दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १

यशस्वी झाले श्रीमंत पहिले सवेलढायाला ।

आताच आले अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥

दादासाहेब पुण्यप्रतापी निस्सीम शिवभक्त ।

स्वारी करुन दरसाल हालविले दिल्लीचे तक्त ।

आनंदीबाई सुशील शिरोमणी सगुणसंयुक्त ।

पतिभजनी सादर घडोघडी अखंड आसक्त ।

बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त ।

जन्मांतरी तप केले निराहारी राहुन एकभुक्त ॥चा०॥

शके सोळाशे शहाण्णवी अति उत्तम जयसंवत्सरी ।

पौषशुद्ध दशमिस भरणी नक्षत्र भौमवासरी ।

ठीक पहिल्या प्रहरात जन्मले रात्रीच्या अवसरी ॥चा०॥

पहा बाईसाहेब धारमुक्कामी राहुनी ।

कंठिला काळ काही दिवस दुःख साहुनी ।

केले तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥चा०॥

गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला ।

कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥

समाधान सर्वास वाटले कोपरगावास ।

स्वारी शिकारीस बरोबर जाती कथा उत्सवास ।

जे करणे ते पुसून करिती अमृतरावास ।

एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावास ।

असे असुन नानांनी मांडिला अति सासुरवास ।

हळुच नेऊन जुन्नरास ठेविले श्रीमंतरावास ॥चाल०॥

इतक्या संधीत सवाई माधवराव मरण पावले ।

तेव्हापासून नानांनी राक्षसी कपट डौल दाविले ।

परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥चा०॥

आले खडकी पुलावर श्रीमंतास घेउनी ।

दर्शनास नाना परिवारे येउनी ।

दाखविली याद रावास एकांती नेऊनी ॥चाल पहिली॥

भय मानून शिंद्यांचे निघाले बाईस जायाला ।

सातार्‍यात राहून लागले भेद करायाला ॥२॥

आपण बाळोबा होउन एक केली खचीत मसलत ।

चिमाप्पास धनी करून राखिलि जुनाट दौलत ।

करारात दोघांच्या झाली काही किंचित गफलत ।

म्हणुनी फिरून नानांनी उलटी मारुनी केली गल्लत ।

सूत्रधारी जो पुरुष ज्याच्या गुणास जग भुलत ।

हातात सगळे दोर पतंगापरी फोजा हालत ॥चाल॥

परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण ।

राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ।

कठीण गाठ नानांशी न चाले तेथे जारण मारण ॥चाल॥

महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ।

बाळोबास शिंद्यांकडून कैद करविले ।

शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥चाल पहिली॥

रास्ते झाले जामीन प्रसंगी अवघड समयाला ॥

असा गुजरला वक्त नेले मांडवगण पाहायाला ॥३॥

घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले ।

द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥

शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले ।

दलबादल डेर्‍यात श्रीमंतासंन्निध संगटले ।

बाजीराव राज्यावर बसता आनंदे जन नटले ।

तोफांचे भडिमार हजारो बार तेव्हा सुटले ॥चाल॥

नंतर नाना एकविसांमधी समाधीस्त झाले ।

महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधि आपले पाहिले ।

यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥चाल॥

शिंद्यांनी करून माळव्यात खातरजमा ।

केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा ।

सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥चाल पहिली॥

कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला ॥

घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥

दिला मार पळणास जातिने पुण्यास येऊनिया ।

शहर सभोते वेढुन बसले चौक्या ठेवुनिया ।

खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनिया ।

सुखात होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनिया ।

इंग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनिया ।

सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनिया ॥चाल॥

अगोदर सोजर तरुक धावले मप्याशी दक्षिणी ।

त्या भयाने होळकर परतले नाही कोणी संरक्षणी ।

भरघोसाने श्रीमंत त्यावर पुण्यास येता क्षणी ॥चाल॥

झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ।

परि घरात शिरला शत्रु सबळ पारखा ।

लाल शरीर टोपी अंगी आठ प्रहर अंगरखा ॥चाल पहिली॥

धर्म कर्म ना जातपात स्थल नाही बसायाला ।

असे असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥

फार दिवस आधि जपत होते या इंग्रज राज्याला ।

अनायासे झाले निमित्त पंढरपुरास कज्जाला ।

संकट पडले काहि सुचेना प्रधानपूज्याला ।

रती फिरली सारांश मिळाले लोक अपूज्याला ।

भय चिंता रोगांनी ग्रासिले काळीज मज्जाला ।

पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥चाल॥

परम कठिण वाटले आठवले त्रिभुवन राव बाजीला ।

थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला ।

निरुपाय जाणुनी हवाली केले मग त्रिंबकजीला ॥चाल॥

ठेविला बंदोबस्तीने नेउन साष्टीस ।

एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस ॥

केले गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥चाल पहिली॥

स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला ।

शोध लावून साहेबांणी तेथे पाठविले धरायाला ॥६॥

इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची ।

म्हणून साहेब लोकांनी आरंभिली अगळिक दाव्याची ।

वसई प्रांत कल्याण गेली गुजराथ पुराव्याची ।

रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ।

कर्नाटक दिले लिहून ठाणी बैसली पराव्यांची ।

कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥चाल॥

अश्विनमासी वद्य एकादशी दोन प्रहर लोटता ।

श्रीमंत बापुसाहेब एकांती पर्वतीस भेटता ।

हुकूम होताक्षणी रणांगणी मग फौजा लोटता ॥चाल॥

बैसले राव दुर्बिणीत युद्ध लक्षित ।

भले भले उभे सरदारसैन्य रक्षित ।

लागुन गोळी ठार झाले मोर दिक्षित ॥चाल प०॥

तसाच पांडोबांनी उशीर नाही केला उठायाला ।

उडी सरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥

आला त्रास वाटते फार ह्यावरून लक्षुमीस ।

विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुकडून खामीस ।

फसले शके सत्राशे एकुण चाळीसच्या रणभूमीस ।

ईश्वर संवत्सरात कार्तिक शुक्ल अष्टमीस ।

प्रहर दिसा रविवारी सर्व आले आरब गुरमीस ।

खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्वामीस ॥चाल॥

दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्यांशी लढू ।

गर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणात डोंगर चढू ।

शिपाइगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढू ॥चाल॥

लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी ।

दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी ।

गेली स्वारी महाला हिलाला मग लावुनी ॥चाल पहिली॥

जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला ।

खेचुन वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ॥८॥

सकळ शहरचे लोक हजारो हजार हळहळती ।

सौख्य स्मरून राज्याचे मीनापरी अखंड तळमळती ।

रात्रंदिवस श्रीमंत न घेता उसंत पुढे पळती ।

यमस्वरूप पलटणे मागे एकदाच खळबळती ।

धडाक्याने तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती ।

त्यात संधी साधून एकाएकी दुरून कोसळती ॥चाल॥

भणाण झाले सैन्य सोडिली कितीकांनी सोबत ।

कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनी चुंबत ।

कितीक मुकामी अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥चाल॥

कोठे डेरे दांडे कोठे उंट तट्टे राहिली ।

कोठे सहज होऊन झटपट रक्ते वाहली ।

कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥चाल पहिली॥

बहुत कोमावली पाहवेना दृष्टीने उभयाला ।

हर हर नारायण असे कसे केले सखयाला ॥९॥

माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणी भिडले ।

जखम करुन जर्नेलास फिरता जन म्हणती पडले ।

गोविंदराव घोरपड्याचे दोन हात भले झडले ।

आनंदराव बाबर ढिगामधी खुप जाऊन गढले ।

मानाजी शिंदे मागे फिरताना डोई देऊन अडले ।

छत्रपती महाराज तळावर समस्त सापडले ॥चाल॥

घाबरले श्रीमंत सुचेना मन गेले वेधुनी ।

बाईसाहेबांना तशिच घोड्यावर पाठीस बांधुनी ।

नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधुनी ॥चाल॥

दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले ।

नाही स्नान शयन नाही स्वस्थपणे जेवले ।

आले आले ऐकता उठपळ राव धावले ॥चाल॥

गर्भगळित जाहले लागले शुष्क दिसायाला ।

बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥

दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन ।

रागरंग नाही आनंद ठाऊक रायालागुन ।

सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन ।

कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ।

धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन ।

कर्म पुढे प्रारब्ध धावते लगबग मागुन ॥चालव

पांढरकवड्यावर रचविल्या धनगारा अद्भुत ।

थंडीने मेले लोक उठविले गारपगार्‍यांनी भुत ।

बेफाम होते लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥चाल॥

ओधवले कसे सर्वांचे समयी संचित ।

कडकडून पडले गगन जसे अवचित ।

दुःखाचे झाले डोंगर नाही सुख किंचित ॥चाल पहिली॥

अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला ।

कोणे ठिकाणी नदीत लागले सैन्य बुडायाला ॥११॥

जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती ।

कळेल तिकडे भरदिसास प्रभु काट्यामधी शिरती ॥

आपला घोडा आपण स्वहस्ते चुचकारुन धरती ।

खाली पसरुन उपवस्त्र दिलगिरीत वर निद्रा करती ॥

अस्तमानी कधी रात्री भात भक्षिती पाटावरती ।

दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥चाल॥

पेशव्यांचे वंशात नाही कोणी असा कट्टर पाहिला ।

हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ।

बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥चाल॥

नर्मदेस शालिवाहन शक संपला ।

त्या ठायी ठेविल शकपंती आपला ।

भरचंद्रराहुग्रहणात जसा लोपला ॥चाल पहिली॥

सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला ।

सिद्ध झाले मालकमास राव राजेंद्र मिळायाला ॥१२॥

समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिवरले ।

सद्गद जाला कंठ नेत्र दोन्ही पाण्याने भरले ।

आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले ।

ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ।

केवळ असा विश्वासघात केल्याने कोण त ले ।

इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥चाल॥

तुमची आमची हीच भेट आता राव सर्वांना सांगती ।

कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ।

ऐसे उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ।

॥चाल॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये ।

दूर ढकलुन शरणागतास लावू नये ।

पहाकसबाचे घर गाईस दावू नये ॥चाल पहिली॥

हिंमत सोडू नये सर्व येईल पुढे उदयाला ।

कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावे ह्रदयाला ॥१३॥

प्राण असुन शरिरात बुडालो वियोग लोटात ।

बरोबर येतो म्हणुन घालिती किती डोयी पोटात ।

निराश जाणुन झाली रडारड मराठी गोटात ।

निर्दयांनी लांबविली पालखी पलटण कोटात ।

मातबर लोकांची ओझी चालतात मोटात ।

गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटात ॥चाल॥

कुंकावाचुन कपाळ मंगळसूत्रावाचुन गळा ।

तया सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ।

धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥चाल॥

कसे प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविले ।

अगदीच पुण्याच्या लोकांना फसविले ।

हुर हुर करीत का उन्हात बसविले ॥चाल पहिली ॥

काही तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला ।

कोणास जावे शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥

विपरित आला काळ मेरुला गिळले मुंग्यांनी ।

पंडीतास जिंकिले सभेमध्ये मदांध भंग्यांनी ।

भीमास आणिले हारीस रणांगणी अशक्त लुंग्यांनी ।

कुबेरास पळविले अकिंचन कसे तेलंग्यांनी ।

जळी राघव माशास अडविले असंख्य झिंग्यांनी ।

जर्जर जाहला विष्णुवाहन बदकांचे दंग्यांनी ॥चाल॥

ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडवीले ।

हरिश्चंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडवीले ।

फितुर करुन सर्वांनी असले राज्य मात्र बुडवीले ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर ।

तर दृष्टीपुढे पडतील राव लवकर ।

महादेव गुणीजन श्रीमंतांचे चाकर ॥चाल पहिली ॥

प्रभाकरची जडण घडण कडकडीत म्हणायाला ।

धुरू नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायाला ॥१५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा २

श्रीमंत झाले लोक श्रीमंतापासुन लक्षावधी ।

दुरावले ते श्रीमंत आपल्या दृष्टिस पडतिल कधी ॥धृ०॥

शिंदे होळकर उत्तरेस पश्चमेस नांदती ।

पूर्वेकडे भोसले मिरजकर दक्षणचे अधिपती ।

हरिपंत नानाच्या पुढे किती बुद्धिमंत लोपती ।

बृहस्पति आणि शुक्र जसे काय तारांगणी तळपती ॥

विपुल त्या रास्त्यांच्या घरी आजवर संततसंपती ।

इचलकरंजीकर बारामतिकर सोयर्‍यात धनपती ॥

चा० पहा कृष्णराव चास्कर, साजणी ॥

कोकणचे कोल्हटकर, साजणी ॥

महशूर सोलापूरकर, साजणी ॥चा० पहिली॥

दिक्षित-पेठे-साठे-ओक-ओंकार सभाग्यामधी ।

फाटक-थत्ते-बर्वे-देवधर-पेंडशांची रित सुधी ॥१॥

भागवत-मांडलिक-दामले-रामदुर्ग बळी ।

आपा बळवंतराव पार जाई रणात फोडुन फळी ॥

रामाजी महादेव रणांगणी अडेल मोठे खळी ।

हशमनीस, कार्लेकर देती कोळी भिलांना गळी ॥

झाशीवाले बिनीवाले बुंदेले रिपु खांडेकर छळी ।

कितीक लक्षाधीश प्रतिष्ठित दप्तरची मंडळी ॥

चा० मर्दाने विंचुरकर, साजणी ॥चा०प॥

नायगावकर पुरंधरे प्रतिश्रीमंत ते गुणनिधी ।

सखाराम भागवत राजकारणात केवळ विधी ॥२॥

नगरकर-आंबीकर चिंतो विठ्ठल स्वारीकडे ।

पवार जाधव धुमाळ डफळे देवकाते धायगुडे ॥

दरेकर सरलष्कर बाबरसानवणी पायघुडे ।

निंबाळकर नाईक घायभर पाटणकर फाकडे ॥

मुधोळ गुती गजेंद्रगडकर संस्थानि घोरपडे ।

गुजर घाडगे माहाडीक मोहिते विचारे शिर्के बडे

॥चा० मर्द माने म्हसवडकर, साजणी ॥

आटोळे उंबरखेडकर, साजणी ॥

रणनवरे सासवडकर, साजणी ॥

चा० प० पिसाळ-शितोळे-वाघ-आपतुळे लढाइला ते अधी ।

शहामीरखा रोहिले फिरंगी पठाण आरब सिधी ॥३॥

ताकपीर-थोरात-पांढरे स्वामी पदी सादर ।

धुळपांचा इंग्रज टोपी काढु करती आदर ॥

श्रीमंतांचे प्रतिबिंब अलि-बहादर-समशेरबहादर ।

कुशावा हैबतसिंग सजले काय स्वरूप सुंदर ॥

सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर ।

छत्रपती विनवून देविती श्रीमंतास चादर ॥

चा० निळकंठराव धारकरी, साजणी ॥

सन्निध त्यांची चाकरी, साजणी ॥

मोहीम हैबतराव करी, साजणी ॥चा०प०॥

बाबुराव हरी-सखाराम हरी शूर विरांचे क्षुधी ।

अहंकारी मल्हारराव जगजीवन नसे पर-बुधी ॥४॥

धन्य प्रभू पेशवे ज्यांचे ऐश्वर्य बघुन मन रिझे ।

पर शत्रूंचे सैन्य ठायिंच्या ठायी प्रसंगी थिजे ॥

सुखी केला मुलखात केशरी भात घरोघर शिजे ।

गृहस्थ-भिक्षुकांचे गौरव तुपात मनगट भिजे ॥

तीर्थो तीर्थी नित्य शेरभर सोने सकाळी झिजे ।

नाही दुःख कोणास पलंगी आनंदात जन निजे ॥

चा० ईश्वरी अंश हे धनी साजणी ॥

महापराक्रमी साधनी, साजणी ॥

सर्व गुण शोधनी, साजणी ॥ चा० प०॥

गंगुहैबती म्हणे ज्यांचे विघ्न गजानन वधी ।

महादेव गुणी प्रभाकराचे कवन शरकरा दुधी ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

पोवाडा - अहिल्याबाई होळकरीण

सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥

महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी ।

दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।

वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥चाल॥

उद्धार कुळाचा केला । पण आपला सिद्धिस नेला । महेश्वरास जो कुणी गेला ॥चाल पहिली॥

राहिला तेथे तो घेउन बाप भाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥

प्रत्यही द्यावी ब्राह्मणास दश दाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने ।

लाविली हरी हर मंदिरी तावदाने । गर्जती देउळे कीर्तन नादाने ॥

शोभती होम कुंडे द्विजवृंदाने । टाकिती हजारो नमात अवदाने ॥चाल॥

कधी कोटि लिंगे करवावी । वधुवरे कधि मिरवावी । अर्भका दुधे पुरवावी ॥चा०प०॥

पर्वणी पाहुन दान देतसे गाई । जपमाळ अखंडित हाती वर्णू काई ॥२॥

जेथे ज्योतिलिंग जेथे तीर्थ महा क्षेत्रे । घातली तेथे नेहमीच अन्नछत्रे ।

आलि जरा झालि काही ज्याची विकल गात्रे । पुरवावी त्यास औषधे वस्त्रे पात्रे ।

कितिकांनी घेतली स्मार्त अग्निहोत्रे । दिली स्वास्थे करुन त्या भटास क्षणमात्रे ॥चाल॥

आधि इच्छा भोजन द्यावे । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावे ॥चा०प०॥

जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई ॥३॥

आल्या यात्रेकर्‍याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास नवे जोडे ।

कोणास महेश्वरी उंच धोत्रजोडे ।

कोणास दुशाला कोणास बट घोडे । गवयास मिळाति कडी कंठ्या तोडे ।

घाली गिराशांचे पायात बिड्या खोडे ॥चाल॥

बांधिले घाट मठ पार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनात पाणी गार ॥चाल पहिली॥

त्यासाठी मुशाफर काय धावत जाई । विश्रांत पावती पाहुन अमराई ॥४॥

किती सूर्य ग्रहण संधीत तुळा केल्या । कधी कनक रौप्य कधी गुळाच्या भेल्या ।

संभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधी रामेश्वरी गेल्या ।

संसारी असुन वासना जिच्या मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥

कवी गंगु हैबती म्हणती ॥ पुण्याची कोण करी गणती ॥ राज्यास होती पडपण ती ॥चा०प०॥

महादेव गुणीचे लक्ष तिचे पाई । कवनात प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

नाना फडनविसाचा पोवाडा

सवाईमाधवरावसवाई सवाई डंका बजाया । फडणीस नानाकी तारीफ अक्कलने तो गजब किया ॥धृ०॥

बिनधारसें राज्य चलाया नाकिसे चक्‌मक् झडी । कैक मुत्सद्दी चपगये बस भये नानाकी तो अक्कल बडी ।

दिल्ली अटक लाहोर भाहोर कर्नाटक बीज पुकार पडी । चारो तरफ तजेला निकला चंदाऐसी किरत बडी ।

जिने बैठे राज कमाया दिलके तै खूप दिल दिलासा दिया । साहेब बंदगी करना पुना छांड कहूं अया न गया ।

अजि बडी अकल । सवायी माधवराव सवायी सवायी डंका बजाया । फडणीस नानाकी तारिफ अक्कलने तो गजब किया ॥१॥

कैक मुत्सदी होगये अक्कल नानाकी नयी पायी किसे । निजामअल्ली भगादिया साहेब जसदे हराउसे ।

टिपूसरीखे लाये बगलमे ज्या पहुंचे दरवाजेसे । पेशवोका निमक जहालम् मनीं कियावो गाजीमे ।

क्या नबाबका हुवा खराबा तोबा सबही डुबा दिया । तुम हमबी कानोसे सुंनते याजस लेकर कोन गया ।

कुचबी नही । सवायी माधवराव सवायी०॥२॥

किया मोंगलपर हल्ला उसदिन कई उमराव संगा चले । शिंदे होळकर और नागपुरवाले भोसले आन मिले ।

दाभाडे पाटणकर निंबालकर कट्टे लढनेवाले । पवार जाधव माधवरावके संगत नानाबी निकले ।

फडके आपाबळवंत रास्ते अभये इसमे कोण रह्या । चुका भुला हुवा देखने कहा अपना अखर गया ।

अजि किसे खबर । सवायी माधवराव सवायी० ॥३॥

सब् मिल हल्ला किया उडादिया नबाबके धुडके धुडके । मशरमुलुक् पकड कैदमे डाल दिया बैठो चुपके ।

पानी बिगर घोडे उट हत्ती तमाम मरगये नबाबके । रुपयेका जल एक कटोरा पानी ऐसी जगा रखे ।

किसे खबर भइ मेहेल मुलुख नबाबने क्या दिया लिया । फंदी अनंत कुतै क्या मामलु सुनते है कुच कबूल किया ।

सचहोगया । सवायी माधवराव सवायी०॥४॥


कवी - अनंत फंदी

पेशवाईच्या त्रोटक हकीकतीचा पोवाडा

श्रीमंत ईश्वरी अंश, धन्य तो वंश, परम पुरुषार्थी ।

बरोबरी तयांची कोण करील पहातार्थी ॥ध्रुवपद॥

राजाधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत ।

भासती सदैव देव आमचे हेच भगवन्त ॥

पाषाण धातुच्या मूर्ती, धरत्रीवरती, आहेत अनंत ।

त्या पूज्य परंतु नाहीत प्रगट जीवित ॥

तसे नव्हेत हे तर देव, कलिमध्ये भूदेव, ब्राह्मण संत ।

त्या वंशी पेशवे झाले सबळ बळिवंत ॥चाल॥

योग्यतेस आणिले पंत, होऊनिया कृपावंत, त्या राजांनी ।

ह्यामुळेच चढती कमान, धरुनी अभिमान.... ।

मग बहिरोपंत सोडवून, बिडी तोडवून, प्रभुच्या पणज्यांनी ॥चाल पहिली॥

पुढे प्रधानपद मिळवून, वैरी पळवून मारिल्या शर्थी ॥श्रीमंत०॥१॥

राव बाजी पुण्यामध्ये येऊन, हातावर घेऊन, निघाले शीर ।

प्रारंभी पाहिले जनस्थान रघुवीर ।

नेमाड माळवा मुलूख, करुन सरसलूख, मोडिले वीर ।

मेवाडचे राजे न धरती धीर ॥

गढमंडळ बुंदेलखंड, डंघईत अखंड, राहून थंड, सही केले ।

प्रतापे करून या जगात नाग मिळविले ॥चाल॥

बुडवूनि या बहाद्दरास, आणिली घरास, माषुक मस्तानी ।

दरवर्षी धौंशा घालून, जावे चालून अघाडीस मस्तानी ॥

शह दिला नगर थेट पास, खु...... । ........॥चाल पहिली॥

उपरात नर्मदाकाठी, सार्थकासाठी, मोक्ष कार्यार्थी ।

देह समर्पिला त्या स्थानी याच भावार्थी ॥ श्रीमंत ॥२॥

तेची दुनियेमाजी धन्य, न मानी अन्य, वंदिती स्वामी ।

जीव खर्च कराया सिद्ध धन्याच्या कामी ॥

तीन वर्षे राज्य वसवून, मोर्चे बसवून सभोवते धमामी ।

सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी ॥

हल्ल्यांत उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी ।

नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी ॥चाल॥

बक्षीस दिले कडी तोडे, पालख्या घोडे, वाजे चौघडे, जमीदार्‍या ।

ठायी ठायी दिसती भरभरून, आख ठरवून,

सजीवल्या सरदार्‍या परशत्रू होईना खाक, वाटुनी परख, तशाच हवलदार्‍या ॥चाल पहिली॥

खूब केली तुम्ही तरवार, नावनिशीवार, म्हणून किती प्रार्थी ।

यशस्वी होता तो संवत्सर सिद्धार्थी ॥श्रीमंत॥३॥

बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी ।

आणिले पुण्यात जपानी नळाचे पाणी ॥

युद्धात जिंकुन नबाब, बसविली बाब, करून धुळदाणी ।

त्या सालीच बंगाल्यत घातली ठाणी ॥चाल॥

लागलेच केले कूच, स्वारी दरकूच, परतली सगळ्यांची ।

लष्करात केवढा गजर, होई नित्य नजर, मोती मणि पोवळ्यांची ।

वाटून खिचडी रमण्यात, आनंदे पुण्यात, मोहरापुतळ्यांची ॥चाल पहिली॥

खुष केले शास्त्री पंडित, विद्यामंडित, विप्र विद्यार्थी ।

गेले कीर्त गात ते ब्राह्मण तीर्थोतीर्थी ॥श्रीमंत०॥४॥

शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ ।

दादाही गणावा त्यात, बाण भात्यात, भातांचे ताट ॥

भलत्याच ठिकाणी घाली रिपुशी गाठ ।

तिन्ही काळ निरंतर साधी, जातीने बांधी, हत्यारे आठ ॥चाल॥

फेडून नवस, माहेरास, गेले लाहोरास, जिंकित शेंडे ।

अरे जपानी सहज अटकेत, पाव घटकेत, लाविले झेंडे ।

सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दूल गेंडे ॥चाल पहिली॥

पुढे चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामी कार्यार्थी ।

हे पुरुष म्हणावे श्रेष्ठ बंधुचे स्वार्थी॥श्रीमंत०॥५॥

भाऊसाहेब योद्धा थोर, आंगामध्ये जोर, पुरा धैर्याचा ।

विश्वासरावही तो तसाच शौर्याचा ॥

दोहो बाजूस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा ।

किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ॥

दृष्टांत किती कवि भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा ।

शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ॥चाल॥

कितीकांची बसली घरेच, हे तर खरेच, ईश्वरी कृत्य ।

शोकार्णवी नाना पडून, नित्य रडरडून, पावले मृत्यु ।

कवि गंगु हैबती दीन, पदांबुजी लीन, कृपेतील भृत्य ॥चाल पहिली॥

महादेव प्रभाकर ध्यायी, सदा गुण गाई, यथा साह्यार्थी ।

श्रीमंत प्रभूची कीर्त जशी भागीरथी ॥श्रीमंत०॥६॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर

पोवाडा - दुसरे सयाजीराव गायकवाड

धनी सयाजी महाराज धुरंधर भाग्यवान भूपती । स्त्रिया पुत्रसह वर्तमान ते भोगितात संपती॥ध्रु०॥

प्रौढ प्रतापी शाहु छत्रपती सिंहासनी सुंदर । सभोवतले सरदार शूर मध्ये आपण पुरंदर ।

प्रांत परगणे गाव ज्यांनी सोडविले गिरिकंदर । सरंजाम ते तयास दिधले जहागिर एकंदर ।

फौजबंद गायकवाड सेनापती समशेर बहादर । वंशध्वज त्या वंशी जन्मले हे स्वकर्मी सादर ॥चाल॥

महाराज सयाजी मणी, लालसा ॥ करी प्रकाश कुळी दिनमणी, फारसा ॥ देई चिंतित चिंतामणी, पहा कसा ॥चाल॥

तसा पुरुष ह्या दिसांत पाहता नाही असा अधिपती । जी सुपुत्र प्रसवली धन्य ती जननी धन्य ते पती ॥१॥

निष्कलंक निर्दोष स्वामिनी करून पूर्वार्चन । प्रसन्न केला असेल मागिल जन्मी भाललोचन ॥

पदोपदी तो सांब म्हणुन करी प्रसंगी भय मोचन । धैर्यवान दृढ पिंड न बाधे पदार्थ होई पाचन ।

लेजिम जोड्या जोर कसुन खूप केले बळ सिंचन । सहस्त्रात सौंदर्य गौरपण पीत जसे कांचन ॥चाल॥

पगडीस तुरा वाकडा, काही जरा ॥ जेग्यास जडित आकडा, गोजरा ॥ कानी भिकबाळी चौकडा, साजरा ॥चाल॥

राजबीज फाकडा सुशोभित दिव्य शरिर संपती । गळ्यात कंठ्या हार, कडी करी जडावाची तळपती ॥२॥

मर्जी होइल त्या दिशी स्वारी कुलतमाम श्रृंगारणे । पूर्व कधी पश्चिमेस जाती मृग शिकारी कारणे ।

भरपल्ला फेकून अडचणीत घोडा ललकारणे । स्वता शिस्त बांधून गोळी हटकुन ठीक मारणे ।

भले लोक बोथाटी टाकिता वरचेवर वारणे । मागे पुढे बाजूस हुल दावुन भाला फेरणे ॥चाल॥

सुती हात तिरंदाजिचा, वाणिती ॥ डाव दुसर्‍यावर बाजिचा, आणिती ॥ आला न्याय गरीब गाजीचा, छाणिती ॥चाल॥

खबरदार लिहिण्यात कल्पना इतरांची अल्प ती । समई मुख्य जंद्राल पेचिता न गवसता जल्पती ॥३॥

सर्व गोष्टींचा शोख जातिने हुशार तर कुस्तिस । दंड भुजा आटीव उमररायाची तिसपसतिस ॥

तूप साखर आणि कणीक उस चारुन आणुन मस्तिस । साठमार चहुकडुन खिजविती नित्य नव्या हस्तिस ॥

पहिलवान किती जेठी येउन राहतात तेथे वसतिस । खुराक उत्तम त्यास कारकुन वर बंदोबस्तिस ॥चाल॥

हे जाणुन कवी सागर, धावती ॥ गुण सभेस नट नागर, दाविती ॥ बक्षीस कडी लंगर, पावती ॥चाल॥

ज्याकडे पाहती कृपा दृष्टि तो करतिल लाखोपती । सप्तपिढ्यांचे दरिद्र विच्छिन्न होउन रिपु लोपती ॥४॥

भक्तजनांचे माहेर देशावर श्रीपंढरपुर । याचकांस हे योग्य बडोदे सर्व क्लेश करी दुर ॥

नित्य उठुन वाटितात खिचडी ब्राह्मणही महामुर । स्त्रियापुरुष मुलीमुलांसकट शेर होतो भरपुर ॥

पुण्यवान गायकवाड जगतीतळांत ते महशुर । सर्व कनकमय लोक घरोघर निघे सोन्याचा धुर ॥चाल॥

जे देणे दिले एकदा, योजुन ॥ ते परत न घेती कदा, समजुन ॥ कोणी फंद करील जर कंदा, माजुन ॥चाल॥

दर्शनास तो अयोग्य त्यावर विधिहरिहर कोपती । अशा प्रभूच्या रक्षणार्थ उडी घाली म्हाळसापती ॥५॥

अहारे बडोदे शहर, कोट चौफेर काम मजबुत । चार दरवाजे चार दिशेना वर शिपाई कलबुत ॥

चोहो रस्त्यावर दाट हवेल्या काय सांगिन शाबुत । मांडवीत मोहोरमात जमती सर्व तिथे ताबुत ॥

अजब शहर वसविले गिराशे करून नेस्तनाबुत । बाग बगीचे तलाव साहेब घेति हवा तंबुत ॥चाल॥

महा जागृत राजेश्वर, पावती ॥ संकटी नीळकंठेश्वर, धावती ॥ भुत वाटेस यवतेश्वर, लावती ॥चाल॥

बहुत उग्र नरसिंह समंधादिक थरथर कापती । प्राशन करिता तीर्थ हिमज्वर इतर रोग करपती ॥६॥

विठ्ठलमंदिर सुरेख दुसरे देउळ बालाजिचे । खंडेराव दक्षिणेस उत्तरपंथींबेचराजिचे ॥

भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजिचे । महाकाली भदरेत लक्ष्मी लक्षणीक मुख जिचे ॥

गोजिरवाण मूर्त नाव नारायण सुंदरजिचे। काही पुढे बाहेर महंमदवाडित घर काजिचे ॥चाल॥

किती धर्म हरीभक्तिचा, होतसे ॥ लल्लूपारख खुष वक्तिचा, दिसतसे ॥ सामळ सौदा नक्तिचा करितसे ॥चाल॥

दैवशाली गोपाळराव मैराळ राखिती पती । खुशाल अंबईदास रतंजी असे कितिक धनपती ॥७॥

महाराजांचे आप्त आवंतर धारकरी बरोबर । एकासारखे एक पांढरे करिती डौलडंबर ॥

घोरपडे उमराव लक्ष्मणराव कसुन कंबर । मागे न फिरती रणात पडल्या तुटुनी जरी अंबर ॥

मानसिंगराव शिर्के आणिक रघुनाथराव धायबर । थोर कुळींचे मर्द राजे मंडळीत असे नंबर ॥चाल॥

मामांची मानमान्यता, चांगली ॥ करवितील दुर दैन्यता, लागली ॥ ही चौघांमध्ये धन्यता, वागली ॥चाल॥

भाऊ पुराणिक पूर्ण कृपेतिल जे कारण स्थापिती । मान्य पडे ते प्रभूस गुरुवर दया करी गोपती ॥

हस्तमुखे खावंद गादीवर बसुन सोपस्कर । रुमाल चौरी वारितात वर भोवते उभे किंकर ॥

नारायणराव दिवाण, भास्कर विठ्ठल जोडुन कर । सदय ह्रदय शास्त्रज्ञ मुतालक मुख्य भिमाशंकर ॥

रामचंद्र विश्वनाथ फडणिस येती पुढे लौकर । मुजुमदार ते नारायणराव, माधव करंदीकर ॥चाल॥

विश्वासुक बक्षी खरे, मर्जिचे ॥ किती शब्द सुचविती बरे, अर्जिचे ॥ गोपाळपंत गुणी पुरे, मर्जिचे ॥चाल॥

कृपावंत सरकार म्हणुन हो श्रम सारे हरपती । चाहती उमाशंकरास बारिक कामकाज सोपती ॥९॥

अशा प्रभूचे उमाकांत कल्याण सदोदित करो । गाई म्हशी गजतुरंग वहनी अपार पांगा भरो ॥

पुत्रपौत्री राज्यलक्ष्मी अशीच अक्षई ठरो । शत्रुपराजय करुन प्रतापे राज्यनिति आचरो ॥

दान दक्षणा धर्मी निरंतर चित्तवृत्ति अनुसरो । गंगु हैबती शीघ्र कवींची प्रपंच चिंता हरो ॥चाल॥

दहा चौकी काम उठवुन, सांगिन ॥ हरजिनसी यकवटउन, रंगिन ॥ गातात गुरु आठवून, चंगन ॥चाल॥

महादेवाचे कवन कमळसर भ्रमर गुणी झेपती । प्रभाकराची नजर हीच करी धन्यास विज्ञप्ति ॥१०॥


कवी/शाहीर - शाहीर प्रभाकर

धर्मादाय वर्णनपर पोवाडा

दामाजी पंतांनि जगविले ब्राह्मण काही दुकळात । गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखो असल्या काळात ॥ध्रु०॥

तीनशे तिसांवर वर्षे लोटली दुर्गादेविच्या काळाला । फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥

दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळाला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वास आला निर्दाळा ॥

त्या समई कथोर फोडुनी पंती जगविले सकळाला । बेदरास कळताच धुतोड शिपाई आले आवळाला ॥

चल बे बम्मन म्हणुन ओढिता अश्रु लागले गाळाला । कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥

महाराचे सोंग विठोबांनी स्वता घेउनी ॥ धान्याचे द्रव्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंतांच्या पोथिमधे ती रसिद ठेउनी ॥

राहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०

दामाजीपंताच्या धावण्या असा धावला विपळात । तसा म्हाळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळात ॥१॥

सत्राशे चोवोसात दंगा होळकरांनी अति केला । पंचविसामधे दरोबस्त अगदिच पहारे पाउस गेला ।

दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला । दिसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाही रयतेला ॥

ब्राह्मण गेले उठुन मजलोमजली खुब ठेला । बडोद्यात पोचला तो जगला न पोचल्या वाटेस मेला ॥

धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमा शांतिने भरलेला । तेव्हापसुन प्रारंभ सिध्याला हजारो ब्राह्मण जपलेला ॥चा०॥

चाळीस वर्षे वाटितात खिचडी सदा ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशी कदा ॥ दिवसात प्रहरभर पडे मेहनत एकदा ॥

मग सार्वकाळ आनंद हसती गदगदा ॥चा० कुटुंब सुद्धा प्रपंच करती गर्भिणी होति बाळात ।

तिही महिन्याच्या मुलास खिचडी मिळत्ये असे आले आढळात ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास । टाळ विने करताळ मृदंगी त्यात एखादी सुरदास ॥

सार्वकाळ भजनात घालती कदा न शिवती नर्दास । घुंगुर बांधुन पायी नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ।

चित्रे मूर्ती करण्यात कुशळ जे वैद्य जिंकिती दर्दास । तर्‍हे तर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥

ब्रह्मचारि मांत्रीक तपस्वी घेउन सवे शार्गिदास । मोहरा पुतळ्या रुपये तयांना देति शालजोड्याफर्दास ॥चा०॥

ह्यापरी ब्राह्मण समुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करुन संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥

वंशास वश मार्तंड करुन ठेविला ॥चा०॥

येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या राहाळात । कीर्तवान खावंद असले नाही मराठे मंडळात ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरले । गायकवाड आहेत म्हणुन हे समस्त ब्राह्मण सावरले ॥

तानसेन पंथाचे गवय्ये तेहि प्रभूनि आवरले । कडी तोडे हातात दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥

पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले । हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥

नायकिणी आणि कसबिणी शाहिर नेहमी बडोद्यामधे ठरले । पावे पगाराशिवाय बक्षिस कसबी लोक ह्याने तरले ॥चा०॥

कल्याण ईश्वरा असेच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधी अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥

महादेव गुणीचे कवन मनामधे ठसो ॥ चा० प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळात ।

द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळात ॥४॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर