बा.सी.मर्ढेकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बा.सी.मर्ढेकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर

शिशिरागम हा बा. सी. मर्ढेकरांचा पहिला  काव्यसंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. 

कवितांना शीर्षक नाहीत, क्रमांक आहेत. 'शिशिरागम' ही पहिली कविता. बहुतेक कविता या शृंगाररसातील आहेत. चित्रदर्शी आणि गेय आहेत.

बहुतेक कविता 'सुनीत' वृत्तात रचल्या आहेत.

एकूण वीस कवितांचा हा संग्रह


मर्ढेकरांच्या शिशिरागम ह्या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितांवर रविकिरण मंडळाची−विशेषतः त्यातील माधव ज्यूलियन् ह्यांची−छाया दिसून येते.



शिशिरागम

 सूर कशाचे वातावरणी ?

सळसळ पानांची ? वा झरणी ?

खळखळ, ओहोटीचे पाणी ?

किलबिल शिशिरी केविलवाणी ?


कुणास ठाऊक ! डोळयां पाणी

व्यर्थ आणता; नच गार्‍हाणी

अर्थ; हासुनी वाचा सजणी

भास !- जरी हो खुपल्यावाणी.

शिशिरागम

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

फुलली असेल तुझ्या परी,
बागेंतली बकुलावली;
वाळूंत निर्झर-बासरी;
किति गोड ऊब महीतलीं !
येतील हीं उडुनी तिथे,
इवलीं सुकोमल पाखरें,
पानांत जीं निजलीं इथे.
निष्पर्ण झाडिंत कांपरे !
पुसतों सुहास, स्मरूनिया
तुज आसवे, जरि लागलें
एकेक पान गळाव्या
शिशिरर्तुच्या पुनरागमें.


कवी  - बा. सी. मर्ढेकर

 माळावरल्या बांधावरती विलोलनयना जरा

थांबली कटीं ठेवूनी करा.


पश्चिमभागीं बाल कुणि तरी देवदूत चिमुकला

चितारीत मेघावली रंगला.

नीलाकाशीं शुभ्र कापसी खांद्यावर जांभळी

झाक ही हलक्या हातें दिली.

डोळ्याखाली अफाट माळहि थेट पुढे लागला

तयावर आम्रवृक्ष एकला.

मोहर भरला, चूतमंजिरी उन्मादक परिमला

पसरवी लोभविण्या गे तुला.

चरतां चरतां दूर पांगल्या गाई कुरणावरी

चालल्या ओढ्याकाठुन घरी.


नजर नाचरी नागसुंदरी विलासिनी रोखुनी,

झरझरा जाताना हासुनी,

गालावरल्या गोड खळीने शराब जी सांडली

मुशाफिर-तृष्णा तिने भागली.

 तीरावरल्या भव्य शिलेवर एकाकी बैसुनी,

हाससी काय जलीं निरखूनी ?


मंद विखुरती मेघ गुलाबी गगनी, अवनीतली

गुलाबी पडली तत्सावली.

पादाग्राला चुंबुनि जातां झुळझुळणारे जल,

वाढवी कोमलता निर्मल.

तृणांकुरांवर बागडणारी बारिक पिवळी फुलें

पहुडलीं पदराखालीं पिले.

हिरवी राई पार पसरली हासत हलते तुला,

चालल्या कानगोष्टि कोठल्या ?

पल्लवभारे तव शीरावर लवलेल्या वेलिने

कांहि ना वनराणीला उणे !


मंजुल पवनी तरल लकेरी स्तब्ध करी पावलां,

सुचावा मार्ग कसा, जरि खुला ?

सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें

राहिले काय अता मागणें !

 वाचन-मग्ना पर्णकुटीच्या दारिं उभी टेकुनी,

कपोला अंगुलिवर ठेवुनी.


सडा शिंपुनी प्रातःकाळी, सुंदर संमार्जुनी,

काढली रांगोळी अंगणी.

कडेकडेने गुलाब फुलला टपोर कलिका किती

लाजुनी अर्ध्या तुज हासती.

बाल हरिण तव धावत येतां अनिमिष बघ लोचनीं

राहिला पाहत तुज थबकुनी.

तिरपा डोंगर-कडा भयंकर सरळ तुटे खालती,

मागुनी सूर्यकिरण फाकती.

झाडावरले पान हलेना, स्थिरचर संमोहुनी

जाहले मग्न तुझ्या चिंतनी.


पवनीं भरल्या अलकसुगंधे राणी बेहोषुनी

भारलो निश्चल त्वदर्शनीं !



 गुलाब जाई फुललेली । वाऱ्यावर करिती केली;

हास गडे त्यांच्यासंगे । सुमहृदया माला तूं गे;

नयनामधि निर्मल पाणी । सस्मित मधु अधरीं गाणीं;

गात गात आनंदूनी । नंदनवन बनवी अवनी.


मिटलेल्या कोमल कलिका । पानांमधि लपवी लतिका;

एकेकिस शोधुनि काढी । चुंबुनी ती फुलवी वेडी.

– हात नका लावूं कुणिही । कोमेजुन जातिल बाईं;

शब्द नका काढूं कुणिही । लपविल ही नाजुक जाई.


सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;

मंद गंध भवती भरती । पानपुष्प पुलकित करिती.

वर्षांच्या मागुनि वर्षे । जातिल तरि विसरुनि हर्षे;

पाहत तुज राहिन ऐसा । आनंदित वेडा जैसा.


चकित परि तन्मयता ही । प्रश्न करी आश्चर्यें की,

स्वर्गातिल सौंदर्याला । बहर कसा भूवर आला !

 दिव्यात्म प्रस्फूर्त हृग्दीत हें गोड गाईल कोणास गुंजारवी ?

आवेगुनी अंतरीचा उमाळा दाटून येतां कुठे ओतणे ?

उत्फुल्ल हृत्पुष्प ! आशादलांचा खुले रंग ! भोळी चढे टवटवी !

तत्केसरांच्या सुवासी परागां कुणां केस-भांगांतुनी पेरणे ?

उत्तुंग लाटा समुल्लोलुनी या सुहृत्सागराच्या नभीं चालल्या;

ही फेनमाला स्वर्गस्थिता कोण घेईल का तारका झेलुनी ?

मज्जीवनाच्या पहाटेस वृत्ती मनींच्या अशा तीव्र आतूरल्या;

शोधार्थ अदृष्ट रूपा ! म्हणूनी किती भागलों वाट ही चालुनी !

कुणी हासली; रम्य गोष्टी कुणांच्या; कुणी स्पर्शुनी अंग बेहोषवी;

कुणी लोभलीं; लोभ झाला कुणांचा; कुणी कीवलीं व्यर्थ रस्त्यावरी;

कित्येक ऐशी ! भ्रमिष्टापरी मी तरी – अंतरी एकला !- आळवी

रूपास ज्या, तें दिसेना कुठेही जरी थांबला सूर्य माथ्यावरी.


तें रूप येथे ! न् समुद्धारिणी भक्ति निशःब्द त्वल्लीन हो हर्षुनी

हा हाय ! निस्सार तों पार्थिवत्वांत निभ्रांत तूं राहसी गुंगुंनी.

कोणी नको अन् कांही नको, देवता तूं एकली !

हृदय जीतें अर्पिलें हें होउनी बद्धांजली !

वाटभर गे हा फुफाटा; पाय जाती पोळुनी;

सौंदर्य तूझें – सावली ही ! सार्थ झाली चालणी.

आग पोटी भावनेची ! ‘घाल तुकडी भाकरी’,

– हीहि परि गे, याचना ना आज तूझ्या मंदिरी.

मन्मनाच्या माळरानी भावना-झुडुपें जिथे

तग न धरती, प्रेम-तरु गे, फोफावणें कैचा तिथे !

जीविताचें ऊन विश्वीं जोंवरी हें तापतें,

फक्त तूझ्या दर्शनाची ही पिपासा लागते.


सौंदर्य-देवि सुहास, तूं ! मी फक्त आतुर दर्शना;

मेल्यावरी तर हीहि गे, उरणार नाहि तहान ना ! 

 सुन्न झालें मन, सुन्न भावना या,

भोवताली पसरली रात्र-छाया;

पावसाचा चुकविण्या मार घेती

पांघरूनी अंधार घरें रस्तीं.

“- व्यर्थ येतां का ? प्रेम कधी माझें

– शक्य नाही” – उतरिलें तिथे ओझें

बंद दाराशीं मग मुग्ध भावनांचे;

आणि धरिला मम मार्ग सिधा….

पावसाळी अंधार गारठ्यांत

काकडूनी हम-मार्ग-दिवे जात;

चिंब ओला जाहलों आणि थेट

दारूगुत्त्याला दिली प्रथम-भेट !

भेट शेवटली तशी प्रथम तीच,

झोपडीला परतावी माय-खेच.

माय असते, बाईल जरी नाही,

प्रेमवंतां तशि प्रेमवंचितांही.

दिवस झाले कित्येक त्या प्रसंगा;

आज आलों शोधीत गेह-रांगा;

बंद आहे तव दार; परि ओझें

आत नेलें उचलुनी कुणीं माझें !

 हां हां थांब ! नको सुहास, गमवूं तोंडातली मौत्तिके,

“देवाच्या घरचाच न्याय असला !” प्रश्नास दे उत्तर.

“झाला खेळ, अता पुरे !” वद असे धिक्कारुनी कौतुके,

जातांना उपहास-हास्य-ध्वनिही पाडीत कानांवर.


काळी भीषण रात्र कापित निघे हृत्स्वामिनी भेटण्या

काळा फत्तर तोंच होउनि पडे तारा सहाऱ्यावर.

स्वर्गाच्या मग मंदिरी चमकती जेव्हा सख्या चांदण्या,

किंचित् हासुनी तारका खुणविते – “आता कळे अंतर !”


झाला अंक समाप्त एक ! बदले ही भूमिका, वेष हा;

मी रस्त्यातिल गे भिकार कवि, तूं प्रासादशृंगीं रहा !

 आता अंत कशास पाहसि ? अता आभाळलें अंतरी;

विश्वाची घटना मला न उमगे; मानव्यता दुर्बळ.

केलें पाप असेल जें कधिं तरी मी जन्मजन्मांतरीं,

प्रायश्चित्त तदर्थ ना म्हणुनि गा, पाठीवरी हे वळ ?


न्यायाच्या निज मंदिरांत बसुनी साक्षीपुराव्याविना,

किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचुन,

न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना;

देवाच्या परि न्यायरीति असलें पाळील का बंधन !


होवो तृप्त – तथास्तु ! – निर्घृण प्रभो, ही न्यायतृष्णा तुझी;

फासाला चढल्यावरी नच दया याची, जरी पामर;

भूतां अप्रतिकारिता भ्रमविते यंत्रापरी शक्ति जी,

तीतें एक सहिष्णुता अचल अन् निःशब्द हे उत्तर.


किंवा हार्दिक बेइमान ठरतो नित्यांतला सत्क्रम,

तेथे प्रेमच एकनिष्ठ घडते अक्षम्य दुर्वर्तन !

 मायावी गुजगोष्टि गुलगुल मुदे; आलंगनी तत्पर;

किंवा चुंबनलोलुप स्मित सदा ओठांवर नाचरे !

झाली दंग सुहास, प्रेम-युगुलें ऐशी मजेखातर;

– विश्वाच्या बगिच्यांत हीं भिरकिती कालांबरी पाखरे.


हासे ज्या क्षणभंगुरत्व विजयें वाखाणुनी कौतुकें,

लीला या लटक्या बघून निमिषोत्फुल्ला सुदैवानिलें;

माझेंही तुज प्रेम काय गमलें या टर्फलांसारिखे,

ज्यांच्यातील जिवंत जीवनरसा सौख्ये असे शोषलें ?


नाही -! मद्हृदयीं सुरा खुपसतां मी आत्महत्येस्तव,

रक्ताची चिळकांडि ही उसळुनी एका कमानींतुन

येवोनी भिजवील कोमल तशा या शुभ्र पायां तव;

अन् तो स्त्रोत अखंड वाहिल तसा दिक्काल ओलांडुन.


घेतां आचमुनी पवित्र जहरी ही रक्तगंगा लव,

विश्वाचे अभिषिक्त देव तरुनी होतील ते – मानव.

 जा जाई आता, परतुनि कां हाससी ?

कां उगाच वळवुनि मागे

आपुली नजर, भारिसी ?


स्थितधी नजरी मी, मानी तरि मानिनी,

नच अवाक्षरही एका,

काढीन कधी भाषणीं.


ये वीणारव मधु, मंजुळ पवनांतुनी,

डबडबती ऐकुनि डोळे

कारुण्य-सुधा-सिंचनीं.


परि एकहि भोळा अश्रू जो तेथुनी

पडणार, तोंच घेईल

हृदयाग्नि तया शोषुनी.


धगधगित निखारा हृदयीं हा कोंदुनी,

मत्प्रसन्नवदनीं छाया

वरि शीतल चंद्राहुनी.


ही पाझरते तव शांत शरच्चन्द्रिका !

निशिगंध दरवळे भोती,

पुलकिता मार्ग-वालुका.


अदृश्य अप्सरा अवनीवर येउनी,

घुमविती निशा-संगीत

या मिटल्या पुष्पांतुनी.


मी मानव ! – दुर्बळ ! – दिव्य, धवल माधुरी !

व्याकळून हृदयीं येतां

स्मृति होइल तव अंतरिं .


हृतकंप ! – तरल भावना ! गोड ती स्मृति !

परि निष्ठुर जबरेने मी

गाडीन गाढ मी विस्मृतीं.


बंबाळ जखम आतली दाबतों अशी,

बेहिम्मत आर्तरवाने

रडतील रडो दीनशीं.


निष्प्रेम-निराशा-दुःसह जीवन तरी,

याचना न केविलवाणी

मम वदेल कधी वैखरी.

 झाली चूक ! – क्षमस्व ! वेड असलें जन्मांतुनी लागतें,

तेंही एकच वेळ ! नेत्र उघडे ठेवून ना दोनदा :

मौर्ख्याचा जगणें कलंक न असा लावून घेतां कदा,

सर्वांनाच कुठे शहाणपण हे देवाघरीं लाभतें !

ज्यांना संकट,

 आलों -स्वतंत्र तव भाव !-स्वतंत्रतेने

आराधण्या प्रथम तन्मय आर्जवाने,

प्रेमार्तता उघड बोलुनि दाखवीली

-शब्दांत, जे ठरति बालिश अन्य वेळीं.

दोघेंच आपण सुहास, न पाहणारा,

निश्चिन्त- चित्त बघ मांडुनि हा पसारा

विश्वासपूर्ण बसलों मम भावनांचा,

रागानुराग नि विनोदमय स्तुतीचा.

किंचित क्षणांत वरती ताव दृष्टि जावी,

अन हासरी चमक लोचनिं वेड लावी !

होतें निवांत; मन संशयशून्य, भोळें;

अर्थविना सरस-वाक्पटुताहि वोळे.

किंचित पुन्हा नजर ही वरती करून

तूं हासतां बघितले फिरवून मान,

-भांबावलों-स्तिमित-बावरलों- कळेना

कोठे, कसा, कुठुनि मी……..


तों विश्वनाट्यगृहांतुन या दिगंत,

हास्य-ध्वनी दुमदुमून भरे हवेंत;

अन रंगभूमिवरला जगतांत खास

गेलों विदूषक पुरा ठरुनी सुहास !

 गेलों विदूषक जरी ठरुनी सुहास,

दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आसपास

कोठे तरी स्वमरणोत्तर भाग्यकालीं -!

हाही विचार न कमी मज शांतिदायी.

 जातेस तरि सुखाने । जा आपुल्याच ठायां;

हृदयांत साठलेलें । गेलें न रूप वाया.

ही एक मुग्ध कलिका । ताऱ्यास वेड लावी,

परि तत्प्रभात-अश्रू । हृदयी डुजीच ठेवी,

आधार या तरूचा । वरती चढावयाला,

आलिंगणें लतेने । स्नेहें वरी दुजाला.

ही रीत काय नाहीं । येथील कोमलांची,

अपवाद त्यास कैशी । होशील एक तूंची !


रेताड जीवनांत । भवितव्यता-किनारीं,

अति तीव्र वेदनांनी । व्याकूळतां जिव्हारीं,

सौंदर्यरूप ईशा । भावें बघून हृदयीं,

मम पोळल्या जिवाला । लाभेल दिव्य शांती.


तारुण्य-रूप जातां । बघशील बावरून,

शांती अशांततेची । तूतें न तीहि जाण.

 मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तव एकसारखी;

हुरहूर भरून ये हृदीं; भर संध्या करि त्यांत आणखी.

बसलों म्हणुनीच येउनी — जग-कोलाहल लांब मागुती —

दगडावर त्याच, ज्यावरी गतकालीं तव स्निग्ध संगती.


पसरे लहरींत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;

निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.

अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,

“जरि वाट कितीहि चाललां, नच आता तरि अध्व-खेद तो.”

विहरून नभांत स्वैरसें घरटयाला निज शेवटीं त्वरें,

चिंवचींवित सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें.

मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनी,

लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,

श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे !”

मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.

हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;

अपघात घडून देह हा पडला एक रुळावर इथे,

बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,

कुठुनी तरि शक्ति ;…………………

 प्रीतीची दुनिया सुहास, हसते वाऱ्यावरी भाबडी;

स्वानंदें रमते समुत्सुक जनीं निर्हेतुका बापुडी;

अद्वैतांतिल मंजु गीत-रव तो आलापुनी गुंजनीं,

राही मग्न अशीच गोड अपुल्या स्वप्नांत रात्रंदिनीं.

आशांची बकुलावली विकसली मंदस्मितें भोवती;

ईषत्कंपितकल्पनाकिसलयीं निष्काम डोलेल ती !

चाखावा मकरंद त्यांतिल जरा; जावें, झुलावें जरा;

शंकाही नच की कधी वठुनि हा जाईल गे मोगरा.

सौख्याभाव नि सौख्य एकच इथे संवेदनाजीवनीं;

नीती आणि अनीति संभ्रम फिटे स्नेहार्द्र संभावनीं;

संध्यादेवि उषेसह प्रगटते आकाल निलांबरीं;

येई गे, अजरामत्व मरुनी निर्वेध ताऱ्यांपरी.


नाही हें नशिबीं ! — नसोच ! — मिटती जागेपणीं पापण्या;

आई ! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या.