खूळ

जिवलग राणी दुज्या भाळुनी पळे कुठे चंचळ,

मान टाकुनी म्हणुनि पडलों गाळित अश्रूजळ.

कुणी बालिका अजाण येउनि म्हणे 'प्रीति हें खुळ,

सुसकार्‍यांचे तुफान करुनी कां होता व्याकुळ ?'

खोल घोगर्‍या सुरांत वदलों हंसरा रडवा जरा,

'पांडित्याचे बोल तुझे परि झोंबति माझ्या उरा'

तरी कैकदा जवळ येउनी रमवी नानापरी,

म्हणे ' किती दिन तिच्या खंतिच्या जळवा धरणें उरी ?

अकस्मात हे शब्द ऐकुनी टकमक तिज पाहिलें,

गाळित आसू वदलि,'नाहि कां मज अजुनी जाणिलें ?"

जवळ जाउनी वदलो तिजला 'प्रीति असे ना खुळ ?

मनराणीविण खुळा जाहलो-तुम्हि कां हो व्याकुळ ? "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ८ मार्च १९२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा