगताती अर्धे मेले
श्रेयस्कर याहुन मरणे।। गाऊ..।।

देण्यास नाहि तो कवळ
यासाठी माता विकळ
अर्पिती नद्यांना बाळ
जळतोच ऐकुनी काने।। गाऊ..।।

उपजली न मरती तोची
प्रिय बाळे भारतभूची
मेजवानि मृत्युस साची
मांडिला खेळ मरणाने।। गाऊ..।।

ना वस्त्रहि अंगी घ्याया
ना मीठहि थोडे खाया
ना तेल दिवा लावाया
मृति येना म्हणुनी जगणे।। गाऊ..।।

लागल्या शेकडो जळवा
संपत्ती नेती सर्वा
आमुची न कोणा पर्वा
आम्हि हताश होउन रडणे।। गाऊ..।।

जाहलो लोक फटफटित
नि:सत्त्व भुतांसम दिसत
पावले सर्वही अस्त
किति दिवस असे हे पडणे।। गाऊ..।।

भारतीय जनता रोड
नि:सत्त्व करित काबाड
मोजुन घ्या हाडन् हाड
पोटभरी न मिळे खाणे।। गाऊ..।।

तेजस्वी विद्या गेली
ती पोपटपंची उरली
जी गोष्ट पश्चिमे लिहिली
ती आम्हां श्रुतिसम माने।। गाऊ..।।

सत्कला मावळे सारी
सच्छस्त्रे मेली सारी
अनुकरणे करित भिकारी
शेणात सदा हो सडणे।। गाऊ..।।

ती थोर संस्कृती गेली
ती गजान्त लक्ष्मी गेली
पुरुषार्थ सत्त्वता गेली
उरली ती स्मृतिची चिन्हे।। गाऊ..।।

सोन्याचा जेथे धूर
द्रव्याचा जेथे पूर
ती चिंतेमाजी चूर
भारतभू कैशी बघणे।। गाऊ..।।

भरलेली होती बाग
भरलेले होते भाग्य
ते गेले परि सौभाग्य
अपमाने आता जगणे।। गाऊ..।।

तो बाग मनोहर गेला
हा मसणवटा हो झाला
दैवाची भेसुर लीला
आम्हि गुलाम म्हणुनी जगणे।। गाऊ..।।

कुणि उंदिर आम्हां म्हणत
ती मेयो निंदा करित
जग अस्पृश्य आम्हां गणित
किति निंदा ऐकू काने।। गाऊ..।।

अज्ञानपंकगत लोक
आढळे घरोघर शोक
नांदतात साथि अनेक
ठाण दिले दृढ रोगाने।। गाऊ..।।

शेतकरी मागे भीक
शिकलेला मागे भीक
तो भिकारी मागे भीक
धंदा ना भिक्षेवीणे।। गाऊ..।।

हृदयाची होई होळी
आपदा सदा ही पोळी
खाऊ का अफुची गोळी
मज सहन होइ ना जगणे।। गाऊ..।।

खाऊन अफू परि काय?
ही रडेल सतत माय
बंधूंची न हरे हाय
काय मिळे मज मरणाने।। गाऊ..।।

हा हिमालय दिसे खिन्न
या सरिता दिसती दीन
पशूपक्षिवनस्पती हीन
सोडिती श्वास दु:खाने।। गाऊ..।।

हे परात्परा भगवंता
हे अनंत करुणावंता
हे जगदीशा बलवंता
ऐकावे हे रडगाणे।। गाऊ..।।

वाजवी मनोहर पावा
मोहांधतिमिर हा जावा
खडबडुनी लोक उठावा
उघडावी अस्मन्नयने।। गाऊ..।।

दे स्फूर्ति आम्हाला दिव्य
कृति करु दे उत्कट भव्य
स्वातंत्र्य येउ दे नव्य
हलवावी अस्मद्वदने।। गाऊ..।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

स्वातंत्र्य

प्राण अर्पावे। स्वातंत्र्यसौख्य मिळवावे।।

केवळ बडबड ना कामाची
गरज असे निशिदिन कष्टांची
कष्टत जावे।। स्वातंत्र्य....।।

विलास-सुखभोगांना सोडा
मोह सकळ ते मारक तोडा
स्वार्थांकुर चित्तातील मोडा
निर्मळ व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

देशभक्तिचा मनात काम
भारतभूचे वदनी नाम
दृष्टि दिसावी तेजोधाम
निर्भय व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

द्वेष कलह ते विसरुन जावे
बंधुबंधुचेपरि सजावे
हाती हात प्रेमे घ्यावे
पुढे दौडावे ।। स्वातंत्र्य....।।

उचंबळोनी वृत्ती जावी
उचंबळोनी हृदये जावी
वेडावुन जणु मति ती जावी
तन्मय व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

गुलामगिरिवर हाणा घाव
दास्या देशी नुरोच ठाव
प्रयत्नावरी ठेवुन भाव
सदा झुंजावे ।। स्वातंत्र्य....।।

स्वातंत्र्याची जया तहान
धावून जाऊ घेऊ ठाण
गाठू ध्येया देऊ प्राण
व्रत हे घ्यावे ।। स्वातंत्र्य....।।

परवशतेचे तोडा पाश
तोडा तोडा हरपो त्रास
चीड न येते काय तुम्हांस
चला चमकावे ।। स्वातंत्र्य....।।

परदास्याच्या पंकी कीट
असणे याचा येवो वीट
होउन सावध नीट सुधीट
निजपद घ्यावे ।। स्वातंत्र्य....।।

स्वातंत्र्याचा ईश्वरदत्त
हक्क करोनी घेऊ प्राप्त
करु यत्नाची अपूर्व शर्थ
मरुनी जावे ।। स्वातंत्र्य....।।

निज मरणाने मंगल येइल
निज मरणाने वैभव येइल
निज मरणाने मोक्ष मिळेल
मरण वरावे ।। स्वातंत्र्य....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, जानेवारी १९३०

स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन

आनंदाचा।
उगवला दिवस सोन्याचा।।

मालिन्यरात्र लोपली
सौभाग्यउषा उजळली
सत्कीर्तिगुढी उभविली
चला रे नाचा।। उगवला....।।

गंभीर भेरिगर्जन
शंखादि मंगलस्वर
देवता येतसे दुरुन
मांगल्याचा।। उगवला....।।

ते पहा मराठी भाले
चपळेपरि चमकत आले
मंदील पाठिवर खेळे
तच्छौर्याचा।। उगवला....।।

शत्रुच्या पिऊन रक्ताला
यज्जीव निरंतर घाला
तो आला रजपुत भाला
तत्तेजाचा।। उगवला....।।

ते पहा शिवाजी राजे
तो प्रतापसिंहही साजे
पृथ्विराजहि तेथ विराजे
धन्यत्वाचा।। उगवला....।।

ती जिजा तुम्हां दिसली का
ती उमा तुम्हां दिसली का
लक्ष्मीहि तुम्हां दिसली का
पावित्र्याचा।। उगवला....।।

दुंदुभी नभी दुमदुमली
माणिकमोती उधळिली
स्वातंत्र्यदेवता आली
जयघोषाचा।। उगवला....।।

सर्वैक्य-सुंदरासन
मांडिले बहुत सजवून
देवता दिसतसे खुलुन
मोक्षश्रीचा।। उगवला....।।

सुखसिंधु किति उचंबळे
भाग्यात चित्त दंगले
मोदात विश्व रंगले
कैवल्याचा।। उगवला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

स्वातंत्र्यानंदाचे गाणे

(लाहोरला स्वातंत्र्याचा ठराव पास झाला ती वार्ता ऐकून केलेले गाणे.)

मंगल मंगल त्रिवार मंगल पावन दिन हा धन्य अहो
भारत प्यारा स्वतंत्र झाला जय बोला जय बोला हो।।

मेवाडाच्या रणशार्दूला उठा, उठा शिवराया हो
माता अपुली स्वतंत्र झाली जय बोला जय बोला हो।।

दिशा आज का प्रसन्न दिसती निर्मळ दिसती सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पवन आजचा पावन वाटे कारण मजला सांगा हो
भारतमाता मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पाषाणांची फुले जाहली का ते मजसी सांगा हो
गतबंधन भू झाली म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

मातीची ही माणिकमोती झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

काट्यांची मखमल मृदू झाली चमत्कार का झाला हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

सतेज आजी अधिकच दिसतो दिनमणि का मज सांगा हो
आई झाली मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पर्वतातुनी खो-यांतूनिही दुर्गांतुन का गाणी हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

नद्या आज का तुडुंब भरल्या वाहावयाचे विसरुन हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

उचंबळे का अपार सागर सीमा सोडुनी आज अहो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

गगनमंडपी विमानगर्दी झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

स्वर्गातून सुमवृष्टि होतसे अपार का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

नारद तुंबर गाणी गाती सुरमुनि हर्षित ते का हो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

कैलासावर डमरु वाजतो नाचे शिवशंकर का हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

चार मुखांनी चतुरानन की सामगायना करितो हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

सृष्टी नाचते विश्व हासते चराचर भरे मोदे हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पाहा पाहा ते विश्वजन बघा, भेट घेउनी आले हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

चिनी जपानी अमेरिकन ते आले वंदन करण्या हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

तार्तर मोगल अफगाणादी शेजारी ते आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

युरोपातले सारे गोरे सविनय साश्रू आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

भारतमाता अनाथनाथा प्रेमे कुरवाळीत अहो
आपपर तिला नाही ठावे जय बोला जय बोला हो।।

आज जगाचे भाग्य उदेले वैभव फुलले अगणित हो
उचंबळे सुखसागर मंगल जय बोला जय बोला हो।।

दैन्य पळाले दु:ख गळाले कलहद्रोह दुरावति हो
नव्या मनूचा उदय जाहला जय बोला जय बोला हो।।

चुकली माकली जगातील ती राष्ट्रे जवळी घेउन हो
प्रेमे न्हाणी त्यांना भारत जय बोला जय बोला हो।।

पिवळी ढवळी काळी सारी भुवनामधली बाळे हो
भारतमातेजवळ नाचती जय बोला जय बोला हो।।

“भलेपणाने खरेपणाने प्रेमे सकळहि वागा हो
सुखास निर्मा” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“शांति नांदु दे अता अखंडित आनंद सहा नांदो हो
विसरा मागिल” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“परमेशाची सकळ लेकरे सुखेन भुवनी खेळू हो
स्वर्ग निर्मु या” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“परस्परांचे हात धरु या फेर धरुनी नाचू हो
शांतिगीत गा” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“थोर भारता! मार्गदर्शका! तूच आमुचा सदगुरु हो”
वदती सारी राष्ट्रे सदगद जय बोला जय बोला हो।।

अनंत झाली सुपुष्पवृष्टी गगनामधुनी तेव्हा हो
थै थै थै थै नाचु लागले गाउ लागले जय जय हो।।
जयजय भारत प्रियतम भारत जयजय भारत बोला हो
जयजय जयजय जयजय जयजय जय भारत जय बोला हो।।

आनंदाने डोला हो
आनंदाश्रू ढाळा हो
जयजय भारत जयजय भारत जयजय भारत बोला हो।।

हृदय कपाटे खोला हो
बांधा चित्सुखझोला हो
नाचा त्यावर नाचत बोला जयजय भारत बोला हो।।

जय बोला जय बोला हो।।
जय भारत जय बोला हो।।
जयशब्दाने अंबर कोंदे जय भारत जय बोला हो।।

भारत प्यारा स्वतंत्र झाला जयजय म्हणुनी बोला हो
सृष्टी सकलही स्वतंत्र झाली जयजय म्हणुनी बोला हो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, २६ जानेवारी १९३०