नवीन संन्यास

उत्साहसिंधु थोर। चित्तात नाचवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास हालवील

मालिन्य संहरुन। स्फूर्तीस पेटवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास चेतवील

कर्मात रंगुनिया। लोकांस रंगवील
संन्यास हा नवीन। आलस्य घालवील

सेवेत राबुनिया। लोकांस राबवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास शोभवील

सेवेत रंगुनिया। वस्त्रे न रंगवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास जागवील

दास्यास दूर करुन। चैतन्य खेळवील
संन्यास हा नवीन। मोक्षास पाववील

राष्ट्रास उद्धरील। दैन्यास भंगवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास हासवील

क्षण एक ना बसेल। बंधूस जीववील
संन्यास हा नवीन। देशास भूषवील

बांधील कारखाने। शाळा उभारवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास वाचवील

रस्ते करील नीट। संडास साफ करील
संन्यास हा नवीन। घाणीस संहरील

अस्पृश्य बाळकांना। जाऊन तो धुवील
संन्यास हा नवीन। भेदास घालवील

सर्वत्र आत्मतत्त्व। आचारि दाखवील
संन्यास हा नवीन। न वदेल फक्त बोल

गायींस पोषुनिया। भरपूर दूध करील
संन्यास हा नवीन। आरोग्य वाढवील

ऐक्यास निर्मुनिया। सत्प्रेम दाखवील
संन्यास हा नवीन। सत्पंथ शिकवील

राष्ट्रास भूषवील। विश्वास तोषवील
संन्यास हा नवीन। सन्मुक्ति चाखवील

संन्यास हा नवीन। सूत्रांस हालवील
संन्यास हा नवीन। संसार चालवील

राहूनिया अ- सक्त। सेवा सदा करील
संन्यास हा नवीन। सत्पंथ हा वरील


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३२

विपत्ति दे तीहि हवी विकासा

करुन माता अनुराग राग। विकासवी बाळ- मनोविभाग
फुले करु सेवुन उष्णशीत। जगी असे हीच विकासरीत।।

पिका हवे ऊन तसे पाणी। तरीच ते येइल भरभरोनी
प्रभो! न संपत्ती सदैव मागे। विपत्तिही दे मज सानुरागे।।

कभिन्न काळे घनमेघ येती। परी जगा जीवनाधार देती
विपत्ति येतील अनेक घोर। परंतु देतील विकास थोर।।

विपत्ति ही चित्तविकास- माता। दुजा नसे सदगुरु बोधदाता
विपत्ति मानीन सदा पवित्र। विपत्ति माझे घडवी चरित्र

विपत्ति मानीन मनी अमोल। विपत्ति माझे बनवील शील
विपत्ति आकार मनास देई। विपत्ति खोटे भ्रम दूर नेई।।

विपत्ति आणील जळास डोळा। मिळेल पाणी तरि जीवनाला
विपत्ति डोके जरि तापवील। स्वजीवना ऊबच ती मिळेल।।

विपत्ति मांगल्यखनी खरीच। विपत्तिरुपे मिळतो हरीच
उराशि मी लाविन ती विपत्ति। कधी न जाईन जळून चित्ती।।

विपत्तिमाजीच विकासबीज। घनांतरी वास करीत वीज
विपत्तिंतून प्रकटेल तेज। विपत्तिपंकी शुभचित्सरोज।।

कधी न लागे झळ ज्या नराला। न आच लागे कधि यन्मनाला
तया न पूर्णत्व कधी मिळेल। गंभीर त्या जीवन ना कळेल।।

विपत्ति ही जीवनवीट भाजी। विपत्ति संजीवनधार पाजी
विपत्ति आणी रुचि जीवनाला। विपत्ति दे स्फूर्ति सदा मनाला।।

प्रकाश अंधार, तरीच वाढ। सदा न मारा न सदैव लाड
विपत्ति द्या, द्या मधुन प्रकाश। प्रभो! असे मागतसे पदांस।।

विपत्ति दे तीही हवी विकासा। सदैव देशील करील नाशा
सदैव थंडी, तरि गारठेल। कळी, न ती सुंदरशी फुलेल।।

सदैव दु:खे तरि ये निराशा। दिसे न मांगल्य दिसे न आशा
मनी शिरे द्वेष तशीच चीड। भरे तिरस्कार मनी उदंड।।

म्हणून देवा! प्रणती पदास। विपत्ति ना संतत दे कुणास
करुन कारुण्य करुन कोप। विकसवी जीवन- रम्यरोप।।

प्रभो! विनम्र प्रणती पदांस। विपत्ति दे तीहि करी विकास
परी कृपाळा! न सदैव ती दे। तरीच मांगल्य मनात नांदे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

दु:ख आनंदरुप

कर्तव्याला करित असता दु:ख आनंदरूप
व्हावे माते, मजसि भरु दे अंतरंगी हुरूप
जावे दु:खे खचुन न, वरी सर्वदा म्या चढावे
व्हावे क्लेशे विचलित न मी, धीर गंभीर व्हावे।।

दु:खे व्हावे जळुन सगळे चित्तमालिन्य खाक
सदभावांची शुभ झळकु दे तेथ लावण्यझाक
दु:खे व्हावे विमलतर मन्मानसांबु प्रसन्न
दु:खे व्हावे स्थिरमति अति स्वांतरंगांत धन्य।।

दु:खे येता, हृदयी भरु दे शाश्वताचा विचार
दु:खे येता, उठुन पुस दे दीननेत्रांबुधार
दु:खे येता सहज मम हा जीव चंडोल व्हावा
जावा ध्यानांबरि उडुनिया दिव्य गानी रमावा।।

दु:खावीणे जगति न असे जीवना पूर्णता ती
दु:खे होते हृदय सरस, प्राणि ते धन्य होती
दु:खे उल्लू मतिस करिती खोल गंभीर धीर
दु:खे दृष्टी विमल करिती नेत्रिं आणून नीर।।

आपत्तीला सतत समजा दूत हा ईश्वराचा
व्हावे ना हो विमुख, करणे नित्य सत्कार तीचा
आशीर्वाद प्रभुजि वितरी देउनी दु:ख- वेष
सत्कारावा मुदित हृदय्, क्लेश मानून तोष।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली फेब्रुवारी १९३१

प्रेमधर्म

हिंदू आणिक मुसलमान ते भांडत होते तदा
राष्ट्रावरती महदापदा
जिकडेतिकडे हाणामारी दंगेधोपे सुरु
माझा जीव करी हुरहुर
परस्परांच्या खुपशित होते पोटामध्ये सुरे
ऐकुन माझे अंतर झुरे
गेले बंधुभाव विसरुन
गेले माणुसकी विसरुन
गेले पशुच अंध होउन
अविवेकाने परस्परांचे कापित होते गळे
माझ्या डोळ्यांतुन जळ गळे।।

खिन्न होउनी, उदास होउनी निराश होउन मनी
बसलो होतो मी त्या दिनी
एकाएकी अन्यत्र मला आहे बोलावणे
नव्हते शक्यच ते टाळणे
सायंकाळी गाडी होती तिकिट तिचे काढुन
बसलो गाडीत मी जाउन
नव्हते लक्षच कोणीकडे
येई पुन:पुन्हा मज रडे
भारति माझ्या का कलिकिडे
विचार नाना काहुर उडवित मानस शोके जळे
प्रभु दे सुमति कधी ना कळे।।

देव मावळे पश्चिमभागी लाल लाल ते दिसे
रक्तच का ते तेथे असे
काय तिथेही खून चालले? रवि का कुणि मारिला?
कुणि तत्कंठ काय कापिला?
भेसुर ऐसा विचार येउन मनि गेलो दचकुन
पाहू लागे टक लावुन
विरले लाल लाल ते परी
तारका चमकू लागत वरी
शांती पसरे धरणीवरी
लाल लाल रुधिरानंतर का शांति जगाला मिळे
काहिच मन्मतिला ना कळे।।

गाडीमध्ये दिवे लागले, तारका वरि जमकले
तिमिरी प्रकाश जगता मिळे
भारतीय जनता हृदयांबरि प्रेमतारकातती
केव्हा चमकु बरे लागती?
प्रेमदीप कधि भारतीय-हृन्मंदिरि पाजळतिल?
केव्हा द्वेष सकल शमतिल?
वरती ता-यांना पाहुन
ऐसे विचार करि मन्मन
मधुनी पाझरती लोचन
खिडकीच्या बाहेरच मन्मुख जे अश्रूंना मळे
डोळे प्रभुचरणी लाविले।।

गाडीमध्ये नानापरिचे होते तोथे जन
तिकडे नव्हते माझे मन
एकाएकी खिडकीतुन परि आत वळविले मुख
विद्युद्दीप करित लखलख
गोड गोड मी शब्द ऐकिले भरलेले प्रीतीने
गेलो मोहुन त्या वाणिने
होती एक मुसलमानिण
होती गरीब ती मजुरिण
दिसली पोक्त मला पावन
आवडता तत्सुत बाहेरी पुन:पुन्हा पाहत
होती त्याला समजावित।।

गरीब होती बाई म्हणुनी नव्हता बुरखा तिला
होता व्यवहार तिचा खुला
प्रभुच्या सृष्टीमधे उघड ती वागतसे निर्भय
सदय प्रभुवर ना निर्दय
खानदानिच्या नबाबांस ती आवरणे बंधने
गरिबा विशंक ते हिंडणे
होती तेजस्वी ती सती
दिसली प्रेमळ परि ती किती
बोले मधुर निज मुलाप्रती
मायलेकरांचा प्रेमाचा संवाद मनोहर
त्याहुन काय जगी सुंदर?।।

“नको काढु रे बाळा! डोके बाहेरी सारखे”
बोले माता ती कौतुके
“किति सांगावे फार खोडकर पुन्हा न आणिन तुला”
ऐसे बोले प्रेमे मुला
“ये मजजवळी मांडीवर या ठेवुन डोके निज
बेटा! नको सतावू मज
झाली भाकर ना खाउन
जाई आता तरि झोपुन
डोळ्यांमध्ये जाइल कण”
असे बोलुन प्रेमे घेई बाळ जवळ ओढुन
ठेवी मांडीवर निजवुन।।

पाच सहा वरुषांचा होता अल्लड तो बालक
माता करिते तत्कौतुक
क्षणभर त्याने शांत ठेविले डोके मांडीवरी
चुळबुळ मधुन मधुन तो करी
पुनरपि उठला, गोड हासला, मातेसही हासवी
जाया संमति जणु त्या हवी
का रे उठसि लबाडा अता
डोळे मिटुनी झोपे अता
ऐसे अम्मा ती बोलता
फिरुन तिच्या मांडीवरती बाळ गोड झोपला
त्याचा मुका तिने घेतला।।

मुसलमान बाईशेजारी होती एक कुणबिण
होते करुण तिचे आनन
लहान अर्भक बसली होती मांडीवर घेउन
पाणरलेले तल्लोचन
एकाएकी मूल रडाया मोठ्याने लागले
पाजायास तिने घेतले
घाली पदर तन्मुखावरी
लावी स्तनास तन्मुख करी
अर्भक आक्रंदे ते परी
पुन:पुन्हा ती स्तनास लावी अर्भकमुख माउली
परि ते तोंड लाविना मुळी।।

“पी रे बाळा! ही वेल्हाळा! नको रडू रे असा
रडुनी बसला बघ रे घसा
किति तरि रडशिल उगी उगी रे काय तुला जाहले
गेले सुकुन किती सोनुले
उगी उगी रे पहा पहा हे दिवे लागले वरी”
राहे बाळ उगा ना परी
त्याला पायावर घालुन
हलवी आई हेलावुन
बघते अंगाई गावुन
रडे तयाचे कमि न होइ परि अधिकच रडू लागला
वाटे मरण बरे जननिला।।

चहा चिरुट चिवडा भजि यांचे भक्त तदा कोपले
मातेवरि गुरुगुरु लागले
“किति रडविशि गे त्या पोराला ट्यांहा ट्यांहा करी
होतो त्रास इथे किति तरी
दांडक थोपट टाक निजवुनी
घंटाभर रडतसे
लाजच बायांना या नसे”
ऐकून निर्दय ते बोलणे
बालक आपटिले जननीने
बाकावरती निष्ठुरपणे
“तूहि कारट्या आईला या आलास छळावया”
बोले माया विसरुनिया।।

पुन्हा उचलिले तिने तान्हुले प्रेम न रागावते
क्षणभर जणु ते भांबावते
“उगी उगी रे तुला नाहि हो बाळा! मी बोलल्ये
दैवच फिरले रे आपुले
पी रे राजा, पी हो थोडे, वाटेल तुल बरे”
ऐसे बोले ती गहिवरे
बाळ स्तना न लावी मुख
माता खाऊ पाहे विख
करुनी पायांचा पालख
बसली हलवित फिरुनी त्याला अगतिक भरल्या मने
वदवे काहि न तिज वाणिने।।

केविलवाणी हताश होउनि बसली ती माउली
रडते बाळक मांडीवरी
मनात म्हटले मी देवाला ‘बाळ करी रे उगी’
परि मद्वाणी ती वाउगी
प्रेमे हृदयी वोसंडोनी स्वपर सकल विसरुनी
हाती बालक ते घेउनी
असते जरि मी समजाविले
असते किति सुंदर जाहले
नव्हते भाग्य परी तेउले
मदहंकारे दूर राहुनी आळविला मी प्रभु
दंभचि परि तो जाणे विभु।।

मुसलमान बाईचे त्या असे हृदय खरे आइचे
गेले कळवळुनी मन तिचे
पुत्रप्रेमाचा तिज होता पावन तो अनुभव
सुमधुर मंगल सुंदर शिव
मांडीवरती डोके ठेवुन बाळ तिचा झोपला
होता हळुच तिने उचलिला
तेथे चिरगुट मग पसरुन
त्यावर निज बाळक निजवुन
उठली बाई मुसलमानिण
हिंदू बाइच्या जवळी गेली बोले मधुर स्वरे
कुणबिण फारच ते गहिवरे।।

“द्या मजजवळी, द्याच जरासा, घेते त्याला जरा”
ऐसे बोलुन पसरी करा
“फारच आहे रडत सारखा दृष्ट काय लागली
घामाघूम तनू जाहली
रडुनी रडुनी दमला तरिही रडणे ना थांबवी
दूधही अंगावर ना पिई
द्या मजजवळ जरा लेकरा
संकोच न तो इवला करा
घेउन बघते मी त्या जरा”
प्रेमाचे अनकंपेचे ते गोड शब्द बोलुन
घेई बाळक ती ओढून।।

गोड बोलते मुलाजवळ ती “रडू नको रे असा
रडुनी रडविसि आइस कसा”
टिचक्या वाजवि, दिवे दाखवी, हातांनी नाचवी
त्याचे हातपाय खाजवी
कानी त्याच्या कुर्र करितसे भांडे ती वाजवी
अम्मा अर्भक ते खेळवी
तेव्हा चांद उगवला नभी
फुलवी बालकवदनच्छबि
“रो मत उगि हां बेटा अबी”
प्रेमे बोलुन, बाळ डोलवी वात्सल्ये खेळवी
त्याचे रडणे ती थांबवी।।

चमत्कार जाहला खरोखर बाळ-रडे थांबले
हासू खेळू ते लागले
अम्मा त्याला वरती उडवी घेइ करी झेलुन
बाळक हसते ते खेळुन
गोड गोड ते हास्य तयाचे डब्यात पसरत असे
इतरांनाही सुखवीतसे
येती चंद्रकिरण गाडित
अर्भक गोड तसे हासत
माझे मानस मोहावत
कृतकृत्य तया अम्मेलागी मनात जणु वाटले
अमित प्रेम मनी दाटले।।

“उगा राहिला, खेळु लागला, पाजा त्याला अता
झोपले क्षण न लागता”
असे बोलुनी अम्मा देई अर्भक जननीकरी
घेई माता मांडीवरी
पाजायाला मूल घेतले स्तनास लावी मुख
बाळ प्राशी होई सुख
भरले मातेचे लोचन
भरले मातेचे ते स्तन
भरले गहिवरुन तन्मन
बाळराज तो राजस होता पीत पोटभर पय
झाले मातृहृदय सुखमय।।

पुन:पुन्हा ती त्या बाळाला घट्ट आवळुन धरी
माता सुखावली अंतरी
बाळाने हे रिते करावे भरलेले स्वस्तन
ऐसे वांछी किति तन्मन
पोटभरी तो प्याला धाला पदर दूर सारित
बालक निजमुख-शशि दावित
हसणे मधुर किति मनोहर
काळेभोर नयन सुंदर
मुख मोहाचे माहेरघर
अमित सुखाचे भरले आले घेइ मुके कितितरी
माता, तृप्त न परि अंतरी।।

“काय लबाडा! झाले होते, रडावयाला मघा
आता गुलाम हसतो बघा
मघा कोणते आले होते भूत गुलामा तुला
चावट कुठला वेडा खुळा
पहा पहा हो किति तरी हसतो, तुम्हि याला हसविले
अमृत त्याच्यावर शिंपले
ओळख पूर्वजन्मिची जणु
संशय मज न वाटतो अणु”
ऐसे बोलुन हलवुन हनु
मुका तयाचा घेइ आई बाळक ते हासले
पोटी प्रेमाने घेतले।।

कृतज्ञतेने कुणबिण किति ती हृदया भरली असे
गहिवर पोटी मावत नसे
हासत खेळत बाळक निजला क्षणात मांडीवर
आइस आवरे न गहिवर
अम्मेचे मुख कृतज्ञतेने भरल्या नेत्री बघे
शब्द न बाहेरी परि निघे
“तुम्ही हासविला मद्बाळक...”
परि तिज वदवेना आणिक
पाहे भरल्या नेत्री मुख
अम्मेचा ती हात आपुल्या हाती प्रेमे धरी
त्यावरि गळती अश्रुच्या सरी।।

भरलेल्या अंतरातून त्या वच बाहेर न फुटे
नयनी प्रेमझरा परि सुटे
हृदयामधला भाव सकल तो विमलाश्रू दाविती
तेथे शब्द सकळ खुंटती
मुकेपणा तो बेलुन दावी अनंत हृदयातले
अन्योन्यासचि सगळे कळे
थोडी ओसरली भावना
झाला अवसर संभाषणां
पुशिती पदराने लोचना
दोन अशा त्या माता दिसल्या गंगायमुनांपरी
नति मी केली दुरुनी करी।।

कुणबिण मग ती हळुच सोडिते पदराच्या गाठिस
काढी त्यातून सुपारिस
अम्मेला द्यावयास जवळी दुसरे काहिच नसे
कुणबिण दीन दरिद्री असे
कृतज्ञतेला प्रकट कराया उत्सुकता मानवा
त्याविण समाधान ना जिवा
करण्या कृतज्ञता प्रकट ती
पुरते पोद्यांची मूठ ती
असु दे वस्तु कशी वा किती
कृतज्ञतेचा सिंधु मावतो बाह्य-चिन्ह-बिंदुंत
जैसा विश्वंभर मूर्तित।।

सुपारिचे ते खांड काढिले अम्मेला ते दिले
भरले कृतज्ञतेने भले
साधे नव्हते खांड, अमोलिक मंतरलेले असे
जिविचा भाव त्यात तो वसे
माणिकमोत्यांच्या राशीहुन त्रिभुवनलक्ष्मीहुन
अधिकचि कृतज्ञतेची खुण
होती कठिण सुपारी जरी
प्रेमे भिजलेली ती परी
अम्मेच्या ती देई करी
देउन पाही पुन्हा तन्मुखा भरलेल्या लोचनी
अम्मा विरघळली ती मनी।।

होते मांडीवरती निजले मूल गोड गोजिरे
साजिरे दमले रडुनी खरे
रडावयाचे कसे थांबले? काय जादु जाहली
माझी वृत्तिच ती गुंगली
क्षणात पडला प्रकाश माझ्या हृदयी सुंदर परी
कळली गोष्ट मला अंतरी
नवपिढिचा तो बालारुण
होता करित अमित रोदन
होता भुका, न परि घे स्तन
भेदातीत प्रेम पिउन तो बालप्रभु तोषला
खुलला फुलला मग हासला।।

मुसलमान मी, मी हिंदू, हे माता त्या विसरल्या
प्रेमसमुद्री त्या डुंबल्या
माता तेथुन एकच, त्यांचा धर्म एकची असे
एकच वत्सलता ती असे
हास्य, अश्रु ते एकच असती सगळ्यांना समजती
हृदये हृदयाला जोडिती
एक प्रेमधर्म तो खरा
कळतो सकळांच्या अंतरा
परि ना रुचतो अजुनी नरा
हृदयांतील या सद्धर्माला दडपुन पायातळी
जगि या माजविती हे कली।।

परस्परांची वैरे विसरा विरोध ते मालवा
प्रेमे जीवन निज रंगवा
परस्परांची उणी न काढा परगुणगौरव करा
कर धारुनी सहकार्या करा
परस्परांच्या संस्कृतिमधले हितकर मंगल बघा
बघु दे दृष्टि सुंदर शुभा
होऊ प्रभुचे यात्रेकरु
सगळे सुपंथ आपण धरु
जग हे आनंदाने भरु
कधी परी हे होइल? कधि का होइना मी तरी
पूजिन प्रेमधर्म अंतरी।।

मोठे मोठे आग लावणे हाच धर्म मानिती
प्रेते उकरुन ती काढिती
इतिहासातिल जनांपुढे हे भुतावळिच मांडिती
मंगल शिव ना ते दाविती
विझवतील ना वणवे कोणी तेलच ते ओतिती
सार्थक ह्यांतच ते मानिती
खोट्या स्वाभिमान-कल्पना
खोट्या धर्माच्या कल्पना
करिती स्मशान नंदनवना
न अहंतेचे महंत व्हावे धर्म अहंता नसे
धर्म प्रेमी नांदत असे।।

धर्माचे सत्प्रेम हेचि हो सुंदर सिंहासन
दिसती धर्म तिथे शोभुन
द्वेषमत्सरांचे ते आहे धर्माला वावडे
धर्मा प्रेम एक आवडे
प्रेमरुप तो परमेश्वरही प्रेमे त्याला पहा
पूजा प्रेमाची त्या वहा
सकळही देवाची लेकरे
कोठे भेद तरी तो उरे
झाले पाप अता ते पुरे
जीवनपंथा उजळो आता प्रेमदीप शाश्वत
पावू मंगल मग निश्चित।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३३

परी बाळाला सकळ ती समान

तीन वर्षांचा बाळ गोड आला। नसे सीमा जणु त्याचिया सुखाला
हास्य त्याच्या मुखि गोड किति साजे। मूर्ति गोंडस ती गोजिरी विराजे।।

अधर मधुर तसे गोड गाल डोळे। सुखानंदाने भरुन जणू गेले
काय झाले सुख एवढे अपूर्व। तया बाळा, ज्यापुढे तुच्छ सर्व।।

“काय सापडले? हससी का असा रे। लबाडा सांग सांग सारे”
प्रश्न ऐकुन लागला हसायाला। अधिक निज मोदा दाखविता झाला।।

खिशामाजी तो बाळ बघू लागे। “काय आहे रे त्यात मला सांगे”
फिरुन हसला मत्प्रश्न ऐकुनी तो। कौतुकाने परि पुन्हा तो पहातो।।

हास्य ओठांतुन दाबल्या निघाले। बाळकाने मग फूल काढियेले
खिशातूनी ते गोड गुलाबाचे। दिव्य सुंदर सदधाम सुगंधाचे।।

काढि बाळक ते प्रथम फूल एक। दुजे काढी मग त्याहुनी सुरेख
आणि तिसरे ते कण्हेरिचे लाल। सकल संपत्ति प्रकट करी बाळ।।

परी राहे सुम अजुन एक आत। खिशामाजि पुन्हा घालि बाळ हात
फूल चौथे बाहेर काढियले। सर्व सुकलेले वाळुन जे गेले।।

चार पुष्पे मज दाखवून हासे। चार पुष्पे मज दाखवून नाचे
पुन्हा चारीही ठेवि ती खिशात। हसुन बाळक तो दूर निघुन जात।।

तीन पुष्पे रमणीय गोड छान। परी चवथे ते गलित शुष्क दीन
तुम्ही म्हटले असतेच तया घाण। परी बाळाला सकळ ती समान।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२९

ग्रंथमहिमा

दु:खाला जे विसरवनिया दिव्य आनंद देती
एकांती जे परम निकट स्नेहि सप्रेम होती
चित्ती ज्यांच्या मुळि न शिवतो भेद हा साव चोर
सर्वांनाही सुखवित सदा ग्रंथ हे संत थोर।।

कोणी येवो पुरुष वनिता बालिका बाल वृद्ध
सर्वा देती सुरस, करिती बुद्धिते जे समृद्ध
गांभीर्याते किति तरि पहा जीवनी आणितात
आपन्मग्ना हत-जन-मना ग्रंथ हे तातमात।।

तुम्हां द्याया सतत असती ग्रंथराजे तयार
पावित्र्याची परम विमला ज्ञानपीयूष-धार
जी संसारी तृषित हृदये ग्रंथ हे ज्ञानसिंधु
त्यांना होती मधुर, निवती सेविता एक बिंदु।।

झाले गेले कितिक परि ते ग्रंथ आहेत नित्य
आनंदाला वितरुन जगा दाविताती सुपंथ
सेवा धामी विपिनि करिता ग्रंथ तैशीच कारी
नाही सा-या भुवनि असले मित्र नित्योपकारी।।

रात्री प्रात:समयि उघडा ग्रंथ केव्हाहि वाचा
युष्मत्सेवा विपुल करणे हाच आनंद त्यांचा
हिंडायाची अविचलमने काळसिंधूवरून
ज्याला इच्छा, फिरविति तया ग्रंथ हातात धरून।।

नानालापे रमविति मना ग्रंथ ही गोड वेणू
जे जे वांछी मन वितरिती ग्रंथ ही कामधेनू
मातीलाही कनक करिती लाजवीती परीस
नाही मोठा हितकर सखा अन्य ग्रंथापरीस।।

आयुष्याची हितकर दिशा ग्रंथ हे दाखवीती
जीवित्वाची शिकविति कला नूतना दृष्टि देती
उन्मत्तांना नमविति विपदग्रस्त त्या हासवीती
प्रज्ञावंत स्थिर करुनिया मूर्ख त्या लाजवीती।।

संबोधूनी करिति जगदुत्कर्ष हे ग्रंथ साधे
ग्रंथलोके मनुजमतिला कार्यकौशल्य लाधे
नि:स्वार्थी हे अखिल-भुवनाचार्य सदग्रंथ दिव्य
मानव्याला उचलिति वरी पंथ दावीत भव्य।।

माता भ्राता प्रियसख गुरु तात वा रम्य कांता
नानारुपे रमविति पहा ग्रंथ हे मानवाता
जे ना कोणाप्रतिहि कथिले ग्रंथकारे विचार
ते या ग्रंथी प्रकट, उघडे अंतरातील सार।।

सांगे ना जी प्रियतमजनापाशिही ग्रंथकार
ओती ती हो खळबळ इथे, विवृत स्वांतदर
पापुद्रे ते सकळ दिसती चित्तकंदावरील
येई सारे हृदय कळुनी गूढ गंभीर खोल।।

ग्रंथाकारे विमल अमरा दिव्यरंगा समाधी
लावण्याची परम मधुरा लेखक स्वीय बांधी
कैसे तेथे झळकति हि-यांसारखे सद्विचार
जैसे नानाविध मणि तसे भावनांचे प्रकार।।

ग्रंथामाजी अमर असती दिव्य चैतन्यरुप
कर्ते, विश्वा सुखविति सदा मोद देती अमूप
केव्हाही ना मृति शिवतसे थोर सदग्रंथकारा
लोकोद्धारा निशिदीन उभा द्यावया ज्ञानधारा।।

त्रैलेक्यी या फिरविति तुम्हां ग्रंथ देऊन पंख
तत्त्वज्ञानी कवि मुनि तसे भेटती राव रंक
अंतर्यामी उसळविति ते गोड आनंदपूर
केव्हा केव्हा रडविति किती गाउनी दु:खसूर।।

संसाराचे त्रिविध मनुजा दाविती ग्रंथरुप
नाना रुपे मनुजहृदया ज्ञान देती अमूप
छेडोनीया तरल हृदयी सूक्ष्म तारा अनंत
जीवात्म्याला परिसविति ते दिव्य संगीत ग्रंथ।।

जे जे काही घडत असते मानवी जीवनात
अंतर्बाह्य प्रकट करिती ग्रंथ सामर्थ्यवंत
अंत:सृष्टी गुरु किती तरी बाह्यसृष्टीपरीस
ते सदग्रंथांवरुन कळते होइ अंतर्विकास।।

केव्हाही दुर्मुख न दिसती ग्रंथ नित्य प्रसन्न
ना कोणाला कथितिल कधी गोष्टी त्या भिन्न भिन्न
ग्रंथांऐसे परमसुख ना देखिले या जगात
ग्रंथी होता निरत मज तो होउ दे मृत्यु प्राप्त।।

आदर्शाला, शुभ अशुभ वा स्वीय रुपा बघाया
देती ग्रंथ स्वकरि मनुजा, या मिषे उद्धाराया
‘सत्याचा तो विजय ठरला, सत्य पूजा सदैव’
सदग्रंथी हे सतत असते सूत्र हो एकमेव।।

माते ना ते विभव रुचते राजवाडे नको ते
नाते गोते मजसि नलगे नाम मोठे नको ते
वस्त्रांची ती तलम न रुची ना अलंकार काम
व्हावे माझ्या निकट परि हे ग्रंथ कैवल्यधाम।।

रात्री माझ्या निकट असु दे तैलसंपूर्ण दीप
इच्छा नाही इतर असु दे ग्रंथराजे समीप
कोठे रानी मग सदनि वा अन्य देशी तुरुंगी
आनंदाने परिहरिन मी काळ सदग्रंथ-संगी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

गुढीपाडवा

नूतन संवत्सर आला। मोद मनाला बहु झाला
घालुन सुंदर सडे पथी। शोभा करिती लोक किती
उंच गुढी ही उभारली। चमके तेजे नभ:स्थळी
सुंदर पट सुंदर माळा। गुढी सजवली सुमंगला
मंद वायुने कशी डुले। जनमतिकलिका मुदे खुले
विसरा मागिल शुभाशुभ। नूतन करणे आरंभ
विसरा मागिल कलहाना। विसरा मागिल अपमाना
विसरा दुष्कृति मागील। टाका पुढती पाऊल
मागिल मंगल घेऊन। पुढेच जाऊ चालून
निर्मा उज्ज्वल आकांक्षा। निर्मा हृदयी शुभ वांछा
नूतन जीवन सजवावे। आशेने पुढती जावे
दु:ख दैन्य नैराश्य कथा। हरु संहरु जगदव्यथा
आनंदरसा निर्मू या। विपुल समस्ता देऊ या
आनंदाचे साम्राज्य। स्वातंत्र्याचे साम्राज्य
मांगल्याचे साम्राज्य। भूवर निर्मू या आज
चला सकल सवंगडे तुम्ही। आपणास ना काहि कमी
स्वर्ग धरित्रीवर आणू। पृथ्वी मोदाने न्हाणू
विजयध्वज उभवू दिव्य। स्वातंत्र्याचे ते भव्य
चला उभारा गुढी उंच। कुणी न राहो जगि नीच
करु वर अपुल्या या माना। घेऊ सन्मानस्थाना
गुढी नाचते गगनात। श्रद्धा नाचे हृदयात
सदैव आशा बाळगुन। सदैव विजयी होऊन
गुढीपाडवा शुभंकर। करु साजरा खरोखर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९९९