anant kanekar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
anant kanekar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चांदराती खाडीच्या किना-यावर

निळ्या नभावर गिरिराजांची काळिभोर आकृती ,

उमटली चांदण्यात मोडती.

कांठाच्या नारळी ज्योत्स्नेंतुनि रंगति;

नस्तांत झपूर्झा ऊर्मी या खेळ्ती;

काठांस शुभ्र शुभ्र फेनहार अर्पिती !

नौका काळ्या 'डबक डबक ' या जळावरी डोलती;

मर्मरत ऊर्मि तयां चुंबिती !

वाळवंटिं पसरल्या वाळुच्या लहरी लहरी किती !

हि-यासम कण मधुनी चमकती !

युगेयुगें घेउनी लोळण पायावरी,

गिरिकडे कशाची सागर विनती करी ?

गंभीर न बघतो वळुनि मुळीं हा गिरी !

दुःख गिळुनिया अंतरिं सिंधू फेंसाळे परि वरी,

हांसतो निराश जणु वरिवरी !

चराचरावरि शुभ्र रुपेरी मोहन हें पसरलें,

मोहने जीवभाव भारले ;

अस्मान वर्षतें शीत धवलता अशी;

नसनसांत थरके लहर थंड गोडशी;

कुणि जवळ बसावें बिलगुनिया छातीशीं !

चांदरातिच्या कोंदणांत दिक्काल विसरुनी असें,

पडावें स्पर्शसुखीं धुंदसें !

दिव्य कुणी यक्षिणी येऊनी सौंदर्यक्षण असा,

अक्षयीं ठसविल का गोडसा !

चांदणें असेंच्या असें फुलुन राहिल,

गिरिपदीं स्थिरावुन राहिल सिंधूजल,

वक्षावर माझ्या मान तिची निश्चल !

भावि युगें विस्मयें पाहतिल कोरिव लेणें असें,

म्हणतिल 'झालें तरि हें कसें ?'


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ३ मार्च १९२६

स्वर्ग दोनच बोटें उरला !

चुंबणार तुला तोंची मुख हालविलेंस कीं,

आणि बिंबाधराजागीं चुंबिलें हनुलाच मी !

फसलों जरि मी ऐसा धीर ना तरि सोडतों;

स्वर्ग दोनच बोटें हा उरला मज वाटतो !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

पतंगप्रीत

तव पतंगप्रीत मजवरती
ही सोड, गडे आशा भलती !
गळ्यांत माझ्या जी झगमगते,
तेज जियेचें तुला भुलवितें,

माणिकमाला तुज जी गमते,
ते धगधगते लाल निखारे !
तूं मजसाठीं भोळीभाळी,
जाइजुंईची विणिशिल जाळी;

तुझी परंतू होइल होळी.
कुंज नसे हा असे सहारा !
स्पर्शे माझ्या कळ्या करपती,
मनास जडती जळत्या खंती.

त्यांत नको करुं आणिक भरती
दुरुन पाहिन तुझें उमलणें !
चांदरात तर कधिंच संपली,
काळरातिची वेळ उगवली;

मृत आशांचीं भुतें जमविलीं.
तूं आशा ! - तुज इथें न थारा.
पहा गुलाबी पहांट होइल,
कलिकारविकार सुखें खिदळतिल;

तुलाहि कितितरि रविकर मिळतिल,
कां कवळिसि मग अनलज्वाला ?
ही सोड, गडे आशा भलती;
तव पतंगप्रीती मजवरती !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ मार्च १९३८

मोरपिसें आणि कावळा

मिरवितों खोवुनी मोरपिसें पंखांत,

म्हणुनिया कावळे शिष्ट मला हंसतात.

परि देइन जर हीं फेंकुन रस्त्यावरती,

हे शिष्ट मनांतुन टपले उचलाया तीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २५ डिसेंबर १९३७

कागदी फुलें

किति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;

अर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.

परि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,

ह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;

"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं ?

अमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी."

दोलयमानमति असल्या संशयतमीं

होऊन राहिलों अमर्याद काल मी.

कागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,

अर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी !

काळजास डसले सहस्त्र विंचू मम,

जगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.

दुखवितां नाग उभवितो फणा आपुली,

उसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,

"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,

जाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २० नोव्हेंबर १९३५

चालली मिरवणुक

चालली मिरवणुक गीतांची माझिया;

कुणि निळीं दूकुलें नेसलिं, कुणि मोतिया.

नादांचे नूपुर घालुनिया नाचती;

रंगीत भरजरी रुपकांत मिरवती !

पाहुनी झोंक हा कुतुक नयनिं थाटतें;

परि कुठें कांहितरि चुकलेंसें वाटतें !

मनिं विचार येई सत्व पहावें तरी,

वस्त्रे नि नूपरें काढुनि करुं खातरी.

हीं विवस्त्र उघडीं फिरतिल रस्त्यांतुन,

पाहतील सगळे रसिक चकित होउन !

कल्पना आगळी वाटतसे सोज्वळ,

गाणेंपण परि का गाण्यांचें राहिल ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० ऑक्टोबर १९३४

मी करितों तुजवर प्रेम

मी करितों तुजवर प्रेम असें म्हणतात;

परि प्रेमाची ही नवीच कांहीं रीत !

तव प्रेमजलामधिं खोल खोल जों बुडतों,

मम द्वेषवन्हि तों अधिकच भडकत जातो !

कुणि म्हणती किति तव टपारे डोळे काळे;

मज वाटति उघडे दोन विषाचे प्याले !

जइं दावित अपुले शुभ्र दांत तूं हंसशी,

तव कृष्णह्रुदयजलफेन गमे तो मजशीं !

मी तुला बाहतां दूर पळुनिया जाशी !

परि सोडुनि जातां घट्‌ट कवळुनी धरिशी !

हंसुनिया चुंबितां उदास होउनि रडशी ;

मी अश्रु गाळितां खदखद मजला हंससी !

मगरीपरि भक्षक असे तुझी गे प्रीती;

पहिलीच साधुनि संधी मी सोडिन ती !

मी करिन कांही तरि वाटत होतें जगतीं;

तूं येउन माझी केलिस माती माती !

किति मोह होतसे रोज मला अनिवार,

कीं कटयार घेउनि तुला करावें ठार !

मारीन खरा छातींत तुझ्या खंजीर,

माझाच परंतू फाटुन जाइल ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ सप्टेंबर १९३३

लालबावटयाचें गाणें

"असेंच हें चालायाचें

गरिब बिचा-या दलितांचें ;

जगताच्या सौख्यासाठीं

मरती ते अर्ध्यापोटीं.

हा देवाघरला न्याय,

इलाज त्यापुढती काय ?"

चोरांचें तत्वज्ञान

ऐकुनि हें किटले कान.

संत आणखी सरदार

चोरांचे साथीदार !

अन्नवांचुनि जे मरती

उपास त्या शिकवा म्हणती !

व्याघ्रसिंह धांवुनी येतां

जीवास्तव त्यांशीं लढतां,

करुं नका हिंसा अगदीं !

कोंकरांस सांगति आधीं !

समतेची पोपटपंची

जपमाला मधु तत्वांची,

शक्त नसे करण्या कांहीं

दलित सदा दलितच राही.

क्रान्तीचा रक्तध्वज तो

दृष्टिपुढें फडफडत येतो.

दलित जनीं उसळत थोर,

शक्ति असे अपरंपार;

ती सारी केंद्रित करुनी

रक्तध्वज पुढतीं धरुनी

जुलुमाचें उखडूं मूळ,

ढोंग्यांचें काढूं खूळ !

लाखांचें मारुनि पोट,

चाटित जे बसले ओंठ,

त्या चौरां हतबल करुनी,

सर्वस्वा त्यांच्या हरुनी,

लोकांचें सर्वस्व असें,

लोकां देउनि टाकुं कसें !

वसुंधरामाई अमुची

चोरुनि जे बसले त्यांची

हिरावुनी शक्ती घेऊं

लोकांचें लोकां देऊं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ७ ऑगस्ट १९२९

फासावरुन

हा प्रणाम भारतमाते

घे शेवटला बाळाचा । माय भू ।

ही थोडी प्रियतम माती

ह्रुदयीं धरितों दो हातीं । घट्ट गे.

जरि असल्या चरणीं बेडया

विसरशील का मज वेडया । कधि तरी ?

इतरांस

दुष्ट दैत्यांस

भासलों खास

जरी द्रोही मी-नाहलों तरी तव

प्रेमी । उत्कट !

मज नको स्वर्ग सुखधाम

चिंतीन सदा तव नाम । गोडसे.

मरणाची भीती कोणा ?

देशद्रोही षंढाना । भेंकडा !

देशार्थाचि जन्मा आलों

देशार्थाचि स्वर्गी गेलो । हांसत !

हे प्राण

देशनिर्वाण

मायभूत्राण

कराया नाही-वेंचिले जयें

लवलाही । धिक्‌ तया !

दे जन्म हजारों मजला

स्वातंत्र्यास्तव लढण्याला । देशि या.

पाहतोंच डोळे भरुनी

रुप गे तुझे प्रिय जननी । एकदां !

बघु नकोस केविलवाणी

मजकडे दीन नयनांनी । देवते !

स्वातंत्र्य

दिव्य हा मंत्र

स्फुरवि जरि रक्त

तुझ्या बाळांचे-दिन पूर्ण

स्वातंत्र्याचें । जवळची

या शेवटल्या घटिकेला

दिसतसे भावि तव काळ । मज गडे !

स्वातंत्र्याच्या उद्यानीं

फिरतांना दिसशी जननीं । वैभवी.

करितांना तव प्रिय काज

देहास ठेवितों आज । धन्य मी !

पाहुनी

प्रेत मम कुणी

थरकला जनीं

देशभक्तीनें-तरि धन्य धन्य मम

मरणें । जाहले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोणि म्हणती

कोणि म्हणती कसलिं ही प्रतिभेस घेसी बंधनें ?

चांदराती आणखी तीं वल्लभेचीं चुंबनें----

---टाकुनी हें काय गासी रुक्ष, कर्कश, रांगडें ?

शेणमातीचीं खुराडीं आणि रंकांचे लढे !

राव सत्तावंत किंवा दास मध्यमवर्गिय,

गा गडया, त्यां खूष करण्या गान तूझें स्वर्गिय !

तीं तुझीं गुलगूल गाणीं ऐकुनी विसरावया---

---लाव रंकां झुंज जी लढतात ते सत्ता-जया !

वल्ल्भा जाईल माझी मीहि माती होइन;

रंकरावांची रणें इतिहास टाकिल तोडुन.

आणखी उगवेल साम्याची उषा जगतांत या;

काय ते म्हणतील काव्या त्या क्षणीं या माझिया ?

मानवांचे पुत्र लढले, आणि तुटलीं बंधनें;

गाइला हा चांदरातीं वल्लभेची चुंबनें !

क्रांतियुध्दाची चढाई आज जर ना गाइन,

मानवी इतिहास का देईल फिरुनी हा क्षण ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ ऑगस्ट १९३३

दोन देवभक्त

होतीं चार धुरांडि ओकत ढगें काळ्या धुरांचीं जिथें,

संपाग्नी भडकून ना चिलिमही सोडी धुरांतें तिथें!

तेंव्हां मालकही मनीं गिरणीचा झाला बहू रंजित;

सारें एकावटून चित्त मग तो देवा बसे प्रार्थित.

"केली दोन कलक रोज बसुनी पूजा तुझी भक्तिनें

वस्त्रें घालुनि मख्मली, किति तुला मीं घातले दागिनें !

होतां वृध्द मदीय राख तिजला देतों जरी टाकुनी,

नाही का तव मंदिरें दिधलिं मीं नांवें तिच्या बांधुनी ?

होत्या चार स्वयंगती परि अतां मीं ठेविल्या दोन ना !

माझे हाल कसे तुझ्या बघवती देवा, खुल्या लोचना ?

आतां कांहिं तरी असें कर जयें मालास या भाव ये

टक्के आठ करुनि काट मजुरी, बांधीन रुग्णालयें."

होता त्याच क्षणीं कुणीं मजुरही देवाकडे पाहत

डोळे लाल करुनि, मूठ वळुनी मूर्तीस त्या साङत.

"तेथें त्या बघ गोघडींत पडलें अन्नाविणें कुंथत,

माझे बाळ तयास ना मिळतसे रे, खावयाला शित !

वाहोनीं तुजला फुलें फुकटचा पैसा हरुं गांठचा;

गाडया दोन मजेंत तो उडवितो आहे धनी आमुचा !

आकाशांतिल पोलिसा ! छळिसि कां दीनांस आम्हां बरें

देतो टाकुनि मूर्ति ही गिरणिच्या काळ्या धुरांडयांत रे !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ जुलै १९३२

कवने

जुनी पटकुरें अङ्गीं धरुनी

पाउसचिखलीं वणवण खपुनी,

शेतकरी तो फुलवी अवनी'

परी उपाशी बाळें त्याची ।

धान्य खाउनी तेंच पोटभर.

सुखे त्यावरी देउन ढेंकर,

पुष्ट प्रियेचा करि धरुनी कर,

गात असूं किती गोंड्स कर हा ।

यंत्रशक्तिची प्रचंड घरघर,

दमही न घेता मजूर क्षणभर,

वस्त्र विणितसे त्यावर झरझर

रक्ताळ्ति मग डोळे त्याचे

वस्त्र जरा तें जाड म्हणोनी

रुसुनि प्रिया तें देई फेकुनि

क्रुध्द तिच्या ये लाली नयनी

त्यावर आम्ही गाऊं कवने

शंभरातील नव्वद जनता

धुरकटलेल्या कोंदट जगता

'घरे' म्हणोनी त्यांतच कुजतां

औषधास त्या चंद्र ना दिसे ।

आकाशातील तारासंगे

विलासी शशी प्रेमे रंगे,

कृष्ण्मेघ तो येउनि भंगे-

-प्रणय तयाचा, रडतों आम्ही ।

अपुरी भाकर चट्ट खाउनी

रडति आणखी हवी म्हणोनी

कामकर्‍यांच्या मुलांस जननी,

अश्रु दाबुनी नाही म्हणते.

मुर्ख कुणी तरि जोबनवाली,

खुशालचेंडुस ' नाही ' वदली

हृदयिं तयाच्या आग पेटली,

त्यावर शिंपू काव्यजलाला ।

नक्षत्रांची , फुलाफळांची ,

कृष्णसख्याच्या व्याभिचारांची

आणिक झुरत्या युवयुवतींची

खूप जाहलीं हीं रडगाणीं

धनीजनांशीं झुंज खेळुनी

क्षणभर ज्यांना आली ग्लानी

त्यांना आम्ही गाऊं गाणी

ऐकुनि जीं चवताळुनि लढतिल

आणि स्थापितिल सत्ता अपुली


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० ऑक्टोबर १९३१

बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेंस बेगमे तें

अड्खळत वाचुनीयां । आनन्द होई माते.

ते ' नाथ ' आणि ' स्वामी ' । मज सर्व कांहि उमजे

इश्की, दमिश्कि, दिल्नूर । कांहीच गे, न समजे ।

जरि या मराठमोळ्या । शिवबास बोधा व्हावा,

तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ जुलै १९२८

लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे



कुणि नाही ग कुणी नाहीं
आम्हांला पाहत बाई ।
झोंपे मंडळि चोंहिकडे ,
या ग आतां पुढे पुढें
थबकत, थबकत
'हुं' 'चूं' न करित,
चोरुं गडे, थोडे कांही
कोणीही पहात नाही ।



या वरच्या माळ्यावरतीं
धान्याची भरलीं पोतीं,
जाउं तिथें निर्भय चित्तीं
मारूं पसे वरच्यावरती.
उडवुनि जर इकडे तिकडे
दाणे गोटे द्याल गडे
किंवा चोरुनि घेतांना
वाजवाल जर भांड्यांना,
जागी होउन
मग यजमानिण
फसेल सगळा बेत बरें ।
चळूं नका देऊं नजरे



एखादी अपुल्यामधुनी
या धंद्यांत नवी म्हणुनी
लज्जामूढा भीरुच ती
शंसित जर झाली चित्तीं
तर समजावुनि
अथवा भिववुनि
धीट तिला बनवा बाई,
करुं नका उगिचच घाई.



आशा ज्या वस्तुचि चित्तीं
तीच हळुच उचला वरती.
डब्यांत जर थोडे असलें
घेउं नका बाई , सगळे,
मिळे म्हणोनी
उगाच लुटुनी
यजमानिण जरि ती बाला,
करूं नका शंकित तिजला.



जपून असले खेळ करूं
ओटिंत जिन्नस खूप भरू.
लागतां न कोणा वास
'हाय' म्हणुनि सोडूं श्वास
प्रभातकाळी
नामनिराळीं
होउनियां आपण राहूं
लोकांच्या मौजा पाहुं ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोळ्याचें गाणे

आला खुशींत् समिंदर , त्याला नाही धिर,

होडीला देइ ना ठरू,

ग सजणे , होडीला बघतो धरूं ।

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,

सफेत् फेसाचि वर खळबळ,

माशावाणी काळजाची तळमळ

माझि होडी समिंदर , ओढी खालीवर,

पाण्यावर देइ ना ठरू,

ग सजणे, होडीला बघतो धरूं ।

तांबडं फुटे आभाळान्तरीं,,

रक्तावाणी चमक पाण्यावरी,

तुझ्या गालावर तसं काइ तरी ।

झाला खुळा समिंदर , नाजुक होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू,

ग सजणे , होडीला बघतो धरु ।

सुर्यनारायण हंसतो वरी,

सोनं पिकलं दाहि दिशान्तरीं,

आणि माझ्याहि नवख्या उरीं ।

आला हांसत समिंदर , डुलत फेसावर,

होडिंशीं गोष्टी करूं,

ग सजणे, होडीला बघतो धंरु ।

गोर्‍या भाळी तुझ्या लाल चिरी ,

हिरव्या साडीला लालभडक धारीं,

उरीं कसली ग. गोड शिरशिरी ?

खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,

चाले होडी भुरुभुरु ,

ग सजणे, वार्‍यावर जणुं पांखरु ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १७ जानेवारी १९२८

तिमदन

तिजला जणू छबि आपुली रतिची दुजी प्रत वाटते,

मदनाहुनी तिळ्ही कमी निजरूप त्या नच भासतें

नवयौवनी दोघें जंई हीऊ एकमेकां भेटती,

'जय आपुला ' ही खातरी दोघेहि चित्तीं मानिती .।

निजरूपमोहिनिजालका पसरावया ती लागतें,

गुलगूल कोमल बोलणी फ़ांसे तयाचे गोड ते ।

' जय आपुला '- दुसरा गडी झाला पुरेपुर गारद,

मनिं मानुनीं हे पारधी करिती परस्पर पारध ।

राजा निसर्गा सर्व ही अति थोर गम्मत वाटते ,

विजयोत्सवी दोघां बघु अनिवार हासूं लोट्तें ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २ जानेवारी १९२७

दोन चुंबने

पूर्णेन्दू पिवळा हळू हळु असे झाडावरी ठेपला,

झाडे सर्सर्नाद गूढ करिती-एकान्तही वाढला.

तेंव्हा येऊनिया जुन्या स्मृति मनी हो वृत्ति वेडीखुळी,

प्रेमाची दुसरी धनीण अरला होती परी लाभली.

प्रीतीचा पहिला बहार नवलें होता जिला अर्पिला,

मूर्ती येइनि आज मन्मनि तिची झाले कसेसें मला.

तेव्हा ही पहिलीच ती समजुनी वेगे हिला चुंबिले ।

'आहा' , प्रेमभरे वदे , ' मर किती प्रेमात आलिंगिलें ।'

भोळा भाव हिचा बघुन नयनीं झाली उभी आसवें,

आणि चुम्बुनिया हिला पुनरपी प्रेमास केले नवे ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २१ एप्रिल १९२७

माझे गाणें

वसुधामाई माझी जननी, हृदयिं तिच्या बिलगुन,
सदा मी जगालाच गाइन.

बाळांच्या गोंडस गालांचे चुंबन,
युवतीयुवकांचे सुगाढ आलिग्ङन ,
वृध्दांच्या प्रेमळ अश्रुंचें सिंचन,
सारें माझ्या गानिं साठवे घ्या, घ्या , तें वाटुन,
सदा मी जगालाच गाइन.

प्रेमाचा मी सागर, आणिक वैराचा डोग्ङर,
दयाळू आणिक अति निष्ठुर.
अर्भकांवरी आपुलें शौर्य दावुन
अबलांना दुबळ्या जुलमाने गांजुन,
सत्तेचे चाबुक गरिबांवर ओढुन,
अश्रु उधळीले जगतीं कोणी, त्यांना मीं शापिन,
सदा मी जगालाच गाइन .

अज्ञाताच्या अमर्याद या दर्यावर भडकुन ,
चालले मानवताजीचन,
दैवाच्या लाटा येउनिया कोठुन
सवंगडी आपुले टाकितील उलथुन
हें मनांत माझ्या राहि कसें डांचुन
म्हणुनिच माझें विसरुनि ' मी' पण, प्रेमाने रंगुन
सदा मी जगालाच गाइन.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२७

एकाचे गाणें

कैदि कुणी , घोर भयद वेड्यांनी

बध्द असे परि आनन्दे हासे

मी म्हटले, "हांसे , बा हें कसलें ? "

वेडीला दावुनिया मज वदला,

"सोन्याचीं, वलयें बघ मोलाची । "

वदुनि असें, आनन्दें तो हांसे ।

परि मजला मृत्युविवशसा दिसला ।

गहिंवरलों आणिक त्याला वदलों

" तोडुनियां, टाकूं का बेड्या या ? "

क्रुध्द झणी - होवुनियां तो हाणी,-

-बेडया त्या डोक्यावरती माझ्या ।

रक्ताने भिजलीं माझी वसनें,

परि त्याला बेडितुनीं सोडविला ।

कळवळला कृतज्ञतेने रडला ।

पुष्पांनीं पूजा माझी करुनी,

प्रतिदिवशी, गातो स्तुतिगीतांसी ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २२ नोव्हेंबर १९२६

चंदाराणी

निळ्या निळ्या आकाशांत

शोधाया आलें नाथ.

शुभ्र ढगांचा-

-मऊ पिसांचा

करुनि गालिचा,

जरा पहुडलें त्यावरती

घेण्याला क्षण विश्रांती.

चैन मुळीं नच पडे परी;

तशीच फिरलें माघारीं.

मेघनगांच्या घनकुहरीं

धुंडधुंडिलें किती तरी !

चपला येउनि मजजवळी,

'शोधाया जातें ' वदली.

इथें पळाली,

तिथें भटकली,

पुन्हा चमकली;

चंचल परि त्या बालेला

तो कुठचा गवसायाला !

मग म्हटले जावें आतां,

पाताळीं शोधित नाथा.

शोधुनि दमलें,

विकल जाहलें,

तेज पळालें;

अश्रूंचा वाहे पूर !

जीवाभावाच्या सखया

तारा भेटाया आल्या.

त्या मधल्या वदल्या कोणी,

'नका भिऊं, चंदाराणी !

जलधीमध्यें शिरतांना,

दिसला आम्हां रविराणा.'

ऐकुनि त्यांच्या वचनाला,

किति उठल्या झणिं जाण्याला.

रविरायाला

शोधायाला

जलधितळाला,

उडया पटापट त्या घेती

जीवाची सोडुनि भीती !

किती जाहलीं युगें तरी,

अशीच फिरतें पिशापरी !

प्रेमामृत जोंवरि जवळी,

आशा तोंवर ना सुटली !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ नोव्हेम्बर १९२२