अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न

मुलें अंत्यजांचीं बिचारीं मजेनें
पथाच्या अहो खेळताती कदेनें;
दुरूनी तिथें विप्र डौलांत आला,
वदे काय तो मुग्ध त्या बालकालाः---

” सरा रे दुरी पोर हो म्हारडयांचे !
चला ! खेळ हे मांडले डोंबलाचे !
निघा ! वाट द्या लौकरी ब्राह्मणातें ! ”
पळालीं मुलें;---कोण राहील तेथें !

परी एक त्यांतील तैसाचि ठेला;
उगारी तधीं दुष्ट तो यष्टिकेला.
म्हणे---” गाढवा ! सांवली ना पडेल !
दुरी हो ! पहा हाच खाऊ मिळेल !”

तधीं बाळ तोही घराला निघाला,
मनीं आपुल्या या करी चिन्तनालाः---
” जरी त्यावरी सांवली माझि गेली.
तरी काय बाघा असे ठेविलेली ?”

घरीं जाउती तेंचि मातें विचारीं ;
वदे तेधवां त्यासि माता विचारीः---

” अम्ही नीच वा, आणि ते लोक थोर;
तयां पाहतां होईजे नित्य दूर.”
सुधें बोलली !--- हें परी काय तीतें
कळे कीं जगीं नाडुनीयां परांते,
म्हणूनी करूनी अधीं घोर पाप,
जनीं गाजवी मानवी स्वप्रताप !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - भुजंगप्रयात
- १ सप्टेंबर १८८८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा