माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

- बहिणाबाई चौधरी

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही,
हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही,
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही,
नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही,
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही,
जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही,
एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही,
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही,
जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही,
ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही


 - बहिणाबाई चौधरी

"टणक ऊस"

स्थळ : पुणे,  वेळ दु. 1 ते 4 मधली..

एक पुण्याबाहेरील माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिहि अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. "टणक ऊस" ???

हे नाव का ठेवले असेल?

उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने बेल मारलीच.
एका म्हातार्याने पुणेरी चेहर्‍याने दरवाजा उघडला.

"काय्ये ?" म्हातारा खेकसला

"अहो ते... या बंगल्याचे नाव "टणक ऊस" का ठेवलय ?"

म्हातारा विस्कटलाच... "हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही"

" साॅरी... पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना "टणक ऊस" काय प्रकार आहे?"  चाचरत त्या  माणसाने विचारलं...

"निलाजरे आहात तुम्ही"

"ते झालंच पण "टणक ऊस"....

"अहोssss..." म्हातारा फिस्करला
"अक्षर जुनी झाली की तुटून पडतात..... सगळ्यांना माहिती आहे हे 'पाटणकर हाऊस' आहे....

🔶 दगड 🔶

शब्द एक तो 'दगड' रांगडा
परंतू त्याची रूपे पहा
वृत्ती, दृष्टी जैसी असते
अर्थ लाभतो त्यास महा

अ, आ, इ, ई लिहीण्यासाठी
'दगडा'ची ती पाटी असते
सरस्वती नाखूष ज्यावरी
त्याला जग हे 'दगड'च म्हणते

बालपणी जी केली चोरी
कैर्‍या पाडून दगडांनी
संसाराचा आरंभ होतो
तीन 'दगडां'च्या चुलीतूनी

ऐतिहासिक शिल्पे म्हणजे
दगडावरती कोरीव काम
सेतू बांधिला वानरांनी त्या
'दगड' घेऊनी मुखात राम

'दगडा'ची ती शिला होते
वास्तू बांधण्या आरंभ होतो
अशुभ वार्ता ऐकण्याआधी
हृदयावरती 'दगड ठेवतो

मैलाचा तो 'दगड'च असतो
आयुष्याचे वळण सांगण्या
'दगडा'ची ती भिंत बांधती
नात्यामधले वैर दावण्या

'दगड' घालूनी डोक्यामध्ये
कुणी कुणाचा जीवच घेतो
या 'दगडा'तूनी शिल्पकार तो
सुंदर, मोहक मूर्ती घडवतो

निर्धाराचा शब्द म्हणजे
काळ्या 'दगडा'वरची रेघ
संप, बंद आंदोलन म्हणजे
क्रूर, अमानुष 'दगड'फेक

'दगडा'तूनच जन्मां आले
पाटा-वरवंटा अन् जाते
पाथरवट निर्माते  परंतू
आज त्यांस ना कुणी पुसे

मूर्ख माणसां अर्थ सांगणे
'दगडा'वरती डोके फुटणे
विनाश घेता  ओढवून कधी
पायावरती 'दगड' पाडणे

ज्याचा त्याने विचार करणे
'दगड'घ्यावा हाती कशास
नावच अपुले राहील मागे
'दगडा'वरती कोरून खास.


- सौ.शुभांगी श्री. नाखे (अलिबाग)
कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला । कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥
मनेंचि आरती केला नमस्कार । पूजिला साचार मनामाजीं ॥ ३ ॥
बहिणी म्हणे त्याचे मनांतील हेत । ओळखे निश्चित पांडुरंगा ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई 

गांव

खरं खरं सांगतो राव् ,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाईलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललय?कस चाललय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झाेके हाेते,
आेढ्याच्या डाेहात पाेहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसुन,
कच्चे-पीकलेले आंबे खायची मजा हाेती...

विटी-दांडु,खेळाच मैदान होतं,
इतर अनेक मैंदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे हाेते,ऊस हाेता...

गोठाभर ढोरं होती...
ढाेरां बराेबर पाेर हाेती....

जिवाला जीव देनारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गानं होतं.…

शाळेतल्या कवितेले,
आनंदाचं उधान होतं...

पण..............

जसं गावात हा काेठुन,
मोबाईल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेटआलं...

गजबजलेलं गाव माझ,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणस,
टीव्हीलाच चिटकुन राहीली..

रस्तावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैंदानावरील मुल सारी,
देवळामागच्या अंधारात...

माेबाईल मध्येच,गुंतली सारी......

सुनेसुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खर-खर सांगताे राव.....
या माेबईलनच बीघडवल माझ सार गाव !


कवी - सतिश आहेर
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥
तृषितांसी जैसें आवडे जीवन । तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं । ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई

मित्रा , हा भारत आहे

एक म्हैस जंगलात घाबरून पळत होती .

एका उंदराने,विचारले " अगं, इतकी का पळतेस ?"

म्हैस: जंगलात पोलिस आलेत हत्ती पकडायला.

उंदीर : पण , तू तर म्हैस आहेस . तू का पळतेस ?

म्हैस :  मित्रा , हा भारत आहे .
एकदा त्यांनी पकडले की पुढची वीस वर्ष कोर्टात सिद्ध करावं लागेल की मी हत्ती नाही , म्हैस आहे .
ऐकून उंदीरही पळू लागला .

** आम्ही असे शिकलो **

"आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ..
             त्यावर करतो
             तांब्यानी प्रेस,
             तयार आमचा
             शाळेचा ड्रेस..
       
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग..
       
            धोतराचं फडकं
            आमचं टिफीन,
            खिशात ठेवुन 
            करतो इन..
करगोटा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
            मिरचीचा ठेचा
            लोणच्याचा खार,
            हाच आमचा
            पोषण आहार..
            
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज..
             काट्यांच रूतणं
             दगडांची ठेच,
             कसा सोडवायचा
             हा सारा पेच..
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट..
             जुन्या पुस्तकांची
             अर्धी किंमत,
             शिवलेल्या वह्यांची
             वेगळीच गंमत..
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची..
             केस कापण्याची
             एकच शक्कल,
             गप्प बसायचे
             होईपर्यंत टक्कल..
गेले ते दिवस,राहिल्या त्या फक्त आठवणी....

पाषाण विठ्ठल

पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका । प्रत्यक्ष कां सुखा अंतरावें ॥ १ ॥

घेईन उदंड सेवासुख देहीं । साक्ष या विदेही आहे मज ॥ २ ॥

भ्रताराची सेवा पतिव्रता करी । तरी ती उद्धरी उभय कुळें ॥ ३ ॥

बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांति । भ्रतारें समाप्ती जन्ममृत्यु ॥ ४ ॥


- संत बहिणाबाई

न बोलवे शब्द अंतरींचा


न बोलवे शब्द अंतरींचा धावा । नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥

अदृष्ट करंटें साह्य न हो देव । अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥

तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत । घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥

महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ । बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥ ४ ॥

अंतर साक्ष आहे निरोपणीं हेत । जडे परी चित्त वोळखेना ॥ ५ ॥

बहिणी म्हणे मीच असेन अपराधी । अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा ॥ ६ ॥


- संत बहिणाबाई

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत.
झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...

" नेमाडपंथ "


ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या "कोसला" या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच…! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले."

तर हिंदू कादंबरी बाबत बोलायचे झाले तर कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृती' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापू  टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ'. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, मिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे.

प्राध्यापक ते सडेतोड समीक्षक या त्यांच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप...

* प्रा. डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे
* जळगाव जिल्ह्यात सांगवीत १९३८ मध्ये जन्म
* पुणे विद्यापीठातून बी.ए. (१९६१)
* मुंबई विद्यापीठातून एम.ए. (१९६४)
* १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचं अध्यापन
* गोवा विद्यापीठात इंग्रजीचे विभागप्रमुख
* तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त

साहित्यसंपदा-

* छंद, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व या नियतकालिकांमधून भालचंद्र नेमाडेंनी कविता लिहिल्या.
* १९६३ मध्ये, उमेदवारीच्या काळात 'कोसला' कादंबरी प्रकाशित... या कादंबरीनं कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडले...
* 'कोसला'नंतर तब्बल एका तपानं, समकालीन मराठी समाजावर भाष्य करणाऱ्या 'बिढार', 'जरीला', 'झूल', 'हूल' या कादंबऱ्यांनी मराठी रसिक वाचकांना वेगळी अनुभूती दिली.
* 'मेलडी' आणि 'देखणी' हे काव्यसंग्रह प्रकाशित... विंदा करंदीकरांच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या कविता... व्यवहारी, अमानुष जगातल्या वास्तवावर उपरोधिक भाष्य...
* मराठी समीक्षेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं श्रेय नेमाडेंना जातं... 'साहित्याची भाषा' हे भाषाविज्ञानपर पुस्तक आणि 'टीकास्वयंवर' हा समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित. 
* २०१० मध्ये 'हिंदू' या महाकादंबरीचे प्रकाशन.  

पुरस्कार- 

* "साहित्य अकादमी पुरस्कार - १९९०"
* "पद्मश्री पुरस्कार"' - २०११"
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "जनस्थान पुरस्कार" व नुकताच जाहीर झालेला "ज्ञानपीठ पुरस्कर"… 


आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कराने अवघे मराठी जन आनंदून गेले आहे, आज पुन्हा एकदा मराठी साहित्यक्षेत्रात एक मनाचा तुरा खोवला आहे.  आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढील आयुष्यास अनेक शुभेच्छा…!!

-
अभिनय महाडिक 
रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?

सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.

रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून?

सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.
एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले:- अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??

पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......

दुसरी मुंगी:- का काय झालंय??

पहिली मुंगी:- अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते,