कवने

जुनी पटकुरें अङ्गीं धरुनी

पाउसचिखलीं वणवण खपुनी,

शेतकरी तो फुलवी अवनी'

परी उपाशी बाळें त्याची ।

धान्य खाउनी तेंच पोटभर.

सुखे त्यावरी देउन ढेंकर,

पुष्ट प्रियेचा करि धरुनी कर,

गात असूं किती गोंड्स कर हा ।

यंत्रशक्तिची प्रचंड घरघर,

दमही न घेता मजूर क्षणभर,

वस्त्र विणितसे त्यावर झरझर

रक्ताळ्ति मग डोळे त्याचे

वस्त्र जरा तें जाड म्हणोनी

रुसुनि प्रिया तें देई फेकुनि

क्रुध्द तिच्या ये लाली नयनी

त्यावर आम्ही गाऊं कवने

शंभरातील नव्वद जनता

धुरकटलेल्या कोंदट जगता

'घरे' म्हणोनी त्यांतच कुजतां

औषधास त्या चंद्र ना दिसे ।

आकाशातील तारासंगे

विलासी शशी प्रेमे रंगे,

कृष्ण्मेघ तो येउनि भंगे-

-प्रणय तयाचा, रडतों आम्ही ।

अपुरी भाकर चट्ट खाउनी

रडति आणखी हवी म्हणोनी

कामकर्‍यांच्या मुलांस जननी,

अश्रु दाबुनी नाही म्हणते.

मुर्ख कुणी तरि जोबनवाली,

खुशालचेंडुस ' नाही ' वदली

हृदयिं तयाच्या आग पेटली,

त्यावर शिंपू काव्यजलाला ।

नक्षत्रांची , फुलाफळांची ,

कृष्णसख्याच्या व्याभिचारांची

आणिक झुरत्या युवयुवतींची

खूप जाहलीं हीं रडगाणीं

धनीजनांशीं झुंज खेळुनी

क्षणभर ज्यांना आली ग्लानी

त्यांना आम्ही गाऊं गाणी

ऐकुनि जीं चवताळुनि लढतिल

आणि स्थापितिल सत्ता अपुली


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० ऑक्टोबर १९३१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा