साने गुरूजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साने गुरूजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मेंग चियांग - एक चिनी लोककथा

चीनमध्ये लूपू राजा होता. त्याचे मोठे उद्योग, अचाट आणि विचित्र! मानवी हृदयावर न कोरलेल्या गोष्टी विसरल्या जातात! परंतु घोर पापांच्या कथा, त्या कोण विसरेल? त्या युगानुयुग चालत येतात. शापित अशा कथा.

लूपूने साम्राज्य वाढविले आणि संरक्षणासाठी उत्तरेकडे भिंत बांधायचे ठरविले. भिंतीजवळ हाडांच्या राशी पडत आहेत. दृश्य बघून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. सर्वत्र जुलूम आणि भीति! आकाश रडू लागले, भूमाता रडू लागली. ग्रंथ जाण्यात येत आहेत, पंडितांना ठार करण्यात येत आहे, जिवंत पुरण्यात येत आहे. कायदा नाही, नीतिनियम नाही. धर्म सारा लोपला.

मेंग चियांग  निघाली. ती पतिव्रता सती. तिचा पती कामाला सक्तीने नेण्यात आला. ती रडत बसे. किती कृश झाली आहे बघा. गाल खोल गेले. डोळे निस्तेज. अरेरे. तिचे लक्ष उत्तरेकडे आहे. तेथे कडक हिवाळा आहे! माझा पति! पुस्तकांत रमणारा. नाजुक, सुकुमार! त्याच्याने दगडधोंडे विटा कशा उचलल्या जातील? कोण त्याची कींव करील? कठोर अधिकारी हुकुम सोडीत असतील, वादीचे चाबूक कडाड् उडवित असतील. हे का त्याच्या नशिबी असावे? हे घर स्मशान वाटते. कशी येथे राहू? किती वाट पाहू? हृदय दुभंगते. मी त्याला शोधायला जाणार, भेटायला जाणार! दहा हजार मैल का असेना अंतर! मी जाईन.

ती निघाली. ती कोमलांगी, कृशांगी निघाली. शरीराने दुबळी परंतु आत्मा वज्राचा होता. साधे सुती लुगडे ती नेसली होती. ना अलंकार ना काही. तिचे ते सौंदर्य हाच तिचा दागिना. सौंदर्याचा प्रकाश फेकीत वा-यांतून, वादळांतून, पावसांतून ती निघाली. जवळच्या गाठोडयात काय आहे? पतीसाठी हाताने तयार करून आणलेले गरम कपडे! उत्तरेकडे चावरी थंडी आहे. जात होती. वाटेत नद्या लागत आहेत. दिवस मावळत आहे. गायीगुरे घरी येत आहेत. चूल पेटत आहे, परंतु ती? तिला विसांवा नाही. अनन्त पृथ्वी, अनन्त आकाश! एकटी, हो एकटी. जा एकटीच रडत, अश्रूंचे सडे घालीत. पावले उचलत नाहीत. थकली बिचारी. पदर चिखलात पडत आहे; तिला भान नाही. ओचा सुटला; कळत नाही. ते उघडे हात थंडीने हिरवे निळे झाले.

जातांना तो म्हणाला होता, ''मी परत येईन काय भरवसा? राजाचा हुकुम! कोणी मोडायचा? आता एका उशीवर डोकी ठेवून आपण पाखरांच्या जोडप्यांप्रमाणे पुन्हा प्रेमाने पडणार नाही. प्रिय सखी, पतिव्रते, खोटे स्वप्न मनात नको खेळवू. मनात आशा नको. पुन्हा परत येणे कठिण आहे.''

नाथ, त्या शब्दांत करुणा होती. तुम्ही का माझा मार्ग मोकळा करून जात होता? आपले वैवाहिक जीवन का विसरलात? मासा आणि पाणी तसे आपले एकत्र जीवन. माझे हृदय शुध्द आहे. पातिव्रत्य हेच माझे बळ. मायबापांची शिकवण का विसरू? मी येणार तुझ्या पाठोपाठ, येणार भेटायला, तुला गरम कपडे द्यायला. तुला मदत करायला, दहा हजार मैल अंतर असले म्हणून काय झाले?

दु:खाने ती दग्ध झाली होती. जरा काही सळसळले तरी घाबरे. आज थंड चावरे वारे वहात आहेत. कावळे चालले घरटयांकडे. ही कोठे जाणार? घंटांचा आवाज येत आहे. मिण मिण दिवा दूरचा दिसत आहे. गाव आहे जवळ? गाव नव्हता. त्या जंगलात ते देऊळ होते. त्या लहानशा देवळात ती बसली. देवासमोर अश्रू ढाळित बसली, ''देवा, अश्रूंनी तुझे मंदिर मलिन करित आहे म्हणून रागावू नको. मुलीला क्षमा कर. मी दुर्दैवी आहे. थंडीवा-यात तुझ्या पायी निवारा; उबारा.''

तेथे जागा झाडून दात शिवशिवत ती झोपली. कोठली झोप? तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत! लहान मी. परंतु जाईन त्याला शोधीत.''

गालांवरून अश्रु घळघळले. ती पुन्हा जुडी करून पडली. स्वप्नात अस्थिपंजर पतीला ती बघते.

''कशाला तू आलीस?'' तो म्हणतो.

''नाथ, या, या,'' असे म्हणत त्याला ती हृदयाशीं धरू बघते, तुम्हांला ऊब देतें म्हणते.

बाहेर सों, सों वारा करतो. तिला जाग येते. अनंत तारे चमचम करीत असतात. सभोवती पृथ्वी धुक्यांत वेढलेली. हे स्वप्न दुर्दैवाचे सूचक का? तो नाही भेटणार?

तो स्वप्नात म्हणाला, ''माझी मूठभर हाडे, माझी माती, हीच तुझ्या अनंत श्रमांची भरपाई, दुसरे काय  तुला मिळणार?''

माझे विचार भरकटत गेले असतील. ते स्वप्न प्रचंड नद्या नि उंच पर्वत यांवरून येत होते. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झाले असावे. मी का त्याला मातीच्या खाली पाहीन? हे का माझ्या नशिबी असेल? निदान त्याच्याजवळ मीहि पडेन. हें का कमी?

उजाडले. धुके पडून सारे ओलसर आहे. कावळे हिंडू फिरू लागले. देवाला नमस्कारून ती निघाली. हृदयांत आशा-निराशा. म्हणाली, ''किती संकटे असोत, कष्ट असोत, पतिपत्नीचे ऐक्य - त्याची कसोटी आहे.''

दंवाने तिचे वक्ष:स्थळ ओले झाले आहे आणि अश्रुंनीही. कठोर वारा तिला मिठी मारीत आहे. ती थरथरत आहे. पतीला हांक मारून म्हणते, ''कोठल्या बाजूला वळू, कोठें तुला पाहूं? कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील? माझ्या कानांत कर्णफुलें घालशील? आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का? पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का? जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का? नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें? तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही?''
त्याची बायको तिला विचारी, ''बाई कोठून आल्यात, कोठे जायचे?''

तिचे अश्रू धावत येत. हुंदका आवरून म्हणे, ''भिंत, उत्तरेकडची प्रचंड भिंत! वेठीला धरून माझ्या पतीला त्यांनी ओढीत नेले. त्याला भेटायला जाते. हे गरम कपडे घेऊन थंडीवा-यांतून जात आहे. घरी रडत बसण्यापेक्षा हा दु:खदायक प्रवास बरा. त्याला शोधीत जात आहे. त्याला पाहीन नि शान्त होईन.''

''वेडी तर नाहीस तू मुली? शेकडो हजारो मैल कशी चालत जाशील? थंडीचा कडाका. वाटेत वाटमारे, डाकू, तू सुंदर आहेस. तेच तर भय. नको जाऊ. हे तुझे सुकुमार पाय.''

''सर्व नात्यांत पतिपत्नींचें नातें श्रेष्ठ. सर्व संकटांची मला जाणीव आहे. परंतु माझे वेडे हृदय. त्याला पाहिल्याशिवाय विसावणार नाही. परत नाही फिरायचे या निश्चयाने मी निघाले आहे. मग आमची भेट धरित्रीच्या पोटात व्हायची असेल तरी तेथे होवो.''

ती म्हातारी खानावळी बाई म्हणते, ''मुली; तूं एकटी मी येऊ का सोबतीला? एकीपेक्षां दोघी ब-या. हा थकलेला देह येऊ दे का तुझ्या संगे?''

''नको आजीबाई नको. तुम्ही प्रेम दिलेत, दया दाखवलीत. तुमच्या मरणाला का मी कारणीभूत होऊं? शिवशिव. नाही आजी, ते बरे नाही. तुम्ही मला आईचे प्रेम दिलेत. पति भेटल्यावर परतेन तेव्हा तुमचे ऋण फेडीन हो.''

आजीबाई आणि मेंग चियांग कितीतरी वेळ बोलत बसतात. मग डोळा लागतो. उजाडले आता. रात्रीचे पहा-याचे हांकारे थांबले. कोंबडा आरवला. ती उठली. कपडयांचे बासन घेऊन निघाली.

थंडी, थंडी, कडक थंडी. कशी ही जाणार, कशी चालणार? वारा, चावरा वारा. झोंबतो अंगाला. कशी ही जाणार? पायांची चाळण झाली. अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या झाल्या. कशी राहणार थंडी? धुके, बर्फ, सारे गार गार, तिची हाडे दुखत आहेत. रक्ताळ अश्रू गळत आहेत. सुस्कारे! ते पहा उंच पर्व दिसू लागले. भिंत जवळ आली का? उत्तरेची भिंत? ती पर्व चढू लागली. भिंत कोठे आहे ती विचारी. आणि एक शेतकरी म्हणाला, ''आता जवळच आहे. समुद्रापर्यंत भिंत आता भिडेल. अघोरी काम.''

तिचे हृदय आशेने फुलले. जवळ आली भिंत. समोरचाच रस्ता. त्याला बघेन नि सारे श्रम नाहींसे होतील. अश्रूंची फुले होतील.

भिंतीचे काम लौकर आटपा. अपार खर्च होत आहे. करांखाली प्रजा आहे. लौकर आटपा काम. डोंगरावर पाणी न्यायचे, दगड चढवायचे! पाठीवर कडाड् चाबूक वाजे. हजारो मरत. सभोती हाडांचे ढीग!

आणि फॅन चि लियांगला तर कष्टांची सवय नाही. हातात पुस्तक खेळवणारा, तो दगडधोंडे उरापोटी उचलीत होता. तो कसा वाचणार? त्याची वेठीची मुदत संपण्याआंतच तो मरणार! आणि खरेच काम करताना एक दिवस तो पडला, मेला! कामगार हळहळले. तेथे त्या विटांतच त्यांनी त्याचीहि समाधि बांधली! त्या भिंतीतच!

आज संक्रांत होती. सुटीचा दिवस आणि ती आली. कोणाला विचारणार पत्ता? ते पहा फाटक्या कपडयांतले बिगारी. ती लाज-या धीटपणाने पुढे होऊन म्हणाली,

''एक क्षणभर थांबा मित्रांनो.''
ती थकलेली होती तरी सुंदर दिसत होती. थोरामोठयांच्या घरातील वाटली. ते थांबले.

''येथे टेकडया आणि समुद्र मिळत आहेत. येथल्या कामांत माझा पति होता. फॅन चि लियांग त्याचें नाव. कोठे आहे तो?''

तो बांधकाम करणारे गवंडी होते. ते सद्गदित झाले व म्हणाले, ''त्याच्यासाठीच आज आलो आहोत. तो कोवळा तरुण होता, सुकुमार होता. श्रमाची सवय नाही. तो मेला. त्याचे प्रेत उघडे कसे टाकायचे? आम्ही त्याला पुरले. आज सणाचा दिवस. त्याच्या समाधीला फुले वाहायला, मैत्री दाखवायला आलो आहोत.''

ते बोलत होते, तिचे डोळे निराशेने जवळ जवळ मिटत आले. प्रियजनांचा चिरवियोग यासारखे दु:ख नाही. पतिपत्नींना जोडणारे नाते प्राणमय असते. पति मेला ऐकताच तिचा तडफडणारा, विव्हळणारा आत्मा शरीर फाडून जायला लागला.

शेवटची वेदनामय वाणी मुखातून बाहेर पडत आहे, ''नाथ, नाथ!''

ती पडली!

थोडया वेळाने पुन्हा सचेत होऊन म्हणाली, ''माझा पति किती सद्वर्तनी. तो प्रवचने करी, धर्मग्रंथ सांगे. तो परत येईल म्हणून कितीजण वाट पहात आहेत तिकडे. परंतु पाण्यांत दगड बुडावा तसा तो गेला. नाही, पुन्हा दिसणार नाही! शेवटचा निरोप घेताना तो जे बोलला त्याने पाषाणहि पाझरेल. म्हणाला, 'पतिपत्नींचे अभेद्य नाते असते. दोन पक्ष्यांचा जोडा. परंतु दुर्दैव ओढवले म्हणजे त्यांनाहि विमुक्त व्हावे लागते. पतीने पुरुषार्थ मिळवावा, कधी पत्नीला सोडू नये असे मला नाही का वाटत? परंतु येथे काय इलाज? पूर्वजन्मींच्या पापांची ही शिक्षा! दैवाला कोण जिंकणार? त्या लांब भिंतीपासून पुन्हा यायचा रस्ता नाही. आपण स्वप्नातच भेटू.' नाथ, तुमची वाणी खरी ठरली अखेर. मलाहि परत जायला रस्ता नाही! मला आता घर ना दार... मी मेल्यावर माझ्या देहाचे काय होईल चिंता नको. वारा माझ्या या भग्न हाडांची धूळ जगभर फेकील.'' ते बांधकाम्ये गहिंवरले व म्हणाले, ''नका रडू, पुसा डोळे, विसावा घ्या.''

तिने डोळे पुसले. ती शांत झाली व म्हणाली, ''तुम्ही माझ्या पतीला मूठमाती दिलीत. तुमचे उपकार कसे फेडू? हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत?''

''तुमच्याबरोबर आम्हीहि अश्रूंची तिलांजली द्यायला येतो चला.''

घट्ट पदर बांधून जड गांठोडे उचलून ती निघाली. हृदय फोडून अश्रूंचे पाट वहात येत होते.

ते पहा. भिंतीचे शेवटचे टोक, समुद्राला ते मिळाले आहे. खाली लाटा उसळत आहेत. आकाशाला भेटू बघत आहेत! ती म्हणाली, ''कोठे पुरलेत? दाखवा थडगे.''

ते म्हणाले, ''ही सारी सम्राटाची जागा. त्याची मालकी. येथे कोणाला कसे पुरता येईल? म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती.?''

तिने तो दगड पाहिला. वारा, पाऊस, ऊन यांना पुसून टाकता न येणारे नाव तिने पाहिले. तिची प्रेमज्वाळा पेटली, भडकली. ''नाथ, वेडया आशेने तुम्ही जिवंत भेटाल म्हणून आले. आणि आता का एकटी राहू? शून्य आकाशाकडे बघत? नाही, कधीहि नाही!''

तिचे प्रेम, तिचे पातिव्रत्य आकाशाला भेदून गेली. पातिव्रत्याची शक्ति विश्वाला हलवील. ती आपल्या पतीची हाडे मिळतात का पहात होती. आणि भिंत फाटली! दगड माती जरा दूर झाली. पतीची त्रिभुवन मोलाची हाडे मिळाली. अंमलदाराने सम्राटाला चमत्कार कळविला. सम्राटाने मेंग चियांगला प्रासादराणी करतों कळवले!

सम्राटाची आज्ञा ती धिक्कारते. ती हाडे आपल्या विश्वासू हृदयाशी धरून लांब भिंतीच्या टोकावर ती उभी राहते. खाली समुद्र उसळत असतो.

घेतली तिने उडी! डुब्!
पूर्व समुद्रात ती विलीन झाली.

आणि सम्राटाला तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. तेथे त्या भिंतीजवळ तिचे समाधिमंदीर त्याने उभारले. तिचा दिवस चीनभर पाळण्यात येऊ लागला. तिची पूजा होऊ लागली. मेंग चियांग अमर झाली!

पत्री समर्पण

श्रीराम

अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा।।

कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची।।

म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, २८-२-२५

हृदय मदीय तव सिंहासन होवो

हृदय मदीय तव सिंहासन होवो।।
अभिनवतम रमणीया गुणनिधान
मूर्ति तुझी विलसत राहो।।हृदय....।।।

दंभ दर्प काम क्रोध
बहु करिती विरोध
उपजे न ज्ञानबोध
तिमिर सकल जावो।।हृदय....।।।

भक्तिभाव-गंधाची
सद्विचार-सुमनांची
मंगलमय-गानांची
पूजा तुज पावो।।हृदय....।।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

मजवर कृपा करावी

प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी।। मजवर....।।

भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी ।। मजवर....।।

नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी।। मजवर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

एक किरण

एक किरण मज देई
केवळ एक किरण मज देई।।

कोटी रवि-शशि
तू पेटविशी
विश्वमंदिरी पाही
परि मम हृदयी
तिमिर सदाही
श्रमुनी जीव मम जाई।। एक....।।

किती कृमि-कीटक
रोगोत्पादक
बुजबुजाटा जणू होई
दे सौभाग्या
दे आरोग्या
तम मम विलया नेई।। एक....।।

मी धडपडतो
मी ओरडतो
कोणि न धावो भाई
आस तुझी मम
हरि झडकारि तम
मुळी न सुचे मज काही।। एक....।।

एक किरण ना
मागे फार
एक किरण शुभ
देऊन तार
प्रणति तुझ्या शुभ पायी
तेज:सिंधो!
प्रकाशबिंदु
दे, होईन उतराई।। एक....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

माझी बुडत आज होडी

माझी बुडत आज होडी
मज कर धरून काढी।। माझी....।।

तुफान झाला सागर सारा
मज सभोती वेढी।। माझी....।।

लोटितील मज भीषण लाटा
खचित मृत्यु-तोंडी।। माझी....।।

शांत करी रे तुफान दर्या
काळमुखी न वाढी।। माझी....।।

अपराध तुझे रचिले कोटी
परि धरी न आढी।। माझी....।।

पुनरपि माते राहीन जपूनी
करीन कधी न खोडी।। माझी....।।

रागावली जरी माय मुलावरी
संकटी न सोडी।। माझी....।।

ये करुणाकर ये मुरलीधर
हात धरुनी ओढी।। माझी....।।

किती झाले तरी मूल तुझे मी
प्रेम कधी न तोडी।। माझी....।।

इतर कुणी ते धावान येतील
आस अशी न थोडी।। माझी....।।

बाळ तुझा हा होऊन हतमद 
हाक तुजसि फोडी।। माझी....।।

आजपासुनी तव करि राया
सोपवीन होडी।। माझी....।।

मुरली वाजव सागर शांतव
वादळास मोडी।। माझी....।।

मुरली वाजव, वादळ लाजव
दाव गीतगोडी।। माझी....।।

जीवन तव पदी वाहून बालक
हात तात! जोडी।। माझी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

अति आनंद हृदयी भरला

अति आनंद हृदयी भरला
प्रियकर प्रभु मम हृदयी आला
शोक पळाला
खेद गळाला
पापताप दूरी झाला।।अति....।।

मम तनमनधन
मम हे जीवन
अर्पिन पदकमला।।अति....।।

चिंता सरली
भीती नुरली
त्रास सकळ सरला।।अति....।।

प्रेमरज्जुने
प्रभुला धरणे
जाईन मग कुठला।।अति....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मम जीवन हरिमय होऊ दे!

मम जीवन हरिमय होऊ दे
हरिमय होवो
प्रभुमय होवो
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।

रुसेन हरिशी
हसेन हरिशी
हरिभजनी मज रंगू दे।। मम....।।

गाईन हरिला
ध्याइन हरिला
भवसागर मज लंघू दे।। मम....।।

हरिनामाचा
पावक साचा
अघवन घन मम जळू दे।। मम....।।

हेत हरीचे
बेत हरीचे
सकल कृतींतून दावू दे।। मम....।।

वेड सुखाचे
लागो हरिचे
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३४

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी।।
अगतिक निशिदीन
मजलागि वाटे
सदा दीन या लोचनी येई पाणी।। मजला....।।

मम कार्य जगी काय
न कळे मला हाय
स्थिती तात ही होत केविलवाणी।। मजला....।।

असेल जिणे भार
वाटे मला फार
जणू देई पाठीवरी कोणी गोणी।। मजला....।।

देवा दयाळा
हतदीन बाळा
घेऊन जा ठेवि निज पूज्य चरणी।। मजला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

तव अल्प हातून होई न सेवा

तव अल्प हातून होई न सेवा
मम कंठ दाटे
किती खंत वाटे
हुरहूर वाटे अहोरात्र जीवा।। तव....।।

सेवा करावी
सेवा वरावी
मानी नित्य बोले असे फक्त देवा।। तव....।।

किती दु:ख लोकी
किती लोक शोकी
परि काही ये ना करायास देवा।। तव....।।

दिसता समोर
किती सानथोर
झटती, मला वाटतो नित्य हेवा।। तव....।।

हृदयात सेवा
वदनात सेवा
उतरे न हातात करु काय देवा।। तव....।।

खाणेपिणे झोप
मज वाटते पाप
वाटे सदा तात! की जीव द्यावा।। तव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३

सदयहृदय तू प्रभु मम माता

सदयहृदय तू प्रभु मम माता
घेई कडेवर हासव आता।।सदय....।।

अगतिक बालक
कुणी ना पालक
त्रिभुवनचालक तू दे हाता।।सदय....।।

काही कराया
येई न राया
लाजविती मज मारिती लाथा।।सदय....।।

धावत येऊन
जा घरी घेऊन
वाचव मज तू नाथ अनाथा।।सदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिसतात सुखी तात! सारेच लोक

दिसतात सुखी तात! सारेच लोक
हसतात जगी तात! सारेच लोक।।
मम अंतरंगात
परि ही निराशा
भरतात डोळे जळे, जाळि शोक।।दिसतात....।।

खाणे पिणे गान
जग सर्व बेभान
असे फक्त माझ्याच हृदयात दु:ख।।दिसतात....।।

फुलतात पुष्पे
गातात पक्षी
रडे एक मच्चित्त हे नित्य देख।।दिसतात....।।

जनमोददुग्धी
मिठाचा खडा मी
कशाला? तुझे जाई घेऊन तोक।।दिसतात....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

देवा! धाव धाव धाव

देवा! धाव धाव धाव
या कठिणसमयी पाव।।देवा....।।

अगणित रस्ते दिसती येथे
पंथ मजसि दाव।।देवा....।।

अपार गोंधळ बघुनी विकळ
देई चरणी ठाव।।देवा....।।

हा मज ओढी तो मज ओढी
करिती कावकाव।।देवा....।।

कुणी मज रडवी कुणी मज चढवी
म्हणू कुणास साव।।देवा....।।

घेऊनी जा मज प्रभु चरणी निज
नुरली कसली हाव।।देवा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

दु:ख मला जे मला ठावे

दु:ख मला जे मला ठावे
मदश्रुचा ना
अर्थ कळे त्या
आत जळून मी सदा जावे।। दु:ख....।।

‘असे भुकेला
हा कीर्तीला’
ऐकून, भरुनी मला यावे।। दु:ख....।।

‘एकांती बसे
अभिमान असे’
वदति असे ते मला चावे।। दु:ख....।।

‘या घरच्यांची
चिंता साची’
ऐकून, खेद न मनी मावे।। दु:ख....।।

नाना तर्क
काढित लोक
नयनी सदा या झरा धावे।। दु:ख....।।

तू एक मला
आधार मुला
बसून तुझ्याशी विलापावे।। दु:ख....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

नयनी मुळी नीरच नाही

नयनी मुळी नीरच नाही
करपून किती मम अंतर जाई।। नयनी....।।

रडूनी रडूनी सरले पाणी
वदुनी वदुनी शिणली वाणी
आत जळत परि निशिदिन पाही।। नयनी....।।

रडता मी ना आता दिसतो
लोक सकळही परि हा फसतो
अश्रुविणे रडणे अति दाही।। नयनी....।।

खाई किडा तो आता कळीस
भ्रमर आत पोखरी काष्ठास
शोक तसा हृदयास सदाही।। नयनी....।।

अमृतधारा ये घेऊन तव
शोकानळ हा प्रभु झणि विझव
आस उरे तव केवळ आई।। नयनी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

वेल

मी प्रभुराया! त्वदंगणांतील वेल
काळजी का न घेशील।।

मी एका या बाजुस पडलो आहे
वाट त्वत्कृपेची पाहे
त्वत्करुणेचे जल थोडे तरि मिळु दे
मज येथे जीव धरू दे
तू लक्ष जरा मधुनमधुन तरि देई
येईल धीर मम हृदयी
मज अंकुर मग फुटतील
मज पल्लव शुभ येतील
मम जीवन हे हासेल
ती येऊ दे मम भाग्याची वेळ
काळजी का न घेशील।। मी....।।

हे बघ किति रे! माझ्याभवती गवत
ते मजसि वाढु ना देत
मज झाकोळी गुदमरवी ते सतत
शिर वरि मुळि करू ना देत
हे खाऊनिया मारून टाकिल माते
उपटशिल जरी ना हाते
हे उपट विषारी गवत
जे मदंकुरा अडवीत
दे मला विकासा पंथ
ये सखया तू, मरण जरि न येशील
काळजी का न घेशील।। मी....।।

मज घालावे निज हातांनी पुरण
मग भरभर मी वाढेन
कधि खत घाली थोडे तरि तू राया
येईल भरारुन काया
कुणी काळजि ना आजवरी मम केली
म्हणून ही विकलता आली
परि पोशिल जरि कुणी मजला
प्रकटेल कला मम विमला
प्रकटेल दिव्यता सकला
मी त्वदंगणी म्हणूनिच झालो वेल
काळजी का न घेशील।। मी....।।

मग फुटतिल रे दिव्य धुमारे माते
मांडवी चढव निज हाते
दे छोटासा मंडप मज घालून
त्यावर प्रभुजि! पसरेन
कधि येतील ती फुले फळे मधु
मजला
लागेल ध्यान मन्मतिला
होईन अतिच उत्कंठ
कळि हळुच होइल प्रकट
तू होशिल बघुनी हृष्ट
मग सुंदरशी कितिक फुले फुलतील
काळजी का न घेशील।। मी....।।

जरि सकळ फुले सखया! ना फळतील
झडतील काहि गळतील
ती काहि तशी वांझ प्रभु! निघतील
कितिकांस किडी खातील
कितिकांस फळे धरतिल परि सडतील
वाढ ना नीट होईल
परि एक दोन तरि दिव्य
रसभरित मधुर तुज सेव्य
येतील फळे प्रभु भव्य
तव पद=-पूजा-कामी ती येतील
काळजी का न घेशील।। मी....।।

यापरि देवा! त्वदंगणी विकसू दे
बहरू दे, मुदे पसरू दे
मजमाजी जे आहे ते वाढवुन
त्वच्चरणकमळि वाहीन
परि वाढाया आहे करुणा-शरण
वाढेन सदय जरि चरण
मद्विकास त्वत्पूजार्थ
ना इतर हेतु हृदयात
हा एकच सखया हेत
फलपुष्पी हा वेल तवार्चन करिल
काळजी का न घेशील।। मी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

जीवनतरू

प्रभु! जन्म सफल हा व्हावा
मम जीवनतरु फुलवावा।। प्रभु....।।
सत्संगतिसलिला देई
सद्विचार रविकर देई
वैराग्य बंधना लावी
हे रोप वाढिला लावा।। मम....।।

तू विकार वादळि पाळी
मोहाचे कृमि तू जाळी
श्रद्धेचे खत तू घाली   
टवटवित हरित शोभावा।। मम....।।

धैर्याचा गाभा भरु दे
प्रेमाचे पल्लव फुटु दे
सत्कर्मसुमांनी नटु दे
सच्छील-सुरभि पसरावा।। मम....।।

गुंगोत भक्तिचे भृंग
नांदोत ज्ञान-विहंग
कूजना करुत नवरंग
शांतिच्या फळी बहरावा।। मम....।।

बंधूंस सावली देवो
बंधूंस सौख्यरस देवो
सेवेत सुकोनी जावो
हा हेतु विमल पुरवावा।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मज माहेराला नेई

येइ ग आई
मज माहेराला नेई।।

तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव
सुकुनी जाई।। मज....।।

वृक्ष जसा तो मूळावीण
फूल जसे ते वृंतावीण
मीन जसा तो नीरावीण
तसे मज होई।। मज....।।

सदैव येते तव आठवण
भरुन येती दोन्ही नयन
तगमग करिते अंत:करण
सुचेना काही।। मज....।।

शतजन्मांचा मी उपवासी
एक कणहि ना माझ्यापाशी
तू तर औदार्याची राशी
कृपेने पाही।। मज....।।

तुझ्याजवळ मी सदा बसावे
त्वन्मुखकमला सदा बघावे
भक्तिप्रेमे उचंबळावे
हेतु हा राही।। मज....।।

वात्सल्याने मज कवटाळ
तप्त असे मम चुंबी भाळ
प्रेमसुधा सुकल्या मुखि घाल
जवळी घेई।। मज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

येतो का तो दुरून

येतो का तो दुरून
बघा तरि, येतो का तो दुरून।।

येतो का मम जीवनराजा
येतो का मम अंतरराजा
कंठ येइ गहिवरून।। बघा तरि....।।

केवळ त्याच्यासाठी जगलो
केवळ त्याच्यासाठी उरलो
हृदय येतसे भरून।। बघा तरि....।।

वाट बघोनी त्याची सतत
रडुनी रडुनी निशिदिन अविरत
डोळे गेले सुजून।। बघा तरि....।।

येईल केव्हा माझा जिवलग
मम हृदयाची होई तगमग
जीव जातसे झुरून।। बघा तरि....।।

येतांची मम जीवन राणा
ओवाळून मी पंचप्राणा
टाकिन त्याचेवरून।। बघा तरि....।।

जीवनवल्लभ पडता दृष्टी
धावत जाउन घालिन दृढ मिठी
जाइन तत्पदि मरून।। बघा तरि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३२

पूजा मी करु रे कैशी?

पूजा मी करु रे कैशी?
येशी परि, पूजा मी करु रे कैशी?।।

पडके हे घर माझे
कैसा बोलवू? हृषिकेशी!।। पूजा....।।

अश्रूंचा माझ्या हार
घालू का तो तव कंठासी?।। पूजा....।।

सुटतात जे सुसकारे
तेची संगीत, देवा! तुजसी।। पूजा....।।

जमले अपयश माझे
त्याच्या दाविन नैवेद्यासी।। पूजा....।।

द्याया तुजलागि योग्य
नाही काहिच माझ्यापाशी।। पूजा....।।

गोळा मी केल्या चिंध्या
कैशा दावू त्या मी तुजसी!।। पूजा....।।

मोती फेकुन देवा!
जमवित बसलो मी मातीसी।। पूजा....।।

त्वत्स्पर्श परि दिव्य होता
मृत्कण होतिल माणिकराशी।। पूजा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३