अक्रुर

अक्रुरा गोपी आक्रंदती हरीप्रति ठेवा । मथुरेशीं नको नेऊं पहारे मथुरेशीं नको नेऊं आमचा प्राणविसांवा ॥ध्रृ०॥

येऊन गोकुळी अवतरला दीनबंधु । तेपासुनि अवघे आनंदले गोपबंधू त्रैलोक्यामाजी दुमदुमिला आनंदु ।

हें क्षीर सागरिचें निधान ब्रह्मानंदु । हा भक्तांना कनवाळू गोकुळाबाई । अक्रुरा याविना गोपी धृतराष्‍ट्र न दिसे कांहीं ।

मथुरेशीं कसा नेतां समुद्रजावाई । या हरिवांचुनि आम्ही मृत्यु पावलों लवलाही । हा पुतनारी घननीळ हत्तीचा छावा । आमचा प्राणविसांवा ॥१॥

मथुरेशीं कंस कसा रिपु निर्मिला हरिचे साठीं । धाडिलें तुम्हातें आणावया जगजेठी । अक्रूर पण तुम्ही क्रूर भासतां पोटीं ।

निष्‍ठुर हा तुमच्या ह्रदयीं विषाच्या गोटी । आधीं समस्त गोपींचें प्राण वधावे । मग स्वस्तिक्षेम मथुरेशीं हरीला न्यावें ।

हरि गेल्यावर राहुन आम्ही काय करावें । म्हणुनि स्वहस्तें आम्हाशीं मारुनि जावें । या मुरारीचा दचका प्राणाशीं नसावा । आमुचा प्राण० ॥२॥

अक्रूर म्हणे पुरुषोत्तम सर्वां ठायीं । भरुनि उरलासे तुम्हाशीं ठावा नाहीं । हा जळिं काष्‍ठीं पाषाणीं शेषशायी ।

कंसालागी हरी हा वधील एके धाई । ही तुम्हास भासती याची लहान पराई । परि हा प्रळयाग्नि कैक बांधिल पायीं ।

हा सर्वांचा देह असुनि विदेही । गोपीहो तुम्हाला भ्रांत पडली एव्हां । आमचा प्राण० ॥३॥

अक्रुरा तुम्हि इतुकें बोललां असत्य । कळलें ये समयीं तूं कंसाचा भृत्य । वचनें ऐकुनी गोपी चित्तीं वनवास जाला ।

अक्रुरा काननीं कसें मोकलिलें गोपिकांला । जननी मृत्तिका फाकिती प्रयळ झाला । मालणी कैक प्राशिती विषाचा प्याला ।

फंदि अनंत म्हणे ह्रदयीं हरि बसवा । आमचा प्राणविसांवा । मथुरेशी नको नेऊं अक्रुरा पहारे । मथुरेशीं नको नेऊं आमुचा प्राणविसावा ॥४॥


कवी - अनंत फंदी

पति तर केवळ शुद्ध दांडगे

पति तर केवळ शुद्ध दांडगे घागरगडचे हंस जसे । पाणी वाहतां खटी पडल्या खांदी कावड डुल्लतसे ॥ध्रु०॥

चवला पुरती करी मजूरी कंबर बांधुनि हजीर जसे । अक्षरशत्रू 'ओनामासी' हें तव ठाउक स्वप्निं नसे ।

तंबाखूचा मोठा चाळा नाहिं मुखावर तेजकळा । दोटक्यांनीं भले दांडगे पाझर येइना खडकाला ।

परि निवळ फतर । पति तर केवळ० ॥१॥

तूं तर केवळ देवाघरची मुखरणी मध्यें श्रेष्‍ठपणीं । नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी ।

राजस गोंडस स्वहस्तकमळीं गौरवर्ण तनु देखणी । विशाळ डोळे बुबुळ कुळकुळित नाहिं कुठे तिळतुल्य उणी ।

शांत प्रकृती हास्यमुखी सुंदराकृती हो सदा सुखी । रंभा पाहुनि लज्जित होउनि तव गुणश्रवणीं पडति गळां ।

पति तर केवळ ॥२॥


कवी - अनंत फंदी

पंडित शाहणा आला

पंडित शाहणा आला मनामधीं उलटा सुलटा आला जमाना । पाऊस म्हणतो कर्मेना । धरत्रीनें पीक टाकिलें अंतपारी दिसेना ॥ध्रु०॥

दुनयामधिं बंड मातलें जो बळी तो कानपिळी । सुलतानी अस्मानी राव ऐका एकच धुमाळी ।

मोमणानें माग टाकले शिपाई झाले साळी माळी । ज्या योनीला जन्म घेतला त्याची उद्धरली नाहीं कुळी ।

आपलें सांडी देवदंडी त्याला पुर्वेला येईना । आप आपल्यामधीं मर्जी ठेविती मोक्षपदाशीं मिळेना । पंडित० ॥१॥

कळावांतणीची झाली राळ बटकी झाल्या शिरोमणी । दे साळू वाण्याची घाण केली या मारवाडयांनीं ।

गुरुवांचें संधान बुडविलें महार या वाजंत्र्यांनीं । पाटीलपांडे घरीं राहिले पट्‍टी केली कुणब्यांनीं ।

पहा पासरी कितीक ध्यावी सवा हात खचली धरणी । पाऊस अंतरीं शाहाणा मग तो जाऊन बैसला कोकणीं ।

बाबन हकांचा महारधनी याला पुरविल्या येईना । भोपळ्यामधीं सत्व राहिलें तो पाण्यांमध्यें बुडेना । पंडित० ॥२॥

लेक म्हणे बापाला म्हातारा झाला याची शुद्ध गेली । सुन सासुची मर्जी ठेविना फिरुन बोलू ती लागली ।

शिष्य झाले मस्त गुरुची विद्या गुरुवर फिरली । गोरसाला कोणी पुसेना दारु महाग विकू लागली ।

पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली । चंचल नार बांधीत असे नवें घर एक दरसालीं ।

ब्राह्मण जोशी लटके यांचा ठोका येईना । अनंतफंदी म्हणे गडयांनों ऐकुनि घ्यावे सुज्ञाना ॥३॥


कवी - अनंत फंदी

घर नको मला मी फार त्रासलें

घर नको मला मी फार त्रासलें । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण शपत आण मनीं उदासलें ॥ध्रु०॥

कोण भेटली मोहून फासले । वर्ष चार चुकुर नार नसे थार लाऊनि तार पहातो मासले । संगतीमुळें बेताल नासले ।

समजतात जरी येतात प्यादेमात कुच उरांत रसालले । सुबक ठेंगणी मुसमुसासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥१॥

भुलनिशा करी जसें द्रव्य हरवतं । टाकितें उसास जातो भास खास नाहीं सुखास विषय करवत । रात्र वैरिणी दिवस पर्वत ।

ठेवितें शीर बंधु दीर व्हा वजीर पैलतीर न धीर धरवत । साक्षी देतील आसपासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥२॥

अरुचि अन्न हें लागनें कडूं । हिंपुटींत जीब मुठींत हुटहुटीत कळवटींत पालथी पडूं । कधीं सखा सखी एकांतीं सांपडूं ।

सपन पडत उलट घडत कडकडत डाग पडत मळत का पडूं । गत कशी करुं मिळाले असले । नवती जान प० ॥३॥

निश्चय तिचा हिशोब गरतिचा । पावले दयाळ चंद्रमाळ रुंडमाळ व्याळ वेळ भरतीचा । मेघ वर्षतां उदय धरत्रीचा ।

धरुनि हात हांसत जात महालांत बेतबात पंचआरतीचा । चित्तवृत्तीनें सावकासलें ।

फंदी मूल करी कटाव नित घटाव सूर्यबिंब आज प्रकाशलें ।

नवती जान पतीची० ॥४॥


कवी - अनंत फंदी

हार तुरे तुला धीरा मी गुंफितें

हार तुरे तुला धीरा मी गुंफिते । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा धिरा धिरा तुझ्यावरी आधीं रंग शिंपितें ॥ध्रु०॥

होळिला तुम्ही घरीं असतां कधीं ? ॥ मी आपुल्या स्वहस्तें का निजमस्तकीं गुलाल फेकीन दयानिघी ।

रंग खेळणें होऊं द्या आधीं । मग हो सारे रात्र घेऊनि बसा मला तुम्ही रंगमहालामधीं ।

शरीर हें तुला आज वोपिंतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिल भरा धिरा० ॥१॥

दध्धराजभरा लई दिसा आला । होऊनि स्थीर धीर धरी, अधीर नका वस्त्र तरी नेसूं द्या मला ।

क्षणभरी उशीर लागला । ठीक ठाक चाकपाक झाक साबना उद्यां दिदार चांगला ।

वेणी मोकळी चापचोपिनें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥२॥

चाहते तुझ्यावर रंग टाकीन । त्या हातें फुलले तेल रेलचेल करुन आंग मर्दीन ।

भरभरु मुठी गुलाल फेंकीन । गोकुळीं जसा श्रीकृष्ण फाग खेळतो तसें तुम्हा मी लेखीन ।

तो हरी जसा त्या प्रीय गोपीतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा०॥३॥

बनून फाकडी राहिली उभी । रंग राग पाग खेळूनि तुफंग मार करितसे खुबी । खुप देखणी लहानशी छबी ।

चोळी तंग घे पचंग आंग संग करीं निसंग मग कोणा न भी । तुज मी आपल्या ह्रदयीं स्थापितें ।

छंद फंदी आनंदाचे कटिबंध ते प्रबंध यामुखें अलाफितें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥४॥


कवी- अनंत फंदी

तुज नाहींरे माझी काळजी

तुज नाहींरे माझी काळजी ॥ध्रु०॥

आपण तरि जीव द्यावा । नाहिं तरि शुद्ध हातामधिं घ्यावा विणा टाळ जी । तुज नाहींरे० ॥१॥

कोण मिळाली ठकणी । माझा रांवा उडविला गगनीं ।
केली राळ जी । झाली राळ जी । तुज नाहींरे० ॥२॥

कोण मिळाली विवशी । कोणीकडे नेला राजबनसी ।
पिटी भाळ जी । आपटी भाळ जी । तुज । नाहींरे ॥३॥

घरास आले फंदी । तेव्हां सुंदर चरणा वंदी ।
घाली माळ जी । सख्याला माळ जी । तुज नाहींरे० ॥४॥


कवी - अनंत फंदी

एका राजाला कन्या झाली

एका राजाला कन्या झाली तिच्या उरावर तीन थान । जाईल आंधळ्याची तिथें लाग लाविला कुबडयानं ॥ध्रु०॥

तेथोनाची वाईट झाली कोणी करिना मग तिजला । तिला एका आंधळ्याला देऊन आपल्याच गांवामधिं ठिवला ।

तिला एका कुबडयानं फितवलं रोज घरामधिं आणि त्याला । कवाड वाजतां आंधळा म्हणे घरामधि कोण आला ।

ती म्हणे कुत्रें आले घरामधिं बाहेर घालितें पिटून । अशी कुबडयाला रोज आणिती पुढें ऐका त्याचें कथन । एका० ॥१॥

एके दिवशीं कुबडा बोले तिथानिशीं ऐकतां । कोण येतो म्हून उगाच आंधळा । सारा वेळ लावितो कथा ।

हा मरतां म्हणजे बरें गडे होत । तुझा आपला संग बरा होता । कुबडयानें एक सर्प मारुन बाहेरुन आणला ताथा ।

तिथानीचे केला हवाला घाल याला रांधुनशेन । दे आंधळ्याला खाया म्हणजे जवळ आल याचें मरण । एका० ॥२॥

तेव्हां तो सर्प चिरुनशेन तवली ठेविली चुलीवर । आंधळ्याला शिजवाया बसविले कुबडा होई तिजवर स्वार ।

गतका आला तवलिला तेव्हां तो पाहे कानाच्या सुमार । जहराचा कडका जो बसला आंधळ्याचा नेत्रावर ।

जहराच्या कडक्यान डोळ्यांच्या टिकाच गेल्या उडून । पहा उलटयाच सुलटें झालें त्याला रक्षिता भगवान । एका० ॥३॥

डोळे उघडून पाहे आंधळा कुबढा आणि तीनथानी । कुबडा वरती खालीं दोहींच्या आंगाचें पाणी पाणी ।

जळत लांकूड घेऊन झणी आंधळा उठला तत्क्षणीं । कुबडयाला माराया चालला आंधळा आहे त्याचे मनीं ।

जळत लांकूड उचलून झणी त्यान घातलं कुडवण ।


कवी - अनंत फंदी