नवरसमंजरी - वीररस

होता तो मृगराज जोवरि वनी सिंहासनाधिष्टित,
कोल्हे तोवरि हे विळांत दडुनी होते भये कापत !
त्याचा देह विराट आज पडता निष्प्राण भूमीवरी,
आली धावत टोळधाड जिभल्या चाटीत ही त्यावरी !

तन्नेत्रा उघडूनि कोणी म्हणती, 'या गारगोट्या पहा ।'
दाढीचे उपटूनि केस वदती, 'संजाब खोटाच हा!'
बोटेही जबड्यांतुनी फिरविती निःशंक आता कुणी,
कोणी खेचुन शेपटी फरफरा नेई तया ओढुनी !

कोणी ठेवुनि पाय निर्भयपणे छातीवरी नाचती,
'आता सोडविण्यास कोण धजतो याला बघू!' बोलती;
जो तो सिंहच आपणा म्हणवुनी आता करी गर्जना,
मारि हात मिशांवरी फिरवुनी वीरश्रिच्या वल्गना!

दारोदार बघून वीर असले संतोष होतो जरी,
नाही भेकड मात्र कोणि उरला हे शल्य डांचे उरी !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा