हरपलें श्रेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हरपलें श्रेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

राजा शांतनु

जा स्वस्थळास हरिणा सुखें; पहा बाण घेतला मागें;
तुजमागें आलों; पण तव लिप्सा मन्मनीं न ती वागे.        १

मृगयामिषें त्रिपथगा – तीरीं एकान्त साधुनी रानीं
विचरावें स्वैरपणें, या गोष्टीची असे मज शिराणीं.            २

तातें प्रतीपरायें कथिलें हितगूज जें मला, तेणें
भ्रम जडला हृदयाला, अन्य विषय तो मुळींहि मी नेणें.     ३

भ्रमहेतु तूंच अससी गंगे ! तव दर्शनें अहा भंगे –
ताप जनांचा, मग मम होतीं संतप्त केविं हीं अंगे !           ४

ममजन कदक्षिणांकीं बैसुनि पूर्वी तुवांच ना त्यातें
वचन दिलें ‘तुमच्याशीं सुनेचिया जुळिन साच नात्यातें.’   ५

तें देवि ! स्मरसी कीं? पुसतों सुत मी प्रतीपराजाचा,
भ्रमवुनि मज कोठेवरी दु:सह देसी मदंतरा जाचा ?         ६

मी मानव म्हणुनी तव शंकित जरि चित्त होय सुरसरिते,
तरि नच वचनविलंघन करिं, मर्त्यालाहि हीन जें करितें.   ७

देवेन्द्रतुल्य राजे इन्दुकुलोत्तंस विश्वसन्महित,
तद्वंशज मी असता शंकित व्हावें तुवां न हे विहित          ८

कां मग विलंब करिसी? गुंतवितें कोणतें तुला काम ?
धाम न रुचे मज वनीं फिरवी तव पाणिपीडनीं काम.       ९

ये, हो प्रकट लवकरी! पाहूं दे दिव्य मूर्ति तव मग ती
ज्योतिवरी शलभाची होऊं दे तेविं शीघ्र माम गती!         १०

ये ये ! धीर न धऱवें, करवेना काज मज पहा कांही!
वाहीं तुज औत्सुक्यें, जाई नभ त्या भरुन हाकांही !        ११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति- आर्या
- 'यथामूल आवृत्ती', १९६७

वातचक्र

पर्जन्याचे दिवस उलगले,
थंडीचेही बरेच गेले;
पिकें निघाली; कारण नुरलें
सोसाट्यानें वहावयाचें; म्हणुनि मरुद्भण खेळांत –
मग्न होउनी, चक्रावतीं
आरोहूनि, सांप्रत हे जाती
गर गर गर गर भर भर एका निमिषांमध्यें गगनांत !     १

धूलीचे कण असंख्य उठती,
पक्ष्यांचे पर तयांत मिळती,
गवताच्या त्या काड्याहि किती,
थंडीनें गळलेली पर्णें जीर्णें उडतीही त्यांत;
सृष्टीचा हा असा भोंवरा
फिरतो आहे पहा भरारा,
गर गर गर गर धरणीपासुनि चढत असे तो गगनांत !    २

वाग्देवी गे ! दे शब्दांतें
भोंवर्‍यांत या फेंकुनि, त्यांतें
जरा जाउं दे निजधामातें,
नरें मळविलें अहह ! तेज तें पूर्वी होतें जें त्यांत
म्हणुनी शाप न आतां मारी,
आशीर्वचहि न आतां तारी,
तर गर गर गर त्यांस चढूं दे ताजे व्हाया स्वर्गांत !       ३

मींहि कशाला येथ रहावें ?
काय असे ज्या मीं चिकटावें ?
वाटे गिरक्या घेत मिळावें –
या पवनाच्या चक्रीं, होउनि लीन सच्चिदानंदांत;

जगदद्रुमाचें पिकलें पर्ण
गलित असें मी अगदी जीर्ण;
तर भर भर भर उडूं द्या मला शब्दांसगें स्वर्गांत!          ४


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - श्यामाराणी
- मासिक मनोरंजन, जानेवारी-फेब्रुवारी १८९९

तत्त्वत: बघतां नामा वेगळा

तत्त्वत: बघतां नामावेगळा । कोण नाही सांगा मजला ।
भिन्न व्यक्तित्व नामाला । नामकरण होतसे ।।
नाम म्हणजे अभिधान । अभिधान म्हणजे जे वरुन ।
धारण केलें, ज्यामधुन अन्त: साक्ष पटतसे ।

भाव शब्दस्पर्शहीन तैसे रुपसगंधावांचुन ।
अतएव ते विषय जाण । इन्द्रियांचे नव्हेत ।।
ही तों वाणी मिथ्या वाटे । कारण पंचविषयांचे थाटें
भाव नटती, खरें खोटें । विचारुनी पाहिजे ।।


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- 'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. ४३

उत्तेजनाचे दोन शब्द

(दोहा)

जोर मणगटांतला पुरा
घाल घाल खर्ची;
हाण टोमणा, चळ न जरा
अचुक मार बर्ची !            १

दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ?           २

उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार !           ३

यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव !      ४

ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार !          ५

झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण !            ६


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- विद्यार्थीमित्र, वर्ष १, अंक ७, मार्च १८९५

चिन्हीकरण अर्थात् भाव आणि मूर्ति यांचे लग्न

भूचक्राची घरघर जिथें ती न ये आयकाया,
आहे ध्यानाभिध रुचिर तो कुंज त्या शांत ठायां,
त्याचे द्वारीं उपवर वधू मूर्तिनाम्नी विराजे
तीचे संगें वर परम तो भावशर्माहि साजे !                १

होती पर्युत्सुक बहुत ती शीघ्र पाणिग्रहाला,
तेथें आत्मा भ्रमत कविचा तो उपाध्याय आला;
स्फूर्तिज्वालेवरि मग तयें होमुनी जीविताला,
लग्नाला त्या शुभकर अशा लाविता तो जहाला !       २

गेलें कुंजीं त्वरित मग तें जोडपें दैवशाली
केली त्यांहीं बहुविध सुखें त्या स्थलीं प्रेम-केली;
झालीं त्यांना बहुत मधुरें बालकें दिव्य फार,
तीं जाणा हीं-सुरस कविच्या क्लृप्ति तैसे विचार !       ३


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - मंदाक्रांता
करमणूक, १६ फेब्रुवारी १८९५

फुलांतले गुण

बांधावरि झुडुप एक,
पुष्प तयावरि सुरेख
पाहुनि, मी निजहृदयीं मुदित जाहलों,
त्याजवळि चाललों !                       १

जाउनियां, त्या सुमनीं
काय असे, हें स्वमनीं
मनन करित, उन्मन मी तेथ ठाकलों,
या पंक्ति बोललों !-                         २

पुष्पीं या सुन्दरता
फार असे, ती चिता
वेधुनि, संसारताप सारिते दुरी,
उल्लसित त्या करी !                      ३

पुष्पीं या प्रीति असे,
ती मीपण हाणितसे,
परविषयीं तन्मयता प्रेरिते उरीं,
ने द्दष्टि अन्तरीं !                           ४

मार्दवही यांत फार
कारण, निज मधुतुषार
ढाळितसे स्वलतेच्या पल्लवीं अहा !
तें द्रवतसे पहा !                           ५

सद्गगुणही यांत वसे,
कारण, कीं, तेज असे
तेथें, स्मित करित सदा आढळे पुढें,
त्या तम न आवडे !                       ६

जादूही यांत भरुनि
दिव्य असे, ती पसरुनि
निज धूपा वार्‍यावरि, दश दिशा भरी,
बेहोष कीं करी !                           ७

यापरि मी उन्मनींत
होतों आलाप घेत;
आणिक या फुलांमधीं काय हो असे ?
तें काय हो असे ?-                        ८

तों जवळुनि मधमाशी
आली गुणगुणत अशी
“गाणें तें फुलामधें आणखी असे !”
ती बोलली असें !                         ९

पेल्यामधिं पुष्पाच्या,
गुंगत ती त्यात वचा,
शिरली; त्या वचनाची सार्थता भली
तों व्यक्त जाहली !                        १०

गुणगुणली मधमाशी
“पुष्पीं गुण जे तुजसी
आढळले, तुजमध्ये कितिक त्यांतुनी ?-
बा, घेई पाहुनी !”                        ११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - उन्मती
मुंबई, ३१ मार्च १८९३

निद्रामग्न मुलीस !

सुमारे १२-१३ वर्षांच्या एका निजलेल्या मुलीस पाहून सुचलेले विचार

निद्रामग्र मुली! तुझें मुख अहा! हें रम्य आहे किती! –
तें साधेपण, नम्रता, मधुरता, शान्ती, तिथें शोभती !
कौमार्य नवयौवना न अजुनी थारा दिला वाटतें.
स्वर्गातील तरीच मुग्धतरता या त्वन्मुखीं राहतें !              १

कोणी येथ जरी मनुष्य नसतें, किंवा तुझा हा लय
ब्रह्मानंदनिमग्र-यास नसतें नासावयाचें भय,
तुझे कोमल हे कपोल – मधुनी जे भासतें हांसती,
होतों मी तर त्यांस वत्सलपणें चुम्बूनी बाले! कृती.           २

ऐसें मी म्हणतों म्हणूनि ठपका कोणी न ठेवो मला,
कांकी फारच ओढितें तव गडे ! कौमार्य मद्दुष्टिला !
यासाठींच तसें वदूनि चुकलों तूतें स्वसा मानुन,
पापेच्छेस शिवाय चोदक नसे देहीं तुझे यौवन.                 ३

हा जो मी कवितेंत गे द्रवुनियां गेलों तुला पाहतां,
याचें कारण फार भिन्नच असें ते सांगतो मी अतां:-
ताई गे! तव या अनिश्चित जगीं होईल कैशी दशा,
मी शोकाकुल होऊनी गढुनियां गेलों विचारीं अशा.            ४

थोड्याशां दिवसांमधेंच तव हें कौमार्य गे जाइल;
लज्जारोधितलोललोचन असें तारुण्य तें येइल;
त्यांची फुल्ल विलोकुनी विकसनें डोळे दिपूनी तव,
या लोकविषयीं विचार तुजला येतील कैसे नव?-            ५

‘नानाभोगनियुक्त गोड किती हा संसार आहे बरें ?
जन्मापासूनि कां न तो वितसिला आम्हांवरी ईश्वरे ?”
नानाक्लुप्ति अशा कदाचित तुझ्या चित्तांत त्या येतिल;
जातांना परि लौकिकानुभव तो तूं कायसा नेशिल ?         ६

ज्या ह्या आज अजाणतेपण असे गालीं तुझे शोभतें,
ही शोभा अथवा अजाणपण ज्या गालीं भलें दावितें,
त्य गालीं कटु जाणतेपण पुढें ओढील ना नांगर ! –
त्या तासांवर जाणतेपण तसें बैसेल ना भेसूर !              ७

ह्या तुझ्या मुधरे ! मुर्खी मधुरशा, त्या सर्वही भासती   
चेतोवृत्ति समप्रमाण, न दिसे भारी अशी कोणती;
कांहीका दिवशीं तुला जर गडे ! ठेलों पहाया जरा,
सद्ववृत्तींसह  या तुझा फिरुनि मी वाचीन का चेहरा ?          ८

राहो हें सगळें, अशी कुळकथा नाहीं मुळीं संपणें.
तूं माझी भगिनी ! म्हणून तुजला आशी असे अर्पणें :-
हे माझे भगिनी ! दिनानुदिन गे दु:खें अम्हां घेरिती,
त्यांतें हाणुनियां सुखें तुज सदा भेटोत ती राखितीं !        ९


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
डिसेंबर १८८९

कोठें जातोस?

“कुठें जाशी?” – शर्करा घ्यावयाला;
अमुक पंताला पुत्र असे झाला,
म्हणुनि आतां इष्टांस वांटण्यास
हवी आहे शर्करा बहू त्यास”                  १

“कुठें जाशी तूं?”- “फुलें आणण्यातें;
तमुक रावाच्या असे लग्न येथें,
वधुवरांला त्या गळां घालण्याला
करायाच्या आहेत तेथ माळा,”              २

“आणि कोठे तूं ?” – “नविन पसारा तो
संसृतीचा मांडीत आज आहें;
म्हणुनि बाजारा करायास जातों;-
घरीं जिवलग ती वाट बघत आहे !”        ३

“आणि तूं रे?” – “जातसें आणण्यासी
वैद्यबोवाला, अमुक वृद्ध यासी
वायु झालाहे!” – “जा ! परेतवस्त्रें
विकत घेउनि शोध तूं गोवर्‍या रे !”        ४

पुढुनि दिसतें मग मढें एक येतां.
“कुठें बाबा जातोस सांग आतां?” –
हवेंतुनि हे पडतात शब्द पाहीं
“कुठें जातों हें मला कळत नाही!”         ५


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

जाति - दिंडी
१२ जून १८८९

पद्यपंक्ति

आम्हीं नव्हतों अमुचे बाप,
उगाच कां मग पश्चात्ताप ?
आसवें न आणूं नयनीं
मरून जाऊं एक दिनीं !

अमुचा पेला दुःखाचा
डोळे मिटूनी प्यायाचा,

पितां बुडाशीं गाळ दिसे,
त्या अनुभव हें नांव असे !
फेंकुनि द्या तो जगावरी,
अमृत होउ तो कुणातरी !

जें शिकलों शाळेमाजी,
अध्याह्रत ही टीप तयाः---
“ द्वितीय पुरुषीं हें योजीं,
प्रथम पुरुष तो सोडुनियां ! ”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १८९८

क्षणांत नाहीसे होणारे दिव्य भास

( कवि, चित्रकार आणि तानसेन यांस जीं अलौकिक स्वप्नें, ज्या दिव्याकृति आणि जे गंधर्वालाप भासमान होतात, अहह---त्यांपैकीं किती थोडे मात्र त्यांस आपल्या करामतींत गोंवून ठेवितां येतात बरें ! आत्माराम आणि आका कोण हें सांगावयास नकोच. )

आत्माराम सुखें वनामधुनि तो होता जरा हिंडत,
तों झाला बघता दुरूनि सहसा कोण्या सुमुर्तिप्रत;
तीच्यामागुनि मोहुनी हळुहळु जायास तो लागला,
“ आहे ही पण कोण ? ” या क्षणभरी प्रश्नावरी थांबला.

“ रम्भे १ ” “ उर्वशि गे ” तशींच दुसरीं जीं त्यास होतीं प्रियें
नामें, त्यांतिल घेउनि फिरूनि तॊ बाही त्वरेनें तिये;
ती कांहीं तरिही वळे न, बघुनी तो विस्मया पावला;
जातां सन्निध, “ हो नवीनचि अहा ! कोणी दिसे ” बोलला !

कांहीं नांव नवीन देउनि तिला जेव्हां तयें बाहिलें.
तों तीनें वळनी प्रसन्न वदनें त्याच्याकडे पाहिलें;
त्या रूपद्युतिनें दिपूनि नयनें निर्वाण तो पावला,
तों अन्तर्हित, दृष्टीचा विषय तो, एका क्षणीं जाहला !

आकाची इतुक्यांत हांक परिसे आत्मा, घराला वळे;
आकाच्या हुकुमांत, साक्ष अवघी ती विस्मरूनी, रूळे;
कोणेका दिवशीं तिथें फिरतां तो गोष्ट त्याला स्मरे,
तच्चितीं, पण रूप नाम अथवा तीचें मुळींही नुरे !

आत्माराम सखेद होउनि वदे तो आपणाशीं असें ---
“ कांही सुन्दर देखिलें खचित मीं, यामाजि शंका नसे !
हा ! हा ! -हे जर सर्व भास धरतां येतील मातें, तर
पृथ्वीचा सुरलोक कीं बनवुनी टाकीन मी सत्वर !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मुंबई २७ मार्च १८९३

अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न

मुलें अंत्यजांचीं बिचारीं मजेनें
पथाच्या अहो खेळताती कदेनें;
दुरूनी तिथें विप्र डौलांत आला,
वदे काय तो मुग्ध त्या बालकालाः---

” सरा रे दुरी पोर हो म्हारडयांचे !
चला ! खेळ हे मांडले डोंबलाचे !
निघा ! वाट द्या लौकरी ब्राह्मणातें ! ”
पळालीं मुलें;---कोण राहील तेथें !

परी एक त्यांतील तैसाचि ठेला;
उगारी तधीं दुष्ट तो यष्टिकेला.
म्हणे---” गाढवा ! सांवली ना पडेल !
दुरी हो ! पहा हाच खाऊ मिळेल !”

तधीं बाळ तोही घराला निघाला,
मनीं आपुल्या या करी चिन्तनालाः---
” जरी त्यावरी सांवली माझि गेली.
तरी काय बाघा असे ठेविलेली ?”

घरीं जाउती तेंचि मातें विचारीं ;
वदे तेधवां त्यासि माता विचारीः---

” अम्ही नीच वा, आणि ते लोक थोर;
तयां पाहतां होईजे नित्य दूर.”
सुधें बोलली !--- हें परी काय तीतें
कळे कीं जगीं नाडुनीयां परांते,
म्हणूनी करूनी अधीं घोर पाप,
जनीं गाजवी मानवी स्वप्रताप !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - भुजंगप्रयात
- १ सप्टेंबर १८८८

गोष्टी घराकडील

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !--
आहे घरासचि असें गमतें मनांस,
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

ही देख म्हैस पडवैमधिं बांधलेली
रोमथभाग हळु चावित बैसलेली.
मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे !

डोळयांत बोट जरि घालूनि पाह्‍शील
अंधार तो अधिकची तुजला दिसेल ! --
अंधार-- जो फलक होत असे अम्हांस
चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास !

आवाज ’ किरं ’ रजनी वदतेच आहे,
’घों घों ’ असा पवन नादहि बोलताहे;
ऐके पलीकडुनि बेडुक शेतभातीं
पर्जन्यसूक्त सगळे मनमोख्त गाती ?

हीं चारपांच चढूनी हळु पायठाणें
या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
हें ऐक रे ’ टकटका ’ करितें घडयाळ
या शान्ततेंत गमतें कुटितेंच टाळ !

डावीस हा बघ निरेखूनि एक माचा
निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझ्या.
त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोनें !
तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें !

तातास या बघुनि या ह्रदयांत खातें,
होऊन हें ह्रदय विव्हळ सर्व जातें !
त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
नाणूं तयास मग कां वद आंसवांनीं ?

ताताचिया बघ गडया उजवे कडेला
बापू असे तिथ बेरें अमुचा निजेला,
अज्ञान तो चपलधी परि बाल आहे
त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे !

बापू ! गडया ! ध्वज उभा करशील काय ?
तूं देशकारण करूं झटशील काय ?
बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?

मित्र ! घरीं सुदुढ हस्त मदीय फार,
दारास आडसर घट्ट असेल थोर,
दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं,
सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊं !

मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
येथें हवा मधुर, निश्वबनांत येई,
नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
वाटेवरी चतुरशिंगिचिया न तैशी !

मित्रा ! असा हळूच ये उजवे
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस,
निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
हर्षाचिया न उकळया फुटती कुणास

ती एक खाट अवलोक समोर आतां
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता,
तीचे कुशींत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बधुनि ती मज हर्ष होय,

मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
आलीस तूं खचित गे असशील माते !--
मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते
जातील का फिटूनियां तव पुत्रहस्तें ?

खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या,
गोष्टी जयांस कथितां न पुर्‍याच झाल्या !
ती कोण दूर दिसते ?-- निजली असूनी
जी श्वास टाकित असे मधूनीमधूनी !

कान्ताच ही मम ! -- अहा ! सखये ! मदीय
स्वप्नें अंता तुज गडे ! दिसतात काय ?--
आतां असो ! पण पुढें तुजला दिसेत
स्वप्ने तुझीं मग समग्र तुला पुसेन !

मागील दारीं सखया ! तुळशीस आतां
वन्दूं, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें !
येऊं घरा परत खासगिवालियाचे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- वसंततिलका
- २२ जुलै १८८७

नैऋत्येकडील वारा

जे जे वात नभांत या विचरती पुण्यप्रदेशावरी
नैऋंत्येकडला तयांत वितरी सौख्यास या अंतरीं;
येतां तो मम चित्त हें विसरुनी प्रत्यक्ष वस्तूंप्रति
अर्धोन्मीलित लोचनीं अनुभवी स्वप्नस्थिती आगुती !

तो वारा मम जन्मभूमिवरुनी येतो जवें वाहत,
हें माझ्या ह्रदयांत येउनि सवें मी ठाकलों चिन्तित;
माझ्या जन्मधरेचिया मग मनीं रूपास मी आणितों,
तीचे डोंगर उंच खोलहि नद्या डोळयांपुढें पाहतों,

मोठे उच्च, शिला किती पसरल्या सर्वत्र ज्यांच्यावरी,
तुंगे तीं शिरलीं यदीय शिखरें तैशीं नभाभीतरीं,
आस्वर्गांत चढती सदोदित महात्म्यांचीं जशीं मानसें,
या दृष्टीपुढते पुनः बघतसें अद्रीय ते हो असे !

ज्यांच्या रम्य तटांवरी पसरल्या झाडया किती सुन्दर,
ज्यांच्या थोर शिलांतुनी धबधबां जाती तसे निर्झर
वाणीचे कविदुर्दशांमधुनिया ते ओघ यावे जसे;---
या दृष्टीपुढते पुनः बघतसें अद्रीय ते हो असे !

त्यांचे उंच शिरांवरी विलसती किल्ले मराठी जुने,
देवी पालक त्यांतल्या मज पुनः धिक्कारिती भाषणें !---
“ कोठें पूर्वज वीर धीर तव ! तूं कोणीकडे पामरा !
ये येथें इतिहासपत्र पडकें वाचूनि पाहीं जरा !”

जागोजाग विराजती चलजलें पाटस्थलें तीं किती,
केळी, नारळि, पोफळी, फणस ते, आंबे तिथे शोभती;
पक्षी त्यांवरुनी नितान्त करिती तें आपुलें कुजित,
स्वप्नीं हे बघतां फिरूनि, मन हे होतें समुत्कण्ठित.

जागोजागहि दाटल्या निबिड कीं त्या राहटया रानटी.
रे पाईरहि, खैर, किंजळ, तिथें आईनही वाढती,
वेली थोर इतस्ततः पसरुनी जातात गुंतून रे,
चेष्टा त्यांमधुनी यथेष्ट करिती नानापरी वानरें !

जन्मस्थान मदीय सुन्दर असे त्या माल्यकूटांतल्या
आनन्दें वनदेवता मधुर जीं गानें भलीं गाइल्या
मज्जन्मावसरास, तीं पवन हा वेगें महा तेथुनी
मातें पोंचवितो, तयां अपुलिया पंखावरी बाहुनी !

“ गाऊं या ! ह्रदयांत या अमुचिया प्रीती असे दाटली !
गाऊं या ! ह्रदयांत या अमुचिया कां स्फूर्ति ही बाढली ?
वाग्देवीसुत जन्मला अपुलिया ग्रामांत; यालगुनी
जैजैकार करा, सुरां परिसवा हा मंगलाचा ध्वनि !”

वेगानें जगदुद्धरानदिचिया तीरांहुती वात तो
आशीर्वाद मदीय तातजननी यांचे मला आणितो;
वात्सल्यांस तयांचिया परिसुनी माझ्या मनीं येतसें---
‘ तान्हा बाळचि राहतों तर किती तें गोड होतें असें !’

आईच्या नयनांत नित्य मग मी स्वर्गास त्या पाहतों,
ताताकावरि नित्य मी मग जगद्राज्यासना भावितों,
कां हो यापरि वाढलों फुकट मी ? हा---हंत ! मी नष्ट हा !
तान्हा बाळचि राहतों तर किती तें गोड होतें अहा !

जन्मा येउनि मी उगा शिगविलें आई ! तुला हाय गे !
ताता ! भागविलें तुला फुकट मीं मत्पोषणीं हाय रे !
वार्धक्यीं सुख राहिलें, विसरणें तुम्हांस कोणीकडे !
झालों कष्टद मात्र---या मम शिरीं कां वीज ती ना पडे ?

पुष्पें वेंचित आणि गोड सुफलें चाखीत बागांतुनी
जेथें हिंडत शैशवीं विहरलों निश्चिन्त मी, तेथूनी ---
हा वारा ममताप्रसाद मजला आजोळचा आणितो;
चित्तीं विव्हल होतसें स्मरुनि, मी मातामहां वन्दितों !

बन्धूचींहि मला तशीं पवन हा आशीर्वचें आणितो,
चिन्ताग्रस्त तदीय पाहुनि मुखा अश्रूंस मी गाळितों !
भाऊ रे ! तुजलागिं लाविन कधीं मी हातभारा निज ?
तूतें सेवुनि मी सुखें मग कधीं घेईन का रे निज ?

श्वासांहीं लिहिलीं, विराम दिसती ज्यामाजि बाष्पीय ते
प्रीतीचें बरचें समर्थन असे संस्पृह्य ज्यामाजि तें,
कान्तेचीं असलीं मला पवन हा पत्रें अतां देतसे;
डोळे झांकुनि वाचितां त्वरित तीं सम्मूढ मी होतसे !

आतां प्रेमळ तीं पुनः परिसतों थोडीं तिचीं भाषणें,
चित्तीं आणुनि मी तिला अनुभवीं गोडीं तिचीं चुम्बनें !
ओठां हालवितां न मी वदतसें मागील संवाद तो;
मी काल क्रमुनी असा, जड जगा काडीवजा लेखितों !

नाहीं चैन तुला मुळी पडत ना माझ्याविना मत्प्रिये ?
तूतें आठविल्याविना दिवसही माझा न जाई सये !
केव्हां येतिल तीं दिनें न करण्या ताटातुटी आपुली ?
केव्हां त्या रजनी ?--- जियांत विसरूं मीतूंपणाला मुळीं !

माझ्या जन्मधरेपुढें दिसतसे वार्राशि विस्तीर्ण तो,
त्याचें रम्य तरंगतांडर पुनः पाहुनि आल्हादतों,
जें ह्रद्रम्य तरंगतांडव मला तैशापरी वाटतें,
अज्ञेयावरतीं जसें क्षणिक हें अस्तित्व हो खेळतें !

या अब्धीवरतूनि जात असतां बाल्यांत नौकेंतुनी,
गाणीं जीं म्हटलीं मला निजविण्या वारिस्थ देवीगणीं,
त्यांचे सूर अतां अलौकिक असे जे वात हा आणितो ---
ते ऐकून अहा ! सुषुप्ति चिर ती ध्यायास मी इच्छितों !

प्रीति या जगतांत कंटकयुता ही एक बल्ली असे,
शूलालोपणयूप त्यावरिल ही कीर्ति ध्वजा कीं दिसे;
तेव्हां या जगतीं नकोत मजला ते भोग भोगायला,
वाटे नाटक शोकसंकुल असें जीवित्व हें जायला !

देवी सागरिका ! तुम्हीं तर अतां गायनें गाइजे,
त्यांच्या धुंद अफुगुणें किरकिर्‍या बाळास या आणिजे
निद्रा दीर्घ---जिच्यामधी न कसली स्वप्नें कधी येतिल,
ती निद्रा निजतां न मन्नयन हे ओले मुळी होतिल !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मासिक मनोरंजन,एप्रिल-मे १८९८

आईकरितां शोक

अन्तरले पाय तुझे हाय हाय माते ! ॥ध्रु०॥
मागें तव दर्शन मजलागुनी जहालें,
तदनन्तर लोटूनियां दिवस फार गेले:

फिरुनि तुझ्या चरणांतें
उत्सुक मी बघण्यातें
असतां, अन्तींहि न ते

दिसले कीं---अहह ! पूर येत लोचनातें !
अन्तरलें पाय तुझे हाय हाय माते !
फिरुनि तुझें कोठें तें तीर्थरूप पाहूं !
पादरजीं लोळुनि तव धन्य केंवि होऊं !

जनकामागें जागृत
जननी गे तूं दैवत
उरलिस, तीही साम्प्रत

गेलिस सोडुनि आम्हां दिन बालकांतें ।
अन्तरले पाय तूझे हाय हाय माते !
कठिण जगीं या बघती छिद्र काक सारे,
करुणेचें कोठेही नसे लेश वारें

तुझ्यासनें क्षमा दया
प्रीतिहि गेली विलया !
मदपराध घालुनियां ---

पोटीं, नुरलें कोणी प्रेम करायायें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !
कष्ट दिले तुजला मीं फार फार आई !
त्यांची मजकडुनि फेड जाहली न कांहीं !

दुर्भग मी असा असें,
म्हणुनि दुःख वाटतसे,
कठ फार दाटतसे !

रडतों गुडघ्यांत म्हणुनी घालुनी शिरातें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०१

दुर्मुखलेला

माझें शुष्क खरेंच हें मुख गुरो ! आहे, तया पाहुती
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधीं हौउनी;--
हें सर्वां उघडें  असूनि वदुनी कां तें तुम्हीं दाविलें ?
तेणें भूषण कोणतें मग तुम्हां संप्राप्त तें जाहलें ?

याचें तोंड कुरुप हें विधिवशात्‍ गाईल काव्यें नदीं,
तेणें सर्वहि डोलतील जन हे हषें कदाचित भुवि !”
विद्यासंस्कृत त्या तुझ्या, क्षणभरी, मस्तिष्कतन्तूंवरी
येता नम्र विचार हा तुज भला होता किती तो तरी !

जे मुंग्या म्हणुनी मनीं समजशी या मंडळीभीतरीं,
ते पक्षी उडतील होउनि गुरो ! योमीं न जाणों न जाणों वरी !
राखेचीं ढिपळें म्हणोनि दिसतीं जीं तीं उद्यां या जना
भस्मीसात्‍ करणार नाहींत, अशी तुम्ही हमी द्याल का ?

माझ्या दुर्मुखल्या मुखामधुनि या, चालावयाचा पुढें
आहे सुन्दर तो सदा सरसवाङनिष्यन्व चोहींकडे !
तुम्हीं नाहिं तरी सुतादि तुमचे धातील तो प्राशुनी !
कोणीही पुसणार नाहिं, ’ कवि तो होता कसा आननीं ?’


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित

कविता आणि कवि

( श्लोक )

अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हांला

युवा जसा तो युवतीस मोहें
तसा कवी हा कवितेस पाहे ;
तिला जसा तो करितो विनंती
तसा हिला हा करितो सुवृत्तीं.

लाडीगुडी चालव लाडकीशीं
अशा तर्‍हेनें, जरि हें युव्याशीं
कोणी नसे सांगत, थोर गौरवें
कां तें तुम्ही सांगतसां कवीसवें ?

करूनियां काव्य जनांत आणणें,
न मुख्य हा हेतु तदीय मी म्हणे;
करूनि तें ते दंग मनांत गुंगणें,
तदीय हा सुन्दर हेतु मी म्हणें,

सभारुची पाहुनि, अल्प फार,
रंगीं नटी नाचवि सूत्रधार;
त्याचें तयाला सुख काय होय ?
तें लोकनिन्दाभयही शिवाय !

नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जो ह्रदयांत याची;
पढीक तीचे परिसूनि बोल
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल.

स्वभावभूयिष्ठ जिच्यांत माधुरी,
अशी तुम्हांला कविता रुचे जरी;
कवीस थोडा कवितेबरोबरी,--
न जाच वाटेस तयाचिया तरी,

तयाचिया हो खिडकीचिया, उगे,
खालीं, तुम्ही जाउनि हो रहा उभे,--
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि, पावाल तुम्ही मुदाला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ३० डिसेंबर १८८६.

कवितेचें प्रयोजन

” शान्तीचें घर सोडुनी प्रखर त्या हाटीं प्रयत्नाचिया,
प्रीतीचाहि निकुंज सोडुनि रणीं जीवित्व नांवाचिया,
सर्वांहीं सरमावणें झटुनियां हें प्राप्त झालें असे;
या वेळे न कळे कवे ? तुज सुचे गाणें अहा रे कसें !

” माता ही सुजला स्वभूमि सुफला, तीच्या परी लेंकरीं
खायाला पुरतें पहा नच मिळे कीं हाल आहे पुरा;
झांकायास तनूस वस्त्रहि न तें आतां पुरेसें मिळे;
या वेळेस कसें कवे ! तुज सुचे गाणें न मातें कळे !’

हें कोणी म्हणतां जवें कविमनीं खेदोर्मि हेलावल्या,
नेत्रांतून सवेंचि बाष्पसरिता वाहावया लागल्या;
त्याचा स्त्रैणपणा असा प्रकटला वाटेल कोणा, परी
धीरोदात्त असेचि तो श्रुत असे हें दूरही भूवरी !

सोन्याचे सरले अहा ! दिवस ते, आली निशा ही कशी !
सौख्याचा नद तो सुकून पडलों या दुःखपंकीं फशीं !
कालक्रीडीत हें बघूनि रडला, हें व्यस्त कांहीं नसे;
प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवींचा असे,

बाष्पान्तीं तरलस्वरें मग कवी निश्वासुनी बोलिला ---
जो पूर्वीं गुण पुण्यभूमिवरि या अत्यन्त वाखाणिला,
तें हें दिव्य कवित्य दुर्विधिवशें हीनत्व कीं पावलें,
त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें !

” गाणें जें परिसावया कविपुढें राजेशही वांकले,
यन्नादेंच लहान थोर सगळें गुंगून वेडावले,
त्याला मान नसे, नसो पण, अतां त्याची अपेक्षा नसे ---
हें कोणी म्हणतां विषाद अहिसा मन्मानसाला डसे !

” आलेल्या दुरवस्थितींतुनि तुम्ही उत्तीर्ण व्हाया जरी,
जद्योगीं रत व्हावया धरितसां सौत्सुक्य चित्तीं तरी,
गाण्यानें कविच्या प्रभाव तुमचा वर्धिष्णुता घेइल,
स्फुर्तिचा तुमच्या पिढयांस पुढल्या साक्षी कवी होइल !

” हातीं घेउनियां निशाण कवि तो पाचारितो बान्धवां ---
‘ या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा !’
प्रेतेंही उठवील जी निजरवें, ती तो तुतारी करी,
आतां नादवती, निरर्थ तर ती त्याची कशी चाकरी ?

” आशा, प्रेम तसेंच वीर्य कवनीं तो आपल्या गाइल;
गेलें वैभव गाउनि स्फुरण तो युष्मन्मना देइल,
द्या उत्तेजन हो कवीस, न करा गाणें तयाचें मुकें;
गाण्यानें श्रम वाटतात हलके, हेंही नसे थोडकें;

“ आतां जात असे दुरी शिथिलता अस्मत्समाजांतुनी,
याची खूणच गान जें निघतसें तें साच जाणा मनीं;
तारा ताणिलियावरी पिळुनियां खुंटयास वाद्याचिया,
त्याच्यांतून अहा ! ध्वनी उमटती जे गोड ऐकावया !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १८९३

काव्य कोणाचें ?

“ कवे ! कोणीं हें काव्य लिहीयेलें ?”
“ मींच ---” कविनें प्रतिवचन बोलिजेलें,

“ बरें तर ! हें वाचून अतां पाहूं,
श्लोक सुन्दर यांतील सदा गाऊं.”

मनीं वाचक तों दंग फार झाला,
क्लृप्ति आढळली सरस एक त्याला;

म्हणे कविता “ ही रम्य फार आहे ?”
वदे कवि “ ती मम पंक्ति कीं नव्हे ते.”

पुढें वर्णन पाहून रेखलेलें,
वाचकाचें रममाण चित्त झालें;

कविस शंसी तो “ धन्य ! ” अशा बोलें
त्यास “ वर्णन मम न तें ” कवी बोले.

“ काव्य लिहिलें हें सत्य तूं असून,
“ नव्हे माझें हें --- नव्हे तें ” म्हणुन

सांगसी, तर परकीय कल्पनांतें
तुवां घेउनि योजिलें, गमे मातें,”

‘ नव्हे ऐसेंही ?’ कवी वदे त्यातें,
“ काव्य लिहिले मीं खरें, परी मातें

शारदेनें जो मंत्र दिला कानीं,
तसें लिहिलें मीं;--- काव्य तिचें मानीं !”

“ दिव्य शक्तीनें स्फुरें गंध पुष्पीं,
रंग खुलतीही तिनें इंद्रचापीं;

सृष्टिमाजीं जें रम्य असे कांहीं
तीच कारण त्या शक्ति असे पाहीं ”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- भडगांव, ७ ऑगस्ट १८९७

सृष्टि आणि कवि

वयस्या, गाते ही मदुधनरवें सृष्टि मधुर,
कसा गाऊं तीच्यापुढति वद मी पामर नर ?
तशी ती गातांना श्रुतिसुभग तीं पक्षिकवनें
कशासाठीं गावीं अरस कवनें मीं स्ववदनें ?

मिषानें वृष्टीच्या खळखळ अशी सृष्टि रडतां
कुणाची ढाळाया धजल तसले अश्रु कविता ?
निशीथीं ती तैशी हळु मृदुमरुच्छ्‍वास करितां
कवीची गा कोण्या त्यजिल तसले श्वास दुहिता ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शिखरिणी

दूर कोठें एकला जाउनीयां

दूर कोठें एकला जाउनीयां,
एकतारी आपली घेउनीयां,
स्वेच्छें होतों छेडीत ती, मनाला
दुःखिताला आराम व्यावयाला,

आजवेरी बहु मनोभंग झाले
बहुत आशांचे प्राण निघुनि गेले
तयां शोचाया निर्जनांत जावें,
एकतारी छेडीत मीं बसावें

आजदेखिल मी तसा अस्तमानीं
वाद्य वेडें वांकुडें वाजवूनी
दंग झालों स्वच्छन्द गायनानें;
खरें संगीतज्ञान कोण जाणे !

ह्रदय आत्म्याला जधीं खेळवीतें,
ह्रदय आत्म्याला जधीं आळवीतें;
तधीं तुमचें तें नको कलाज्ञान,
तधीं ह्र्दयासन नसे तानसेन !

असो; असतां मन गायनांत लीन,
रात्र झाल्याचें भान राहिलें न;
असें कलहंसा वाहतां प्रवाहीं
प्राप्त मरणाचें ज्ञान नसे कांहीं !

अहा ! अद्‍भुत तों काय एक झालें ---
‘ धन्य बन्धो ! ’ हे शब्द वरुनि आले !
बरी बघतां, तारका उंच आहे,
सदय सस्मित मजकडे वरुनि पाहे !

प्रसादें त्या वांकतां, काजव्याचें
स्फुरण खालीं बघुनि मी म्हणें---” याचें
साम्य कांहींतरि असे तुशीं तारे !
माझिया तर जीवितीं तिमिर सारे !”

“ नको ऐसें रे वदूं बन्धुराया !”
म्हणुनि लागे ती मला आश्वसाया ---
“ तुझ्या दिव्यत्वापुढें जग भिकारी !
कासया ही खिन्नता---दूर सारीं !”

अशा भगिनीचा लाभ मला झाला;
तिचा आभारी दुवा देत तीतें,
समाधानी मी पातलों घरातें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- २७ ऑगस्ट १९०३