दैविकता

सारी रात्र सरुन मंद गगनी तारा फिक्या जाहल्या;

माझी गोष्ट अजून मात्र नव्हती सांगूनिया संपली.

एकामागुनि एक आठवुनियां लीला तिच्या प्रेमाला,

जीवाच्या सुह्रुदास सर्व कथिलीं दुःखें मनींचीं मुकीं;

"आतां सांग गडया, खरी मजवरी आहे तिची प्रीत ना ?"

तो बोले, "भलताच संशय असा कां घेसि वेडयापरी ?"

तेव्हां टाकुनि श्र्वास एक वदलों नैराश्यपूर्ण खरें,

"वर्षें दोन उणीं पुरीं उलटलीं नाहीं तिची दादही !"

झाली सांज तशी उदासह्रुदयें होतों कूठेंसा उभा ;

तों मागून कुणी हळू 'तुम्हिच कां!' ऐसें वदे मंजुळ.

सारा दाटुनि जीव लोचनिं बघे-तो तीच मागें उभी !

सोन्याचा क्षण तो कसा कुणिकडे ठेवूं असें जाहलें !

दैवाची दिलदारि ही बघुनियां बेहोष झालों मनीं;

'वेडया, होइल ती तुझीच' असला उल्हास ये दाटुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ८ मे १९२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा