लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे



कुणि नाही ग कुणी नाहीं
आम्हांला पाहत बाई ।
झोंपे मंडळि चोंहिकडे ,
या ग आतां पुढे पुढें
थबकत, थबकत
'हुं' 'चूं' न करित,
चोरुं गडे, थोडे कांही
कोणीही पहात नाही ।



या वरच्या माळ्यावरतीं
धान्याची भरलीं पोतीं,
जाउं तिथें निर्भय चित्तीं
मारूं पसे वरच्यावरती.
उडवुनि जर इकडे तिकडे
दाणे गोटे द्याल गडे
किंवा चोरुनि घेतांना
वाजवाल जर भांड्यांना,
जागी होउन
मग यजमानिण
फसेल सगळा बेत बरें ।
चळूं नका देऊं नजरे



एखादी अपुल्यामधुनी
या धंद्यांत नवी म्हणुनी
लज्जामूढा भीरुच ती
शंसित जर झाली चित्तीं
तर समजावुनि
अथवा भिववुनि
धीट तिला बनवा बाई,
करुं नका उगिचच घाई.



आशा ज्या वस्तुचि चित्तीं
तीच हळुच उचला वरती.
डब्यांत जर थोडे असलें
घेउं नका बाई , सगळे,
मिळे म्हणोनी
उगाच लुटुनी
यजमानिण जरि ती बाला,
करूं नका शंकित तिजला.



जपून असले खेळ करूं
ओटिंत जिन्नस खूप भरू.
लागतां न कोणा वास
'हाय' म्हणुनि सोडूं श्वास
प्रभातकाळी
नामनिराळीं
होउनियां आपण राहूं
लोकांच्या मौजा पाहुं ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा