दोन देवभक्त

होतीं चार धुरांडि ओकत ढगें काळ्या धुरांचीं जिथें,

संपाग्नी भडकून ना चिलिमही सोडी धुरांतें तिथें!

तेंव्हां मालकही मनीं गिरणीचा झाला बहू रंजित;

सारें एकावटून चित्त मग तो देवा बसे प्रार्थित.

"केली दोन कलक रोज बसुनी पूजा तुझी भक्तिनें

वस्त्रें घालुनि मख्मली, किति तुला मीं घातले दागिनें !

होतां वृध्द मदीय राख तिजला देतों जरी टाकुनी,

नाही का तव मंदिरें दिधलिं मीं नांवें तिच्या बांधुनी ?

होत्या चार स्वयंगती परि अतां मीं ठेविल्या दोन ना !

माझे हाल कसे तुझ्या बघवती देवा, खुल्या लोचना ?

आतां कांहिं तरी असें कर जयें मालास या भाव ये

टक्के आठ करुनि काट मजुरी, बांधीन रुग्णालयें."

होता त्याच क्षणीं कुणीं मजुरही देवाकडे पाहत

डोळे लाल करुनि, मूठ वळुनी मूर्तीस त्या साङत.

"तेथें त्या बघ गोघडींत पडलें अन्नाविणें कुंथत,

माझे बाळ तयास ना मिळतसे रे, खावयाला शित !

वाहोनीं तुजला फुलें फुकटचा पैसा हरुं गांठचा;

गाडया दोन मजेंत तो उडवितो आहे धनी आमुचा !

आकाशांतिल पोलिसा ! छळिसि कां दीनांस आम्हां बरें

देतो टाकुनि मूर्ति ही गिरणिच्या काळ्या धुरांडयांत रे !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ जुलै १९३२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा