गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कुणी टाकला डाका

कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे


कवी - चित्तरंजन भट

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?

आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा

"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा


कवी - चित्तरंजन भट

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

पटवती साऱ्या पुरातन ओळखी
कुठुन हे आले नवे माथेफिरू ?

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)


कवी - चित्तरंजन भट

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


कवी - चित्तरंजन भट

हमाली

विझल्या  कालांतराने  पोरक्या  मशाली
कालचा  कार्यकर्ता  पुन्हा  बने  मवाली

विरल्या  हवेत फ़सव्या  घोषणा  कधीच्या
पुनश्च  लोक आता  ईश्वराच्या  हवाली

ल्यालें  राजवस्त्रें ते गावगुंड  सारे
जनता- जनार्दनाला  ही  लक्तरें  मिळाली

उजवें  अथवा  डावें , भगवें  वा  निधर्मी
कोणी  पुसें  न  आता  दीनांची  खुशाली

आपल्या  दु:खाचा  वाहतो  भार जो तो
चुकली  कुणास  येथे  ही रोजची  हमाली


कवी - मिलिंद फणसे

शिल्पकार

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी मदार आता

विझलो जरी कितीही, मी संपणार नाही
हृदयातल्या आगीशी माझा करार आता

गावात  चोरट्यांच्या दिवसा उजेड नाही
तो सूर्यही कुठेसा झाला फरार आता

नाही अता उदासी, नाही अता निराशा
माझ्याच जीवनाचा मी शिल्पकार आता


कवी - प्रसाद
दिशाहीन एकटे भटकणे प्राक्तन बनले
एकांताशी बोलत बसने प्राक्तन बनले 

कॅमेऱ्यातील रोल संपला, हौस संपली
जुन्या स्मृतींचा अल्बम बघणे प्राक्तन बनले  

वाळूवरती तीच अक्षरे गिरवत बसतो
लिहिणे-पुसणे....पुसणे-लिहिणे प्राक्तन बनले
                  
श्वासांइतकी कठोर शिक्षा दुसरी नाही
पाषाणासम निर्जीव जगणे प्राक्तन बनले


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - मोगरा
हे असे बागेवरी उपकार केले.
कत्तली करुनी फुलांचे हार केले

ठेवुनी शाबूत काया वार केले
फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले

ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा
पाडुनी भिंती घराच्या दार केले

पाहुनी तुजला चितेवरती   'इलाही'
तारकांनी अंबरी जोहार केले


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - जखमा अशा सुगंधी

मुक्त्तक

व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी

नसेल जर का, तुला भरवसा,
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्‌, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग `इलाही' सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे
प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण
निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण   

पानगळीच्या मोसमापरी गळू लागले तारे आता
कसे थोपवू उल्केसम हे कोसळणारे एकाकीपण       
          
कधीतरी तू पुन्हा भेटशील अनोळखी माणसाप्रमाणे
दिसेन  मी पण दिसेल का तुज गोठविणारे एकाकीपण           

हलाहलाचे कितीक प्याले एकदाच तू रिचाविलेस पण
सांग शंकरा पचवशील  का गोठविणारे एकाकीपण 


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - अर्घ्य

मुंबई

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला ‘इलाही‘ जाणवली मुंबई


कवी - इलाही जमादार
कवितासंग्रह – भावनांची वादळे

जमेल तितका जुलूम

जमेल तितका जुलूम जो तो करून गेला!
मला खुबीने हरेकजण वापरून गेला!!

किती बघा काळजी तयाला असेल माझी.....
मला गलबतापरीच तो नांगरून गेला!

न थांगपत्ता, अजून त्याची न गंधवार्ता....
वसंत आला कधी? कधी तो सरून गेला?

तुझ्या दुराव्यामधे अशी जाहली अवस्था....
तुझ्या स्मृतींनीच प्राण हा मोहरून गेला!

हरेक वस्तू घरातली ओरडून सांगे....
कुणी तरी वादळापरी वावरून गेला!

कळे न केव्हा असा शिशिर जीवनात आला!
मलाच आतून पूर्ण तो पोखरून गेला!!

विनाशकारी थरार केदारनाथमधला;
दुरून पाहून जीव हा गुदमरून गेला!

पहाड तो उंच एवढा ढासळून गेला!
क्षणात पाऊस त्यास, बघ, कातरून गेला!!

अशा प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला!

न राहिली एकही इमारत, सपाट सारे!
अता कुठे पूर तो जरा ओसरून गेला!!

क्षणात काही, प्रलय म्हणे तो निघून गेला....
सडा शवांचा चहूकडे अंथरून गेला!

स्वत: पुरानेच काळजी घेतली शवांची.....
शवांवरी सर्व रेत तो पांघरून गेला!

नशीब होते, तसेच ते धेर्यवान होते!
मुठीत धरूनीच जीव जो तो तरून गेला!!

दिला मला हात एकदा अन् निघून गेला....
तमाम आयुष्य मात्र तो सावरून गेला!

कुणी न डोकावले, तृषा पाहिली न माझी!
जथा  ढगांचा निमूट दारावरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला, 'ये' म्हणत राहिलो

सांत्वनाला तरी, हृदय होते कुठे?
रोज माझेच मी, मन चिणत राहिलो

ऐकणारे तिथे, दगड होते जरी
मीच वेड्यापरी, गुणगुणत राहिलो

शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो

ऐनवेळी उभे, गाव झाले मुके
मीच रस्त्यावरी, खणखणत राहिलो

विझत होते जरी, दीप भवतालचे,
आतल्या आत मी, मिणमिणत राहिलो

दूर गेल्या पुन्हा, जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा, रणरणत राहिलो

मज न ताराच तो, गवसला नेमका
अंबरापार मी, वणवणत राहिलो


कवी - सुरेश भट

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

व्यर्थ

सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
-दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
-खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
-मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
-हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
-व्यर्थ हा अमृताचा वसा


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना...
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

गडे हे बहाणे,निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली!

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे,हालचाली!

तुला आण त्या वेचल्या तारकांची,
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची;
लपेटून घे तू मला भोवताली!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

वय निघून गेले

देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले


कवी - सुरेश भट
गझलसंग्रह - एल्गार

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते..
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाढल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्याचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी,त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा.. तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकऱ्य़ाचा
लोकहो,माझा तरीही खून दर्जेदार होता!


कवी - सुरेश भट

भल्या पहाटे निघून आले !

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !


कवी - सुरेश भट

अबोलाही तिचा बोलून गेला!

अबोलाही तिचा बोलून गेला!
मला काही तरी सुचवून गेला!!

कसा मी वेंधळा इतका कळेना;
मला जो तो पहा हटकून गेला!

जरासे दार झाले किलकिलेसे....
नको तो आत डोकावून गेला!

जणू मी झाड जे रस्त्यामधोमध!
मला रस्ता स्वत: छाटून गेला!!

न पासंगासही माझ्या पुरा तो....
तरी टेंभा किती मिरवून गेला!

फळांनी मी लगडलो....चूक झाली!
दगड जो तो मला मारून गेला!!

फुले तोडून गेला....दु:ख नाही!
पहा काटेच तो पसरून गेला!!

पहा लोंढाच आला सांत्वनांचा....
जखम प्रत्येक अन् भिजवून गेला!

निसटला भोवऱ्यामधुनी जरी तो;
किनारा शेवटी बुडवून गेला!

दऱ्या बाजूस दोन्ही, बिकट रस्ता....
सुरक्षित जो मला घेऊन गेला!

विचारांचा जथा आला अचानक!
मनाला पार भंडावून गेला!!

न इतके दु:ख ग्रीष्माच्या झळांचे!
मला पाऊस वेडावून गेला!!

मतांची भीक मागायास आला...
हरेकालाच गोंजारून गेला!

खिरापत वाटुनी आश्वासनांची;
गरीबांनाच तो चकवून गेला!

किती पेरून साखर बोलला तो!
शिताफीने किती फसवून गेला!!

अशी बरसात शेरांचीच केली!
सभेला चिंब तो भिजवून गेला!!

न केले काय गझलेस्तव तयाने?
उभे आयुष्य तो उधळून गेला!

गझलसम्राट ना झाला उगा तो!
गझल जगला, गझल पेरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त - मृगाक्षी
लगावली - लगागागा/लगागागा/लगागा