आनंद ! कोठें आहे येथें ?

देवानें शेवटी माझी अशी निराशा केली !
हाय !
स्वर्गलोकाला सोडून मी येथें कशाला बरें आलों ?
जिकडे तिकडे अगदीं अंधार - अंधार आहे येथें !
भूलोक समजून मी चुकून नरकांत तर नाहीं ना आलों ?
अरे मला घोडाघोडा खेळायला कोणी एक तरी सूर्यकिरण द्या रे !
तीन दिवस झाले, पण मला प्यायला, एकसुद्धां स्वच्छ व गोड असा वायूचा थेंब अजून मिळाला नाहीं !
देवा !
तूंच नाहीं का मला सांगितलेंस कीं, या मृत्युलोकांत आनंद आहे म्हणून ?
मग कोठें आहे रे तो आनंद ?
हाय ?
नऊ महिने सारखा अंधारांत धडपडत, ठेंचा खात, वारंवार नरड्याला वेलीनीं घट्ट बसविलेले कांटेरी फांस सोडवीत खोल अशा घाणेरडया चिखलाच्या डबक्यांतून रडत रडत, मोठ्या आशेनें मीं प्रवास केला, पण शेवटी काय ?
- नको !
अरे काळोखा !
असे कडकडा दांत खाऊन जिकडे तिकडे अशी तेलकट घाण पसरुं नकोस !
- माझ्या जिवाला आग लागली !
मला तडफडून मारुं नका रे !
- आ !
माझ्या तोंडावरचा हा धुराचा बोळा काढा !
नाहीं !
मी पुनः येथें येणार नाहीं !
अरेरे !
माझ्या आशेचा उंच डोलारा शेवटीं या काळोखांत विरुन गेला ना !
काय ?
येथें मोठमोठ्यानें रडायला सुरवात झाली ?
चला !
आधीं आपल्या स्वर्गाला परत चला ! ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा