फुलांची ओंजळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फुलांची ओंजळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नावात काय आहे ?

का आग्रह ? रसिका ! नाव सांग मज म्हणसी ?

नावात मोहिनी भासो सामान्यासी !

घननीलमणिप्रासादचंद्रशालांत,

ते असंख्य सुंदर तारे चम्‌चम्‌तात,

अनिवार इंद्रजालाते-टाकिती,

वसुधेस मंत्रमुग्धते-भ्रमविती,

संगूढ नेत्रसंकेते-वाहती,

हे विलास हरिती वस्तुजातह्रदयासी,

वद ! त्यांची नावे काय पुसाया जाशी ?

तरुलता प्रसूनान्विता राहती रानी,

संपूर्ण भारिती वनश्रेणी गंधांनी,

ह्या प्रमदवनांतरि शिरले-जे जन,

तरुलताचि अंगे झाले-आपण,

निज नामरूपही गेले-विसरुन,

आनंदसमीरण डोल देतसे त्यांसी,

टपटपा पडति खालती लूट कुसुमांसी !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कविनंदन

कविजनसंस्तुत काव्यदेवते वंदन तव पायी
क्षराक्षराचे जननी, व्यक्त प्रणवाचे आई !

’बालकवीचा’ जीवननिर्झर जाता ओसरुनी
दूर्वांकुरपुष्पांची त्यावर चादर पसरूनी,

चंदेरी दरियाचे काठी प्रेमप्रळयात,
निजल्या ’रामा’ अक्षयतेच्या वेष्टुनि शेल्यात,

ह्या दोघा रस-रंगा घेउनि अंतर्हित होशी
कोठे ? मागे टाकुनि उघडा कविजन परदेशी.

जाशी का तू पडली पाहुनि तख्ते दोन रिती
चिरंतनाच्या निर्झरिणीवरि पैलाडापरती ?

शाश्वतेचे भरूनि पाणी आणावा कलश
कुणा भाग्यवंताचे तेणे न्हाणावे शीर्ष,

अम्लान प्रतिभेची अद्वय लेणी लेववुनी
स्वानंदाचे लगबग उतरुनि लिंबलोण वरुनी,

दोन्ही सिंहासनी तया एकाते बसवावे
प्रयाण करिती झालिस का तू देवी या भावे ?

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही !

आधुनिकांचे कविते बाई ! अझुनी तुजवरचा
रोष न सरता होई काही विद्वद्वर्यांचा.

नूतन चालीरीती नूतन भूषावेषांना
भावाविष्करणाच्या नूतन घेशी धाटींना.

बाळपणे तू उथळ जराशी, अल्लड वृत्तीची,
सौंदर्याची अस्फुट अंगे कोर्‍या रंगाची,

लाजेच्या सांजेचा नाही मुखमंडळि मेळ
अवगत नाही अझुनि चोरटा नेत्रांचा खेळ,

नटचंचल बावरा झडे फुलछडीचा न नाच
जाणपणाची अझुनि लागली नच मंदहि आच,

कोमल कलिकेमधली अस्फुट मधुसौरभसृष्टी
बादलछायेआडिल किंवा चंद्राची दृष्टी,

अथवा, दृष्टीपुढची अस्थिरसृष्टी बाळाची
लाट जणो तू स्वर्भूःसरितासंगमलीलेची.

प्रौढ कलाढ्यत्वाचे वारे अंगि न जरि वाजे
मुग्धदशेची चंचलता तुज कुलजेते साजे.

कारकसंधीरूपे व्याकरणातिल सूक्ष्मतर
रसरीत्यादिक साहित्यांतिल दगडांचा चूर,

बूझ कशी या नियमे व्हावी तव माधुर्याची,
अगाध लावण्याची, निस्तुळ रूपारीतीची ?

ह्रस्वदीर्घवेलांटीमात्राशास्त्री जी घेती
जुनी मापकोष्टके जराशी बाजुस सारा ती.

होता केव्हा, काही, किंचित्‌, संप्रदायभंग
रंगाचा बेरंग काय हा अथवा बेढंग ?

कवितेच्या साम्राज्यामधली ही का बंडाळी
तेणे होते काहो त्याची राखरांगोळी ?

शुद्ध मराठी धाटी साधो कोणा अथवा न
गीर्वाणप्रचुरा रचना ती केव्हाही हीन.

शब्दरूपसंपदा ’रांगडी’ वाळावी म्हणुनी,
’रांगड’ अथवा ’नागर’ हे तरि ठरवावे कोणी ?

संस्कृतभाषानियमांची का तुजवरि बळजोरी
स्वतंत्र अस्तित्व न तुजला की झाली वाढ पुरी ?

नागर कुल तव, नागर लोकी सारा व्यवहार,
नागर वाङ्मयदेशी सतत करिशी संचार.

इथुन आणखी तिथुनि आणिशी रत्‍नांचे हार
समृद्ध आम्हाकरिता करिशी भाषाभांडार

बिंदु बिंदु रक्ताचा, कण कण देहाचा, उमले,
विकास सौंदर्याचा र्‍हासानासाविण चाले !

अथांग अव्यक्तांतुनि होशी निजलीला व्यक्त
तुझे तूच निर्मिशी प्रसाधनशासन अभियुक्त.

मृगजळ पाणी भरुनि रांजणी पढिका फुंजू दे
सौंदर्याच्या कुंजी आम्हा रुंजी घालू दे.

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही

काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नादमधुर मेळ
अर्थचमत्कृतिचाही नोहे डोंबारी खेळ.

निसर्गसृष्टीची सादृश्ये, नीतिपाठ भव्य,
थाटदार घाटाची रचना केवळ नच काव्य.

ऐश्वर्यात्मक सामर्थ्याची निर्माणक्षमता
अंतरंग ओथंबुन ओसंडे ती ’सुंदरता’

केवळ सौंदर्याची स्फुरणे प्रस्फुरणे दिव्य
जिव्हार हेच स्वानंदाचे. -’सौंदर्यचि’ काव्य.

या सौंदर्यस्फुरणा म्हणती ’चैतन्य-स्फूर्ती-
प्रसाद-भगवंताचे देणे-नैसर्गिक शक्ती’.

देवी शारदा हीच. न हे स्थल अभ्यासा साध्य
लोकोत्तर काव्याचे हेचि प्रसवस्थल आद्य.

यास्तव कविजन अहंभाव सोडोनी संपूर्ण
प्रसादसिद्धीसाठी पहिले करिती तुज नमन.

देवि ! जशी तू, तसे तुझे ते भक्तहि, मज पूज्य
वंदन माझे गतास, त्यासहि असती जे आज.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रणयपत्रिका

प्रणति मम सख्याच्या पूज्य पादद्वयासी,
विजय सतत चिंती आपुली लीन दासी.

कितिक दिवस झाले ! आपले पत्र नाही
म्हणुनि बहुत चिंताग्रस्तचित्ता असे ही

सकल कुशल आहो श्रीहरीच्या दयेने,
किमपिहि न करावी काळजी मत्प्रयाने.

परि मम मन आहे खिन्न अत्यंत बाई !
कुशल कळविणारे पत्र ते कान येई?

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.

सुखकर सखया ती आपली रम्य मूर्ती
निशिदिनि दिसताहे पूर्ण साठूनि चित्ती

क्षणभर अपुल्या मी दृष्टीच्या आड होता
करमत नव्हते ना आपल्या होर चित्ता ?

विविध मिष करावे काम काही करिता
मजविण मग कैसा कंठिता काळ आता ?

दिनभरि सरकारी काम सारूनि येता
लगबग गृहभागी भागले, सांज होता

कवण तरि प्रतीक्षा सेर्ष्य दारी करील
श्रम मधुर विनोदे कोण सारा हरील ?

मदितर असताना जेवता वाढण्याला
खचित, खचित गेला घास ना आपणाला ?

निरलस दिनरात्री आपणाला जपाया
नच जवळ कुणीही काळजी योग्य घ्याया.

रजनिसमय येता झोप घ्यावीत भारी
परि कर नसताना आपुल्या त्या शरीरी

दचकुनि किति वेळा नित्य तुम्ही उठावे
गति कशि अपुली हो संप्रती, हे न ठावे.

प्रकृति कितितरी ती सत्य नाजुक आहे
विरम मम तुम्हाला, जाणते मी, न साहे

सुतनु अमित बाई ! क्षीण झाली असेल
मजसम अपणाला ध्यास माझा असेल.

तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

सदय, पण, सख्याच्या मानसा पूर्ण जाणे
तिळभर असली ही कल्पना व्यर्थ घेणे !

मम विरह तुम्हाला जागवी शीण देई
स्थिति जरि असली का आपुली सत्य होई

तरि मग मज आहे इष्ट ही गोष्ट साच
सतत छळ सख्याचा हो मदर्थी असाच

जपुनि सतत वागा. काळ्जी सर्व सोडा.
प्रणय मजवरीच आपुला होन थोडा.

लिहुनि सकल धाडा वृत्त सोडूनि काम.
बहुत नच लिहिणे, हा मदीय प्रणाम.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

वेडगाणे

टला-ट रीला-ई

जण म्हणे काव्य करणारी.

आकाशाची घरे

त्याला प्रकाशाची दारे

ग्रहमाळांच्या वर अडसरी ग,

जन म्हणे काव्य करणारी.

पाचूंच्या वेली

न्हाल्या लावण्याच्या जली

दारी उभ्या स्वर्गीय नरनारी-ग,

जन म्हणे काय करणारि.

उडुगणांच्या यानी

बसुन विश्वाची राणी

अनंताची प्रदक्षणा करी-ग,

जन म्हणे काव्य करणारी.

चंद्राचे हसणे

वायूचे बरळणे

सृष्टिसुरात सुर मी भरी-ग,

जन म्हणे काव्य करणारी.

मी न तुझी-त्याची

मी न माझी-कुणाची !

ब्रह्मांडाच्या घडामोडी करी-ग,

जन म्हणे काय करणारी.

दिव्य भोगांच्या खाणी

गाय मनोमय वाणि

कशी वदेल राठ वैखरी-ग,

जन म्हणे काव्य करणारी.

टला-ट-रीला-री

जन म्हणे काव्य करणारी


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रमिला

राहे सत्कविकल्पनेत, सवितातेजात, जी दिव्यता
जीच्या ती नयनी वसूनि वितरी मांगल्यसंपन्नता

ती निद्रावश होय आज रमणी एकान्त शय्येवर.
वाटे की निजले निरभ्र गगनीनक्षर हे सुंदर !

येता दृष्टिपथात मी, मिटुनि जे संकोच पावे अती,
ते निद्रेत मुखारविंद फुलले मंदस्मिताने किती !

स्वच्छंदे प्रतिकरिता मजप्रति, प्रोत्साह ये ज्या नव,
हाले हात मृणालनालसम, तो माझा करी गौरव !

त्वा कैलास विरोध आजवर जो माझा सखे-साजणी !
त्याचा हा अनुताप काय दिसतो झाला असे त्वन्मनी ?

हे ओष्ठ स्फुरतात, आतुर जणो माझ्यासवे भाषणी,
निद्रा ही उपकारिणी प्रगतली, घाली हिला मोहनी !

माझी मूर्ति असेल सांप्रत हिच्या ह्रन्मंदिरी स्थापिली,
न्हाणोनि प्रणये, सुनर्म सुमने अर्पून आराधिली,;

झाले सस्मित आस्य, नेत्र उघडे ईषत्‌, कपोली कर,
रामा मंगलदेवता रमतसे निर्वैर शय्येवर

वाहे तो सरिदोघ, जोवै असे त भूवरि भूधर,
नक्षत्रांसह चंद्रसूर्य असती व्योमात की जोवरः

राहो तोवर ही अशीम विषमा निद्रिस्त रामा स्थिर,
मी राहीन असाच पाहत उभा हे चित्र लोकोत्तर !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पिंगा

माझा पिंगा गोड गडे
अद्वयरंगी रंग चढे.

नाचण मी मुळची मोठी,
उद्भवल्या माझ्या पोटी

कोमल नवनीतापरिस,
ज्योत्स्नेहुनि कान्ती सरस

दिक्‌रागाहुनि दिव्यतर,
चंचल चपलेच्याहि पर

वृत्ति गोरट्या अकलंकी-
माय तशा झाल्या लेकी !

प्रसन्न ह्रदयाच्या कोशी
असती सौरभसराशी

त्यास लुटाया पोटभरी
वृत्ती झाल्या हो भ्रमरी !

गोंगाटाला थांबविले,
श्रवणमनाला कळु न दिले

कौशल्याची नवलाई
रस चोरुनि प्याल्या बाई !

तो प्रमदांचा संभार
लोटुनि आला अनिवार,

बळेचि माझा धरुनि कर
मज केले वृत्याकार

धुंद नशा भरली नेत्री,
जीवन मुसमुसले गात्री.

गुरुलघुतेची कृत्रिम ती
पार उडाली मम भ्रांती.

मिळून आम्ही सर्वजणी
नाच मांडिला एकपणी.

अनेक नेत्रांचे बघणे,
अनेक कंठांचे गाणे

अनेक चरणांचे जाणे,
अनेक चित्ताचे स्फुरणे,

दृष्टी, वाणी गती, मती
एकच येथुन तेथुन ती.

प्रवाह बहुमुख जो होता
वाहे एकमुखे आता,

वृत्तीचे बळ मज मिळता
विश्व सहज आले गिळता.

पिंगा माझा सोन्याचा,
पंजर रत्‍नाचा त्याचा,

पहा ! उघडिले दाराला,
पिंगा आकाशी गेला !

पिंगा माझा अलौकिक
शोधुन आला भूलोक.

चारी खाणी मी वाणी
सांगितले त्याने कानी !

पिंगा गेला स्वर्गाला.
भूवरि घेउनि त्या आला.

अंघ्‍रितली दडपुनि त्याला
नाच वरी म्या मांडियला !

दानव मानव सुरासुर
मी, मजविण ते निःसार !

मी येता उदयोन्मुख ते
जग तेव्हाची संभवते !

दुर्बलपण पहिले गेले,
क्षुद्रपणातुन मी सुटले,

जीर्णबंध सारे तुटले,
मी माझी मज सापडले !

स्वार्थजनित सद्‌गुणभास
जडले होत अंगास

ते गुण झाले मम धर्म
प्रेमास्तव आता प्रेम !

तारा सारंगीवरल्या
सम सुरी लागुन गेल्या;

भूते आली साम्याला
मोहर आनंदा आला !

विश्वबंधुता एकांगी
न पुरे माझ्या पासंगी,

भूते मी मजला नाते-
द्वैत कसे हे संभवते ?

मज कसले जाणे येणे !
भाव-अभावाविण असणे.

बुदबुद हो की कल्लोळ
अर्णवपद माझे अढळ !

काय करू पण कसे करू !
मीपण माझे का विसरू ?

’दीपकळीगे ! दीप्तीला
सोड-’ म्हणे का बुध तिजला ?

म्लानपणाविण लावण्य,
क्षीणपणाविण तारुण्य,

मंगलमांगल्यायतन,
नित्यानंद निरावरण,

विश्ववैभवालंकरण,
ते माझे ते-स्वयंपण !

पिंगा आला भर रंआ,
आत्मभाव भिडला अंगा.

नाच परी मम राहीना,
स्वभाव मुळचा जाईना !

नाचा माझ्या वृत्तींनो !
नाचा भुवनसमूहांनो !

नाच आपला भूताला
होवो शान्तिप्रद सकला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रणयप्रयाण

भंगता दीप तेजाची मृत्तिकेत कलिका नमते.

देवेंद्रचापचारुश्री, विखरता मेघ, ओसरते.

विच्छिन्नतंतुवीणेची श्रुतिरम्यरवस्मृति नुरते.

प्रस्फुट प्रीति नंतर ती, उद्गारमाधुरी सरते.

नष्टता दीप वीणा ती

सुप्रभा न सुस्वर उरती,

निर्मिती न अंतःस्फुरणे, संपता प्रणय, गीताते !

रागोर्मिरक्तचित्ताचे मग मधुर काव्य ते कुठले ?

नैराश्यजन्य नादांचे चिर निलय ह्रदय ते बनले.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

उध्वस्तसदनशालेच्या रंध्रांत वायु जणु बोले !

सागरी निमाले कोणी,

त्यावरी घोर घोषांनी

जणु आक्रंदन वीचींनी मांडिले विकलचित्ते ते

ह्रदयांचे मेलन होता पाखरू नव-प्रीतीचे

त्यागिते प्रथम त्यामधले कोटर प्रबलबंधांचे;

अबलांतरि वसते घाले सोसाया पूर्वस्मृतिचे.

बा प्रणया ! भंगुर सगळे

वस्तुजात म्हणसी इथले,

का क्षीण सदन मग रुचले स्वोद्भवस्थितिप्रलयाते ?

तुज विकार आता ह्रदया ! आंदोलन देतिल खासे,

शैलाग्रकोटरी गृध्रा हालवी प्रभंजन जैसे.

तुज हसेल तीव्र प्रज्ञा अभ्रांत जसा रवि हासे

तव तुंग नीड ते कुजता,

कोसळूनि आश्रय नुरता,

हिम पडता, पल्लव झडता, उपहासित होशिल पुरते !

दीपज्योतीस

सोन्याची तनु जाळितेस अपुली पाषाणमूर्तीपुढे,

मुग्धे ! ते वद कोण पुण्य तुझिया हातास तेणे चढे ?

सारे विश्व बुडे तमात तिकडे भांबावुनी बापुडे,

गे ! निष्कंप, तुला परंतु इकडे, ही ध्यानमुद्रा जडे.

घ्याया कोंडुनि मंदिरात जगदुद्यानी न तू जन्मली,

वाया नासुनि जावया नुगवली बागेत चाफेकळी !

व्हाव्या वर्धित वस्तु ज्यात वसते सौंदर्य अत्युत्कट,

इच्छा केवळ की ! न वस्तुसह ते पावो जगी शेवट.

प्रत्यंगी अवघ्या प्रकर्षभर ये ज्यांच्या पुरा मोडुन

त्यांच्या पूर्णपणास सुस्थिरपणा येथे न अर्धक्षण,

पूर्णोत्थानपनकाल तोच पतनप्रारंभही होतसे,

ऐसा निष्ठुर कायदा सकल या सृष्टीत शासीतसे !

येथे नूतनजीर्ण, रूप अथवा विद्रूप, नीचोत्तम;

न्यायान्याय, अनीतिनीति, विषयी संभोग का संयम;

जाती ही भरडोनि एक घरटी, एकत्र आक्रंदत,

आशा भीतिवशा म्हणूनिच मृषा स्वर्ग स्रुजी शाश्वत.

हे विषम्य असह्य ’होतसमयी’ स्थापावया साम्यता,

तेजोवंत यदा यदा त्यजुनी ती प्रेतोपमा स्तब्धता;

अन्यायप्रतिकारकार्य करिती नाना प्रकारान्तरे,

दारी बंड ! घरात बंड ! अवघे ब्रह्मांड बंडे भरे !

हे लोकोत्तर रूप तेज तुजला आहे निसर्गे दिले,

की तू अन्य तशीच निर्मुनि जगा द्यावीस काही फले;

दाने दे न कुणा निसर्ग ! धन तो व्याजे तुम्हा देतसे,

ते त्याचे ऋण टाक फेडुनि गडे ! राजीखुशीने कसे !

होता वेल रसप्रसन्न फुटुनी येतो फुलोरा तिला,

ती आत्मप्रतिमास निर्मुनि हसे संहारकालानला;

’वाडा आणि जगा’ निसर्ग म्हणतो सृष्टीस भूतात्मिका,

डोळ्यांनी उघड्या पहात असता होशी गुन्हेगार का ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

वात्सल्य

पूर्वेला स्पर्शुनि शशि अस्तंगत झाला,

उदरस्थ बिंब तदनंतर ये उदयाला.

पाहता पुत्रमुख अश्रु तिचे ओघळले.

हिम होउनि होते ते सृष्टीवर पडले.

व्योमस्थ दृश्यसाम्य ते तदा महिवरले

पाहिले; नष्ट शैशवस्मरण टवटवले.

निष्कलंक मुख, विस्तीर्ण भाळ तेजाळ,

तनुवर्ण धवल, करुणालय नयन रसाळ.

ती मातृदेवता उंच समोर करात

शिशु धरूनि होती तन्मुखदृक्‌सुख पीत.

या निखळ सुखाचा सहकारी प्रेमाचा

तो होता तिजला अंतरला जन्माचा.

दामिनीदामसम दारुणतर ते स्मरण

हदरवी स्फुरुनिया तदीय अंतःकरण.

ह्रदयाच्या दिसला खोल कपारी आत

शून्याचा अंधुक देश अपार अनंत;

दुःखाचा अन्तःप्रवाह वाहत होता,

ओलावा त्याचा स्फोट मुखी हो करिता.

पूर्णस्थ बिंदु म्रुदु गंधवाह हलवोनी

दो बिंदूंचे करि एकजीव मिळवोनी;

या विश्वकदंबी तेवि मातृबिंदूते

शिशुबिंदु मिळे जगदंबदयामृतवाते

आरक्तरेणुरविहास्य उधळले तिकडे,

ते उदित बालसुमहास्यपरागहि इकडे.

ते बालभानुपदलास्य नभावर चाले,

ते मातृह्रदावर चंचल शिशुपदचाळे.

पाहता प्रभाती बालजगा वर खाली

कृष्णस्मृति संपुनि मातृमुखी ये लाली,

सद्‌गदित ह्रदय तद्‌गात्रांसह थरथरले,

नेत्रातुनि अविरत वात्सल्याश्रु गळाले;

वात्सल्य दिसे ते बहुविध विश्वविकासी,

ते विश्वात्म्याचे विमल हास्य अविनाशी,

ते स्वार्थसमर्पण धन्य परार्थासाठी

प्रत्यक्ष निर्मिते स्वर्ग धरेच्या पाठी.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

चाफा

चाफा बोलेना, चाफा चालेना,
चाफा खंत करी काही केल्या फुलेना ॥ध्रु०॥

गेले आंब्याच्या वनी

म्हटली मैनासवे गाणी

आम्ही गळ्यात गळे मिळवून.

गेले केतकीच्या बनी

गंध दर्वळला वनी

नागासवे गळाले देहभान.

आले माळ सारा हिंडुन

हुंबर पशूंसवे घालुन

कोलाहलाने गलबले रान.

कडा धिप्पाड वेढी

घाली उड्यावर उडी

नदी गर्जुन करी विहरण.

मेघ धरू धावे

वीज चटकन लवे

गडगडाट करी दारुण.

लागुन कळिकेच्या अंगा

वायु घाली धांगडधिंगा

विसरुनी जगाचे जगपण.

सृष्टि सांगे खुणा

आम्हा मुखस्तंभ राणा

मुळी आवडेना ! रे आवडेना !!

चल ये रे ये रे गड्या !

नाचु उडु घालु फुगड्या

खेळु झिम्मा, झिम्‌ पोरी झिम्‍-पोरी झिम्‌ !

हे विश्वाचे आंगण

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण

जन विषयाचे किडे

यांची धाव बाह्याकडे

आपण करू शुद्ध रसपान.

दिठी दीठ जाता मिळुन

गात्रे गेली पांगळुन

अंगी रोमांच आले थरथरून

चाफा फुली आला फुलून

तेजी दिशा गेल्या आटुन

कोण मी-चाफा ? कोठे दोघे जण ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

निवेदन

रम्य संध्येसम बालपल्लवांनी

मधुस्यंदी माकंदमंजरीम्नी

गुंफिलेल्या एकान्त निकुंजात

कूजनप्रिय रमतात खगव्रात !

मंद विचरे मधुमत्त गंधवात,

शान्ति विश्रमली ज्या स्थली नितान्त,

चाल कुंजी त्या; गूढ इंगिताला

कथिन तुज मी अव्यंग शुभांगीला.

दिशा उत्कंठित अंबर प्रसन्न,

उदय पावे शशिबिंब रसक्लिन्न;

रूप पाहुनि हे सृष्टिसूंदरीचे

स्तब्ध झाले चांचल्य निसर्गाचे

दिव्यगंगातीरस्थ वल्लरीला

मुकुल आले त्या एक निर्मलेला;

वाहुनी ते मद्भाग्यगंधवाहे.

दिले येथे आणून वाटताहे.

अपार्थिव जे संगूढ भाव चित्ती

व्यक्त संज्ञेने मात्र करू येती;

स्पष्ट करिता ते बळे, सर्व जाते-

कान्ति, मार्दव, सौरस्य त्यातले ते !

ओढ तत्रापि स्तब्ध बसू दे ना,

समुत्सुक मन संकल्प करी नाना,

भ्रमति ऐक्या विशयीच ते क्रमाने

रत्‍नसानु-ग्रहमालिकांप्रमाणे !

होय खळबळ जी अंतरी मदीय,

भ्रमणवेगाची तीव्रता तदीय

स्पंद ह्रदयाचे स्तब्ध निकुंजात,

काहिबाही करितील तुला ज्ञात !

कुंज आधी सम्मोहनीय भारी,

वरी रमणीसहवास मनोहारी !

भ्रान्त होउनि बरळेन जरी काही

दोष माझा तिळमात्र त्यात नाही !

नभी दोषाकर हा पहा उदेला,

भ्रंश मनुजाच्या पाडितो मनाला;

गोड इंदूचा आणि पिसाटाचा

सिद्ध आहे संबंध अनादीचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आशादेवी

झाली पश्चिम लाल लाल सगळी रक्तामधे माखुन,

गेली माजुन मानदर्पमदिरा बेहद्द ती प्राशुन;

प्रेतांनी भरले नभातिल दरेकोरे तयांच्यावर

मांसाच्या चिखलात मुक्त फिरते ही भैरवी भेसुर.

होती पूर्व ! उषासखी, गुणवती, सत्वाढ्य, तेजोवती,

जीचे नित्य मृदुत्व लज्जित करी जाईजुईशेवती;

ती हा प्राणिविनाश घोर बघुनी उद्विग्न झाली पुरी

शिंतोडे पडले अशुद्ध उडुनी तन्मंगलश्रीवरी.

रक्ते रंजित भोग काय करणे प्रीत्यर्थ त्यांच्या रणे ?

येथे सात्त्विक संपदा न मिळती का रक्तपाताविणे ?

आहे मानवजाति आक्रमित का उत्क्रान्तिपंथाप्रती ?

शंका त्रासविता अशा, दिसुनि ये तो चित्राकृति.

"होते सर्व सभोवती पसरले संदिग्ध श्यामाम्बर,

काळ्याशार ढगात थेट शिरता भूगोल हो गोचर;

तारा लोपुनि सर्व एक सरसा अंधार हो वाढता

तेथे पश्चिम पूर्व कोण कुठल्या ? सार्‍या दिशा आटता.

विश्वातील समस्त वस्तुमधले सौंदर्य जे जे असे,

नेत्रींच्या पुतळीकडून जपुनी वेचूनि घ्या ते कसे !

चित्ताची बनवून मूस, तुमच्या सत्कल्पनेच्या करे

ओता मूर्ति तुम्हीच, कारण गिरा लाजोनि येथे सरे !

भूगोलावर त्या अधिष्ठित अशी कोणी कुमारी असे,

रुपा आत नव्या छटा उफळता ’न्यारी’ खुमारी दिसे !

अंगांगे गळली, तशीच मळली खेदे मुखश्री, किती,

स्कंधिचा सरला जरी पदर तो नाही तिला शुद्ध ती.

आकांक्षा, असहायता, अबलता, चर्येवरी रेखले

होते भाव, तयास पाहुनि झणी पाणी मुखीचे पळे;

स्नेहस्निग्ध नसे तिची नजर, ती शून्याकडे लागली,

वाटे स्वप्नदशेत चूर सगळी वृत्ती तिची जाहली !

वीणा एक जवाहिरे जडविली होती, जियेच्या वरी

तारा सर्व तुटोनि एक उरली बाकी, तियेला जरी

होती छेडित ती तशीच बसली काढीत तारेतुनी

नाना सुस्वर मालिका, मृत मना चैतन्य दे तो ध्वनि !

हे चेतोहर चारुचित्र विरले त्या चारुगात्रीसह,

झाला जीव विषादजन्य ह्रदयग्लानीमुळे दुस्सह;

आहे सर्वविनाश ’आ’ करुनिया आता समीपशित,

यत्‍नाच्या परमावधीविण टळेना, तो असे निश्चित.

होते कार्य न हो, तरीहि पडल्या काळात या कष्टद

गाणे पूर्वपरंपरादि महती हे शुद्ध हास्यास्पद;

तेणे काय फसेल धूर्त जग हे वाटे असे आपणा ?

हे तो केवळ आत्मवंचन ! पुरे आता जुन्या वल्गना !

विज्ञाने निगमागमात असती किंवा पुराणातली,

ती तेथेचि असोनि द्या ! गरज ना त्यांची कुणा राहिली

शान्तिप्रेम समत्व पाठ नसते गाऊची द्या आजला,

जे का मोहनमंत्रबद्ध असती माझे कवी त्यांजला.

आहे हा व्यवहाररूप अखिल व्यापार जो जो दिसे,

हे आहे जर मान्य, कायम ठसे त्याचे घडावे कसे ?

निर्मावे जग अन्यथा, त्यजुनिया वस्तुस्थितीला सदा

राष्ट्रात्मा अति पंगु पोकळ बने तेणे; नसे फायदा.

आहे बाल्यदशा दिसंदिस जरी वाढीस हा लागला

चालू मानववंश, हे न समजा की पूर्णता पावला,

हा तो नित्य चुके, प्रसंग पडती बाके, सदा काळजी !

खात्रीचा न उपाय एक म्हणुनी योजू नये काय जी ?

आयांचेच नसानसात उसळे ते रक्त जे दुर्धर.

ना बाहेर न आत खास जगती आम्हास जे दुष्कर;

देऊ तोंड नवीन काळ जर हा होऊन आम्ही नवे,

येते पालटता अम्हांसहि पुढे आल्या स्थितीच्या सवे.

आहे जोवरि एक तंतु उरला वीणेवरी शाबुत,

आशा अद्‍भु रम्य बोल असले राहील तो काढित;

ती होऊनि निराश, उज्ज्वल तिची स्वप्ने लया पावती

रक्षो एक तदा दया भगवती आम्हा प्रभूचीच ती !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

मनोहारिणी

पदन्यास लावण्यप्रान्ती ही करिते रमणी;

तारामंडित निरभ्रांबरी जशी रम्य रजनी !

शुभ्र कृष्ण वर्णातिल सारी मोहकता आली

नेत्री, गात्री, एके पात्री, ह्रदयंगम मेळी.

सम्मीलित ती कान्ति दिसे अति शान्त सरस नयना,

शशिकरंजित रजनीसम, जी प्रखर दिना ये ना.

उषा किरण, की अधिक झाक, जर या रूपी पडती

अनिर्वाच्य ती संगमशोभा अर्धी तरि जाती !

कृष्णकेशपाशावरी येती श्याम श्याम लहरी,

शुभ्र तेज मुखसरसिरुहावरि सुरुचिर लास्य करी.

मृदुमंगल मधुभाव आननी जे मुद्रित होती-

किती शुद्ध, किती रुचिर, उगम निज ते प्रस्फुट करिती

मृदुल कपोली हास्य मनोहर जे क्रीडा करिते,

भास्वत्‌ भाली शान्त तेज जे संतत लखलखते.

मूकचि त्यांच्या वक्‍तृत्वाने हिजविषयी पटते

साक्ष मनोमय पवित्र चारित्र्याची ह्रदयाते.

निर्वैर भूतमात्राच्या ठायी हिची चित्तवृत्ति

निर्व्याज प्रेमलभावाची ही रमणी मूर्ति.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आम्ही

अस्ताव्यस्त इतस्तता पसरली हाडे, युगे लोअली,

होते कोण कसे न आठवण ही कोणा जरा राहिली;

गोळा होउनि ती पुनश्च उठती, शून्ये बसू लागती,

होते कोण, किती असे जगऋणी, प्रत्यक्ष ते सांगती.

हे फुंकीसरसे घडोनि आमुच्या एकाच ये अद्‌भुत,

सामर्थ्ये पुरवीत आजवरती आलो जगा शाश्वत;

अंगा फासुनि राख खंक बनलो आम्ही फिरस्ते जरी,

आज्ञा केवळ एकटीच अमुची राणीव विश्वी करी.

श्रीरामात पहा प्रताप अमुचा, ऐश्वर्य कृष्णी पहा,

रुद्री उग्र कठोरता, सदयता बुद्धात साक्षात पहा;

ते आम्हीच महंमदास दिधली खैरात पैगंबरी,

ते कारुण्यहि आमुचेच उठवी जे ख्रिस्त मेल्यावरी.

भावी सत्कवि, ते चिकित्सक पटु, प्रख्यात अध्यापक

मंत्री नाविक वीर दार्शनिक ते व्युत्पन्न वैज्ञानिक;

आहे ह्या घडवीत आज अमुची चिच्छक्ति या भारती

मत्तां मर्दुनि द्यावया अभयता संत्रस्त भूताप्रति.

हिंदूस्तान पहावयास अमुच्या नेत्रे शिका, या कसे,

रोखायास तुम्हांस शक्ति मग या जंजाल काला नसे !

होते सृष्टि नवी, कलेवर जुने टाका, तुम्ही व्हा तसे,

हे ना होय तरी मरा ! न तुमची कोणास पर्वा असे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गिरीगान

उदयगिरीवरच्या पृष्ठी उदयोन्मुख सारी सृष्टि.

नित्यविकासपरायणता ही काळावर दे सत्ता.

ब्रह्मांडा घालुनि फेरी वायूंचा येती लहरी.

लपेटती त्या रणत्करा कणखर शैलाच्या शिखरा.

तेजाच्या लहरी येती उन्नतवक्षी आदळती,

परावृत्त तेथुनि होती भोताली प्रान्तोप्रान्ती.

अस्फुट वर्णाच्या पंक्ति अव्यक्तातुनि कोसळती,

उघडपणे रूपा येती हिमस्नात कलिकांवरती.

नेत्रास न अग्रे दिसती आढ्य द्रुम जेथे असती,

गवताचे छोटे पाते उत्साहे तेथे डुलते.

प्रचंड खगपंक्ती जेथे आकाशा फोडित जाते.

पतंग तेथे निःशंक फडकावी चिमणे पंख.

तुंगनगोत्संगी ललिता गंधलता दिसती झुलता,

कुसुमित कोरांटिहि पसरी निजरंगच्छबि-तनुलहरी.

एकेका हिमबिंदूची पाकसुरत लावण्याची

अत्यद्‌भुत अंतःसृष्टि गिरिशीखरी येते दृष्टी.

गत झाले ज्यांचे प्राण त्यास मिळे पुनरुत्थान

या शाश्वत प्राणागारी ऐश्वर्याच्या माहेरी.

विद्युन्मय स्वातंत्र्याचे श्वास वाहती अद्रीचे.

विशालता ही विकसविते व्यक्तिदृष्टिसंकोचाते.

परम सूक्ष्म अंतःकरणी निजकिरणी साक्षी कोणी.

रेखी दिव्ये; काही ती साम्राज्ये होउनी येती.

तडिलुताहास्यप्रभव उग्रवीर्य मारुतदेव

अजस्रबल वीरप्रवर दानवहंता वज्रधर

वरुण, सोम, पावक तरुण, अरुणादिक निजजनकरुण

सुरगण ते अनुदिन रमती गिरिशिखरश्रेणीवरती.

पुरा आर्यशस्त्रा यांनी विजय दिले संपादोनी,

ज्ञान देउनी अपरिमित त्रस्त जगा केले मुक्त !

उषःकाल तो आर्यांचा जनिता परमाश्चर्यांचा.

महोदार नवघटनेचा मानववंशविकासाचा.

भाग्याची ही उषा पुनः जरी प्राप्त व्हावी अपणा,

चला जाउ या गिरिगहनी महा सिद्धिमुलस्थानि !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

तू देशी न तुझे

तू देशी न तुझे, कशास मग मी द्यावे तुला आपले

दे माझे परतोनि चित्त मज जे ठायी तुझ्या गुंतले.

छे ! ते ठेव तसेच. नाहक नको तो शीण का की, हटे

माझे चोरुनि चित्त नेतिल पुन्हा डोळे तुझे चोरटे.

एका संकुचितान्तरी उगिच का चित्तद्वया दाटणी

दोघांना मिळणी जरी न घडते एकान्त एकासनी ?

कोठे ते सदयत्व सांग, ह्रदये फोडोनिया, आपणा

ठेवाया सजलीस दूर जरि तू स्नेहानुबंधाविना ?

वाटे प्रीति मला महा बिकट ही कूट स्वरूपे असे.

ती निर्धार मनास एकहि धरू देना. करावे कसे ?

भासे, आकळिले रहस्य सगळे प्रेयप्रमेयातले

तो तो चंचल होउनी मन पुनः शंकेमुळे गोंधळे.

चिन्ते, यास्तव जा त्यजून मज, तू खेदाहि जा, या क्षणी.

नाना व्यर्थ करूनि तर्क तुमच्या संगे झुरावे कुणी ?

माझे लंपट चित्त- तेवि सखिचे माझ्या ठिकाणी-असे

ऐसे भावुनि वाट पाहिन तिची निःशंक मी मानसे.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

विचारतरंग

नीलप्रभ निर्मल गगनी विशुद्ध वाहे सुरतटिनी

पारावारि समवटुनी रमती विबुधरमणरमणी.

चंद्र सुधामय पुष्करिणी गगनाला शोभा आणी

दीप्तींची लेवुनि दुकुले तारांगण तेथे जमले.

क्षुब्धार्णव जल मग्नाला दाखविती हे मार्गाला

भोगाचा कर्तव्याचा मेळ मनोहर हा साचा !

वाटे, तारा होवोनी विचारावे अवघ्या भुवनी

धरणीच्या ह्रदयावरती ठेउनि कर हसवावी ती !

विहंगमोत्तम की व्हावे आकाशी वरवर जावे !

नूतन नूतन प्राम्ताते आक्रमुनी जावे वरते.

उदयगिरीच्या पलीकडे बालरवीचा किरण पडे

प्रथम करुनि त्याला प्रणती शुभवार्ता कळवू जगती-

"घोर निशा संपुन गेली ! मंगल वेळ जवळ आली !

खंत सोडुनी कामाला लागा, रवि उदया आला

हताश जे झाले स्वजन चैतन्याचे संचरण

करणे त्यांच्या देहात भाग्य हे थोड्यांना प्राप्त !

सोप्या सोप्या शब्दांनी, स्फुर्तिसूत्राने गुंफोनी,

मंजुळ मंजुळशी गाणी रचुनी रसिकान्तःकरणी

हळू शिरावे चोरोनी जावे मीपण लोपोनी,

हौस मनी ही असे परी टीका तीते विफल करी !

अंतःकरणपटावर ती आत्यंतिक वेगे उठती

दिव्य लेख उन्मेषाचे धरावया ते स्मृति काचे.

बुद्धीच्या भिंगावरती बिंबित ज्या प्रतिमा होती

शब्दचित्र त्यांचे कसले नकळे काढिल मन दुबळे

सरस्वती कंठा भरण वाचुनि हे वरचे कवन

गद्गद वदला हासोन धन्य कवी ! कविता धन्य

शब्दचमत्कृति यात नसे, गांभीर्याचा लेश नसे,

सत्याचाही गंध नसे हनुमंताचे पुच्छ जसे !"

वानर होता नर झाला ग्रहण लागले ग्रहगोला

धूमकेतु गगनि आला विषय असे घ्या कवनाला.

सिद्धान्त घेउनि शास्त्रांचे करा कथन त्या सत्यांचे

पुरे पुरे कल्पना पुरे काळ मागला आज सरे.

थांबा थांबा रसिकवरा ! गदारोळ हा पुरे करा !

प्राण कल्पना काव्याला न कळे हे मतिमंदाला

एक न धड भाराभर ती चिंध्यांची खोगिरभरती

तुटपुंज्या ज्ञाने फुगती रसज्ञ अपणाला म्हणती.

पंडितपन ते रसिकपण बहुधा असती ही भिन्न

दोहोंचा अन्वय एकी सांप्रत दुर्मिळ ह्या लोकी !

महाराष्ट्र कवि परंपरा खंड न पडला तिला जरा

उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी.

भौतिक शास्त्री या काव्यी कल्पनाच वैभव मिरवी

अभेद मज दोहोत दिसे कोण शहाणे, कोण पिसे ?

जे जे विश्वी ज्ञेय असे त्यात कल्पना मात्र वसे

करा कल्पना वजा बरे म्हणजे बाकी शून्य उरे

संगम ह्रदयंगम साचा मृणाल अलि या युगुलाचा

अथवा सज्जन रसिकाचा सहजमनोहर कवितेचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अनुकार

दोष कुणाला ? एकदा निखालस बोल.

भूभृत्कटकावृतवनखंडी,

कटु वाग्‌जल्पनतांडव मांडी,

प्रतिध्वनिप्रति परिसुनि सांडी,

निज भानाला. एकदा निखालस बोला.

अंतर्वीणातंतुततींना

कठोर हस्ते करी ताडना,

कर्कश रव कर्णी पडताना

येत रळीला. एकदा निखालस बोला

निःस्वार्थी सारस्वत तीर्था

पंक त्यावरी फेकी जाता,

कोणी या स्वैरास वारिता

निंदी त्याला. एकदा निखालस बोला.

प्रकृति-सद्‌भिरुचीचे युग्म

आहे प्राक्तन संस्कारासम.

विसरुनि तद्वैचित्र्य मनोरम

कोपा आला. एकदा निखालस बोला.

व्यासोच्छिष्ट जरी जग सारे

का झाले होतात पसारे ?

उष्ट्या जगती जन्म हरे ! रे !

का सर्वाला ! एकदा निखालस बोला.

विश्वविभूषण पुष्प हवे ना ?

दुखवुनि लघुगुरु तरुलतिकांआ

न मिळे ! आता पुरे विघटना.

जीव तान्हेला ! एकदा निखालस बोला.

अमोघ बळ शब्दांचे पाही,

आत साठवी अनन्तासही

शब्दे शब्द कसा मग जाई

हा हारीला ? एकदा निखालस बोला.

अंधार नगरचा उलटा न्याय,

अदंड्य दंडा भाजन होय;

पय घटिका परी, घड्याळ, हाय !

खाई टोला. एकदा निखालस बोला.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

नागेश

स्वैरालापमनोज्ञभावनिवहा तारस्वरे क्षेपुनी,

टाकी त्या मधुरे निनादनिकरे दिक्प्रांत संव्यापुनी,

तो प्रेमाकुल कोकिल स्वरमणीसाठीच ह्या रंजना

आरंभी यदि, काय ते न करिते सानंद अन्या जना ?

का होतोस विषण्ण काव्यविटपाग्रारूढ हे कोकिला ?

लागावा तुज वामने वद कसा पाषाण जो फेकिला ?

पादाघात- सरागवीक्षण - सुहास्यालिंगन -प्रोक्षणी

आहे वाग्वधुने सुमान्वित तुझा उद्यान केला क्षणी.

माते रानवटास ये न विविधालंकारनामावलि

गुंजा-कांचन-काचर‍त्‍न-निचये हो वा न हो वाकली

व्यापारी जन आदरोत असली लेणी; मदीयांतरी

आहे ती रुचिरा निसर्गमधुरा नागेशवागीश्वरी !

आहे भुषणहीन वाग्वधु तुझी ना व्यंजना का मुळी ?

हे आश्चर्य ! वधू विरक्त न कधी म्या ऐकिली पाहिली !

मुग्धा शास्त्र विदग्धधींस न पुसे, ते पूज्य हे तो खरे

व्हावी ही गुरुमंडळी पण- ? पुढे बोलू कशाला पुरे !

टीकाकारमतानुसार रचना जाता करू सत्वर

रम्योद्यान उजाड रान अवघे होईल, शंका नको !

व्हावा नष्ट ’विशेष’ इष्ट न मुळी वैचित्र्य याच्यामुळे

त्यांना काय रुचे मला न बहुधा त्यांचे न त्यांना कळे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

चांदणी

चकाके ’चुनी’ मुदीवरची, चांदणी तसलिच नवलाची !

साज नव तेजाचा करुनी लखाके किति कोमल किरणी

तिचे ते उदित तेज पिउनी जनवन गेले वहकोनी !

प्रौढपण निज निपत त्यजुनि बनली पोरच जणु धरणी !

गिरि गंभीरपणा त्यजुनी पाहतो शिर वरवर करुनी.

नेत्रपुट तृण झटपट मिटुनि खिळले चुळबुळ विसरोनी.

खगगण शब्दविषय फितुनी गेले ठायिच विरघळुनी !

जटिल वनदेव बावचळुनी भ्रमे वनि शमदम गमवोनी !

कुठे तो स्वर्ग, कुठे धरणी ! चांदणी त्यांची नच कोणी !

मग ही ह्रदयंगम करणी काय ये ’निष्कारण’ घडुनी ?

कर्कश शुष्क तर्कनिपुण प्राज्ञवर पंडित परिपूर्ण

मात्र हे विशाळ ’मणिगोटे’ भिजले नच सद्रसलोटे !

नजर न त्यांचेवर ठरते, उरावर जड दडपण पडते.

गहन विद्वत्ता परितापे प्राकृत जग थरथर कापे !

सुंदर मंजुळ मधु मृदुल भूतिबलमुदमंगल-मूल

भावमय सत्‌चित जग असले, त्यास हे प्रज्ञाघन मुकले.

चमक गे तारे ! तू गगनि आपुल्या शीतळ किरणांनी

शान्त सम शुद्ध तुझे तेज, रुक्ष जीवन रंगवि सहज.

खाच निज ह्रदय साच करुनी गाडिला जगदीश्वर ज्यांनी,

तुज ते ’अल्पतेज’ म्हणती, क्षुद्रपण उघडे निज करिती !

उंच अति-मनुजशिरावरती असे तव सतत सहज वसती.

तेज-अभिषिक्त ज्यांस करिते, तयांचे स्वय्म समर्थन ते

प्रौढपण मज निज विसरू दे, दिव्य तव तेज तेजी मिसळू दे;

शुद्ध अद्‌भुतरस उसळू दे, जगज्जीवन जगि कवळू दे.

काव्यगगनांगणगत नवल ’बालकवि’ तारा अति विमल.

हाहि सरसोज्ज्वल कविताही जीव मम बुडवी सुखडोही !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ