कागदी फुलें

किति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;

अर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.

परि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,

ह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;

"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं ?

अमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी."

दोलयमानमति असल्या संशयतमीं

होऊन राहिलों अमर्याद काल मी.

कागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,

अर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी !

काळजास डसले सहस्त्र विंचू मम,

जगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.

दुखवितां नाग उभवितो फणा आपुली,

उसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,

"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,

जाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २० नोव्हेंबर १९३५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा