अढळ सौंदर्य

तोच उदयाला येत असे सूर्य.
अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय ?

तेच त्याचे कर न का कुकुमानें
वदन पूर्वेचें भरिती सभ्रमानें ?

तेच तरु हे तेंशाच पुष्पभारें
लवुनि गेले दिसतात पहा सारे !

त्याच वल्ली तेंसेंच पुष्पहास्य
हंसुनि आजहि वेधिती या मनास !

कालचे जें कीं तेच आज पक्षी
कालच्या हो ज्या त्याच आज वृक्षों

बसुनि गाती कालचीं तींच गानें,--
गमे प्रातःप्रर्थना करिति तेणें !

काल जो का आनन्द मला झाला
तोच आजहि होतसे मन्मनाला;

कालचा जो मी तोच हा असें का ?
अशी सहजच उदूभवे मनीं शंका.

अशी सहजच उद्‍भवे मनीं शंका
काय समजुनि समजलें तुम्ह ला का ?

असे अनुभव कीं-रिझवि एकदां जें
पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें.

पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें
कसें मग हें वेधिलें चित्त माजें --

आज फिरुनो या सूर्य-तरु-खगांनीं
आपुलीया नवकान्ति-पुष्ण-गानीं ?

म्हणुनि कथितों निःशंक मी तुम्हांतें,--
असे सुन्दरता अढळ जरी कोठें

तर करी ती सृष्टींत मात्र वास --
पहा मोहिल सर्वदा ती तुम्हांस.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी 
- १८८६

गांवीं गेलेल्या मित्राचि खोली लागलेली पाहून --

( जलधरमाला वृत्ताच्या चालीवर )

येथें होता राहत माझा स्नेही,
स्नेह्यांसाठीं जो या लोकीं राही,
पाशांला जो तोडायाला पाही
स्वदेशपाशीं अपणा बांधुनि घेई.

पाशांविण या कोठें कांहीं नाही,
पाशांकरितां चाले अवघें कांहीं; --
पाशांतुनि या सुटतां सुंदर तारे,
तेज तयांचें विझूनि जाई सारें.

चन्द्रानें या सदैव पृथ्वीपाशीं
राहुनीच कां सेवावें सूर्याशीं ?
शक्त जरी का असेल तो, तरि त्यानें
सेवावा रवि खुशाल निजतंत्रानें

सोडी पत्नीपाशाची तो आस,
स्वदेशसेवेकरितां घाली कास,
तो मत्सख निज गांवीं गेला आहे,
खोलीला या कुलुप लटकुनि राहे.

येथें गोष्टी आम्ही करीत होतों,
होतों, विद्याभ्यासहि करीत होतों,
मित्रत्वाचें बीज पेरुणी खासें
मैत्रीवल्ली वाढविली सहवासें.

देशाविषयीं गोष्टी बोलत येथें
बसलों, विसरुनि कितीकदां निद्रेतें ;
श्वासीं अमुचे श्वास मिळाले तेव्हां.
अश्रूंमध्यें अश्रु गळाले तेव्हां.

ऐसें असतां पहांट भूपाळयांला
पक्षिमुखांहीं लागियली गायाला,
हवा चालली मंद मंद ती गार,
प्रभाप्रभावें वितळे तो अंधार;

तेव्हां आम्ही म्हटलें---’ ही र्‍हासाची
रजनी केव्हां जाइल विरूनि साची ?
स्वतंत्रतेची पहांट तो येईल,
उत्कर्षाचा दिन केव्हां सुचवील ?---

” या डोळयांनीं पहांट ती बघण्याचें
असेल का हो नशिबीं दुदैव्यांचे ?
किंवा तीतें आणायाचे कांहीं
यत्न आमुच्या होतिल काय करांहीं ?”

असो. यापरी आम्ही प्रश्न अनंत
केले, होउनि कष्टी, परस्परांत;
” इच्छा धरितां मार्ग मिळे अपणांला ”
या वचनें मग धीर दिला चित्ताला.

कोठें असशिल आतां मित्रा माझे ?--
करीत असशिल काय काय तीं काजें ?--
देशासाठीं शरीर झिजवायाला
स्फूतीं आणित असशिल का कोणाला ?

तुझी बघुनि ही मित्रा खोली बंद,
विरहाग्नीनें भाजें चेतःकंद,
पुनरपि आपण येथें भेटूं, ऐशी
आशा होई जलधारा मग त्यासी.

( शार्दूलविक्रीडित )

झाल्यानंतर अस्त तो, कमल तें पाहूनियां लागलें,
” उद्यां मित्र करील तो निजकरें येऊनि याला खुलें,”

ऐसें बोलुनि ज्यापरी भ्रमर तो जातो श्रमानें दुरी,
जातों बोलुनि या स्थलासहि तसें, मित्रा ! अतां मी घरीं.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मे १८८७

एक खेडें

सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरें कोंकणामधीं एक;
नदी त्यामधुनी एक वाहताहे,
एक खेडें तीवरी वसुनि राहे.

वदनि सुन्दर मन्दिरें न त्या ठायीं,
परी साधीं झोंपडीं तिथें पाहीं;
मन्दिरांतुनि नांदते रोगराई,
झोंपडयांतुनि रोग तो कुठुनि राही ?

रोग आहे हा बडा कीं मिजासी,
त्यास गिर्द्यांवरि हवें पडायासी;
झोंडयांतिल घोंगडयांवरी त्यास,
पडुनि असणें कोठलें सोसण्यास ?

उंच नाहिंत देवळें मुळीं तेथें,
परी डोंगर आहेंत मोठमोठे;
देवळीं त्या देवास बळें आणा,
परी राही तो सृष्टिमधें राणा,

उंच डोंगर ते, उंच कडे भारी,
पडे धो ! धी ! ज्यांचियावरुनि वारी,
भोंवतालें रान तें दाट आहे;
अशा ठायीं देव तो स्वयें राहे !

स्त्रोत्र ओढे थांबल्यावीण गाती,
सूर वारे आपुला नित्य देती,
अशा भक्तीच्या स्थळीं देव राहे !

अशी नैसर्गिक भव्यता उदास
तया खेडयाच्या असे आसपास ;
तसा खेडयाचा थाट तोहि साधा
भव्यतेला त्या करितसे न बाधा.

सरळ साधेंपण असे निसर्गाचें
मूल आवडतें; केंवि तें तयाचें
भव्यतेला आणील बरें बाधा ?
निसर्गाचा थाटही असे साधा.

लहान्या त्या गांवांत झोंपडयांत
भले कुणबी लोक ते राहतात;
खपोनीयां ते तदा सुखें शेतीं,
सरळ अपुला संसार चालवीती,

अहा ! अज्ञात स्थळीं अशा, मातें,
एक गवतारू खोप रहायातें,
शेतवाडी एक ती खपायाला,
लाधती, तर किति सौख्य मन्मनाला !

तरी नसतों मी दरिद्री धनानें,
तरी नसतों मी क्षुद्र शिक्षणानें,
तरी होतीं तीं स्वर्गसुखें थोडीं,
तरी नसती कीर्तिची मला चाडी !

कीर्ति म्हणजे काय हो ?-- एक शिंगः
प्रिय प्राणांहीं आपुलिया फुंक,
रखाडीला जा मिळूनियां वेगें ;
शिंगनादहि जाईल मरुनि मागें !

कीर्ति म्हणजे काय रें ?-- एक पीसः
शिरीं लोकांच्या त्यास चढायास,
छरे पडती पक्ष्यास खावयास;
मागुनी तें गळणार हेंनि खास !

पुढें माझें चालेल कसें, ऐशी
तेथ चिन्ता त्रासिती न चित्तासी;
नीच लोकांला मला नमायास
वेळ पडती थोडीच त्या स्थळास !

शेत नांगरणें पेरणें सुखानें ,
फूलझाडें वाडींत शोभवीणें;
गुरे ढोरें मी बाळगुनी कांहीं,
दूधदुभतें ठेवितों घरीं पाहीं.

कधीं येता पाहूणा जर घराला,
तुझें घर हें, वदतोंच मी तयाला;
गोष्टि त्याच्या दूरच्या ऐकुनीयां,
थक्क होतों मी मनीं तया ठाया --

” असें जग तें एवढें का अफाट !
त्यांत इतुका का असे थाटमाट ! ”
असें वदतों मी त्याज विस्मयेंसी,
स्वस्थिती तरी तुळितों न मी जगाशीं.

स्वर्गलोकीं सम्पत्ति फार आहे,
इथें तीचा कोटयंश तोहि नोहे;
म्हणुनि दःखानें म्हणत ’ हाय ! हाय ’
भ्रमण अपुलें टाकिते धरा काय ?

तरी, स्वपया जातात सोडूनीयां,
कुणी तारे तेजस्वी फार व्हाया;
तधीं तेजाचा लोळ दिसे साचा,
परी अग्नी तो त्यांचिया चितेचा !

वीरविजयांच्या दिव्या वर्तमानी
कृष्ण कदनें पाहतों न त्या स्थानीं;
भास्कराच्या तेजाळपणीं मातें
डाग काळे दिसते न मुळीं तेथें !

सूर्यचन्द्रादिक दूर इथुनि तारे,
तसें जग हें मानितो अलग सारें;
जसे सेच्छूं त्यावरी चढायास,
इच्छितों नच या जगीं यावयास !

तेथ गरजा माझिया लहान्या त्या
सहजगत्या भागुनी सदा जात्या;
म्हणुनि माझें जग असें तेंचि खोरें
सुखि मजला राखितें चिर अहा रे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- १८८७

भृंग

( मणिबंध वृत्ताच्या चालीवर )

भृंगा ! दंग अहा ! होसी,
गुंगत धांत वनीं घेसी;
तुजमागुनि वाटे यावें;
गोड फुलें चुम्बित गावें !

रवि येत असे उदयातें,
अरुणतेज विलसत दिसतें;
तरी तिमिर हें विरल असे,
धुकें भरुनि न स्पष्ट दिसे !

कविच्या ह्रदयीं उज्वलता
आणिक मिळती अंधुकता;
तीच स्थिति ही भासतसे,
सृष्टी कवयित्रीच दिसे !

तिच्या कल्पना या गमती
कलिका येथें ज्या फुलती
सुगंध यांतुनि जो झुकतो
रस त्यांतिल तो पाझरतो !

भृंगा ! आणि तुझें गान
सृष्टीचें गमतें कवन !
गा ! तूं गा ! नादी भ्रमरा !
मी गणमात्रा जुळणारा !

शुक पंजरबन्धीं घालूं,
त्यां पढवूं नरवाग‍ बोलूं.
श्रुतिवैचिच्या बघणारे
आम्ही मात्रा जुळणारे !

‘ कवि ’ आम्हांलागुनि म्हणणें
कविशब्दार्था लोळवणें !
अस्मद्‍गान नव्हे ’ गान
तें गाना चिंध्यादान !

परंनु भृंगा ! तव गान
परमानंदैं परिपुर्ण !
उदासीन ही जगाविशीं
तव तन्मयता सृष्टीशीं !

अस्मदीय ह्रदयीं ठरलें
कीं जग हें दुःखें भरलें !
म्हणुनी सुंदरतेलाही
कुसें अम्हां दिसती पाहीं !

परि तव गानांतुन, अले !
थबथबला हा भाव गळेः---
‘ गुङ्‍ गुङ्‍ गुङ्‍ गुङ्‍ !--- भान नसे !
सृष्टि अहा गुङ्‍ ! मधुर असे !

‘ दुःख-वदा तें केंवि असे ?
अश्रु-तें हो काय ! कसें ?
फुलें फुलति, परिमल सुटती,
रस गळती-गुङ्‍ सौख्य किती !”

जाइ, जुई, मोगरी भली,
कमलिनीहि सुन्दर फुलली;
मघु यांचा सेवुनि गोड
पुरवीं तूं अपुलें कोड !

प्रीति, चारुता, आनन्द
यांचे गा मधुरच्छन्द;
प्रीति, चारुता, आनन्द
सिंचिति सृष्टीचा कन्द !

वरुनि नभांतुनि चंडोल
ओतितसे हेची बोल;
खालीं तव गुंजारव हा
प्रतिपादितसे तेंचि अहा !

( वसंततिलका )

होईल का रसिकता तव लब्ध मातें ?
गुंगी मिळेल मजला तव केधवा ते ?
येतें मनांत तुझियासम भृंग व्हावें,
वेलींमधूनि कलिकांवरुनी झुकावें ।


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- खेड, १९ नोव्हेंबर १८९०

फुलांची पखरण

टिप फुलें टिप ! माझे गडे ग ! टिप फुलें टिप !
पहा फुलांची पखरण झिप ! ॥ध्रु०॥

किती सुखाची सकाळ
किती मौजेची ही वेळ;
दिशा या फांकती,
फुलें हीं फुलतीं,
पक्षी हे बोलती;

सगळयाही सृष्टिनें पहा निद्रा ती टाकिली,
प्रीती ती आशेसंगें खेळाया लागली;
तर, आनन्दें या झाडांखालीं

टिप फुलें टिप !

किती सकाळ ही सुन्दर,
जसें मुलींचें माहेर ---
जगाचे ते व्याप
दुरि तैसे संताप
मनिं न शिरे मुळिं पाप,
पुण्याची ही वेळ पहा गें ! सूर्यानें उजळीली,
आशेचिया ग वेलीवरती गाणीं तीं फुललीं;
तर, मौजेनें या वेलींखालीं

टिप फुलें टिप !

सकाळ जाइल संपून,
मग तापेल तें ऊन;
मग धन्दे कराल,
पण, फुलें हीं विसराल !
सूख कैसें पावाल ?

फिरूनी ऐशीं वेळ गडे ग ! कधिं तरि ती येइल का ?
गडे !

आनन्दामधिं आस आपुला काळ कधीं जाइल का ?
म्हणुनिम, असे जों बहर तोंवरी

टिप्‍ फुलें टिप्‍ !

पहा फुलांचि पखरण छिपू !
माझे गडे ग !
टिप फुलें टिप !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ५-१२-९१

पुष्पाप्रत

फुला, सुरम्य त्या उषेचिया सुरेख रे मुला,
विकास पावुनी अतां प्रभाव दाव मापुला;
जगांत दुष्ट दर्प जे भरून फार राहिले,
तयांस मार टाकुनी सुवासजाल आपलें

तुझ्याकडे पहावयास लागतील लोक ते,
प्रीतिचें तयांस सांग तत्त्व फार रम्य तें :---
जिथें दिसेल चारुत तिथें बसेल आवडी,
मेळवा म्हणून सत्य चारुतेस तांतडी.

तुझ्यांतल्या मधूस मक्षिकेस नेऊं दे लुदून,
स्वोपयोगबद्धतेमधून जा तधीं सुदून;
जगास सांग अल्प मी असूनिही, पराचिया
जागतों हिता स्वह्रद्यदानही करूनियां.

बालिका तुला कुणी खुडील कोमलें करें,
त्वद्वीय हास्यभंग तो तधीं घडेल काय रे !
मृत्युची घडी खुडी जधीं जगीं कृतार्थ ते
तधीं तिहीं न पोंचणं जराहि शोकपात्र ते !

वा, लतेवरीच शीघ्र शुष्कतेस जाइ रे,
रम्य दिव्य जें तयास काल तूर्ण नेइ रे;
दुःख याविशीं कशास मन्मनास होतसे ?
उदात्त कृत्य दिव्य तें क्षणीं करून जातसे.

जा परंतु मी तुला धरीन आपुल्या मनीं,
मुके त्वदीय बोल बोलवीन सर्वही जनीं;
अम्हां भ्रमिष्ट बालकांस काव्यदेवतेचिया
जीव निर्जिवांतलाहि नेमिलें पहावया !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
-पंचचामर
- १८८९

संध्याकाळ

संध्याकाळ असे : रवी उतरतो आहे समुद्रावरी,
त्याचें बिम्ब सुरेख चुम्बिल पहा लाटांस या लौकरी;
मातीला मिळूनी गळूनि पडलें तें पुष्प जाई जसें,
लोपाला लहरींत मंडलहि हें आईल आतां तसें.

आकाशीं ढग हे पहा विखुरले, त्यांच्यावरी सुन्दर
रंगाच्या खुलती छटा, बघुनि त्या येतें स्वचित्तावरः---
हा मृत्युंगत होतसे दिवस, तन्मस्तिष्कपिंडांवरी
येतो अक्षयमोक्षसिन्धुलहरी तेजोयुता यापरी !

पक्षी हे घरटयांकडे परतुनी जातात कीं आपुलें;
त्यांलागीं किलबील शब्द करुनी आनंद देतीं पिलें;
गाई या कुरणांतुनी परततां हंबारवा फोडितो,
त्यांचे उत्सुक वत्स त्यांस अपुल्या दीनस्वरें बाहती.

आनन्दी दिसती युवे, फिरकतो जे या किनार्‍यावरी,
घ्याती ते निज सुन्दरीस, गमतें उल्हासुनी अन्तरी;
जी ही मन्दिरर जि पैल दिसते, तीच्या गवाक्षांतुनी
झाल्या त्या असतील ह्रष्ट युवतीं चित्तीं असें आणुनीः---
“ अस्तालागुनि जातसे दिनमणी; रात्री अहा येतसे !

रात्री !  जादु किती विलक्षण तुझे नामामधें गे वसे !
प्रेमाचें ह्र्दयीं उषीं कुमुद जें संकोच गे पावलें
देसीं त्यास विकास ! - चित्त म्हणुनी नाथाकडे लागलें ! ”

संध्येला प्रणयी तुम्ही जन सुखें द्या हो दुवा; मी करीं
हेवा तो न मुळीं; नसे प्रणय तो माझ्याहि का अन्तरीं ?
आहें मी घर सोडुनी पण दुरी; चित्तीं म्हणूनी असें
मी संध्यासमयीं उदास; अथवा व्हावें तरी मीं कसें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- सावंतवाडी, जानेवारी १८९३

फूलपांखरू

( अंजनीगीत )

जेथें हिरवळ फार विलसते,
लताद्रुमांची शोभा दिसते,
तेथें फुलपांखरूं पहा हे----
सुंदर बागडतें !

कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,
गन्धयुक्त अवकाशामधुनी,
पुष्पपरागा सेनित हिंडे ---
मोदभरें करुनी !

तरल कल्पना जशी कवीची,
सुन्दर विषयांवरुनी साची
भ्रमण करी, गति तशीच वाटे---
फुलपांखराची !

वा मुग्धेची जैशी वृत्ति
पतिसहवासस्वप्नावरती
विचरे फुलपांखराची तशी---
हालचालही ती !

निर्वेधपणें इकडे तिकडे
वनश्रींतुनी अहा ! बागडे;
त्याचा हेवा ह्रदयीं उपजुनि
मन होई वेडें !

तिमिरीं आम्हीं नित्य रखडणें,
विवंचनांतचि जिणें कंठणे,
पुष्पपतंगस्थिति ही कोठुनि---
आम्हांला मिळणें !

असे यास का चिन्ता कांहीं ?
यास ’ उद्यां ’ चा विचार नाहीं,
अकालींच जो आम्हां न्याया---
मृत्युमुखीं पाही !

बहु सौख्याची कुसुमित सृष्टि,
तींत वसे हें, न कधीं कष्टी,
ग्रीष्माचे खर रूप विलोकी---
नच याची दृष्टि !

‘ सर्व विनाशी असतो, प्राणी ’
ही मज खोटी वाटे वाणी;
फूलपांखरूं---मरण पाहिलें---
आहे कां कोणी ?

( वसंततिलका )

जें रम्य तें बधूनियां मज वेड लागे
गाणें मनांत मग होय सवेंचि जागें;
गातों म्हणून कवनीं फुलपांखरातें,
व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनातें.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १७-८-१८९२

दिवाळी

विश्वेशें करुनी कृपा सकरुणें दुष्काळदैत्यावरी
पर्जन्यास्त्र नियोजुनी पळविलीं आहेत दुःखे दुरी;
आतां मंगल पातले दिवसही दीपोत्सवाचे भले,
गाणें सुस्वर पाहिजे तर तुवां हे शारदे ! गाइलें.

दीनें ज्यांविण वाटतात सुदिनें सार्‍याहि वर्षांतलीं,
नांवानें जरि दुर्दिनें, सुखद जीं होतीं पुढें चांगलीं;
तीं येऊन बरींच, वृष्टि करुनी त्यांहीं दिली भूवरी,
तेणें सांप्रत पाहतां दिसतसे सृष्टी अहा साजिरी.

सस्यांचा बरवा अनर्घ्य हिरवा शालु असे नेसली,
जाईची जुइची गळां धरितसे जी रम्य पुष्पावली
ती भालीं तिलकांकिता शशिमुखी आतां शरत्सुन्दरी,
माथां लेवुनि केवडा विचरते घेऊनि पद्यें करीं !

जो गोपाळ गमे प्रभातसमयीं गाई वनीं चारितां,
वाटे रव्युदयीं नदीवर मुनी अर्ध्यास जो अर्पितां,
जो भासे दिवसां कृषीवल शिरीं खोंवूनियां लोंबरें,
तो आतां ऋतु शारदीय बहुधा शेतांतुनी संचरे.

राजा जो धनधान्यदायक असे साचा कुबेरापरी,
त्या श्रीमंडित शारदीय ऋतुची राणी देवाळी खरी;
रूपैश्वर्यगुणाढय ती जवळ ये; द्याया तिला स्वागता
सारेही शुभ योजनांत गढले---कांहीं नुरे न्यूनता !

भिंती रंगविल्या नव्या फिरुनियां, केलीं नवीं आंगणें,
वीथी झाडुनि, रान काढुनि दिसे सर्वत्र केराविणें;
दारीं उंच दिले दिवे चढवुनी, हंडया घरीं लाविल्या,
लोकीं शक्त्यनुरूप आत्मसदनीं भूषा नव्या जोडिल्या.

बाजारांत जमाव फार मिळुनी गर्दी जडाली असे,
गन्ध्याला निजसंग्रहास निकितां विश्राम कांहीं नसे;
उंची कापड, दागिने सुबकही, मेवे, फटाके चिनी,
यांचा विक्रय होतसे घडकुनी वस्तू न चाले जुनी !

माहेराप्रत कन्यका स्मितमुखी उत्कण्ठिता पातल्या,
त्या मातापितरां सहर्ष दुहिता, भावां स्वसा भेटल्या;
आले साम्प्रत भेटण्यास वडिलां दूरस्थ ते पुत्रही,
सोहाळे श्वशुरालयीं अनुभवूं आले नवे जांवई !

बाळांहीं निजपुस्तकांस अवघ्या आहे दिलेली रजा;
कांहीं काढुनि खेळ नाचुनि मुलें तीं मारिताती मजा;
तों गेहामधुनी खमंग निघुनो ये वास; तेणें उगी
तीं होऊन, हळूच आंत शिरतो--” दे माउली बानगी !”

आतां भौमचतुर्दशी पुढलिया वारीं असे पातली,
तों रात्रीं निजतां बनो छबुकली मातेप्रती बोलली ---
“ माला आइ उथाव लौकर बलं, अंगास मी लाविन
दादाच्या, म्हनुनी गले ! उथव तूं हांका मला मालुन !”

सारेही पहिल्या दिनीं उठूनियां मोठया पहांटे जन
स्नानें मंगल लौकरी उरकिती सौगन्धिकें चचुंन;
ज्या ठायीं असती दिवाळसण ते, तेथून वाद्यें पहा
निद्रेंतून दिवाळिला उठविण्या तीं वाजताती अहा !

त्यांच्या मंजुरवें न जागृत झणीं होईल ती वाटलें,
यालागीं शिलगावुनीं जणुं गमे देती फटाके मुलें;
‘ ठो ठो ’ आणिक ’ फाड फाड ’ उठती तों नाद अभ्यंतरीं,
त्यांहीं सत्वर जाहली हंसत ती जागी दिवाळी पुरी !

रांगोळया रमणीय काढूनि पहा, त्या मांडल्या पंगती !
पक्वान्नें कदलीदलांवरि अहा ! नेत्रांस संपोषिती;
पाटांच्या मधुनी जलार्थ असती पात्रें रुप्याचीं, तिथें
नेसूनी जन मोलवान वसनें होतात कीं बैसते.

घेऊनी घृत, दुग्ध तें, विपुल ते गोधूमही, साखर
प्रेमानें महिलाजनीं बनविलीं खाद्यें किती सुन्दर;
त्यांची साम्प्रत रेलचेल अगदीं पात्रांत जी होतसे,
तुष्टी आणिक पुष्टि ती वितरुनी प्रीती दुणावीतसे.

रांगोळया दिसती प्रदोषसमयीं दारापुढें काढिल्या,
दीपांच्या सदनापुढें उजळुनी पंक्ती तशा लाविल्या;
त्यांच्या ज्योति असंख्य त्या बघुनियां वाटे असें अन्तरीं :---
तारा या गगनांतुनी उतरल्या कीं काय भूमीवर !

बाळें सर्व फटाकडया उडविती चित्तांत आनन्दुनी,
जाडे बारहि लाविती, धडधडां त्यांता उठे तो ध्वनी,
मोठे बाणहि, चन्द्रज्योति मधुनी, त्या फूलबाज्या, नळे,

दारूकाम असें अनेकविध तें दृष्टी पडे, लाविलें.
लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होससे.
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अर्चीतसे,
साध्याला विसरून लोक धरितो भक्ती कसे साधनीं ---
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी !

लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होससे,
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अचींतसे,
साध्याला विसरून लोक धरिती भक्ती कसे साधनीं ---
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी !

आतां भार नसे कुणास, पण तो शिंक्यास भारी असे,
हातां काम नसे, परन्तु पडतें तोंडास तें फारसें;
कोणा मार नसे, तरी पण शिरीं तो सोंगटयांच्या बसे;
कोणा त्रास नसे, परन्तु नयनां तो गागरें होतसे !

भ्राते ते भगिनीगृहाप्रत सुखें जाती बिजेचे दिनीं,
त्यांचा बेत सुरेख ठेवुनि तयां ओंवाळिती भामिनी,
तेही त्यांस उदार होउनि मनीं ओंवाळणी घालिती,
प्रेमग्रंथिस वाढर्य बंधुभगिनी या वासरीं आणिती

खाणें आणि पिणें, विनोद करणें, गाणेंहि वा खेळणें,
जैसें ज्यांस रुचेल त्यापरि तुम्हीं या उत्सवीं वागणें;
मी सन्ध्यासमयीं खूशाल गिरणातीरावरी बैसुनी
कालक्षेप करीन उन्मन असा वेडयापरी गाउनी !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- शके १८२२, भडगांव १९००

मजुरावर उपासमारीची पाळी

धारेवरी जाउनि देव पोंचला.
हा रंगही मावतेस साजला,
सर्वत्र ही मौज पहा ! दिसे; परी
माझ्याच कां दुःख भरे बरें उरीं ?

सार्‍या दिनीं आजचिया नसे मुळीं
हातास माझ्या कवडीहि लाभली;
पोटा, करोनी मजुरीस मी भरीं;
कोणीं दिलें आज न काम हो परी !

हीं मन्दिरें हो खुलतात चांगलीं;
माझ्या वडिलींच न काय बांधिलीं ?
मी मात्र हो आज मरें भुकेमुळें ;
श्रीमंत हे नाचति मन्दिरीं भले !

हेवा तयांचा मजला मुळीं नसे,
जाडी मला भाकर ती पुरे असे;
कष्टांत देवा ! मरण्यास तत्पर,
कां मारिसी हाय ! भुकेमुळें तर ?

( सर्वांस देवा ! बघतोसि सारखा,
होतोस कां रे गरिबांस पारखा ? )
कांहींस सुग्रास सदन्न तूं दिलें,
साधी अम्हां भाकरही न कां मिळे ?

घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रती
जाती अहा ! पक्षि सुखी घरीं किती;
बाळांस हें दावुनि कारभारिण
कैसें तयां देत असेल सांगुत ?---

पक्षी जसे हे घरटयास चालती
घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रति,
घेवोनि अन्ना, तुमचा तसा पिता
येईल तो लौकरि हो, रडूं नका !”

हे लाडके ! आणिक लाडक्यांनो !
दावूं तुम्हां तोंड कसें फिरोन ?
जन्मास मी काय म्हणोनि आलों ?
येतांच वा कां न मरोनि गेलों ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- इंद्रवंशा
-जानेवारी १८८९

रूढि-सृष्टि-कलि

( रूढि राज्य करीत आहे, तिच्या जुलमी अंमलाखालीं लोक नाडले जात आहेत, तरी ते सृष्टीच्या नियमांस अनुसरण्यास नाखूष असून ‘ शास्त्राद्रूढिर्बलीयसी ’ असलीं वेडगळ मतें अलंघनीय मानीत आहेत. लोक, ज्याला कलि म्हणून भितात, तो त्यांच्या बर्‍याकरितां रूढीचा पाडाव करण्यासाठीं झपाटयानें ग्रंथप्रसार करीत आहे. तेव्हां लौकरच रूढिअक्का राम म्हणतील; आणि सृष्टीला लोक भजूं लागतील, असा रंग दिसत आहे. )

अज्ञानें फुगली, कुरूप अगदीं झाली, दुरी चालली
सृष्टीपासुनि रूढि; ती मग असत्सिंहासनीं बैसली.
सारे लोक पहा ! परंतु तिचिया पायीं कसे लागती,
ही कन्या दितिची असूनि इजला देवीच कीं मानिती !

देते शाप जनांप घोर, जुलमी ही दुष्ट राणी जरी,
तीं आशीर्वचनें शुभेंच गमती या मूर्ख लोकां तरी !
सृष्टीचे अमृतध्वनि दुरुनि जे कानांवरी त्यांचिया,
येती, ते परिसूनि मूर्ख सगळे घेतात चित्तीं भया !

सृष्टीनें निज भृत्य एक बलवान‍ रूढीवरी प्रेषिला,
त्याला लौकिक मूर्ख हा ‘ कलि ’ अशा नांवें म्हणूं लागला !
त्यानें कागद घेउनी सहज जे रूढीकडे फेंकिले,
त्यांहीं आसन तें तिचें डळमळूं आहे पहा लागलें !

येवी तूर्ण कले ! तुझ्या विजय तो अस्त्रांस त्या कागदी,
गाडूं ही मग रूढि विस्मृतिचिया त्या खोल खाडयामधीं !
साधो ! नांव तुझें खचीत बदलूं, बोलूं न तूतें ’ कली ’
जैजैकारुनि सृष्टिला, घ्वनि तिचा तो एक मानूं बली


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- दादर, ९ मार्च १८९१

‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास

यूरोपीय कथा-पुराण-कविता-प्रन्थांतुनी चांगले,
ते आहेत कितीक धोर उमदे राऊत वाखाणिले;
ज्यांचें ब्रीद-पवित्र राहुनी, जगीं दुष्टांस दण्डूनियां
कीजें सन्तत मुक्त दुर्बल जना, मांगल्या वाढावया !

या त्यांच्या बिरुदामुळेंच बहुधा, सन्मान ते जाहले---
देते या महिलाजनांस पहिला, स्त्रीवर्गकार्यीं भले---
ते भावें रतलें, क्षणक्षण मुखें स्त्रीनाम उच्चारुनी,
भूपुष्ठस्थित आद्य दैवत जणूं त्यां वाटली भामिनी !

‘ आहे रे पण कल्पनारचित हें सारेंचि वाग्डम्बर ’
हे कोणी व्यवहारमात्रचतुर प्राणी वदे सत्वर !
‘ नाहीं ! ---वाचुनि हें पहा ! ’ म्हणुनि मी तूझी कथा दावितों,
गेले राउत ते न सर्व अजुनी !-- हा गर्व मी वाहतों !

धीरा ! उन्नतिचे पथांत उमदा राऊत तूं चालसी !
नाहीं काय ? करूनि चीत अगदीं ही रूढिकाराक्षसी,
टांकानें अपुल्या दुराग्रह जुना मर्मीं तसा विंधुनी,
स्त्रीजातीस असाच काढ वरती !-- घे कीर्ति संयादुनी १


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १९ ऑक्टोबर १८९२

मूर्तिभंजन

मूर्ति फोडा, धावा !   धावा फोडा मूर्ति,
आंतील सम्पत्ति  फस्त करा !

व्यर्थ पूजाद्रव्यें   त्यांस वाहूनियां,
नाकें घांसूनीयां  काय लभ्य ?

डोंगरींचे आम्ही  द्वाड आडदांड,
आम्हांला ते चाड   संपत्तीची !

कोडें घालूनियां  बसली कैदाशीण,
उकलिल्यावीण  खाईल ती !

तिच्या खळीमध्यें  नाहीं आम्हां जाणें,
म्हणूनि करणें  खटाटोप.

मूर्ति फोडूनीयां  देऊं जोडूनीयां
परी विकूनीयां  टाकूं न त्या !

विकूनि टाकिती  तेचि हरामखोर
तेचि खरे चोर  आम्ही नव्हें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- अभंग
- १८९६

नवा शिपाई

नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेचि पतित लीं ज आंखडिती प्रदेश साकल्याचा !

खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मला न सूख;
कूपांतिल मी नच मंडूक;

मळयास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !

जिकडे जावें तिकडे माझीं भांवडें आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा---पायांखालीं तृणावृता भू दिसते;
कोठेंही जा---डोईवरतें दिसतें नीलांबर तें !

सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसतो गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;

तीं माझीं, मी त्यांचा,---एकच ओघ अम्हांतुनि वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !

पूजितसें मी कवणाला ?--- तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;
‘ मी ’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनि तो, निजशिरीं ओढिती अनर्थ भलते देख !

लहान---मोठें मज न कळे,
साधु---अधम हें द्वयहि गळे,
दूर---जवळ हा भाव पळे;

सर्वच मोठे---साधु---जवळ, त्या सकलीं मी भरुनी राहें !
कोण मला वठणीला आणूं शकतों तें मी पाहें !

हलवा करितां तिळावर जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केन्द्राभंवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक,
परि अन्यां बोंचाया घरितो कांटे कीं प्रत्येंक !

अशी स्थिती ही असे जनीं !
कलह कसा जाइल मिटुनी ?
चिंता वागे हीच मनीं.

शान्तीचें साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - हरिभगिनी
- ८ मार्च १८९८

निशाणाची प्रशंसा

तुज जरि करितो काठीला लावुनियां पटखंड,
तरि तुजमध्यें वसत असे या सामर्थ्य उदंड !

कोण नेतसे समरास सांग बरें रणधीर,
माराया कीं मरावया कृतनिश्चय ते वीर ?

शूरशिरांवरी धीटपणें युद्धाच्या गर्दींत !
कोण नाचतें फडकत रे स्फुरण त्यांस आणीत ?

तारूं पसरूनि अवजारें भेदित सिंधू जाय,
तच्छिखरीं तत्साहस तूं मूर्त न दिसशीं काय ?

उंच उंच देवायतनें भव्य राजवाडे,
तुंग दुर्गही शिरी तुला धरिताती कोडें ! 

भक्ति जिथें, दिव्यत्व जिर्थे, उत्सव जेथें फार,
तेथें तेथें दिसे तुझा प्रोत्साहक आकार !

वीर्य जिथें ऐश्वर्य जिथें जेथें जयजपकार,
उंचादर तेथें तेथें दिसे तुझा आकार !

म्हणून मानवचित्ताचीं उंचावर जी धाव
तीचें चिन्हच तूं तुजला निशाण सार्थच नांव !

मिळमिळीत ज्याची कविता न असे रंडागीत,
खचित जडेलचि त्या कविची तुझ्यावरी रे प्रीत

संसारा मी समर गणीं; उचलुनि म्हणुनि निशाण,
साद घालितों---” योद्धे हो ! झटुनि भिडुनि द्या प्राण !”




कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

- दोहा 
- १८९९

गोफण केली छान !

स्वह्रदय फाडुनि निज नखरीं
चिवट तयाचे दोर
काढुनि, गोफण वळितों ही
सत्त्वाचा मी चोर !

त्वेषाचा त्या दोराला
घट्ट भरुनियां पीळ,
गांठ मारितों वैराची
जी न पीळ दवडील !

वैर तयांला, बसती जे
स्तिमितचि आलस्यांत
वैर तयांला, पोकळ जे
बडबडती तोर्‍यांत !

वैर तयांला, वैरी जे
त्यांच्या पायधुळींत
लोळुनि कृतार्थ होती जे
प्राप्त तूपपोळींत !

वैर तयांला, पूर्वींच्या
आर्त्यांचा बडिवार
गाउनि जे निज षंढत्वा
मात्र दाविती फार !

वैर तयांला, थप्पड बसतां
चोळिति जे गालांस,
शिकवितात बालांस !

गांठ मारुनी वैराची
गोफण केली छान;
कठिण शब्द या धोंडयांनीं
करितों हाणाहाण !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दोहा

एका भारतीयाचे उद्‍गार

संध्याकाळीं बघुनि सगळी कान्गि ती पश्चिमेला
वाटे सद्यःस्थितिच अपुली मूर्त ती मन्मनाला;
हा ! हा ! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचे
गेला ! गेला !” सहज पडती शब्द हे मन्मुखाचे.

तेणें माथें फिरुनि सगळें जें म्हणोनी दिसावें,
त्या त्या मध्यें स्वजनकुदशा वाचुनी मीं रडावें !
जे जे चित्तीं बहुतकरुनी तें सुषुप्तींत भासे ”
वृद्धांचें हें अनवितथ हो वाक्य होईल कैसें ?

प्रातः कालीं रवि वरिवरी पाहूनी चालतांना,
होई मोदातिशय बहुधा सर्वदा या जनांना;
पूर्वींची तो स्थिति परि करी व्यक्त ती वाचुनीयां
एकाएकीं ह्रदय मम हें जातसे भंगुनीयां !

हा जैसा का रवि चढतसे त्याप्रमाणेंच मागें
स्वोत्कर्षाचा रविहि नव्हता वाढता काय ?-- सांगें;
जावोनी ती परि इथुनियां पश्चिमेशीं रमाया,
र्‍हासाची ही निबिड रजनी पातली ना छळाया ! ”

वल्लींनो ! हीं सुबक सुमनें काय आम्हांस होत ?
युष्मद्‍गानें मधुर, खग हो ? या जनां काय होत ?--
आम्हां डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळें हो !
ऐकायाला श्रुतिहि नसती पारतंत्र्यामुळें हो !

आहे आम्हांवर जव निशा पारतंत्र्यांधकारें,
वाहे जो का उलट कुदर्शचें तसें फार वारें,
सौख्याचें तोंवरि फुकट तें नांव व्हावें कशाल ?--
दुःखाचा तोंवरि खचित तो भोग आहे अम्हांला !

आनन्दाचे सर्मांय मजला पारतंत्र्य स्मरून
वाटे जैसें असुख तितुकें अन्य वेळीं गमे न !
पाहोनीयां विष जरि गमे उग्र तें आपणांतें,
अन्नामध्यें शपपट गमे उग्रसें पाहुनी तें !

” देवा ! केव्हां परवशपणाची निशा ही सरून
स्वातंत्र्याचा धुमणि उदया यावयाचा फिरून ?
केव्हां आम्ही सुटुनि सहना पंजरांतूनि, देवा,
राष्ट्रत्वाला फिरुनि अमुचा देश येईल केव्हां ?”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मंदाक्रांता
- १८८६

सिंहावलोकन

मुखा फिरवुनी, जरा वळुनि पाहतां मागुती,
कितीक ह्रदयें वदा चरकल्याविणें राहती ?
‘ नको वळुनि पाहणें ! ’ म्हणुनि दृग्‍ जरी आवरूं,
धुकें पुढिल जाणुनी मन न घे तसेंही करूं !

प्रदेश किति मागुते रुचिर ते बरें टाकिले,
कितीक तटिनीतटें श्रम जिथें अम्हीं वारिले;
किती स्मृतिस धन्यतास्पद वनस्थली राहिल्या,
जिथें धवलिता निशा प्रियजनासवें भोगिल्या !

सुखें न मिळतील तीं फिरुनि !-तीं जरी लाविती,
मनास चटका, तरी नयन त्यांवरी लोभती.
परन्तु ह्रदयास जे त्वरित जाउनी झोंबती,
प्रमाद, दिसतां असे, नयन हे मिटूं पाहती !

किती घसरलों !--- किती चुकुनि शब्द ते बोललों ! ---
करून भलतें किती पतित हंत ! हे जाहलों !
स्वयें बहकुनी उगा स्वजनमानसे टोंचिलीं ! ---
वृथा स्वजनलोचनीं अहह ! आंसवें आणिलीं !

चुकोनि घडलें चुको ! परि, ’ असें नव्हे हें बरें ’
वदूनिहि कितीकदां निजकरेंचि केलें बरें ! ---
म्हणूनिच अम्हांपुढें घनतमिस्त्र सारें दिसे,
पुढें उचलण्या पदा धृति मुळींहि आम्हां नसे !

“ चुकी भरुनि काढणें फिरुनि, हें घडेना कधीं ”
विनिष्ठुर असें भरे प्रगट तत्त्व चित्तामधीं ! ---
म्हणूनि अनिवार हें नयनवारि जें वाहतें,
असे अहह ! शक्त का कवणही टिपायास तें ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- पृथ्वी
- वळणें, ३ मे १८९०

दोन बाजी

त्या शूरानें भगवा झेंडा हिंदुस्थानीं नाचविला.
निजराष्ट्राचें वैभव नेलें एकसारखें बढतीला;
जिकडे तिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खूप शर्तिनें कदर आपली गनीमांस त्या लावियली,

आणिक तुवां रे ! --- त्वा नीचानें पाठ आपुली दादुनियां
रणांतुनी पौबारा केला, शेपुट भ्याडा वळवुनियां ?

गुणी जनाची पारख करुनी त्या धीरानें गौरविलें,
उत्साहाच्या वातें अपुल्या तेज तयांचें चेतविलें;
प्रतापदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी,
गनीममशकें कितीक गेलीं तिच्यामधें खाक्‍ होवोनी !

आणिक तूं रे ? -- नाचलासि तूं नग्नच संगें अधमांचे,
धूळ खात गेलास---लाविले सर्वत्र दिवे शेणाचे !

भटांस जे रणधुरंधर तयां पाचारुनि त्या सिंहानें
माराया कीं मरावया अरिवरि नेलें आवेशानें,
’ हरहर !’ शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी
’ अला मराठा ! ’ म्हणत पळाल्या सैरावैरा किती लंडी !

तूंहि भटाला पाचारियलें, काय त्यांसवें परि केलें ?---
यथेच्छ लाडू मात्र झोडिले---नांव हाय रे बुडवीलें

घोडयावरिच हुरडा चोळित शत्रुशासना धांवोनी
तो गेला --- तूं बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी !
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दीते सद्‍बुद्धि
त्यांच्या साह्यें निजसत्तेची त्यानें केली रे वृद्धि.

पण तूं रे ?--- तूं नगरभवान्या नाच्येपोर्‍ये घेवोंनी
दौलतलादा केला --- धिग्‍ धिग्‍ भटवंशीं रे जन्मोनी !

या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनिया
तुळशीमध्यें भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनिया !
निजनामाचा ’ गाजी ’ ऐसा अर्थ उरवुनी तो गेला,
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला

मरणाआधिंच मरून आणुनि काळोखी निजराष्ट्रला,
तूं गेलासी करून ’ पाजी ’ अहह ! पितामहनामाला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मुंबई १६ फेब्रुवारी १८९५

घुबड

( एडगर पो याच्या ‘ रेव्हन ’ या अप्रतिम काव्याची मुख्य कल्पना या चुटक्याच्या आधारास घेतली आहे. )

श्यामा राणी गभीर रजनी,
अलंकृता जी नक्षत्रगणीं,
वेत्र आपुलें उंच धरोनी

बसुनी राज्यासनीं दरारा दावित आहे जों फार,

समोरच्या चिंचेवरुनी तों
घुबड तियेचा बन्दीजन तो

घूघू घूघ---महिमा तीचा वर्णी करुनी धूत्कार !

कवी आपुल्या खिडकीमधुनी
बाहेंर बघे शून्य लोचनीं ---
स्तब्धत्व जनीं, स्तब्धत्व वनीं,

मनींहि दयितानिधनें वागे स्तब्ध निराशा अनिवार !

अवघड झालें एकलेपणें;
परि त्या तरुवरुनी घुबडानें

‘ ऊंहूं मी तुज सोवत ! ’ म्हटलें, घू घू करुनी घूत्कार !

“ खाशी सोबत !” कवी म्हणाला;
“ माझ्या विरहव्यथित मनाला;
वाटे मनुजांचा कंटाळा;

दुःख करित बैसणें आवडे, येथें राहे अंधार !

हा मित्र मला भला मिळाला
धीर मदीय मना द्यायाला !”

“ ऊंहूं ऊंहूं !” उत्तर दिधलें त्यानें करूनी घूत्कार !

“ नाही ?--- धीर न देशिल काय ---
शोकें मी मीकलितां धाय ?”

“ ऊंहूं ! घूघू !” उत्तर बोले त्याचा भेसुर घूत्कार !

“ हे अप्रतिमे ! प्रिये, प्रियतमे !
तुजवीण जिणें निर्माल्य गमे !
अहह ! वेढिले असे मज तमें !

मरुन तर मी, जेथें वसे ती दिवंगता दिव्याकार,

तेथ पूजिली सुरांगनांनीं
पाहिन काय न सखी स्वनयनीं ?”

“ ऊंहूं ऊंहू ?” बोले निष्ठूर त्या घुबडाचा घूत्कार !

“ बरें बरें !--- मी नरकीं जाइन,
घोर यातना तेथिल सोशिन;
खेद न त्यांचा अगदीं मानिन;

जर त्या स्थानीं वागेल मनीं कान्तेचा पुण्याकार;

तेथ तियेचें द्याया दर्शन
स्मृति मम समर्थ होइल काय न ?”

“ ऊंहूं ! घूघू ! ” बोले निर्घूण त्या दगडाचा घूत्कार !

“ जा, निघ येथुनि !--- मला रडूं दे !
शोकें माझें ह्र्दय कढूं दे !
कानीं परि तव रव न पडूं दे,

“ घूघू !--- ऊंहूं !” दे प्रत्युत्तर त्या अधमाचा घूत्कार !

निशीथसमयीं या अन्धारीं
वेताळाची मिरवे स्वारी,
पाजळूनियां टेंभे सारीं

भुतें नाचती भयानकपणें !--- चित्तीं उपजविती घोर !

नैराश्यें मज पुरें घेरिलें,
खिडकीपुढुनी घुबड न हाले,

घूघू ! घूघू ! चाले त्याचा घूघू भीषण घुत्कार !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- फैजपूर, १२ डिसेंबर १९०१

दिवस आणि रात्र

दिवस बोलतो “ उठा झणीं ! ”
रात्र ---“ विसांवा ध्या ! ” म्हणते,

या दों वचनीं दिनरजनी
बहुत सुचविती, मज गमतें,

दिवस सांगतो ” काम करा, ”
रात्र ---” विचारा करा मनीं. ”

दिवस बोलतो ” मर मरा ”
रात्र ---“ मजमुळें जा तरुनी. ”

दिवस वदतसे “ पहा प्रकाश; ”
आंत शिरतसे परि अंधार ?

रात्र बोलते “ पहा तमास ! ”
परि आंत पडे प्रकश फार !

दिवस म्हणे “ जा घरांतुनी ”
रात्र वदे “ या सर्व घरास. ”

स्पर्धा लावी दिवस जनीं;
रात्र शिकविते प्रीति तयांस !

नक्षत्रें जगतीवरलीं
दिवस फुलवितो, असे खरें;

पुष्पें आकाशामधलीं
रात्र खुलविते, पहा बरें.

एकच तारा दिन दावी,
असख्य भास्कर परी निशा;

दिवस उघडितो ही उर्वी,
रजनी अनन्त आकाशा !

दिवस जनांला देव दिसे,
परि गद्यच त्याच्या वदनीं;

रात्र राक्षसी भासतसे,
परि गाते सुंदर गाणीं !

“ ही भूपी हा नरक ! ” असें
वदे अदय दिन वारंवार;

“ ही धरणी हा स्वर्ग असे !”
गाते रजनी, जी प्रिय फार !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १४-९-१८९५

स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य

आरम्भीं, म्हणजे मनुष्य नव्हता तेव्हां, क्षितीपासुनी
होता स्वर्ग न फार दूर, अपुल्या कान्तिप्रसन्नेक्षणीं
तो पृथ्वीप्रत सौख्य नित्य वितरी तेव्हां पुढें त्यावरी
गेली प्रीति जडूनि गन्धवतिचे चित्तांत भारी खरी.

निर्मीला नर नन्तर स्वतनुच्या तीनें मळीपासुनी
इच्छा आपुलिया धरूनि ह्रदयीं हीः--- गायनें गाउनी
स्वार्गा आळवुनी नरें सुकुशलें मोहूनियां टाकिजे,
स्वर्गें येउनि खालतीं मग तिशीं प्रेमें सदा राहिजे.

या दुष्टें, पण मानवें स्वजननीपृथ्वीस ताडूनियां
लाथेनें, अपुल्या मनीं अवथिलें स्वर्गावरी जावया;
ती पाहूनि कृतघ्नता निजमनीं तो स्वर्ग जो कोपला,
आवेशांत उडुनि दूरवर तो जाता तघीं जाहला.

तेव्हांपासुनि ही धरा झुरतसे ! माते ! चुकी जाहली !
स्वर्गा ! तूंहि अम्हां क्षमस्व सदया !--- ये खालता भूतलीं---
ये बा ! आणिक या घरेस अगदीं देऊं नको अन्तर !---
आहे तूजवरी तसेंच बसलें स्वर्गा ! तिचें अन्तर.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- खेड, ११ एप्रिल १८९०

कल्पकता

( खालच्या पद्यांत वर्णिलेली देवी ती कल्पकता होय. सर्व जग आपल्या आहारनिद्रादि ठरीव व्यवसायांत निमग्न असतां ती एकांतांत बसून भारत-रामायणासारखीं काव्यें लिहिते, शाकुंतल, हँम्लेट यांसारखीं नाटकें  रचिते, गुरुत्वाकर्षणासारखे गहन शास्त्रीय सिद्धांत सुचविते आणि  एडिसनच्या फोनोग्राफसारखीं यंत्रें तयार करिते, तेणेंकरून नवीन आयुःक्रम पृथ्वीवर सुरू होतो, आणि स्वर्ग पृथ्वीला जवळ होतो, )

खा, पी, नीज, तसा उठूनि फिरुनी तें जा चिन्तित ---
आवर्तीं जग या ठरीव अपुल्या होतें हळू रांगत;
एका दुर्गम भूशिरावरि. परी देवी कुणी बैसली,
होती वस्त्र विणीत अद्‍भुत असें ती गात गीतें भलीं.
होते शोधक नेत्र, कर्णहि तिचे ते तीक्ष्ण भारी तसे,
होतें भाल विशाल देवगुरूनें पूजा करावी असें.
सूर्याचीं शशिचीं सुरम्य किरणें घेऊनि देदी सुधी
होती गोवित इंद्रचापहि तसें, त्या दिव्य वस्त्रामधी;

मेघांच्याहि छटा, तशीच कुटिला विद्युत्‍ ,तसे ते ध्वनी
लाटा, पाउस, पक्षि ते धबधबे---य तें पटीं ती विणी;
तारांचें पडणें, तसें भटकणें केतुग्रहांचें, पहा
सारे सुन्दर, भव्य घेउनि तिनें तें वस्त्र केलें अहा !

आली भू कुतुलें तिथें तिस तिनें तें वस्त्र लेवीवलें;
तों त्या वृद्ध वसुंधरेवरि पहा ! तारुण्य ओथंबलें;
भूदेवी, मग ह्रष्ट होउनि मनीं, नाचावया लागली,
‘ आतां स्वर्ग मला स्वयेंच वरण्या येईल ! ’ हें बोलली.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १७ फेब्रुवारी १८९१

स्वप्नामध्ये स्वप्न!

प्रीतीला विरही दशा कठीण हो मीं फार गार्‍हाणिली,
हंसाचे मग पक्ष ती द्रवूनियां देती मला जाहली;
आनन्दें प्रणती तिला करुनि मीं स्कंधांस ते लाविले,
वेगानें मग अन्तरालभवनीं उड्डाण मीं मारिलें !

आशेचा चमके जसा किरणा तो चिन्तांमधीं आगळा,
तैसा तारक मेघवेष्टित तरी तेजाळ मीं पाहिला;
त्या तार्‍यावरि जाउनि उतरलों. चिन्तीत हें मानसीं---
भेटूं केंवि निजप्रियेस ? रमवूं शब्दीं तियेला कशी ?
ऐशामाजि सखी, परीपरि तिथें उड्डाण घेऊनिक्यां---
आली; कोण असे समर्थ मग त्या सौख्यास वर्णावया !
वक्षें दोनहि चार ओष्ठहिं तधीं एकत्र झाले जवें !
पायांखालुनि जाय-हाय ! तुटुनी तारा परी तो सवें !

हा ! हा ! मी पडलों तसा घसरुनी या विलष्ट पृथ्वीवरी,
त्या धक्क्यासरशीं मदीय सगळी गुंगी पळे हो दुरी !
माझ्या या ह्रदयावरी ममचि हे वेंगुनि होते कर,
हंसाचीं नव्हतीं पिसें चढविलीं या दोन बाहूंवर !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मुंबई, २५ जानेवारी १८९०

आहे जीवित काय ?

आहे जीवित काय ? केवळ असे निःसार भासापरी ?
किंवा स्वप्न असे ? उठे बुडबुडा कालप्रवाहावरी ?

दुःखें काय अनन्त त्यांत भरलीं ? कीं कष्ट जीवा पडे ?
सौख्याचें न तयांत नांव अगदीं ऐकावया सांपडे !

नाहीं स्वप्न-न-भास-वा बुडबुडा; जीवित्व साचें असे !
प्रेमानें परमेश्वरास भजतो जो निर्मलें मानसें !

लोटी निर्मल सौख्य सिंधुलहरी त्याचेवरी जीवित.
तो आनन्दनिधानशैलशिखरीं क्रीडा करी सन्तत !



कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- ११-३-९३

झपूर्झा

( आपल्यास जें कांहीं नाहीं असें वाटतें, त्यांतूनच महात्मे जगाच्या कल्याणाच्या चिजा बाहेर काढितात, त्या महात्मांची स्थिति लक्षांत वागवून पुढील गाणें वाचिंल्यास, तें दुर्बोव होऊं नये असें वाटतें )

हर्षखेद ते मावळते,
हास्य निमाले,
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें लव वठली;

कांहीं न दिसे दृष्टीला
प्रकाश गेला,
तिमिर हरपला:
काय म्हणावें या स्थितिला ?---

झपूर्झा ! गडे झपूर्झा !
हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?

हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरुं हें वदण्याला :---
व्यर्थीं अधिकचि अर्थ वसे
तो त्यांस दिसे,

ज्यां म्हणति पिसे,
त्या अर्थाचे बोल कसे ?---
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

ज्ञाताच्या कुंपणावरून,
धीरत्व घरून,
उड्डाण करून,

चिद्‍घनचपला ही जाते,
नाचत तेथें चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,

त्या गातासी
निगूड गीती;
त्या गीतीचे ध्वनि निघतो---

झपूर्झा ! गडे झपूर्झा !
नांगरल्याविण भुई वरी
असे कितितरी;
पण शेतकरी

सनदी तेथें कोण वदा ? ---
हजारांतुनी एकादा !
तरी न तेथुनि वनमाला

आणायाला,
अटक तुम्हांला;
मात्र गात हा मंत्र चला ---
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

पुरुषाशीं त्या रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करिती;

स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणें, हा ज्ञानाचा ---
हेतु; तयाची सुन्दरता

व्हाया चित्ता ---
प्रत ती ज्ञाता,
वाडें कोडें गा आतां ---
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

सूर्यचन्द्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें

खुडित खपुष्पें फिरति जिथें,
आहे जर जाणें तेथें,
धरा जरा निःसंगपणा

मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणा ---
झपूर्झा ! गडे झपूर्झा !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मुंबई २ जुले १८९३

कोणीकडून ? कोणीकडे ?

कोणीकडून ? कोणीकडे ?
इकडूनि तिकडे, म्हणती गडे;
येथूनि तेथें, मागुनि पुढें,
हें तर नित्यच कानीं पडे;

पण समाधान का कधीं तयानें घडे ?

जिवलगे ?

कोणीकडे ग ?--- कोणीकडून ?
तिमिरामधेच तिमिरामधून;
घडीभर पडे मध्यें उडून,

ह्रदय हें उलें त्यामुळें निराशा जडून !

जिवलगे !

भोगांचीं अवशिष्टें तुसें
घशांत खुपती, लाणे पिसें;
मागें पुढें न कांहीं दिसे;
संशयडोहीं नौका फसे;

मग वदे---हरे राम ! रे, करावें कसें ?

जिवलगे !

गोत्यांत अशा आलों कुठून ?
कोठें जमइन कैसा सुटुन ?---
असें विचारी जेव्हां झटून,
भ्रमबुद‍बुद्‍ तो जातो फुटून;

मग अह ! विभिन्नच दिसे दृष्टि पालटून !

जिवलगे !

शून्य म्हणूं जें मागें पुढें,
त्यांतुनि दीप्ती दृष्टी पडे,
मधला उजेड तिमिरीं दडे;
निजधामाहुनि आलों, गडे,

तर, ऋणें फेड, चल सुखे स्वधामाकडे !

जिवलगे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- भडगांव, १७ ऑक्टोबर १९००

म्हातारी

घेउनि ह्रदयाशीं  सुतेला, स्थित मी दाराशीं
म्हातारी आली   तरंगत, मुलगीला दिसली;
हात पुढें केले   धराया तिला तिनें अपुले;
तिच्या शिरावरुनी  तधीं ती गिरक्या घे उडुनी;
हंसत वरी करुनी  हात, ती धरुं झटे फिरुनी;
त्या चलनें वरती   उडाली म्हातारी परती;
खिवळत तें बघतां  उडाया पाही मम दुहिता !
दडपण संसूतिचें   निधालें मम चित्तावरचें;
मन्मनही लागे   तरंगूं म्हातारीसंगें !
वारा तों तिजला   लागला दूरच न्यायाल.

चुम्बुनि वत्सेला वदें मी मग म्हातारीला ---

“ थांब, थांब ! जाशी अशी कां ? फिर ये गे मजशीं;

वयस्कता माझी   म्हणुनि जर करिसी इतराजी,
तर माझी सोनी   पाहुनी ये गे परतोनी !
तुजला पाहूं दे   तियेला, खिदळत राहूं दे !
मज वय विसरूं दे,   मुग्ध--मधु--बाल्यीं उतरूं दे !
ते दिन पुष्पांचे,   कोवळया किरणीं खेळाचे !
हे दित--हया !---
हे दिन चिन्तांचे   परंतु लटिकें हंसण्याचे !

हे दिन ......... जाऊं चे ! मला तुज गाणें गाऊं दे.

“ म्हणती म्हातारीं   तुज, कधीं होतिस तरुण परी ?
तव जनि मूति न दिसे,   अजामर रूप तुझें भासे !
कोठुनि तूं येशी,   न वदवे, कोठें तूं जाशी;

स्वैरपणें भ्रमसी, यदृच्छा मूर्तच तूं गमनी !

“ येशी तूं का गे   यक्षिणीकुंजांतुनि ?-- सांगे
कैशा वागुनियां   मिळवितो अक्षय यौवन त्या ?
झिजवित नित्य जिणें   तयांला पडतें का मरणें ?

वद त्यांची रीती ध्यावया आम्ही लागूं ती.

या गन्धर्वाचें   विमानच सूक्ष्मरूप साचें
वद असशी का तूं   तरंगत वातावरणांतून ?
सूक्ष्म देह धरुनी   असति का तुजवरि ते बसुनी ?
दिव्य असें गाणें   गात तें असतिल सौख्यानें,
तें मज पाप्याला   कशाचे ये ऐकायाला !
परि मम वत्सेतें   गमे तें परिसाया मिळतें;

म्हणूनिच उल्हासें अशी ही वेडावूनि हांसे !

“ अज्ञातामधला   मूर्त तूं गमसी ध्वनि मजला
अर्थ तुझा कोण   मला तो देइल सांगोन ?
कळेल जर मज तो,  तर जगीं भरला जो दिसतो ---

मी तो अंधार लोपवूं झटेन साचार !

“ खपुष्प तूं असशी   काय गे--सांगुनि दे मजसी.
तुझे रंग वास   न कळति मर्त्य मनवास;
जर ते कळतील   तर इथें स्वर्गच होईल !

मग तुज धरण्यातें मुलांपरि मोठे झटतिल ते !

“ स्वरूप सत्य तुझें   मुळींही तें मजला नुमजे;
तरी तुझ्या ठायीं  वसतसे अद्‍भुत तें कांहीं;
प्रत्यक्षांतुनि तें   परोक्षीं शीघ्र मला नेतें;
तेथें स्वच्छंदें   विचरतां मोद मनीं कोंदे;

मग गणमात्रांतें जोडणें केशवपुत्रातें,”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
२५ जानेवारी १९०१

पायपीट

दुःखाच्या वाटेवर
गाव तुझे लागले;
थबकले न पाय तरी
हृदय मात्र थांबले!

वेशीपाशी उदास
हाक तुझी भॆटली
अन् माझी पायपीट
डॊळ्यातुन सांडली


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !


उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !


गीत : सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले