हिंदुस्थानवर्णन

चोहो वर्णातुन कोण मुशाफर वर्ण मला सांगा । तुम्हाला वर देते जागा ॥ध्रु०॥

विपवंश संपूर्ण दरिद्रे आजवर नाचवले, ब्रह्मकर्माला आचवले ॥

संकटी पडता पक्षी खगेंद्रे जसे काय वाचवले, सकळस तेजे नाचवले ॥

श्रीमंतांनी तसे थोर पदाला ब्राह्मण पोचवले, तया करी शत्रू वेचवले ॥चा०

जे उदार धीर देणार खबर घेणार क्षणामध्ये रूमची ॥

ते तर नव्हे आपले बेट राज बीज थेट कला दिसे तुमची ॥

नारो शंकर विंचुरकर बोला लौकर धरते करी दुमची ॥चा०॥

ओढेकर नायगावकर पुरंधरे पानशांतिल आपुण ।

तुम्ही अमात्य की राजाज्ञा प्रतिज्ञा पुरवा कपट वाणुण ॥

प्रतिनिधी सचिव सुमंत न झालो श्रीमंत दिसती गुण ॥चा०॥

रणशूर पुरे पटवर्धन सर्वदा युद्ध साधन । नाही रास्त्यामध्ये निर्धन, भरपुर भांडारी धन ॥

किती नानाचे शोधन दश दिशा करी बंधन ॥चा० मसलती राजकारणी सखाराम बापू हो ॥

रामाजीपंती वेढिला जंजिरा टापु हो ॥ हरीपंत म्हणती सृष्टित स्वराज्य स्थापू हो

॥चा० त्रिंबकराव राव भाऊसाहेबांचे मामा रावजीजी ॥

हर वक्त विसाजी कृष्ण हजर प्रभु कामा राव जी जी ॥

रामचंद्र गणेश वांछितात नित संग्रामा राव जी जी ॥चा०॥

कृष्ण राव बल्लाळ, कोळी भिल रामोशांचे काळ, पारोळकर काळाचे महाकाळ ॥

चा० रणांगणी बुंदेले मजबुत ॥ घोडे स्वार शिपाई कलबुत ॥ केले गिराशाचे ताबुत ॥

चा० संस्थान शाबूत लढाया रोज नाही नागा, वसविल्या ब्रह्मपुर्‍या बागा ॥१॥

क्षत्रीय मंडळित मुख्य घराणे उदेपुरचे, सुरजमल जाट भरतपुरचे ॥

अश्वमेध कलियुगात केला जयसिंग जैपुरचे, भारमलसिंग जोतपुरचे ॥

बळिभद्रसिंग आणिक सुरूपसिम्ग श्रींगी राजापुरचे, प्रभंजनसिंग कुंजपुरचे ॥चा०

पुरी चेतसिंग काशीचे कर्मनाशीचे इंद्रजितसिंग ॥

हरि भक्त हाती जमाल प्रभु नेपाळचे रणजित सिंग ॥

पडे बर्फ सदा काहूर सुभा लाहूरचे दळजितसिंग ॥चा० अजमेरचे सुरतसिंग मस्तकी लिंग शिवाचे सदा ॥

नरवरचे हरि हरमल एक दिल अचळ संपदा ॥

रजपूत चितोडकर मर्द गर्दअफिमेत न टळती कदा ॥ चा० झरण्या परण्याचे वीर, संग्रामसिंग रणधीर ॥

देती राघोगडास्तव शीर, दुर्जनसिंग गुण गंभीर ॥ मानसिंग तरलाचे तीर, गोहदेस ठेवला खंजीर ॥ चा०

ओंकार मलराठोड लेक मोठ्याने हो ॥

अर्जुनसिंग रामसिंग हरिप खोट्याचे हो ॥ जालमसिंग भिमसिग बुंदिकोट्याचे हो ॥चा०

केशरीगिसदत्त्याचे ब्राह्मणभक्त राव जी जी ॥

वैकुंठसिंग मथुरेचे बहुत वीरक्त राव जी जी ॥

मलसिंग बाहुबळे रक्षिती बाच्छाई तक्त राव जी जी ॥

चाल॥ सबलसिंग मेवाडचे ॥ रुद्रसिंग जमिदार मारवाडचे ॥ हटेसिंग हजारी छत्तिस गडचे ॥चाल॥

अशेले स्वइच्छ फिरती किती ॥भरपूर अमल झोकिती ॥ वळखिल्या वळख टाकिती ॥चाल॥

अशा आहेत लोकांच्या रिती म्हणून येऊ नये रागा, एखादी गोष्ट येते भागा ॥२॥

वंश हजारो हजार ज्यांचे सुरतपाक बेटे, चपळ जसे वाघिणीचे पेटे ॥ नगरशेट मसुदाबादेचे वतनदार शेटे, घालिती पैकेकरी खेटे ॥

सधम गुमस्ते पदरी बांधिती शिरी मंदिल फेटे, गळ्यामध्ये लिंग गोफ गेठे ॥चाल॥

आग्र्याचे केशवलाल द्रव्य आजकाल तयांचे सदनी ॥

आल्या याचकास सत्कार पाट बस्कर मिठाक्षर वदनी ॥ परनारी सहोदर सद्य प्रफुल्लित ह्रदय विषयसुख सदनी ॥चाल॥

उज्जनचे गोकुळदास जन्मतो प्रवास करते भले ॥ गढे मळचे हंसराज बंधु जसे राजपतीने शोभले ॥

झाले मातब्बर सौद्यात होन हौद्यात सहज लाभले ॥चाल॥ आदि ठिकाण भागानगर, लागले सभोवते आगर ॥

जाई जुई शेवंती तगर, खेळती तळ्यामधी मगर ॥ सारी अलम शहरची सुगर, ना अडे एकमेकांबिगर ॥चाल॥

बेदरचे मलापा मुलुख फिरस्ते वाणि हो ॥

शिवपूजन त्रिकाळी करून सत्य वदे वाणि हो ॥

पदोपदी सांब संभाळी समयनिर्वाण हो ॥चाल॥

भावार्थि सुराप्पा श्रीरंगपुर पट्टणचे रावजी जी ॥

धट लावून मोजिती द्रव्य मोधी पल्टाचे रावजी जी ॥चाल॥

चंद्राप्पा सोंदे बिनुरचे ॥ विराप्पा दर्भशयन इंदुरचे ॥ गुराप्पा गुरु मछली बंदरचे ॥चाल॥

नावे इतुक्याची घेतलि पहा पहा यातुन तुम्ही कुणी आहा ॥

भीड सोडून कळवा राहा ॥ करीन पती परिचय हा माझे मर्जिनुरूप वागा, तदार्पण मग दौलत पागा ॥३॥

राज्य संमधी पडले प्रसंगी जिव खर्चुन कामी, मराठे लोक नामी नामी ॥

धारकरी साहेब सुभेसरदार सरंजामी, नांदती आपआपल्या ग्रामी ॥

अमरसिंग जाधव शुचिर्भुत अति अंतर्यामी. घाडगे निसंग संग्रामी ॥चाल॥

रणनवरे नवरे थोरात खरड खैरात फडतरे कवडे ॥ पाटणकर निंबाळकर भुते भापकर झेंडे बालकवडे ॥

जगताप दरेकर बुळे ताकपिर मुळे दिघे वाघचवडे ॥चाल॥ धायबर बाबर धायगुडे पायगुडे सोनवणी घागरे ॥

माहाडिक शिर्के दाभाडे गोड सावंत धुळप नागरे ॥ सितोळ्यांची मोठी वेल सवाई सरखेल सबळ आंगरे ॥चाल॥

आधी सुभेदार होळकर, नंतर पवार धारकर ॥ जगजीवनराव माणकर, मुळी चव्हाण दहिगावकर ॥

आपतुळे पिसाळ वाईकर, ढमढेरे तळेगावकर ॥चाल॥

धनी छत्रपती महाराज तख्त सातारा हो ॥

करवीर चंदिचंदावर अहो दातरा हो ॥

शिंद्यात पुरुष एक एक निवडतो ताराहो ॥

नागपुरचे भोसले होशियार घोड्याचे राव जी जी ॥

गायकवाडा मोहोरे इष्कि कंडी तोड्यांचे राव जी जी ॥

शिरी आकलकोटी लाविती तुरे गोंड्याचे राव जी जी ॥चाल॥

म्हणे मुशाफर गडे ॥ आम्ही तर राज्याचे संवगडे ॥

ऐकून सुंदर पायापडे ॥चाल॥

गुणिजन गंगुहैबती पुरे ॥ मनी कवन तयांचे मुरे ॥

किती महादेव वाखा पुरे ॥

सुगर प्रभाकर म्हणे पंचीपशी काही बक्षिस मागा, कवी नाही कुणी कवनी जागा ॥४॥


कवी/शाहीर  - प्रभाकर

पोवाडा - पेशवाचे संक्षिप्त वृत्त

जगदीश्वर कोपला गोष्ट झाली खरिच निरुपाई, म्हणुन एकाएकी सर्व बुडाली ब्राह्मणबाच्छाई ॥ध्रु०॥

सबळ वीरांचे राज्य पुरुष जे क्षणात हरणारे, आकाश कडकडल्यास सकल जे उचलुन धरणारे ॥

अणिक जागा जिंकुन जे घन भंडारी भरणारे, रिपुसन्मुख धैर्याने रणांगणी जे नर ठरणारे ॥

चोहो सागरिचे स्नान सैन्यसमवेत जे करणारे, पूल बांधुन नावांचे जान्हवी निर जे तरणारे ॥

छत्रपतीच्या कामी शरीर जे खर्चुन मरणारे, उबे कंबर आवळून वायुवत सदा जे फिरणारे ॥

स्वकर्म आचरणारे अभय जे बळी सर्वा ठाई, पहा त्यांचे वंशज हिंडती पृथ्वीवर पाई ॥१॥

शके सोळाशे तिसापसुन राज्याची अमदानी, स्वता खपुन कारखाने जमविले घरी खावंदानी ॥

कसे दप्तरी लिहिणार लेख जे लिहिले मर्दानी, त्यात चुकि नाहि ठावि लेखणी कोरी कलमदानी ॥

वेदशास्त्रसंपन्न मुखोद्गत वदति आनंदानी, असे ब्राह्मण प्रतिसूर्य पाळिले त्यांच्या छंदानी ॥

शहर पुणे हरहमेष भरले वाडे बांधिती घरवंदानी ॥

नळ वाहाती नित्यानी पाणी पीती हौदावर गाई,

पुढे उघडे बाजार सुखे जन करती कमाई ॥२॥

प्रतिवर्षिक दक्षणा लक्ष ब्राह्मण श्रावणमासी, असा धर्म आहे कुठे आवंतर कोण्या ग्रामासी ॥

निरिच्छ योगी ध्याती गाती जे ईश्वरनामासी ॥

अन्न वस्त्र धन धान्य तयांच्या धाडिती धामासी ॥

नंदादिप नैवेद्य ठाई ठाई विठ्ठल रामासी, उच्छाहास दिल्हे गाव सुभद्रा सुताच्या मामासी ॥

कितीक विडे उचलुन पावले मृत संग्रामासी ॥

त्यांचे पुत्र पौत्रांस मागे नाहि दुष्काळ दामासी ॥

मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई, मनुष्यमात्रादिकांचे माहेर होति पेशवई ॥३॥

मूळ बाळाजि विश्वनाथ सुत त्यांचे बाजीराव, नाव केले आपांनी लढविले वसइस उमराव ॥

राव बाजिचे पुत्र प्रभु बाळाजि बाजिराव, कनिष्ठ दादा त्याहुन धाकटे जनार्दनराव ॥

आपासाहेबांचे एक चिरंजिव सदाशिवराव, शूर होते विश्वासराव आणि गुणी माधवराव ॥

नारायणरायांचे सवाइ झाले माधवराव, रावसाहेब घेतल्या वरी जन्मले बाजीराव ॥

चिमाजी आपासाहेब प्रसवली मग आनंदीबाई, विनायकराव बापुजी हे काही किंचित सीपाई ॥४॥

पुरुष पंध्रांतुन पराक्रमी गत झाले अकरा, तदनंतर चौघांनी दिल्या आल्या शत्रुसवे टकरा ॥

उपाय हरले ह्याच प्रसंगी गोष्ट गेलि निकरा, जो रक्षणा आणिला तोच करी दौलतिचा विकरा ॥

हरण झाले सर्वस्व राहिला नाही त्यातुन बकरा, गुप्त ठिकाण अजुन सांगती जा सत्वर उकरा ॥

अशी अवस्था बघुन जनाच्या मनि पडल्या फिकरा, हरहर हे भगवान कशा तरि घरि रहातिल ठिकरा ॥

गंगुहैबती म्हणे आज काय सरली पुण्याई, महादेव गुणी प्रभाकराच्या कवनी चतुराई ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १

यशस्वी झाले श्रीमंत पहिले सवेलढायाला ।

आताच आले अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥

दादासाहेब पुण्यप्रतापी निस्सीम शिवभक्त ।

स्वारी करुन दरसाल हालविले दिल्लीचे तक्त ।

आनंदीबाई सुशील शिरोमणी सगुणसंयुक्त ।

पतिभजनी सादर घडोघडी अखंड आसक्त ।

बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त ।

जन्मांतरी तप केले निराहारी राहुन एकभुक्त ॥चा०॥

शके सोळाशे शहाण्णवी अति उत्तम जयसंवत्सरी ।

पौषशुद्ध दशमिस भरणी नक्षत्र भौमवासरी ।

ठीक पहिल्या प्रहरात जन्मले रात्रीच्या अवसरी ॥चा०॥

पहा बाईसाहेब धारमुक्कामी राहुनी ।

कंठिला काळ काही दिवस दुःख साहुनी ।

केले तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥चा०॥

गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला ।

कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥

समाधान सर्वास वाटले कोपरगावास ।

स्वारी शिकारीस बरोबर जाती कथा उत्सवास ।

जे करणे ते पुसून करिती अमृतरावास ।

एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावास ।

असे असुन नानांनी मांडिला अति सासुरवास ।

हळुच नेऊन जुन्नरास ठेविले श्रीमंतरावास ॥चाल०॥

इतक्या संधीत सवाई माधवराव मरण पावले ।

तेव्हापासून नानांनी राक्षसी कपट डौल दाविले ।

परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥चा०॥

आले खडकी पुलावर श्रीमंतास घेउनी ।

दर्शनास नाना परिवारे येउनी ।

दाखविली याद रावास एकांती नेऊनी ॥चाल पहिली॥

भय मानून शिंद्यांचे निघाले बाईस जायाला ।

सातार्‍यात राहून लागले भेद करायाला ॥२॥

आपण बाळोबा होउन एक केली खचीत मसलत ।

चिमाप्पास धनी करून राखिलि जुनाट दौलत ।

करारात दोघांच्या झाली काही किंचित गफलत ।

म्हणुनी फिरून नानांनी उलटी मारुनी केली गल्लत ।

सूत्रधारी जो पुरुष ज्याच्या गुणास जग भुलत ।

हातात सगळे दोर पतंगापरी फोजा हालत ॥चाल॥

परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण ।

राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ।

कठीण गाठ नानांशी न चाले तेथे जारण मारण ॥चाल॥

महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ।

बाळोबास शिंद्यांकडून कैद करविले ।

शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥चाल पहिली॥

रास्ते झाले जामीन प्रसंगी अवघड समयाला ॥

असा गुजरला वक्त नेले मांडवगण पाहायाला ॥३॥

घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले ।

द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥

शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले ।

दलबादल डेर्‍यात श्रीमंतासंन्निध संगटले ।

बाजीराव राज्यावर बसता आनंदे जन नटले ।

तोफांचे भडिमार हजारो बार तेव्हा सुटले ॥चाल॥

नंतर नाना एकविसांमधी समाधीस्त झाले ।

महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधि आपले पाहिले ।

यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥चाल॥

शिंद्यांनी करून माळव्यात खातरजमा ।

केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा ।

सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥चाल पहिली॥

कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला ॥

घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥

दिला मार पळणास जातिने पुण्यास येऊनिया ।

शहर सभोते वेढुन बसले चौक्या ठेवुनिया ।

खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनिया ।

सुखात होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनिया ।

इंग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनिया ।

सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनिया ॥चाल॥

अगोदर सोजर तरुक धावले मप्याशी दक्षिणी ।

त्या भयाने होळकर परतले नाही कोणी संरक्षणी ।

भरघोसाने श्रीमंत त्यावर पुण्यास येता क्षणी ॥चाल॥

झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ।

परि घरात शिरला शत्रु सबळ पारखा ।

लाल शरीर टोपी अंगी आठ प्रहर अंगरखा ॥चाल पहिली॥

धर्म कर्म ना जातपात स्थल नाही बसायाला ।

असे असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥

फार दिवस आधि जपत होते या इंग्रज राज्याला ।

अनायासे झाले निमित्त पंढरपुरास कज्जाला ।

संकट पडले काहि सुचेना प्रधानपूज्याला ।

रती फिरली सारांश मिळाले लोक अपूज्याला ।

भय चिंता रोगांनी ग्रासिले काळीज मज्जाला ।

पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥चाल॥

परम कठिण वाटले आठवले त्रिभुवन राव बाजीला ।

थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला ।

निरुपाय जाणुनी हवाली केले मग त्रिंबकजीला ॥चाल॥

ठेविला बंदोबस्तीने नेउन साष्टीस ।

एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस ॥

केले गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥चाल पहिली॥

स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला ।

शोध लावून साहेबांणी तेथे पाठविले धरायाला ॥६॥

इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची ।

म्हणून साहेब लोकांनी आरंभिली अगळिक दाव्याची ।

वसई प्रांत कल्याण गेली गुजराथ पुराव्याची ।

रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ।

कर्नाटक दिले लिहून ठाणी बैसली पराव्यांची ।

कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥चाल॥

अश्विनमासी वद्य एकादशी दोन प्रहर लोटता ।

श्रीमंत बापुसाहेब एकांती पर्वतीस भेटता ।

हुकूम होताक्षणी रणांगणी मग फौजा लोटता ॥चाल॥

बैसले राव दुर्बिणीत युद्ध लक्षित ।

भले भले उभे सरदारसैन्य रक्षित ।

लागुन गोळी ठार झाले मोर दिक्षित ॥चाल प०॥

तसाच पांडोबांनी उशीर नाही केला उठायाला ।

उडी सरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥

आला त्रास वाटते फार ह्यावरून लक्षुमीस ।

विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुकडून खामीस ।

फसले शके सत्राशे एकुण चाळीसच्या रणभूमीस ।

ईश्वर संवत्सरात कार्तिक शुक्ल अष्टमीस ।

प्रहर दिसा रविवारी सर्व आले आरब गुरमीस ।

खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्वामीस ॥चाल॥

दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्यांशी लढू ।

गर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणात डोंगर चढू ।

शिपाइगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढू ॥चाल॥

लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी ।

दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी ।

गेली स्वारी महाला हिलाला मग लावुनी ॥चाल पहिली॥

जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला ।

खेचुन वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ॥८॥

सकळ शहरचे लोक हजारो हजार हळहळती ।

सौख्य स्मरून राज्याचे मीनापरी अखंड तळमळती ।

रात्रंदिवस श्रीमंत न घेता उसंत पुढे पळती ।

यमस्वरूप पलटणे मागे एकदाच खळबळती ।

धडाक्याने तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती ।

त्यात संधी साधून एकाएकी दुरून कोसळती ॥चाल॥

भणाण झाले सैन्य सोडिली कितीकांनी सोबत ।

कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनी चुंबत ।

कितीक मुकामी अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥चाल॥

कोठे डेरे दांडे कोठे उंट तट्टे राहिली ।

कोठे सहज होऊन झटपट रक्ते वाहली ।

कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥चाल पहिली॥

बहुत कोमावली पाहवेना दृष्टीने उभयाला ।

हर हर नारायण असे कसे केले सखयाला ॥९॥

माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणी भिडले ।

जखम करुन जर्नेलास फिरता जन म्हणती पडले ।

गोविंदराव घोरपड्याचे दोन हात भले झडले ।

आनंदराव बाबर ढिगामधी खुप जाऊन गढले ।

मानाजी शिंदे मागे फिरताना डोई देऊन अडले ।

छत्रपती महाराज तळावर समस्त सापडले ॥चाल॥

घाबरले श्रीमंत सुचेना मन गेले वेधुनी ।

बाईसाहेबांना तशिच घोड्यावर पाठीस बांधुनी ।

नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधुनी ॥चाल॥

दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले ।

नाही स्नान शयन नाही स्वस्थपणे जेवले ।

आले आले ऐकता उठपळ राव धावले ॥चाल॥

गर्भगळित जाहले लागले शुष्क दिसायाला ।

बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥

दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन ।

रागरंग नाही आनंद ठाऊक रायालागुन ।

सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन ।

कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ।

धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन ।

कर्म पुढे प्रारब्ध धावते लगबग मागुन ॥चालव

पांढरकवड्यावर रचविल्या धनगारा अद्भुत ।

थंडीने मेले लोक उठविले गारपगार्‍यांनी भुत ।

बेफाम होते लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥चाल॥

ओधवले कसे सर्वांचे समयी संचित ।

कडकडून पडले गगन जसे अवचित ।

दुःखाचे झाले डोंगर नाही सुख किंचित ॥चाल पहिली॥

अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला ।

कोणे ठिकाणी नदीत लागले सैन्य बुडायाला ॥११॥

जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती ।

कळेल तिकडे भरदिसास प्रभु काट्यामधी शिरती ॥

आपला घोडा आपण स्वहस्ते चुचकारुन धरती ।

खाली पसरुन उपवस्त्र दिलगिरीत वर निद्रा करती ॥

अस्तमानी कधी रात्री भात भक्षिती पाटावरती ।

दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥चाल॥

पेशव्यांचे वंशात नाही कोणी असा कट्टर पाहिला ।

हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ।

बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥चाल॥

नर्मदेस शालिवाहन शक संपला ।

त्या ठायी ठेविल शकपंती आपला ।

भरचंद्रराहुग्रहणात जसा लोपला ॥चाल पहिली॥

सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला ।

सिद्ध झाले मालकमास राव राजेंद्र मिळायाला ॥१२॥

समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिवरले ।

सद्गद जाला कंठ नेत्र दोन्ही पाण्याने भरले ।

आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले ।

ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ।

केवळ असा विश्वासघात केल्याने कोण त ले ।

इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥चाल॥

तुमची आमची हीच भेट आता राव सर्वांना सांगती ।

कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ।

ऐसे उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ।

॥चाल॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये ।

दूर ढकलुन शरणागतास लावू नये ।

पहाकसबाचे घर गाईस दावू नये ॥चाल पहिली॥

हिंमत सोडू नये सर्व येईल पुढे उदयाला ।

कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावे ह्रदयाला ॥१३॥

प्राण असुन शरिरात बुडालो वियोग लोटात ।

बरोबर येतो म्हणुन घालिती किती डोयी पोटात ।

निराश जाणुन झाली रडारड मराठी गोटात ।

निर्दयांनी लांबविली पालखी पलटण कोटात ।

मातबर लोकांची ओझी चालतात मोटात ।

गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटात ॥चाल॥

कुंकावाचुन कपाळ मंगळसूत्रावाचुन गळा ।

तया सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ।

धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥चाल॥

कसे प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविले ।

अगदीच पुण्याच्या लोकांना फसविले ।

हुर हुर करीत का उन्हात बसविले ॥चाल पहिली ॥

काही तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला ।

कोणास जावे शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥

विपरित आला काळ मेरुला गिळले मुंग्यांनी ।

पंडीतास जिंकिले सभेमध्ये मदांध भंग्यांनी ।

भीमास आणिले हारीस रणांगणी अशक्त लुंग्यांनी ।

कुबेरास पळविले अकिंचन कसे तेलंग्यांनी ।

जळी राघव माशास अडविले असंख्य झिंग्यांनी ।

जर्जर जाहला विष्णुवाहन बदकांचे दंग्यांनी ॥चाल॥

ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडवीले ।

हरिश्चंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडवीले ।

फितुर करुन सर्वांनी असले राज्य मात्र बुडवीले ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर ।

तर दृष्टीपुढे पडतील राव लवकर ।

महादेव गुणीजन श्रीमंतांचे चाकर ॥चाल पहिली ॥

प्रभाकरची जडण घडण कडकडीत म्हणायाला ।

धुरू नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायाला ॥१५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा २

श्रीमंत झाले लोक श्रीमंतापासुन लक्षावधी ।

दुरावले ते श्रीमंत आपल्या दृष्टिस पडतिल कधी ॥धृ०॥

शिंदे होळकर उत्तरेस पश्चमेस नांदती ।

पूर्वेकडे भोसले मिरजकर दक्षणचे अधिपती ।

हरिपंत नानाच्या पुढे किती बुद्धिमंत लोपती ।

बृहस्पति आणि शुक्र जसे काय तारांगणी तळपती ॥

विपुल त्या रास्त्यांच्या घरी आजवर संततसंपती ।

इचलकरंजीकर बारामतिकर सोयर्‍यात धनपती ॥

चा० पहा कृष्णराव चास्कर, साजणी ॥

कोकणचे कोल्हटकर, साजणी ॥

महशूर सोलापूरकर, साजणी ॥चा० पहिली॥

दिक्षित-पेठे-साठे-ओक-ओंकार सभाग्यामधी ।

फाटक-थत्ते-बर्वे-देवधर-पेंडशांची रित सुधी ॥१॥

भागवत-मांडलिक-दामले-रामदुर्ग बळी ।

आपा बळवंतराव पार जाई रणात फोडुन फळी ॥

रामाजी महादेव रणांगणी अडेल मोठे खळी ।

हशमनीस, कार्लेकर देती कोळी भिलांना गळी ॥

झाशीवाले बिनीवाले बुंदेले रिपु खांडेकर छळी ।

कितीक लक्षाधीश प्रतिष्ठित दप्तरची मंडळी ॥

चा० मर्दाने विंचुरकर, साजणी ॥चा०प॥

नायगावकर पुरंधरे प्रतिश्रीमंत ते गुणनिधी ।

सखाराम भागवत राजकारणात केवळ विधी ॥२॥

नगरकर-आंबीकर चिंतो विठ्ठल स्वारीकडे ।

पवार जाधव धुमाळ डफळे देवकाते धायगुडे ॥

दरेकर सरलष्कर बाबरसानवणी पायघुडे ।

निंबाळकर नाईक घायभर पाटणकर फाकडे ॥

मुधोळ गुती गजेंद्रगडकर संस्थानि घोरपडे ।

गुजर घाडगे माहाडीक मोहिते विचारे शिर्के बडे

॥चा० मर्द माने म्हसवडकर, साजणी ॥

आटोळे उंबरखेडकर, साजणी ॥

रणनवरे सासवडकर, साजणी ॥

चा० प० पिसाळ-शितोळे-वाघ-आपतुळे लढाइला ते अधी ।

शहामीरखा रोहिले फिरंगी पठाण आरब सिधी ॥३॥

ताकपीर-थोरात-पांढरे स्वामी पदी सादर ।

धुळपांचा इंग्रज टोपी काढु करती आदर ॥

श्रीमंतांचे प्रतिबिंब अलि-बहादर-समशेरबहादर ।

कुशावा हैबतसिंग सजले काय स्वरूप सुंदर ॥

सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर ।

छत्रपती विनवून देविती श्रीमंतास चादर ॥

चा० निळकंठराव धारकरी, साजणी ॥

सन्निध त्यांची चाकरी, साजणी ॥

मोहीम हैबतराव करी, साजणी ॥चा०प०॥

बाबुराव हरी-सखाराम हरी शूर विरांचे क्षुधी ।

अहंकारी मल्हारराव जगजीवन नसे पर-बुधी ॥४॥

धन्य प्रभू पेशवे ज्यांचे ऐश्वर्य बघुन मन रिझे ।

पर शत्रूंचे सैन्य ठायिंच्या ठायी प्रसंगी थिजे ॥

सुखी केला मुलखात केशरी भात घरोघर शिजे ।

गृहस्थ-भिक्षुकांचे गौरव तुपात मनगट भिजे ॥

तीर्थो तीर्थी नित्य शेरभर सोने सकाळी झिजे ।

नाही दुःख कोणास पलंगी आनंदात जन निजे ॥

चा० ईश्वरी अंश हे धनी साजणी ॥

महापराक्रमी साधनी, साजणी ॥

सर्व गुण शोधनी, साजणी ॥ चा० प०॥

गंगुहैबती म्हणे ज्यांचे विघ्न गजानन वधी ।

महादेव गुणी प्रभाकराचे कवन शरकरा दुधी ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

पोवाडा - अहिल्याबाई होळकरीण

सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥

महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी ।

दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।

वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥चाल॥

उद्धार कुळाचा केला । पण आपला सिद्धिस नेला । महेश्वरास जो कुणी गेला ॥चाल पहिली॥

राहिला तेथे तो घेउन बाप भाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥

प्रत्यही द्यावी ब्राह्मणास दश दाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने ।

लाविली हरी हर मंदिरी तावदाने । गर्जती देउळे कीर्तन नादाने ॥

शोभती होम कुंडे द्विजवृंदाने । टाकिती हजारो नमात अवदाने ॥चाल॥

कधी कोटि लिंगे करवावी । वधुवरे कधि मिरवावी । अर्भका दुधे पुरवावी ॥चा०प०॥

पर्वणी पाहुन दान देतसे गाई । जपमाळ अखंडित हाती वर्णू काई ॥२॥

जेथे ज्योतिलिंग जेथे तीर्थ महा क्षेत्रे । घातली तेथे नेहमीच अन्नछत्रे ।

आलि जरा झालि काही ज्याची विकल गात्रे । पुरवावी त्यास औषधे वस्त्रे पात्रे ।

कितिकांनी घेतली स्मार्त अग्निहोत्रे । दिली स्वास्थे करुन त्या भटास क्षणमात्रे ॥चाल॥

आधि इच्छा भोजन द्यावे । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावे ॥चा०प०॥

जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई ॥३॥

आल्या यात्रेकर्‍याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास नवे जोडे ।

कोणास महेश्वरी उंच धोत्रजोडे ।

कोणास दुशाला कोणास बट घोडे । गवयास मिळाति कडी कंठ्या तोडे ।

घाली गिराशांचे पायात बिड्या खोडे ॥चाल॥

बांधिले घाट मठ पार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनात पाणी गार ॥चाल पहिली॥

त्यासाठी मुशाफर काय धावत जाई । विश्रांत पावती पाहुन अमराई ॥४॥

किती सूर्य ग्रहण संधीत तुळा केल्या । कधी कनक रौप्य कधी गुळाच्या भेल्या ।

संभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधी रामेश्वरी गेल्या ।

संसारी असुन वासना जिच्या मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥

कवी गंगु हैबती म्हणती ॥ पुण्याची कोण करी गणती ॥ राज्यास होती पडपण ती ॥चा०प०॥

महादेव गुणीचे लक्ष तिचे पाई । कवनात प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

नाना फडनविसाचा पोवाडा

सवाईमाधवरावसवाई सवाई डंका बजाया । फडणीस नानाकी तारीफ अक्कलने तो गजब किया ॥धृ०॥

बिनधारसें राज्य चलाया नाकिसे चक्‌मक् झडी । कैक मुत्सद्दी चपगये बस भये नानाकी तो अक्कल बडी ।

दिल्ली अटक लाहोर भाहोर कर्नाटक बीज पुकार पडी । चारो तरफ तजेला निकला चंदाऐसी किरत बडी ।

जिने बैठे राज कमाया दिलके तै खूप दिल दिलासा दिया । साहेब बंदगी करना पुना छांड कहूं अया न गया ।

अजि बडी अकल । सवायी माधवराव सवायी सवायी डंका बजाया । फडणीस नानाकी तारिफ अक्कलने तो गजब किया ॥१॥

कैक मुत्सदी होगये अक्कल नानाकी नयी पायी किसे । निजामअल्ली भगादिया साहेब जसदे हराउसे ।

टिपूसरीखे लाये बगलमे ज्या पहुंचे दरवाजेसे । पेशवोका निमक जहालम् मनीं कियावो गाजीमे ।

क्या नबाबका हुवा खराबा तोबा सबही डुबा दिया । तुम हमबी कानोसे सुंनते याजस लेकर कोन गया ।

कुचबी नही । सवायी माधवराव सवायी०॥२॥

किया मोंगलपर हल्ला उसदिन कई उमराव संगा चले । शिंदे होळकर और नागपुरवाले भोसले आन मिले ।

दाभाडे पाटणकर निंबालकर कट्टे लढनेवाले । पवार जाधव माधवरावके संगत नानाबी निकले ।

फडके आपाबळवंत रास्ते अभये इसमे कोण रह्या । चुका भुला हुवा देखने कहा अपना अखर गया ।

अजि किसे खबर । सवायी माधवराव सवायी० ॥३॥

सब् मिल हल्ला किया उडादिया नबाबके धुडके धुडके । मशरमुलुक् पकड कैदमे डाल दिया बैठो चुपके ।

पानी बिगर घोडे उट हत्ती तमाम मरगये नबाबके । रुपयेका जल एक कटोरा पानी ऐसी जगा रखे ।

किसे खबर भइ मेहेल मुलुख नबाबने क्या दिया लिया । फंदी अनंत कुतै क्या मामलु सुनते है कुच कबूल किया ।

सचहोगया । सवायी माधवराव सवायी०॥४॥


कवी - अनंत फंदी

पेशवाईच्या त्रोटक हकीकतीचा पोवाडा

श्रीमंत ईश्वरी अंश, धन्य तो वंश, परम पुरुषार्थी ।

बरोबरी तयांची कोण करील पहातार्थी ॥ध्रुवपद॥

राजाधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत ।

भासती सदैव देव आमचे हेच भगवन्त ॥

पाषाण धातुच्या मूर्ती, धरत्रीवरती, आहेत अनंत ।

त्या पूज्य परंतु नाहीत प्रगट जीवित ॥

तसे नव्हेत हे तर देव, कलिमध्ये भूदेव, ब्राह्मण संत ।

त्या वंशी पेशवे झाले सबळ बळिवंत ॥चाल॥

योग्यतेस आणिले पंत, होऊनिया कृपावंत, त्या राजांनी ।

ह्यामुळेच चढती कमान, धरुनी अभिमान.... ।

मग बहिरोपंत सोडवून, बिडी तोडवून, प्रभुच्या पणज्यांनी ॥चाल पहिली॥

पुढे प्रधानपद मिळवून, वैरी पळवून मारिल्या शर्थी ॥श्रीमंत०॥१॥

राव बाजी पुण्यामध्ये येऊन, हातावर घेऊन, निघाले शीर ।

प्रारंभी पाहिले जनस्थान रघुवीर ।

नेमाड माळवा मुलूख, करुन सरसलूख, मोडिले वीर ।

मेवाडचे राजे न धरती धीर ॥

गढमंडळ बुंदेलखंड, डंघईत अखंड, राहून थंड, सही केले ।

प्रतापे करून या जगात नाग मिळविले ॥चाल॥

बुडवूनि या बहाद्दरास, आणिली घरास, माषुक मस्तानी ।

दरवर्षी धौंशा घालून, जावे चालून अघाडीस मस्तानी ॥

शह दिला नगर थेट पास, खु...... । ........॥चाल पहिली॥

उपरात नर्मदाकाठी, सार्थकासाठी, मोक्ष कार्यार्थी ।

देह समर्पिला त्या स्थानी याच भावार्थी ॥ श्रीमंत ॥२॥

तेची दुनियेमाजी धन्य, न मानी अन्य, वंदिती स्वामी ।

जीव खर्च कराया सिद्ध धन्याच्या कामी ॥

तीन वर्षे राज्य वसवून, मोर्चे बसवून सभोवते धमामी ।

सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी ॥

हल्ल्यांत उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी ।

नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी ॥चाल॥

बक्षीस दिले कडी तोडे, पालख्या घोडे, वाजे चौघडे, जमीदार्‍या ।

ठायी ठायी दिसती भरभरून, आख ठरवून,

सजीवल्या सरदार्‍या परशत्रू होईना खाक, वाटुनी परख, तशाच हवलदार्‍या ॥चाल पहिली॥

खूब केली तुम्ही तरवार, नावनिशीवार, म्हणून किती प्रार्थी ।

यशस्वी होता तो संवत्सर सिद्धार्थी ॥श्रीमंत॥३॥

बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी ।

आणिले पुण्यात जपानी नळाचे पाणी ॥

युद्धात जिंकुन नबाब, बसविली बाब, करून धुळदाणी ।

त्या सालीच बंगाल्यत घातली ठाणी ॥चाल॥

लागलेच केले कूच, स्वारी दरकूच, परतली सगळ्यांची ।

लष्करात केवढा गजर, होई नित्य नजर, मोती मणि पोवळ्यांची ।

वाटून खिचडी रमण्यात, आनंदे पुण्यात, मोहरापुतळ्यांची ॥चाल पहिली॥

खुष केले शास्त्री पंडित, विद्यामंडित, विप्र विद्यार्थी ।

गेले कीर्त गात ते ब्राह्मण तीर्थोतीर्थी ॥श्रीमंत०॥४॥

शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ ।

दादाही गणावा त्यात, बाण भात्यात, भातांचे ताट ॥

भलत्याच ठिकाणी घाली रिपुशी गाठ ।

तिन्ही काळ निरंतर साधी, जातीने बांधी, हत्यारे आठ ॥चाल॥

फेडून नवस, माहेरास, गेले लाहोरास, जिंकित शेंडे ।

अरे जपानी सहज अटकेत, पाव घटकेत, लाविले झेंडे ।

सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दूल गेंडे ॥चाल पहिली॥

पुढे चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामी कार्यार्थी ।

हे पुरुष म्हणावे श्रेष्ठ बंधुचे स्वार्थी॥श्रीमंत०॥५॥

भाऊसाहेब योद्धा थोर, आंगामध्ये जोर, पुरा धैर्याचा ।

विश्वासरावही तो तसाच शौर्याचा ॥

दोहो बाजूस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा ।

किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ॥

दृष्टांत किती कवि भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा ।

शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ॥चाल॥

कितीकांची बसली घरेच, हे तर खरेच, ईश्वरी कृत्य ।

शोकार्णवी नाना पडून, नित्य रडरडून, पावले मृत्यु ।

कवि गंगु हैबती दीन, पदांबुजी लीन, कृपेतील भृत्य ॥चाल पहिली॥

महादेव प्रभाकर ध्यायी, सदा गुण गाई, यथा साह्यार्थी ।

श्रीमंत प्रभूची कीर्त जशी भागीरथी ॥श्रीमंत०॥६॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

पोवाडा - दुसरे सयाजीराव गायकवाड

धनी सयाजी महाराज धुरंधर भाग्यवान भूपती । स्त्रिया पुत्रसह वर्तमान ते भोगितात संपती॥ध्रु०॥

प्रौढ प्रतापी शाहु छत्रपती सिंहासनी सुंदर । सभोवतले सरदार शूर मध्ये आपण पुरंदर ।

प्रांत परगणे गाव ज्यांनी सोडविले गिरिकंदर । सरंजाम ते तयास दिधले जहागिर एकंदर ।

फौजबंद गायकवाड सेनापती समशेर बहादर । वंशध्वज त्या वंशी जन्मले हे स्वकर्मी सादर ॥चाल॥

महाराज सयाजी मणी, लालसा ॥ करी प्रकाश कुळी दिनमणी, फारसा ॥ देई चिंतित चिंतामणी, पहा कसा ॥चाल॥

तसा पुरुष ह्या दिसांत पाहता नाही असा अधिपती । जी सुपुत्र प्रसवली धन्य ती जननी धन्य ते पती ॥१॥

निष्कलंक निर्दोष स्वामिनी करून पूर्वार्चन । प्रसन्न केला असेल मागिल जन्मी भाललोचन ॥

पदोपदी तो सांब म्हणुन करी प्रसंगी भय मोचन । धैर्यवान दृढ पिंड न बाधे पदार्थ होई पाचन ।

लेजिम जोड्या जोर कसुन खूप केले बळ सिंचन । सहस्त्रात सौंदर्य गौरपण पीत जसे कांचन ॥चाल॥

पगडीस तुरा वाकडा, काही जरा ॥ जेग्यास जडित आकडा, गोजरा ॥ कानी भिकबाळी चौकडा, साजरा ॥चाल॥

राजबीज फाकडा सुशोभित दिव्य शरिर संपती । गळ्यात कंठ्या हार, कडी करी जडावाची तळपती ॥२॥

मर्जी होइल त्या दिशी स्वारी कुलतमाम श्रृंगारणे । पूर्व कधी पश्चिमेस जाती मृग शिकारी कारणे ।

भरपल्ला फेकून अडचणीत घोडा ललकारणे । स्वता शिस्त बांधून गोळी हटकुन ठीक मारणे ।

भले लोक बोथाटी टाकिता वरचेवर वारणे । मागे पुढे बाजूस हुल दावुन भाला फेरणे ॥चाल॥

सुती हात तिरंदाजिचा, वाणिती ॥ डाव दुसर्‍यावर बाजिचा, आणिती ॥ आला न्याय गरीब गाजीचा, छाणिती ॥चाल॥

खबरदार लिहिण्यात कल्पना इतरांची अल्प ती । समई मुख्य जंद्राल पेचिता न गवसता जल्पती ॥३॥

सर्व गोष्टींचा शोख जातिने हुशार तर कुस्तिस । दंड भुजा आटीव उमररायाची तिसपसतिस ॥

तूप साखर आणि कणीक उस चारुन आणुन मस्तिस । साठमार चहुकडुन खिजविती नित्य नव्या हस्तिस ॥

पहिलवान किती जेठी येउन राहतात तेथे वसतिस । खुराक उत्तम त्यास कारकुन वर बंदोबस्तिस ॥चाल॥

हे जाणुन कवी सागर, धावती ॥ गुण सभेस नट नागर, दाविती ॥ बक्षीस कडी लंगर, पावती ॥चाल॥

ज्याकडे पाहती कृपा दृष्टि तो करतिल लाखोपती । सप्तपिढ्यांचे दरिद्र विच्छिन्न होउन रिपु लोपती ॥४॥

भक्तजनांचे माहेर देशावर श्रीपंढरपुर । याचकांस हे योग्य बडोदे सर्व क्लेश करी दुर ॥

नित्य उठुन वाटितात खिचडी ब्राह्मणही महामुर । स्त्रियापुरुष मुलीमुलांसकट शेर होतो भरपुर ॥

पुण्यवान गायकवाड जगतीतळांत ते महशुर । सर्व कनकमय लोक घरोघर निघे सोन्याचा धुर ॥चाल॥

जे देणे दिले एकदा, योजुन ॥ ते परत न घेती कदा, समजुन ॥ कोणी फंद करील जर कंदा, माजुन ॥चाल॥

दर्शनास तो अयोग्य त्यावर विधिहरिहर कोपती । अशा प्रभूच्या रक्षणार्थ उडी घाली म्हाळसापती ॥५॥

अहारे बडोदे शहर, कोट चौफेर काम मजबुत । चार दरवाजे चार दिशेना वर शिपाई कलबुत ॥

चोहो रस्त्यावर दाट हवेल्या काय सांगिन शाबुत । मांडवीत मोहोरमात जमती सर्व तिथे ताबुत ॥

अजब शहर वसविले गिराशे करून नेस्तनाबुत । बाग बगीचे तलाव साहेब घेति हवा तंबुत ॥चाल॥

महा जागृत राजेश्वर, पावती ॥ संकटी नीळकंठेश्वर, धावती ॥ भुत वाटेस यवतेश्वर, लावती ॥चाल॥

बहुत उग्र नरसिंह समंधादिक थरथर कापती । प्राशन करिता तीर्थ हिमज्वर इतर रोग करपती ॥६॥

विठ्ठलमंदिर सुरेख दुसरे देउळ बालाजिचे । खंडेराव दक्षिणेस उत्तरपंथींबेचराजिचे ॥

भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजिचे । महाकाली भदरेत लक्ष्मी लक्षणीक मुख जिचे ॥

गोजिरवाण मूर्त नाव नारायण सुंदरजिचे। काही पुढे बाहेर महंमदवाडित घर काजिचे ॥चाल॥

किती धर्म हरीभक्तिचा, होतसे ॥ लल्लूपारख खुष वक्तिचा, दिसतसे ॥ सामळ सौदा नक्तिचा करितसे ॥चाल॥

दैवशाली गोपाळराव मैराळ राखिती पती । खुशाल अंबईदास रतंजी असे कितिक धनपती ॥७॥

महाराजांचे आप्त आवंतर धारकरी बरोबर । एकासारखे एक पांढरे करिती डौलडंबर ॥

घोरपडे उमराव लक्ष्मणराव कसुन कंबर । मागे न फिरती रणात पडल्या तुटुनी जरी अंबर ॥

मानसिंगराव शिर्के आणिक रघुनाथराव धायबर । थोर कुळींचे मर्द राजे मंडळीत असे नंबर ॥चाल॥

मामांची मानमान्यता, चांगली ॥ करवितील दुर दैन्यता, लागली ॥ ही चौघांमध्ये धन्यता, वागली ॥चाल॥

भाऊ पुराणिक पूर्ण कृपेतिल जे कारण स्थापिती । मान्य पडे ते प्रभूस गुरुवर दया करी गोपती ॥

हस्तमुखे खावंद गादीवर बसुन सोपस्कर । रुमाल चौरी वारितात वर भोवते उभे किंकर ॥

नारायणराव दिवाण, भास्कर विठ्ठल जोडुन कर । सदय ह्रदय शास्त्रज्ञ मुतालक मुख्य भिमाशंकर ॥

रामचंद्र विश्वनाथ फडणिस येती पुढे लौकर । मुजुमदार ते नारायणराव, माधव करंदीकर ॥चाल॥

विश्वासुक बक्षी खरे, मर्जिचे ॥ किती शब्द सुचविती बरे, अर्जिचे ॥ गोपाळपंत गुणी पुरे, मर्जिचे ॥चाल॥

कृपावंत सरकार म्हणुन हो श्रम सारे हरपती । चाहती उमाशंकरास बारिक कामकाज सोपती ॥९॥

अशा प्रभूचे उमाकांत कल्याण सदोदित करो । गाई म्हशी गजतुरंग वहनी अपार पांगा भरो ॥

पुत्रपौत्री राज्यलक्ष्मी अशीच अक्षई ठरो । शत्रुपराजय करुन प्रतापे राज्यनिति आचरो ॥

दान दक्षणा धर्मी निरंतर चित्तवृत्ति अनुसरो । गंगु हैबती शीघ्र कवींची प्रपंच चिंता हरो ॥चाल॥

दहा चौकी काम उठवुन, सांगिन ॥ हरजिनसी यकवटउन, रंगिन ॥ गातात गुरु आठवून, चंगन ॥चाल॥

महादेवाचे कवन कमळसर भ्रमर गुणी झेपती । प्रभाकराची नजर हीच करी धन्यास विज्ञप्ति ॥१०॥


कवी/शाहीर - शाहीर प्रभाकर

धर्मादाय वर्णनपर पोवाडा

दामाजी पंतांनि जगविले ब्राह्मण काही दुकळात । गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखो असल्या काळात ॥ध्रु०॥

तीनशे तिसांवर वर्षे लोटली दुर्गादेविच्या काळाला । फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥

दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळाला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वास आला निर्दाळा ॥

त्या समई कथोर फोडुनी पंती जगविले सकळाला । बेदरास कळताच धुतोड शिपाई आले आवळाला ॥

चल बे बम्मन म्हणुन ओढिता अश्रु लागले गाळाला । कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥

महाराचे सोंग विठोबांनी स्वता घेउनी ॥ धान्याचे द्रव्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंतांच्या पोथिमधे ती रसिद ठेउनी ॥

राहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०

दामाजीपंताच्या धावण्या असा धावला विपळात । तसा म्हाळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळात ॥१॥

सत्राशे चोवोसात दंगा होळकरांनी अति केला । पंचविसामधे दरोबस्त अगदिच पहारे पाउस गेला ।

दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला । दिसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाही रयतेला ॥

ब्राह्मण गेले उठुन मजलोमजली खुब ठेला । बडोद्यात पोचला तो जगला न पोचल्या वाटेस मेला ॥

धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमा शांतिने भरलेला । तेव्हापसुन प्रारंभ सिध्याला हजारो ब्राह्मण जपलेला ॥चा०॥

चाळीस वर्षे वाटितात खिचडी सदा ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशी कदा ॥ दिवसात प्रहरभर पडे मेहनत एकदा ॥

मग सार्वकाळ आनंद हसती गदगदा ॥चा० कुटुंब सुद्धा प्रपंच करती गर्भिणी होति बाळात ।

तिही महिन्याच्या मुलास खिचडी मिळत्ये असे आले आढळात ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास । टाळ विने करताळ मृदंगी त्यात एखादी सुरदास ॥

सार्वकाळ भजनात घालती कदा न शिवती नर्दास । घुंगुर बांधुन पायी नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ।

चित्रे मूर्ती करण्यात कुशळ जे वैद्य जिंकिती दर्दास । तर्‍हे तर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥

ब्रह्मचारि मांत्रीक तपस्वी घेउन सवे शार्गिदास । मोहरा पुतळ्या रुपये तयांना देति शालजोड्याफर्दास ॥चा०॥

ह्यापरी ब्राह्मण समुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करुन संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥

वंशास वश मार्तंड करुन ठेविला ॥चा०॥

येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या राहाळात । कीर्तवान खावंद असले नाही मराठे मंडळात ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरले । गायकवाड आहेत म्हणुन हे समस्त ब्राह्मण सावरले ॥

तानसेन पंथाचे गवय्ये तेहि प्रभूनि आवरले । कडी तोडे हातात दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥

पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले । हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥

नायकिणी आणि कसबिणी शाहिर नेहमी बडोद्यामधे ठरले । पावे पगाराशिवाय बक्षिस कसबी लोक ह्याने तरले ॥चा०॥

कल्याण ईश्वरा असेच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधी अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥

महादेव गुणीचे कवन मनामधे ठसो ॥ चा० प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळात ।

द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळात ॥४॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर 

यशवंतराव होळकरावर पोवाडा

सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥

वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती ।

भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती ।

बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती ।

नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा ।

मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा ।

उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा ।

खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली ।

अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली ।

सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली ।

तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती ।

सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति ।

बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती ।

फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी ।

जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥

सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला ।

शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा ।

मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा ।

अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी ।

सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥


कवी - अनंत फंदी

खर्ड्याचे लढाईचा पोवाडा

दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगात अवतरले ॥ध्रुपद॥

भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥

कलियुगी धर्म ताराया ॥ ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपुनिर्मूळ कराया ॥

सुकिर्ती मागे उराया ॥ सौख्य दिले सर्वास अहारे सवाई माधवराया ॥चाल॥

धन्य धन्य नानाचे शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण ।

गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हाच केला दुर्धट हा पण ।

आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालून कुंपण ।

आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंताना करुनि रवाना ॥

(चाल) दादासाहेब मागे वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ।

अपुल्या राज्यापार पळविले । काही दिवस दुःखात आळविले ।

इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायात खिळविले ।

ठेवून गडावर चणे दळविले । बंदीवान तेथेच खपविले ॥चाल॥

बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ।

जमाव ठायींच ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ।

शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजुर ओढिला ।

लागेल तितके द्र्व्य पुरविले ॥चाल॥ तळेगावावर इंग्रज हरला ।

इष्टुर साहेब रणीच वीरला । उरला इंग्रज घाट उतरला ।

सरमजाम गलबतात भरला । रातोरात मुंबईत शिरला ।

सवेच गाढर पुढेच सरला । शिकस्त खाउन तोही फिरला ।

फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥चाल॥ अशी रिपूची मस्ती जिरविली ।

शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली । कारभार्‍यांनी पाठ पुरविली ।

पुण्यामध्ये अमदानी करविली । पुरंदराहुन स्वारी फिरविली ।

पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली ।

कालूकर्णे वाजंत्री वाजती ॥चाल॥ लग्नचिठ्या देशावर लिहिल्या ।

ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या । पाठविल्या बोलाऊ पहिल्या ।

पठाण मोंगलसहित सहिल्या । छत्रपति रोहिले रोहिल्या ।

भोसल्यांच्या मौजा पाहिल्या । आणिक किती नावनिशा राहिल्या ।

कवीश्वराची नजर पुरेना ॥चाल॥ आरशाचे मंडप सजविले ।

चित्रे काढून चौक उजविले । थयथयांत जन सर्व रिझविले ।

गुलाब आणि अत्तरे भिजविले । शिष्ठ शिष्ट शेवटी पुजविले ।

रुपये होन मोहोरांनी बुजविले । श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ।

यशस्वी झाली सकल मंडळी ॥चाल॥

सत्राशे सातात बदामी । हल्लयाखाली केली रिकामी ।

एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामी ।

बाजीपंत अण्णा ते कामी हरीपंत तात्याचे लगामी ।

परशुरामपंत त्या मुक्कामी । स्वामी सेवक बहुत जपले ॥चाल॥

गलीमास काही नव्हते भेऊन । पराक्रमाने किल्ला घेऊन ।

अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन ।

श्रीमंतांनी वाड्यामध्ये नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ।

बहुमानाची वस्त्रे देऊन । बोळविले तयाला ॥चाल॥

सत्राशे तेरावे वरीस । अवघड गेले पहिल्या परीस ।

करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ।

तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ।

आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥चाल पहिली ॥

नंतर मागे फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकी धरिले ॥

दैन्य दिवस आज सरले ॥१॥

केवढे भाग्य रायाचे । चहुंकडे सेवक यशस्वी होती हे पुण्य त्या पायांचे ॥

करिता स्मरण जयाचे । काही तरी व्हावा लाभ असे बलवत्तर नाम जयाचे ॥

प्रधानपद मूळ याचे । सत्रशे चवदात मिळाले वजीरपद बाच्छायाचे ॥चाल॥

मुगुटमणी ते पाट्लबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ।

दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसिता फळास यावा ।

हर हमेशा शत्रुसि दावा । माहित सगळा मराठी कावा ।

हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥चाल॥

चवदा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ।

तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ।

देउन फार मर्जीने वागले । भेटीसमयी जंबूर डागले ।

मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झाकले ॥चाल॥

राव जेव्हा नालकीत बसले । कृष्ण तेव्हा ते जनास दिसले ।

अर्जुन पाटिलबावा भासले । पायपोस पदराने पुसले ।

चरणी मिथी माराया घुसले । कर प्रभुनी बगलेत खुपसले ।

इमानी चाकर नाहीत असले । धन्य धनी आणि धन्य दास ते ॥चाल॥

दोन्ही दळे या सुखात दंग । त्यावर जाला अमोल रंग ।

गुलाल आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाही प्रसंग ।

मस्त चालतीपुढे मातंग । कोतवाल घोडे करिती ढंग ।

राज्य प्रभुचे असो अभंग । अहर्निशि कल्याण चिंतिती ॥चाल॥

गुलाम सोदे बुडवुनि पाजी । पंत प्रधान राखुन राजी ।

लष्कर दुनया करून ताजी । शके सत्राशे पंधरामाजी ।

माघ मासी भली मारून बाजी । पाटिलबावा सुरमर्द गाजी ।

अगोदर गेले विष्णुपदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥चाल॥

सवाचार महिन्यांचे अन्तर । हरीपंत तात्या गेले नंतर ।

तेथे न चाले तंतर मंतर । वर्तमान हे एक अधिकोत्तर ।

काही न करिती नाना उत्तर । दिलगीर मर्जी सुकले अंतर ।

हिरे हरपले राहिले फत्तर । तरि तो पुरुष बहुत धिराचा ॥चाल॥

दौलतीचे आज खांबच खचले । लाल्होते ते कोठेच पचले ।

शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाही कचले ।

कडोविकडीचे विकार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ।

मोंगलावर मोर्चे रचले । जिकडे तिकडे झाली तयारी (चाल) पुकार पडला पृथ्वीवरती ।

सैन्य समुद्रा आली भरती । आगाऊ खर्ची मोहरा सुर्ती ।

रात्रंदिवस श्रम नाना करती । कशी ही मोहिम होईल पुरती ।

राव निघाले सुदिनमुहूर्ती । लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥चाल॥

गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ।

उजव्या बाजुस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना ।

देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुब सिलेखाना ।

मध्ये रायाचा तालिमखाना खळ ॥ खळ खळ लेजिमा वाजती ॥चाल॥

वाड्याबाहेर जिन्नसखाना । पदार्थ भरपुर मोदीखाना ।

मागे उतरला उष्टरखाना । डेर्‍यासन्निध नगारखाना ।

तर्‍हतर्‍हेचा शिकारखाना । बाजाराच्या पुढे पिलखाना ।

दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठ्या पल्ल्याच्या जरबा ॥चाल पहिली॥

चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ।

दैन्य दिवस आज सरले० ॥२॥ बहुत शिंदे जमले ।

शिलेपोस पलटणे लाविती पठाण जरीचे समले ॥ रणपंडित ते गमले ।

भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेत येउन रमले ।

ज्यापुढे शत्रु दमले । त्यांणी शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥चाल॥

आधीच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ।

फौज सभोवती जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ।

सर्व लढावया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ।

हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिजे ॥चाल॥

बाळोबास तर काळिज नाही । धीट रणामध्ये उभाच राही ।

धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही ।

सदाशीव मल्हार काही । मागे पुढे तिळमात्र न पाही ।

देवजी गवळी रिपूस बाही । रणांगणाचा समय साघिती ॥चाल॥

निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ।

बंदुकीला कटपट्यास नक्षी । फत्ते होई तो गौंड न भक्षी ।

रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । नित्य कल्ल्याण धन्याचे लक्षी ।

पिढीजाद शिंद्याचे पक्षी । केवळ अंतरंग जिवाचे ॥चाल॥

मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ।

सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ।

हपिसर पदरी चंगी भंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी ।

दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर झर बुरुज बांधुनी ॥चाल॥

शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजदे थेट इराणी ।

किती काबूल खंदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ।

कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ।

इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमधे ज्वान पलटणी ॥ ( चाल ) ॥

येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ।

तुकोजी बावांना गुरमाई । आधीच बळ स्वार शिपाई ।

वारगळ बरोबर फणशे जावाई । लांब हात बुळे वाघ सवाई ।

वाघमारे कुळ धगनगभाई । खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥चाल॥

शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फासे ।

लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणे करतात तमाशे ।

बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ।

जा जा म्हणती लोक बगासे । जहामर्द तरवारकरांचे ॥चाल॥

हरजी विठूजी आनंदराव । स्वता धनी यशवंतराव ।

संताजीचे प्रसिद्ध नाव । आबाजीचा तिखट स्वभाव ।

दूर नेला साधितात डाव । विचारी मतकर माधवराव ।

भागवतांनी सोडुन गाव । ताबडतोब निघाले ॥चाल॥

महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ।

चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ।

परशुराम रामचंद्र असारे । चहुकडे ज्याचा पूर्ण ठसारे ।

अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कापती ॥चाल॥

रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ।

विंचुरकरांमधि गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुष जवादा ।

चौपट खर्च दुप्पट आदा । पुरंधर्‍यांची कदीम इरादा ।

तत्पर पेठे मोगल वादा । ओढेकरही येऊन भेटले ॥ ( चाल पहिली ) ॥

वामोरकर सावरले । आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले । दैन्य दिवस आज सरले ॥३॥

खास पतक नानाचे । निवडक माणुस त्यात पुरातन सूचक संधानाचे ॥

पद देऊनि मानाचे । खुष करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचे ॥

बळ विशेष यवनांचे । हे ऐकुनी लोकांनी सोडिले पाणी शीरसदनाचे ॥चाल॥

आपा बळवंतराव सुबुद्ध । बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध । पवारात मर्दाने शुद्ध ।

वाढविती भापकर विरुद्ध । केवढ्यांना शुष्कवत युद्ध ।

काढिती हांडे रणी अशुद्ध । धायगुडे निर्बाणी कुबुद्ध ।

शेखमिरा फौजेत मिसळले ॥चाल॥

पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ।

अमीरसिंग जाधव माळेगावकर । सुजाण गोपाळराव तळेगावकर ।

जानराव नाईक नट निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ।

करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥चाल॥

कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले ।

हर्ष वाहिले पुढे सरसावले । रण नवरे दरकुच धावले ।

समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले ।

शहर पुणे रक्षणार्थ ठेविले । माधवराव रामचंद्र कानडे ॥चाल॥

सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागे नाही लपले ।

धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धा ते आपापले ।

गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ।

खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ।

जाधव काळे माळशिकारे ॥चाल॥ बाजीराव गोविंद बर्वे ।

लाड शिरोळे धायबर सुर्वे । दाभाड्याचा हात न धरवे ।

भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे ।

खंडाळ्याचे पोषाग हिरवे । नलगे भोयते सुंदर सर्व ।

सखाराम हरी बाबुराव ते ॥चाल॥

कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ।

राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे वरची ।

एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ।

काय कथा त्या भागा नगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥चाल॥

दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलोट ।

मारिती पुढे समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ।

देवकात्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ।

जगतापाचे महतर भोयटे । भले मर्तृजा महात थड्याचे ॥चाल॥

गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ।

आयतुळे मान्य सकळ शूरात । बेहरे मांजरे योग्य बीरात ।

राघो बापुजी रणघोरात । येसोजी हरी सैन्य पुरात ।

दारकोजीबावा निंबाळकरांत । वीरश्रीत तो धुंद सग्याबा ॥चाल॥

कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ।

दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ।

मैराळजी पायघुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे ।

गणेश विठ्ठल वाघमारे । बिडकर खुर्देकर आटीचे ॥चाल॥

गिरजोजी बर्गे फार दमाचे । बहादर बारगिर ते कदमाचे ।

आठवले तर बहु कामाचे । दुर्जनसिंग राठोड श्रमाचे ।

टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ।

श्रीमंतस्मरणे काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥चाल पहिली॥

प्रपंच वैद्य विसरले । चिलखत बखतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥

लष्कर सगळे गुर्के । जरी पटक्याभोताले घालिती गरर मानकरी गर्के ।

सुंदर गोरे भुर्के । घोरपडे पाटणकर महाडिक खानविलकर शिर्के ।

मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥चाल॥

पुढे पसरले रिसालदार । मुसा मुत्रीम नामदार । सय्यद अहमद जमादार ।

अमीर आबास नव्हे नादार । शहामिरखा ते डौलदार ।

इतक्या वर ते हुकूमदार । राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥चाल॥

गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ।

विनायकपंताचा गलोल । आबा काळे गुणीच डोल ।

टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ।

तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणे ॥चाल॥

संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ।

राघोजीबावा नाव विराजे । बाणांचा भडीमार माजे ।

सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ।

अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥चाल॥

दक्षण उत्तर पश्चिम भागी । पसरुन तोफा जागोजागी ।

तमाम गारदी त्याचे मार्गी । स्वार सैन्य त्यामागे झगागी ।

जरी पटका तो दुरुन धगागी । कोणीच नव्हता त्यात अभागी ।

स्वस्ति बक्षिस पावे बिदागी । जासूद सांडणी स्वार धावती ॥चाल॥

काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या झडती ।

शिरकमळे कंदुकवत उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ।

कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ।

वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥चाल॥

पाउल पाउल पुढे सरकती । घाव चुकाउनी शुर थडकती ।

सपुत वाघापरी गुरकती । हत्यार लाउन मागे मुरकती ।

खुणेने शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागे सरकती ।

जिवबादादा मनी चरकती । अररररर शाबास बापांनो ॥चाल॥

सुटती तोफा धुंद दणाणत । गुंगत गोळे येती छणाछण ।

सों सों करिती बाण सणासण । खालेले घोडे उडती टणाटण ।

टापा हाणती दुरुन ठणाठण । वाजति पट्टे खांडे खणाखण ।

नौबती झांझा झडती झणाझण । एकच गर्दी झाली धुराची ॥चाल॥

थोर मांडली रणधुमाळ । अगदीच बसली मग काठाळी ।

फौज पसरली रानोमाळी । लाखो लाख तरवारी झळाळी ।

होळकराची फिरती पाळी ॥ जिवबांची मदुमकी निराळी ।

मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूंचे ॥चाल॥

अठरा घटका लाही फुटली । तोफ हजारो हजार सुटली ।

मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निःसंग तुटली ।

मोंगल सेना मागे हटली । त्या समयी कैकांची उपटली ।

पेंढार्‍यांनी दौलत लुटली । गबर झाले एका दिसात ॥चाल॥

शके सत्राशे सोळा भरता । आनंद संवत्सरही सरता ।

दहा दिवस शिमग्याचे उरता । वद्य पंचमी सुवेळ ठरता ।

ती प्रहरांचा अंमल फिरता । मोंगलाशी प्रसंग करिता ।

पळाले मोंगल धीर न धरता । चंद्रउदयी खर्ड्यात कोंडिले ॥चाल पहिली॥

गढीत खासे शिरले ।

मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोभर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥

बहुत खराबी जहाली ।

मोहोर्‍यावरची फौज सैनिका सहित नाहली ॥

त्यात उन्हाची काहाली ।

रुपयाचे दिड शेर पाणी अशा कठीण वेळा वाहाली ॥

ती सर्व जनांनी पाहिली ।

जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥चाल॥

निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानात मान्य ।

जुनाट पुरुषात राजमान्य । अपार पदरीमण धनधान्य ।

कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचे मुळी प्राधान्य ।

तशात झाले अनुकुळ दैन्य । नाही तर घेते खबर पुण्याची ॥चाल॥

जेव्हा मारिती यवन मुसंडी । तेव्हाच होईती फौज दुखंडी ।

साठ सहस्त्र पठाण बुडी । तिनशे तोफा खंडी ।

असे असुनिया दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥चाल॥

झाला जन्म त्या कुळात माझ्या बाई राजेंद्राचा ।

केवळ माघव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराची ॥

अणीक मंत्री मर्द मराठा बंद्रोबंद्रांचा ।

ऐरावत बांधून आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥

येथे न चाले यत्‍न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा ।

उपाय असता तरी न मरता बापू रामचंद्राचा ॥

चा० हरहर जगन्निवासा, अता काय करू ॥

पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरू ॥

राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा कर शकू ॥

चा० पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवू ॥

हिरकणी कुटुन जाऊ पाण्यामधे कालवू ॥

ती पिउन पौढत्ये नका ग मज हालवू ॥

चा० जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला ।

जिवंत मी असल्यास उद्या मी नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते० ॥१५॥

धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले ।

शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ।

जलचर हैदर नबाब सन्मुख रण करिता थकले ।

ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ।

असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले ।

गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥चाल॥

संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती ।

ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबती ।

कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥चाल॥

महादेव गुणीराज श्रुती गादिचे ।

नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ।

पीळ पेच अर्थ अक्षरात वस्तादिए ॥चालपहिले॥

प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेत गायाला ।

अशा कवीची बुज नाही कोणि करायाला ॥

कमि नव्हते० ॥१६॥


कवी - अनंत फंदी

रावबाजीवर पोवाडा

उटया केशरी टिळा कस्तुरी कमालखानी हार गजरे । गहेनाजी बहेनाजी अक्षयीं जवळ पालखिच्या हुजरे ।

जुनी माणसें तीं कणसाला महाग गैर त्याची बुजरे । चार चटारी भटारी हलके जाणुनिगे अलबत हुजरे ।

सुंदर स्त्री दुसर्‍याची तिसरा दे बैल गुतुन अवता । शाल्योदन मिष्‍टान्न भोगता सवा शेर ज्याचा सवता ।

चोवीस वर्षें चैन भोगिली राज्यकांति जाणुन नवता ॥धृ०॥१॥

जो नीचकर्मी लइशी गुर्मीं कुटुंब दाखल नजराणा । प्रभु फार संतोष न किमपी दोष निजा इजजवळ जाणा ।

असें अवश्य घडवी अडवी तिडवी चार प्रहर दम द्या ताणा । दौलतीस बाजीराय करिल अपाय म्हणत होते नाना ।

खेळ करुनि उफराटा वरंटा पाटा रयतेच्या भवता ॥शाल्यो०॥२॥

कुलकल्ला त्रिंबकजी डेंगुळ अगदिं राहिले दिडबोट । पंढरपुरीं महाद्वारी शास्त्री ठार केले कर्मच खोटे ।

चौकुन मग इचकोबा तोबा हाय सुकुन गेले ओठ । आळ येतांच चंडाळ गडावर पदरीं काय पडला धोट ।

सर्वांची रग जिरली ह्मणुनी तळि भरली आला दीप मालवता । फंदी मूल ह्मणे असती विरस !

कां गादि पुण्याची घालवता । शाल्योदन मिष्‍टान्न०॥धृ०॥३॥


कवी - अनंत फंदी

शेवटले बाजीरावाचा पोवाडा

वडिलांचे हातचे चाकर । त्यांस न मिळे भाकर ।

अजागळ ते तूपसाखर । चारुनि व्यर्थ पोशिले ॥१॥

सत्पात्राचा त्रास मनीं । उपजे प्रभूचे मनांतूनि ।

ज्या पुरुषास न कोणी । अधीं त्याला भजावें ॥२॥

तट्टू ज्यास न मिळे कधीं । पालखी द्यावी तयास आधिं ।


मडकें टाकुनि भांडयांत रांधी । ताटवाटया भोजना ॥३॥

द्रव्य देऊन आणिक आणिक । नवे तितके केले धनिक ।

जुन्याची तिंबुनि कणीक । राज्य आपुलें हरविलें ॥४॥

जो पायलीची खाईल क्षिप्रा । पालखी द्यावी तया विप्रा ।

निरक्षर एकाद्या विप्रा । त्याला क्षिप्रा चारावी ॥५॥

एके दिवशीं व्हावी खुशाली । स्वारी पुढें शंभर मशाली ।

एके दिवशीं जैशी निशा आली । मशाल एकही नसावी ॥६॥

मेण्यांत बसावें जाउनि । कपाटें ध्यावीं लाउनि ।

स्वरुप कोणा न दावूनी । जागें किंवा निजले कळेना ॥७॥

हुताशनीच्या सुंदर गांठया । शेर शेर साकरेच्या पेटया ।

विंप्र कंठीं जैशा घंटया । उगाच कंठया घालाव्या ॥८॥

तशाच राख्या जबरदस्त । सांभाळितां जड होती हस्त ॥

दौलत लुटुनि केली फस्त । हस्त चहूंकडे फिरविला ॥९॥

तुरा शिरीं केवढा तरी । बहुताची मोठा चक्राकारी ॥

हार गजरे नखरेदारी । सोंगापरी दिसावें ॥१०॥

हात हात रेशमी धोतर जोडे । चालतां ओझें चहूंकडे

आंगवस्त्र दाहदां पडे । चरणीं खडे रुतताती ॥११॥

पोषाग दिधले बाजिरायें । मोच्यास पैकां कोठें आहे ? ॥

तैसेच अनवाणी चालताहे । शास्त्री अथवा अशास्त्री ॥१२॥

घढींत व्हावें क्रोधयुक्त । घडींत व्हावें आनंदभरित ॥

धडींत व्हावें कृपण बहुत । घडींत उदार कर्णापरी ॥१३॥

घडींत व्हावी सौम्य मुद्रा । घडींत यावा कोप रुद्रा ॥

घडींत घ्यावी क्षणैक निद्रा । स्वेच्छाचारी प्रभू हा ॥१४॥


कवी - अनंत फंदी

श्रीसवाई माधवराव पेशवे रंग खेळले त्याचे वर्णनपर पोवाडा

जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारात ।

तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ॥ध्रु०॥

धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले ।

किर्त दिगंतरी करुन कुळातिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥

एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले ।

दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाही दरिद्री कुणी उरले ।

शालिवाहन शक नर्मदेपावत जाऊन जळी घोडे विरले ।

श्रीमंतास करभार देउन आले शरण रिपु पृथ्वीवरले ॥

चा० महावीर महादजीबाबा हुजरातीचे॥

आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥

केले महोच्छाव खुब मोथ्या गजरातीचे ॥चा०॥

तर्‍हे तर्‍हेचे ख्याल तमाशे बहुत होती दळभारात ।

श्रीमंतांचा संकल्प हाच की रंग करावा शहरात ॥१॥

कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्‍यांचा ।

सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधे बेत अधिक कारभार्‍यांचा ॥

मधे मुख्य अंबारि झळाळित मागे थाट अंबार्‍यांचा ।

चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्‍यांचा ॥

हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्‍यांचा ।

धुमाधार अनिवार मार भर बंबांच्या फटकार्‍यांचा ।

चा० नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥

वर्णिती भाट यश कीर्ति सकल गर्जुन ॥

चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥

चा० घरोघरी नारी झुरझरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारत ।

गुलाल गर्दा पेल दुतर्फा रंग रिचविती बहारांत ॥२॥

सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छेदात ।

हास्यवदन मन सदय सोबले शूर शिपाईवृंदात ॥

दोहो दाहो हाती भरमुठी दिल्हे चत लाल दिसे खुब बुंदात ।

तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात ॥

सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशे चवदात ।

परिधावि संवत्सरात फाल्गुन वद्य चतुर्दशी धादांत ॥

चा० बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥

रंगाचे पाट रस्त्यात वाहु लागले ॥

किती भरले गुलाले चौक ओटे बंगले ॥

चा० कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरात ।

पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारात ॥३॥

भोतगाडे रणगाडे गुलाले भरून चालती स्वारीत ।

गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारीत ॥

आपाबळवंतराव खवाशित चौरि मिजाजित वारीत ।

लाल कुसुंबि रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥

कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित ।

बल्लम बाण बोथाट्या इटे लगी वाद्यघोष डिमदारीत ।

चा० भले भले एकांडे मधे घोए घालती ।

बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥

संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥चा०॥

वत्रपाणिवारिती तरी झालि गर्दी मोठि बुधवारात ।

झुकत झुकत समुदाय सहित निट स्वारि आली रविवारात ॥४॥

आधिच पुणे गुलजार तशामधे अपूर्व वसला आदितवार ।

त्यात कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥

हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार ।

हर्ष होउन राजेंद्र झांकिती शरिरानन वारंवार ॥

पाटिल बावानी नेउन शिबीरा रंग केला जोरावार ।

वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥चा०॥

उलटली स्वारी मग महिताबा लाउनी ॥ कुरनिसा करित जन वाड्यामधे जाउनी ॥

दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥चा० महादेव गुणिराज फेकिती तान तननन दरबारात ।

प्रभाकराचे कवन पसरले सहज सहज शतावधि नगरात ॥५॥


कवी - अनंत फंदी

पोवाडा फत्तेसिंग गायकवाडाचा

पुण्यांत बाजीराय बडोद्यांत फत्तेसिंग महाराज । उदार स्वामी सेवक त्यांना कर्णाची उपमा साज ॥ध्रु०॥

इकडे अमृतराय वडील । तिकडेही आनंदराय दादा । इकडे प्रभु बाजीराय । तिकडे फत्तेसिंग साहेब जादा ।

इकडे आप्पासाहेब तिकडे महाराज सयाजी उमदा । इकडे पांच चार वाडे । तिकडेही तसाच महाल जुदा ।

इळुडे स्वामी चाकरीस पलटणें । तिकडे सेवक इंग्रज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥१॥

इकडे स्वार शिपाई । तिकडेहि तसेंच थोडे बहुत । इकडे श्रावणमासीं दक्षिणा । तिकडेही धर्म होत ।

इकडे आल्या गेल्याचा आदर करितात यथास्थित श्रीमंत । तिकडेही जो आला गुणिजन तो नाहीं गेला रिक्तहस्त ।

इकडे पेशवे । तिकडे गायकवाड उभयतां शिरताज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥२॥

इकडे भरगच्ची पांघरुणें । तिकडेही याहुन चढी । इकडे अन्नशांतीचा तडाखा तिकडेही चालू खिचडी ।

इकडे आदितवार बुधवार । तिकडेही मांडवीत घडमोडी । इकडे मुळामुळा । तिकडे विश्वामित्र जोडी जोडी ।

इकडे तलात पर्वतीचा । तिकडे सुरसागर नांव गाज । उदार स्वामी सेवक त्यांना ० ॥३॥

इकडे भूमीवर अंथरुण । तिकडे रेतीमुळें घरोघर खाटा । इकडे पैका पुष्कळ । तिकडेही सुवर्णाच्या लाटा ।

इकडे जुना वाडा । तिकडे लहरीपुर्‍याचा बोभाटा । इकडे पुरण वरण । तिकडे चुरमा क्वचित्‌ वरंटा पाटा ।

इकडे पैठणी लफ्‍फे । तिकडे उशा जवळ अमदाबाज । उदार स्वामी० ॥४॥

इकडे हत्ती घोडे पालख्या । तिकडेही कमती नाहीं । इकडे रावबाजी तिकडे फत्तेसिंगाजी दाहीदुराई । इकडे जोगेश्वरी ।

तिकडेही दैवत बेचराई । इकडे देवस्थान । तिकडेही तशीच सांगूं काई । इकडे लोक दक्षणी ।

तिकडे गुजराथी न्यारी मिजाज । उदार स्वामी सेवक त्यांना० ॥५॥

इकडे उत्साह गणपतिचा । तिकडे तशीच चंपाषष्‍टी । इकडे हरदासाच्या बिदाग्या । तिकडे तशाच भरमुष्‍टी ।

इकडे मेघडंबरी । तिकडे तशीच पहा जा दृष्‍टी । इकडे ओंकारेश्वर । तिकडे मुक्तेश्वर नवीच सृष्‍टी ।

इकडे दिग्गज पहिलमान । तिकडे जेठी कुस्ती रोज । उदार स्वामी सेवक त्याना कर्णाची उपमा साज ॥६॥

इकडे नाना फडणीस । तिकडे शिताराम दिवाण गाजी । इकडे पंत सदाशिवा । तिकडे शास्त्री गंगाधर दाजी ।

इकडे बागमळे । तिकडे हर जिन्नस शाखभाजी । इकडे माती । तिकडे रेती हारफेर जमिनी माजी ।

इकडे हौद पाण्याचे तिकडे कुव्यावर मोठी मौज । उदार स्वामी सेवक त्यांना० ॥७॥

इकडे रावबाजी पंढरीस । आषाढी यात्रेस जातात । तिकडे विसा कोसांवर डाकुरजी पंढरीनाथ ।

इकडे गंगा जवळ, तिकडेही तसेंच, रेवातीर्थ । इकडे तसेच, तिकडे घटाव दोन्ही कडला यथार्थ ।

इकडे कडेतोडेवाले तिकडेही तशीच लहज । इकडे अनंदफंदी, तिवडेही जाऊनि आला सहज ।

उदारस्वामी सेवक त्यांना कर्णाची उपमा ॥साज॥८॥


कवी - अनंत फंदी

खर्ड्याच्या लढाईवर पोवाडा

श्रीमंत सवाई नांव पावले । दिव्य तनू जणुं चित्र बाहुलें । विचित्र पुण्योदरीं समावले । नानातें राज्याचे अवले ।

विधात्यानें नेमून ठेविले । बसल्या जागा कैक छपविले । उन्मत्त झाले तेच खपविले । अति रतिकुल दोरींत ओविले ।

जगावयाचे तेच जगविले । तमाम शत्रू मग नागविले । तपसामर्थ्यें येश लपविलें । दिल्ली अग्र्‍या झेंडे रोविले ।

अटक कर्नाटकांत भोंवले, जिकडे पहावें तिकडे उगवले, माधवराय पुण्याचीं पावले, टिपूसारखे मुठींत घावले, मेणापरिस मृदु वांकविले ।

सवाई तेजापुढें झांकले । पुण्य सबळ उत्कृष्‍ट फांकले । नानापुढें बुद्धिवान चकले । कैक त्यांची तालीम शिकले ।

तरि ते अपक्व नाहीं पिकले, दहा विस वर्षें स्वराज्य हांकिले, श्रीमंताचें तक्त राखिलें , अक्कलवंत कोठेंहि न थकले ।

श्रीमंत गर्भीं असतां एकले, नानांनीं राज्य ठोकुनि हाकिले, माझे करुनि महाभाव केलें, जहाज बुद्धीबळ जवकले,

यावत्काळ पावेतों टिकले, श्रीमंत पाहून धनुवर छकले, छोटेखानी कैक दबकले, जे स्वमींचरणास लुबकले, ते तरले वरकड अंतरले,

जे मीपणांत गर्वें भरले, ते नानांनीं हातिं न धरलें, ते साहेबसेवेंत घसरले, मग त्यांचें पुण्योदय सरलें, न (?) जन्मले माते उदरीं,

घाशिराम कोतवाल त्यावर उलथून पडली ब्रम्हपुरी । सवाई माधवराव सवार भाग्योदय ज्यांचे पदरीं, यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरा ॥१॥
श्रीमंताचें पुण्य सबळ कीं, न्यून पडेना पदार्थ एकहि, महान्न झाले भिन्न मनोदय खिन्न करुनी, शत्रूचीं शकलें मध्यें एक चिन्ह उद्बवलें,

नबाब झाला सिद्ध करु म्हणे, राज्य आपण पृथ्वीचें सारे, गलीमाचे मोडूनि पसारे, वकील धाडुनिया परभारे, हळुच लाविले सारे दोरे,

म्हणे युद्ध करा धरा हत्यारें, त्यामुळें वीरश्रीच्या मारे, शहर पुण्याच्या बाहेर डेरे, गारपिरावर दिधले डेरे, श्रीमंतांना जयजयकारें,

होळकरास धाडिलें बलाउन, छोटे मोठे समग्र येऊन, वडिलपणानें जय संपदा, पाटिल गेले ते विष्णुपदा, जबर त्यांची सबसे ज्यादा,

गादीवर दवलतराव शिंदा, बहुत शिपायांचा पोशिंदा, त्याच्या नांवें करुनि सनदा, लष्करि एकहि नाहिं अजुरदा, त्याचे पदरचे जिवबादादा,

सुद्धां आणविलें, परशरामभाऊ मिरजवाले, नागपुरांकडुन आले भोसले, बाबा फडके, आप्पा बळवंत, बजाबा बापू, शिलोरकर माधवराव रास्ते,

राजे बहादर, गोविंदराव पिंगळे, विठ्‌ठलसिंग आणिक देव रंगराव वढेकर, गोडबोले, राघोपंत जयवंत पानशे, मालोजी राजे, घोरपडे,

दाजीबा पाटणकर, अष्‍ट प्रधानांतील प्रतिनिधि फाकडे मानाजी मागुन आले, चक्रदेव नारोपंत भले दाभाडे, निंबाळकर हे उभेच ठेले,

रामराव दरेकर चमकले, वकील रामाजी पाटिल सुकले, मग याशिवाय चुकले मुकले । कोण पाह्यला गेले आपले ।

तमाम पागे पतके बेरोजगारी घेउनि कुतुके । अचाट फौजा मिळूनि आले, वळून गेले । जुळून संगम झाला, तीलक्षाचा एकच ठेला,

त्यामधिं नाना ते कुलकल्ला, होणारी शंकर नानाला, बंदुखानी तोफा गरनाळा, वाद्यें रणभेरी कर्णाला, गणित नाहीं शामकर्णाला,

मरणाला नच भीती घोडे, पुढें धकाउनि नानासहवर्तमान पुण्यांत आले, राउत तमाम दुनिया आली, पाह्याला, कन्हया माधवराव फुलाचा झेला,

पेशव्यांनीं कुच केला, सवेंचि मोंगल सावध झाला, याचा त्याचा पाण्यत्वरुनी तंटा झाला, तो तंटा त्यानिंच वाढविला, श्रीमंतांनीं करुनि हल्ला,

घ्या घ्या म्हणून कैक धुडाउन, दिले लुढाउन मोगल गोगलगाय करुनिया, पृथ्वी देईना ठाय, मोकली धाय करित हायहय,

तेव्हां लेंकरा विसरली माय, प्रतापी सवाई माधवराय, मोंगल त्राहे त्राहे करितील माय, करुनि सोडविला गनिमाचा वरपाय,

कैक दरपानें खालीं पाहे, किं सर्पासंनिध उंदिर जाय, असा मृदु मोंगल केला, शरण आला मग मरण कसें चिंतावें त्याला,

उभयतापक्षीं सल्ला झाला, पुढें मग महाल मुलुख कांहीं देतो घेतो श्रीमंताला, ते आपल्याला, कोण सांगतो आतां पुढें जे उडेल

मातु तेव्हां कळेल कीं अमके महाल, अमकी धातु अमकी पांतु, नबाबावर रहस्य राखुनि रंग मारला, पुढें ठेविली अस्ता, रस्ता

धरुनि पुण्याचा थाट दुरस्ता, नबाबावर कंबरबस्ता फिरुत आले वळून एक एक नानापरिच्या वस्ता, स्वतां दाणा पाणी

वाद्यांसहवर्तमान मश्रु मुलुख कैद करुनियां, श्रीमंतानीं कारागृहीं ठेविला, येथुनि पवाडा समाप्त झाला, सब्‌ शहरीं संगमनेरी

फंदी अनंत कटिबंद छंद ललकारी, श्रीमंता दरबारी । सवाई माधवराव सवाई भाग्योदय ज्याचे पदरीं । यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरी ॥२॥


कवी - अनंत फंदी

पोवाडा - पटवर्धन सांगलीकर

वसविली सांगली । चिंतामणरायें चांगली ॥ध्रु०॥

सर्वांचा मुकुटमणी । मुख्य पटवर्धन चिंतामणि । कर्ममार्गामाजी सुलक्षणी । सर्व यजमानची मनास आणी ।

वचन जें निघेल तोंडातुनि । करावें मान्य सर्वत्रांनीं । दालतीचा खांब मुख्य स्थानी । आज्ञा त्याची कोण न मानी ।

किल्ला सांगली राजधानी । प्रज्ञा उभी जोडून द्वयपाणी । ज्याला जितुकें पाजतील पाणी । त्याला पिणें प्राप्त मुक्यानी ।

लौकिक त्याचा जगत्र वानी । शिपाई मूळचे पुण्यप्राणी । गजानन ज्याचा पक्ष धरोनि । करीत संरक्षण संतोष मानी ।

कानीं नित्य पडावें गानीं । गायन करिती महा महा गुणी । विणे पखवाज कितीक कोण गणी ।

कुशल ज्या त्या ममतेशील धनी । न लागे जेथें किंचित पाणी । तेथें प्रभु यत्किंचित खणी ।

पाणीच पाणी रानोरानीं । किल्ल्याची कीर्ति जग वाखाणी । चुंबित गगन मनोरे गगनीं । कोटांत कोट बाहेरुनि ।

सभोंता खंदक मग रेवणी । वेष्‍टिला वरुनि चिल्हारीनीं । चहुंकडे कीर्ति फाकली । वसविली सांगली ॥१॥

भक्ति गजाननाची भारी । तो मोरेश्वर देतो उभारी । चिंतामणी सर्वांला तारी । जेथें बिघडेल तेथें सवारी ।

चिंतामणीची चिंता वारी । धार्मिक अधर्मास धिःकारी । पटवर्धन जाणती संसारी । घालिती उडयाच जैशा घारी ।

फते केल्याविण माघारी । उलटोनयेची मारी मारी । म्हणावे हेंज मनांत खुमारी । ऐसे थोडे पुरुष अवतारी ।

वडिला वडिलीं नामधारी । सप्त पिढया लौकिक उद्धारी । वृत्ति धर्मा जागली । वसविली ॥२॥

खेरीज बाहेर पुरे । वसविले एकाहुन एक सरे । बंदोबस्ती गस्ती पाहरे । लोक खुखवस्ती बांधूनि घरें ।

एक राहती स्वस्थ नांदती बरे । कौल सर्वांला ताकीद फिरे । धन्याची आज्ञा नांदा कींरे । शिवालय देवालय सुंदरे ।

घाट बांधुनिया कृष्णातिरे । आंत भरचक्का चुनारचिरे । कृपा केली श्रीमोरेश्वरें । प्यसामुग्री भागली । वसविली सांगली० ॥३॥

शेंकडो चारी दुकानदार । जोहोरी बोहोरी शेटे सावकार । रुमाली रस्ते बांधून चार । बनविला बाग चांगला फार ।

आंत मांडव द्राक्षांचे गार । सुरुची झाडें मनोहर । फुलें हरजिनशी अपरंपार । पाचदवणा मरवा कचनार ।

गुलाब चमेली गुले अनार । मोतिया मोगर्‍यांचे हार । सोनचाफे मकरंद बहार । गणित करतांना वाटेल फार ।

म्हणुनि सांगितले सारासार । आंत उमराव जुने सरदार । अश्वरथ गाडया कुंजर बहार । पालख्या शिवाय घोडेस्वार ।

तलावे देती चक्राकार । दुपेटे शेले भरीजरतार । एकापरीस एक दवलतदार । भले लोक संग्रही धनदार ।

पुण्य त्या चिंतामणीचें सारें । मुख्य सवाला तोच आधार । दानधर्माला बहुत उदार । आल्या गेल्याचा आधीं सत्कार ।

कल्पनाबुद्धीचे भांडार । न लागे ज्याचा अंतनापार । पाहिले हें पक राजद्वार । विवेकी बिचार सारासार ।

कविता अनंतफंदी करी । ताल सुर नमुदा लागली । बसविली सांगली० ॥४॥


कवी - अनंत फंदी

महेश्वर शहरावर

नाहीं पाहिलें पारखें महेश्वर क्षेत्रपुर ॥धृ०॥

नर्मदा निकट तट घाट । बहुत अफाट । पायर्‍या दाट । चिरे वाट । मुक्तीचीं शिवालयें ।

कैलास साम्यता नानापरिची रचना रचिली । रामकृष्ण मंदिर । बहुत सुंदरें । बांधिलीं घरें ।

रमे रमणूक हवेल्या । नयनीं पाहिल्या । नूतन थाट । प्रताप अहिल्या । किल्यावर तळवटी ।

शहर गुलजार । बहुत बाजार हारज । दुकानें लक्षापति सावकार ।

भारी भारी माल खजीना रस्ता खस्ता सुकाळ नाहीं दुष्काळ बाल वृद्ध प्रतिपाल करीती ।

गरिब गुरिब कंगाल गांजले । अडले भिडले । त्या देखुनियां अन्नछत्र सरी सारखे ।

नाहिं पाहिलें नयानें पारखे । महेश्वर क्षेत्र पूर ॥१॥

दानधर्म करी नित्य शिवार्चन । सत्वशील ऐकुनी धांवती । देशोदेशींचे कर्नाटक । तैलंग द्रावीड ।

वर्‍हाड कर्‍हाड । कोल्हापूर, कृष्णातीर, गंगातीर । कोंकण काशीकर ।

गयावळ, माळवे बिरांगडे येती कावडे, वेडे बागडे । गुजराथी मैथुलीपुरी । भारती दिगंबर जटाधारी ।

बैरागी योगी कानफाडे दर्शना येती । हरिदासाचे प्रेमळ भक्त सांप्रदाय पुष्कळ पाहिले नयनीं । सर्व महेश्वर क्षेत्रपूर ॥२॥


कवी - अनंत फंदी

बाळासाहेब पटवर्धन मिरजकर

प्रतापी बाळासाहेब पुण्यश्लोक मुखी सर्वत्रांच्या । हेचि ऐकण्यांत आले बहुधा कानीं प्राणिमात्रांच्या ॥ध्रृ०॥

मोठया परि मोठयाशीं भाषणें लहान्याशीं बोलून बरें । जिंकून बसविले तिकून साजिरे अष्‍टपैलू चौकून चिरे ।

दयावंत बुद्धिवंत चतुर साधारण वचनाचे खरे । रयतेचे कनवाळु सभोंवती गजाननाचें चक्र फिरे ।

आल्याचा सत्कार करिती भेटी घेती सत्‍पात्राच्या ॥प्रतापी० ॥१॥

सभोंताला खंदक किल्ल्यामध्येंच उंट घोडे हत्ती । झडत असे चवघडा पदरचे भले लोग त्यांतच राहती ।

बागबगीचे नानापरीचे हवा लहान मोठे पाहती । शिवाय आणखी घाट बांधिला दक्षिणेस कृष्णा वाहती ।

लोकवस्तीची कीर्ति वाखाणती गोविंदपुत्राच्या ॥प्रतापी० ॥२॥

मुख्य दैवत समनामिर दैवत जागृत बस्तीचा वाली । तेथ उपद्रव होऊं न शके पीर मिरजेचा रखवाली ।

तशांत शूर पटवर्धन बाके कीर्ति जघन्यांत झाली । भयाभीत जो होऊनि आला त्याला पाठीशी घाली ।

तृणप्राय परशत्रु जैसा उभ्या बाहुल्या चित्राच्या ॥प्रतापी० ॥३॥

बस्ती अतिगुलजार फार बाजार भरे बृहस्पतवारी । शनवारामध्यें चौक तेथें जोहारी बोहारी ।

व्यापारी राफाचारी तमाम इमाम रस्त्याशेजारी । उदमाची घडामोड होतसे बजान पट्टेकझारी ।

अनंतफंदीचे छंद जखमा जशा जिव्हारी शस्त्राच्या
॥प्रतापी० ॥४॥


कवी - अनंत फंदी

राघोजीराव आंग्रे सरखेल

धन्य सवाई सरखेल राघोजीराव मुख्य अधिपती । कीतीक त्या तेजापुढे लोपती ॥ध्रु०॥

पूर्वी कोण्या पूर्वजाने समयी शत्रु सैन्य पळवुनी । सर्व साकल्य हुजुर कळवुना ॥

महाराजांचे प्रसन्न मन ते आपल्याकडे वळवुना । आले संकट सारे टळवुनी ।

श्रम साध्य सरखेलपणाचे अक्षय पद मिळवुनी । टाकिले दरिद्र दुर खिळवुनी ॥

चा० त्या वंशामध्ये जन्मले ॥ राघोजीराव चांगले ॥ भले मर्दुमिने शोभले ॥ चा०

जळात आणि प्रांतात ज्याला रिपु थर थर कापती । येउन अपराधी पाई लागती ॥१॥

नूतन विसा बाविसात उंबर स्वरूप शाम सुंदर । चढाइत घोड्यावर बहादर ॥

स्वता करवली करून मागे मारितात चादर ।

शूर कर जोडिता एकंदर ॥ कलगि तुरा शिरपेच झळाळित कडी कंठी नादर ।

हजारो जन करिती आदर ॥चा० गर गर भाला फिरविती ॥

राव पहिलवान हरविता ॥ गवयांचे गर्व निरविती ॥ चा० प्रवीण गाण्यामधे टाकिती साजावर थाप ती ।

सूर स्गीन विणे वाजती ॥२॥

स्वारी निघे कडकडीत भयंकर आरब किंकाळती । वारुमधे कोतल चौताळती ।

स्वार पिच्छाडिस मांड बरोबर दाटित संभाळती ।

हात हलतंच हुकूम पाळती ॥ दोहो बाजूस मोरचले मिजाजित रायावर ढाळती ।

पाहून मुखचंद स्त्रिया भाळती ॥चा० पुढे बल्ल बाण चालती ॥ भालदार मधुर बोलती ॥

खावंद मोठे मसलती ॥चा० धनि दिवाण साहेबास शंकरे दिली संतत संपती । ठेंगणी भुय आटीव आकृती ॥३॥

उदार गजराबाई सदोदित हास्यानन मावली । असले पुत्र सती प्रसवली ॥ उभय लौकिक रक्षुन जगात ध्वज लावली ।

हीच महायात्रा घरी पावली ॥ अशा कल्प वृक्षाची पडावी किंचित तरी सावली । जडो हे मन त्यांचे पावली ॥ चा०

मर्जिनरूप जे वागती ॥ झाले वर्तमान सांगती ॥ नंतर निरोप मागती ॥चा०

जलदी किती कामाची हुशारित चक्रापरि तळपती । जेव्हा तेव्हा हत्यार चमके हाती ॥४॥

ताईसाहेब भाग्याची पुत्र आणि पौत्रादिक साजती । श्रीमंतिणी स्त्रियात सुविराजती ॥ अनेक राजद्वारी अखंडित जय वाद्ये वाजती ।

विप्र मंगल घोष गर्जती ॥ राज्य असुन तर लहान मुल्खो मुलुखी कीर्त गाजती । नाव ऐकुन धनाढ्य लाजती । चा०

किती छत्रामधे जेवती ॥ किती घरीच अन्न सेविती ॥ किती कामावर ठेविती ॥ चा०

किती कारकुन लिहिणार किती कर जोडितात दंपती । दया येई मग मातुश्री प्रती ॥५॥

नित्य दान काही पुराण समई गान होतसे । सदा सत्काळ यात जातसे ॥ काय कोठे कमी जास्त सती ते सर्व स्वता पहातसे ।

खबर पर राज्यातिल येतसे ॥ चा० नाही राज्यामधे तस्कर ॥ हे जनास श्रेयस्कर ॥ भोगिती सुख सोयस्कर ॥ चा०

घरोघर गाती गीत जास्त नाही रयतेवर बाबती । शिरस्ते कदीम तेच चालती ॥६॥

सदैव मुक्तद्वार कुलाबा गरिबांचे माहेर । जसे तप साधनास बेहर ॥ श्रीमंत गेल्या पसुन मिळेना अन्न कोठे बाहेर ।

म्हणुन झड घालितात लाहेर ॥ वस्त्र पात्र येई शिधा हेच ह्या सरखेलांचे हेर । उचीच नव्हे शब्दांचा आहेर ॥ चा०

पहा पहा राजांचे मुख ॥ उभे रहा क्षणभर सन्मुख ॥ होइल दरिद्र विन्मुख ॥ चा०

प्रपंच कल्याणार्थ कराया प्रभूस विज्ञापती । सौख्य पावाल सर्व निश्चिती ॥७॥

मंत्री विनायक परशराम ते बुद्धिचे सागर । सर्व गुणी विद्येचे आगर । भुजंग राजे भुलती सुवासिक दिवाण मैलागर ।

राजकारणी एक नट नागर ॥ येती किती दर्शनास ब्राह्मण आणि सौदागर । रात्री हरहमेश होई जागर ॥ चा०

मुळी पुण्यवान ते धनी ॥ कारभारी तसे साधनी ॥ गंगु हैबती कवी शोधनी ॥ चा०

महादेव गुणी म्हणे प्रभाकर क्षेम असो भूपती । न्यहाल कधी करतिल सहजोगती ॥८॥


कवी - अनंत फंदी

नाना शंकर शेट

दैववान नाना शंकर शेट विजाति । केली केवढी उभय वंशात उभयता ख्याती ॥ध्रु०॥

ना कळे कोणाला विचित्र हरिची माया । क्षणमात्रे दीनावर लावील छत्र धराया ॥ बाबुल शेटिवर पडली कृपेची छाया ।

ते पुण्यवान ती धन्य पवित्र जाया ॥ शंकर शेट आले पोती किर्त कराया । झाली प्राप्त अचल लक्ष्मी आरोग्य काया ॥चाल॥

वाढली मान-मान्यता जगामध्ये मोठी ॥ पाहिल्या पडे श्रम केवळ धनाची कोटी ॥

नावडे गोष्ट कल्पांती कोणाची ओती ॥चाल॥

कडकडीत कठीण मर्जी । जसा फर्जी निर्भय गर्जुन बोले ॥ संतत संपत अनुकुळ । नाही प्रतिकुल । या भरपणांत डोले ॥

बाच्छाय आपल्या घरचे । लाल हरीचे । त्या योग्य तसे तोले ॥चाल॥

बहु बळे संपदा मिळवली ॥ मुळापासून औदसा पळवली ॥ विष्णु सहित लक्ष्मी वळवली ॥चाल॥

अहा रे ! शंकर शेट धनाज ॥ भाग्यवान भोळे महाराज ॥ कुटुंबसंरक्षणाचे जहाज ॥

डामडौल नाही काही मिजाज ॥ दीन दुबळ्याचे गरीब नवाज ॥ शरण आल्याची राखुन लाज ॥ आगोदर त्याचे करावे काज ॥

मोठ्या मोठ्याचा जिरवुन माज ॥ हरीस आणिले शेट बजाज ॥ पैलापूर मुंबईत आज ॥चाल॥

जेव्हा टिपूवर इंग्रज गेले ॥ तेव्हा शेट सवे नव्हत नेले ॥ परंतु भर्णै येथुन केले ॥ समय रक्षिले ज्यांनी अशेले ॥चाल॥

म्हणून साहेब बहुत चाहाती ॥ करून गौरव धरावे हाती ॥ काढुन टोपी उभे की राहती ॥चाल॥

देशावर चालता हुंड्या ॥ इतर गाई तर गरीब भुंड्या ॥ अपराधावर धरून पुंड्या ॥ घरी चढवाव्या ॥चाल॥

भलत्याचे पडेना तेज फिटेना भ्रांती । यासाठी लोक भरदिसास हिसके खाती ॥१॥


कवी - अनंत फंदी

लंडे गुंडे हिरसे तट्टु

लंडे गुंडे हिरसे तट्टु ह्यांचीं संगत धरु नको । नरदेहासी येऊन प्राण्या दुष्‍ट वासना धरुं नको ॥ध्रु० ॥

भंगी चंगी बटकी सठकी ह्यांच्या मेळ्यांत बसुं नको । बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मागी सोडुं नको ॥

संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको । चल सालसपण धरुनि निखालस बोला खोटया बोलुं नको ॥

पर धन पर नार पाहुनि चित्त भ्रमुं हें देऊं नको । अंगीं नम्रता सदां असावी राग कुणावर धरुं नको ॥

नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊं नको । भली भलाई कर कांहीं पण अधर्म मार्गीं शिरुं नको ॥चाल॥

मायबापावर रुसूं नको । दूर एकला बसूं नको । व्यवहारामधिं फसूं नको ॥चा० प० ॥

परी उलाढाली भलभलत्या पोटासाठीं करुं नको ॥ लंडे गुंडे० ॥१॥

बर्म काढुनि शरमायाला उणें कुणाला बोलुं नको । बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनिया हेवा झटुं नको ।

मी मोठा शाहाणा धनाढयही गर्व भार हा वाहुं नको । एकाहुन एक चढी जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ॥

हिमायतीच्या बळें गरिबागुरिबाला तूं गुरकावुं नको । दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेऊं नको ।

बहुत कर्जबाजारी होऊनि बोज आपला दवडुं नको । स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होऊं नको ॥चाल॥

विडा पैजेचा उचलुं नको । उणी तराजू तोलुं नको ॥ गहाण कुणाचें डूलवुं नको ॥ असल्यावर भीक मागूं नको ॥ चा० प० ॥

नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरुं नको ॥ लंडे गुंडे० ॥२॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठीं करुं नको ॥ बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको ॥

कष्‍टाची बरी भाजि भाकरी तूप साखरेची चोरि नको ॥ आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहूं नको ॥

दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको ॥


कवी - अनंत फंदी

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥ध्रु०॥

ब्राम्‍हणाशीं बिगारी धरतात । अविचार मनस्वी करतात । अशा आधारें कसे तरतात । मुलेंमाणसें घेऊन मरतात ।

वाणी बकाल घाबरतात । लोक गाईसारखे हुंबरतात । पंढरीनाथ स्मरतात । महार पोरगे घरांत शिरतात ।

घरधनीच होऊन बसतात । वस्तभाव अवधी भरतात । माल बापाचा बांधिती मोटारे मोटा । सत्कर्माचा । सम० ॥१॥

धामधूम चहुंकडे गर्दी । पठाण कंपु आरब गार्दी । ज्याला न मिळे भाकर अर्धी ।

त्याला बसाया घोडे जर्दी । लागून वारा नका घेऊं होईल सदीं ।

त्याची बडेजाव आठचारदी । दिवाण दरबारांत गर्दी । दिवस लागू नये फारदी । जेव्हां तिजवर व्हावी गर्दीं ।

तशामधीं होते वरदी । ते पार पडले मरदा मरदी । आवताराच्या दैवी उपद्रव मोठारे मोठा ।

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥२॥

जो येतो तो हातीं भाला । म्हणे आपणाला जेऊं घाला । कोणी कोणाचा गुरु ना चेला । भलताच धमकावी भलत्याला ।

चोरदंड तो कोतवालाला । जसा रावणाचा साला तो हलकाला एकची झाला । पतिव्रता मुकली प्राथाला । शिंदळ चढली लौकिकाला ।

सांगत फिरती ज्याला त्याला । एक जातबाई टोपीवाला । मी नाहीं दमलें पंचविसाला ।

फंदी अनंताची कविता सवाई सोटारे सोटा । सत्कर्माचा तोटा ॥ समय० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

शोध करीरे मना हरि भजनाविण अवघें वृथा ॥धृ० ॥

हरीभजनीं ठरला । तो यमाजीकडे न घरला । भवसिंधु त्यालाच वसरला । विठाईचीच मिठाई चाला ।

ह्रदयांतरी हरी संचरला । त्याच्या मग तो सेवेंचि तरला । यमदुतापासून विसरला । जो पंढरिनाथापायिं न विसरला ।

उत्तम जन्म जरा न घसरला । यमाजीचजा प्रयत्‍न हरला । ज्यांनीं विष्णु ह्रदयीं धरिला ।

तो नभीई अजका सर्वथा । शोध करीरे मना हरि भजानाविण अवघें वृथा ॥शो० ॥१॥

शाश्वत नाहीं करुं आजकाल । हरिभजनाविरहित जें शिकाल । तें कामी सर्वस्वें टिकाल । मोक्षाधिकारी व्हालच मुकाल ।

जितके हरीभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । ते समयीं मग अवघे थकाल । बळकट काढील यमाजी खाल ।

मग त्यापुढें तुम्ही काय बकाल । हरीच्या भजनीं मन हें विकाल । अनंत जन्म सुजन्य पिकाल । यापरता कैचा निकाल ।

तुम्ही जाणा गबाजी हाकाल । सांगितलें नाहीं मग चकाल । मग यमाजी बुकाल । कुंदी करील तेव्हां कसें टिकाल ।

केलें पातक तितकें वकाल । नामामृत घ्या धनवल छकाल । द्या सोडून या भाकडकथा ॥ शोध० ॥२॥

नामस्मरणीं होई चाटुकार । कर भगवज्जनाचा देकार । या कामास न व्हावें चुकार । परंतु सत्य याचा स्विकार ।

दुर होतील हे नाम विकाल । या गोष्‍टीचा नसावा नकार । कांहीं नलगे चकारपकार । फुकटामध्यें नामामृत स्विकार ।

सांपडल्यास न कीजे धिःकार । हातीं आला येवढा अधिकार । हरिहरी फोडित जा तूं वर । भगवान करील अंगीकार ।

सांगितलें तर याचा अंतर । नाहीं तरी माझे जाईल यकार । सत्कर्माची हुंडी स्विकार ।

फंदी अनंत करि हे प्रकार । तुज अर्पण दुर करि भवव्यथा ॥ शोध० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

नरदेहामधिं येऊन नर हो साधन ऐसें करा जेणें भवसगर तरुनि सुखें व्हावें पैलतिरा ॥ध्रु०॥

संतारार्णवीं भिजा गडयांनो संसारार्णवीं भिजा । परंतु परमार्थ साधनातें साधा यांतच मजा ।

परनारीधन त्यजा गडयांनो परनारी० ।

मदमत्सर मीपणा सहित द्या तमोगुणाला रजा । भाव न ठेवुनि दुजा । गडयांनो० ॥

अकपट होऊनि थोर लहाना समदृष्‍टीनें पूजा । अन्यायपथें न जा ॥ गडयांनो० ॥

सदसद्विचार करुनी लोकीं सत्कीर्तींनें सजा । कोणा नच द्या इजा ॥ गडयांनो० ॥

परि आश्रय दुःखितांस द्याया तन मन धनें झिजा । संकटसमयीं धजा ॥ गडयांनो० ॥

सत्यवचन राखण्यास न ढळा कथितो ह्या हितगुजा । व्हा सावध नचि निजा ॥ गडयांनो० ॥

पळ घटका प्रहर दिवस, यांहीं होतें आयुष्य होतें वजा । जगदिशाला भजा ॥ गडयांनो० ॥

अनंतफंदी म्हणे तोचि मग तारिल देऊनी करा ॥१॥नरदेहामधि० ॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

येउंदे वाचें नाम देवाचें अष्टौ प्रहरा शिव हर हर हर ॥धृ०॥

दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ॥ हरिनामाची लावी ध्वजा ॥

असार हा संसार त्यजा ॥ तमोगुणाला देच रजा ॥ रजसत्वाची करी पुजा ॥

क्षमा शांति मनिं धरीत जा । भगवीं वस्त्रें करी पोटभर भिक्षा मागें घर घर घर ॥येउंदे० ॥१॥

परोपकारा शरीर झिजवावें जैसा मैलागिरी चंदन ॥ कर सज्जन चरणीं वंदन ॥

सा शत्रूंचें करि कंदन ॥ गृहवैभव वाजी स्यंदन ॥ अशाश्वती ह्या हो धुंदन ॥

आठवी मनीं दशरथनंदन ॥ अनंतफंदी ह्मणे घालीं विठ्‌ठला गरके गर गर गर ॥ येउंदे० ॥२॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

देसोडुन तरी फंद वाऊगे-विषयाची तरी काय मजा । हरिनामाची लाव ध्वजा ।

पंढरीस कार्तिकी आषाढी दुवक्ता-येत जातजा । असार हा संसार त्यजा ।

तमोगुणाते द्यावी रजा । रजसत्वाची करी पुजा । क्षमाशांती मनीं धरीतजा ।

भगवीं वस्त्रें करुनि पोटभर भिक्षा मागे घर घर घर । येऊंदे वाचे अष्‍टौप्रहर कीं हर हर हर ॥१॥

वाहते गंगेंत हात धु आलबेली भली भलाई कर मग मर । ईश्वर भजनीं निमग्न राहावे विषयांतरीं वासना नको ।

नामामृत महामुर पिको । सहाणेवर मैलागिरी चंदन देह झिजो यमयातना चुको न चुको । भवपाशाशी मुको न मुको ।

सांगितले हे शिको न शिको । भजनाकडे झुको न झुको । धन ज्याला मृत्तिका तोची साधु, यम कापे थर थर थर ॥२॥

सोदे शिकविती चढी लावितील त्यांच्या नादी न लागावें । ईश्वरभजनीं जागावें ।

कामक्रोध मद मत्सर मोहो लाभ या साजणांशीं सांगावें कीं तुम्ही मार्गीं वागावें ।

असार तितके नागावे । सार असेल तें घ्यावें । जाणे मोक्षपदाशीं झर झर झर ॥३॥

भाव धरुनि मनीं हरीहर । म्हणशील तरी चुकेल चौर्‍यांशीचें चकर । ईश्वरपाई हा नीटकर ।

नरदेह धुतला पवित्र शेला उडून जाईल जसा सकर । दुसरा धंदा काहीं नकर । धर बळकट देवाचें शिखर ।

त्यामध्यें राहील तुझा वकर । अनंतफंदी म्हणे घाल विठ्‌ठलाशी घिरटया गर गर गर ॥४॥


कवी - अनंत फंदी

संध्येंतील चोवीस नामांवर

अनंत भगवंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥धृ०॥

केशवकरणी अघटित लीला नारायण तो कसा । जयाचा सकल जनावर ठसा ।

माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाचे रसा । पीत जा देह होइल थंडसा ।

विष्णु स्मरतां विकल्प जाती मधुसुदनानें कसा । काढिला मंथन समयीं जसा ।

वेष घरुनि कापटय मोहिनी भाग करि निमेनिम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगबंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥१॥


त्रिविक्रमान त्रिताप हरिले भक्तीचे सर्वही । वामनें दान घेतली मही ।

श्रीधरसत्ता असंख्य हरिती दुष्‍टांचे गर्वही । वंदिल्या ह्रुषिकेशाच्या रही ।

पद्मनाभ धरियेले तेथुनि देव झाले ब्रम्हही । दामोदरें चोरिलें दहीं ।

गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्‍ठादि गौतम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंतांची नामें ॥२॥

संकर्षण स्मरतांना षड्रिपु नाशातें पावती । स्मरारे वासुदेवाप्रती ।

प्रद्युम्नाचा करितां धावा गजेंद्र मोक्षागती अनिरुद्ध न वर्णवे स्तुती ।

क्षीरसारगरिंचें निधान पुरुषोत्तम हा लक्ष्मीपती । स्मरारे अधोक्षजातें प्रती ।

अपार पापें स्मरतां जाती वाचे पुरुषोत्तम । गाइल्या उद्धरती अधम । अनंत भगवंताचीं ० ॥३॥

प्रल्हादाचे साठीं नरहरि स्तंभी जो प्रगटला । अच्युतें कालनाथ मर्दिंला ।

जनार्दनाची अघटित लीला कीर्तनीं ऐकूं चला । उपेंद्रा शरण जाई तो भला ।

हरिहर स्मरता त्रिबार वाचादोष सर्व हरियला । गोकुळीं कृष्णनाथ देखिला ।

रामलक्ष्मण म्हणे तयाच्या नामें गेला भवभ्रम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंताचीं नामें त्यांतुनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥अ० ॥४॥


कवी - अनंत फंदी