kusumagraj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
kusumagraj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी




गीत    -    कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
संगीत    -    वसंत प्रभू
स्वर    -    लता मंगेशकर

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले



कवी - कुसुमाग्रज
(वीज म्हणाली धरतीला)

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.


कवी - कुसुमाग्रज

कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

शेवटचे पान

आवर पद हे मत्त प्रवासी,

पहा जरा परतून प्रवासी, पहा जरा परतून्

घेत सुगंधाचा मागोसा

अलीपरी आलास विलासा

आणि फुलोरा लुटून जासी नव वेलीवरतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

कलेकलेने चान्द खरोनी

आवस आली माझ्या गगनी

तोच उदेले दोन सुधाकर सुन्दर नयनातून्

प्रवासी, पहा जर परतून्

आणि चान्दणे सवे घेउनी

दुणावुनी तम जासी निघुनी

कशी साहुं रे धुन्द रात ही बाहेरून आतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

क्षणभर येउन क्षणभर राहुन

क्षणभर हांसुन क्षणभर पाहुन

क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालून

प्रवासी, पहा जरा परतून्

वाळवण्टि तू एक पदाती

ना कुणि सोबत ना साङ्गाती

पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन्

प्रवासी, पहा जरा परतून्

परत पाखरा, खन्त कशाला

घालिन तनुची तुला दुशाला

उन्नत माझे ऊर उशाला घोष तुझा ज्यांतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

जाणारच का-सुखात जा तर

बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून्

प्रवासी, पहा जरा परतून्

शेवटले जा पान मिटू दे

सुखेनैव यापुढे तुटू दे-

ह्रदयाचे रेशीम पदी तव बसलेले गुंतून

प्रवासी, पहा जरा परतून्


कवी - कुसुमाग्रज
ठिकाण - पुणे
सन - १९३८

प्रेमयोग

प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....
सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं
प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............


कवी - कुसुमाग्रज

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज

आधार

चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते….
पुन्हा एकदा सांधते आहे

अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार…



कवि -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

जखमांचं देणं

आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर

सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी

गहाळ झाला

उरलेल्या सहांच्या गळ्यातून

प्रथमच

अनावर हुंदका फुटला

‘ ती असती तर’ – ते उद्गारले,

तो हरवला नसता

मीही अनावरपणे

सातवा चमचा झालो

आणि त्याची रिकामी जागा घेउन

सहांच्या हुंदक्यात

सामील झालो – आणि

पुटपुटलो;

खरं आहे, मित्रांनो

ती असती तर

मी हरवलो नसतो.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

वास्तव

परवाच्या पेपरात एक बातमी वाचली
बातमी:
कालच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले ,
बुडून मेले.

बुडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही पाच तारयांचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम नाही बुडाले

झोपडपट्टीतील एका उघड्या-नागड्या मूलाचे
असे मूल्य ते किती?
साधे गणित येत असेल तर करता येईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच
आणि हे मत तुमचे किंवा माझेच आहे असे नाही
त्याच्या आईचेही तेच असावे

कारण मुलाचे कलेवर मांडीवर घेउन
ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा
एक वार्ता वस्तीवर येऊन कोसळली.
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा घशातच आवरला अर्ध्यावर
मूलाचे कलेवर जमिनीवर टाकून ती उठली
आणी घरातल्या सगळ्या पिशव्या गोळा करुन
बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी.


कवी - कुसूमाग्रज

तेव्हा

पहाटेच्या काळोखी फांद्यातून
अवेळी जागलेल्या कोणाएका
कोकिळेने
भ्रमिष्टपणे
दिली भिरकावून आकाशावर
कोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी
चौधारी
पल्लेदार स्वरावळ
नंतर सारं स्तब्ध….
संगमरवरी स्तंभाला टेकून
उभी राहिलेली व्याधाची चांदणी
किंचित हसली,
आणि रुपेरी वस्त्राचे हेम
अलगद उचलून
उतरायला लागली पहिली पायरी
क्षितिजाच्या तळाकडे…..
तेव्हा चारही वाजले नव्हते


कवी -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

प्रवास

क्षितीजाचे तट फोडून धावे
अश्व सनातन मार्गावरती.
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती.

रवी-शशीचे परजीत पलिते
स्वार तयावर बसला आहे.
अश्व न जाणे स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे

कवी - कुसुमाग्रज

अनाम वीरा

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !


गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?

तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”


कवी - कुसुमाग्रज

निवास

खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारख्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा
ज्वालामुखीच्या उद्रेकांनी,
उसालेली उद्यानं
दग्ध होतात
किंवा कोकीळांची कूजनं
बाकीच्या प्रपातात,
गोठून पडतात,
तेव्हा
माझा निवास
त्या तारकेवर असतो,
व्यवहारापुरत
मी येथे
वावरत असलो तरी




कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

अन्यथा

तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा -
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्‍या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
- अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.


कवी - कुसुमाग्रज

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो

वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती

काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते

असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे

माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज