कवने

जुनी पटकुरें अङ्गीं धरुनी

पाउसचिखलीं वणवण खपुनी,

शेतकरी तो फुलवी अवनी'

परी उपाशी बाळें त्याची ।

धान्य खाउनी तेंच पोटभर.

सुखे त्यावरी देउन ढेंकर,

पुष्ट प्रियेचा करि धरुनी कर,

गात असूं किती गोंड्स कर हा ।

यंत्रशक्तिची प्रचंड घरघर,

दमही न घेता मजूर क्षणभर,

वस्त्र विणितसे त्यावर झरझर

रक्ताळ्ति मग डोळे त्याचे

वस्त्र जरा तें जाड म्हणोनी

रुसुनि प्रिया तें देई फेकुनि

क्रुध्द तिच्या ये लाली नयनी

त्यावर आम्ही गाऊं कवने

शंभरातील नव्वद जनता

धुरकटलेल्या कोंदट जगता

'घरे' म्हणोनी त्यांतच कुजतां

औषधास त्या चंद्र ना दिसे ।

आकाशातील तारासंगे

विलासी शशी प्रेमे रंगे,

कृष्ण्मेघ तो येउनि भंगे-

-प्रणय तयाचा, रडतों आम्ही ।

अपुरी भाकर चट्ट खाउनी

रडति आणखी हवी म्हणोनी

कामकर्‍यांच्या मुलांस जननी,

अश्रु दाबुनी नाही म्हणते.

मुर्ख कुणी तरि जोबनवाली,

खुशालचेंडुस ' नाही ' वदली

हृदयिं तयाच्या आग पेटली,

त्यावर शिंपू काव्यजलाला ।

नक्षत्रांची , फुलाफळांची ,

कृष्णसख्याच्या व्याभिचारांची

आणिक झुरत्या युवयुवतींची

खूप जाहलीं हीं रडगाणीं

धनीजनांशीं झुंज खेळुनी

क्षणभर ज्यांना आली ग्लानी

त्यांना आम्ही गाऊं गाणी

ऐकुनि जीं चवताळुनि लढतिल

आणि स्थापितिल सत्ता अपुली


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० ऑक्टोबर १९३१

बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेंस बेगमे तें

अड्खळत वाचुनीयां । आनन्द होई माते.

ते ' नाथ ' आणि ' स्वामी ' । मज सर्व कांहि उमजे

इश्की, दमिश्कि, दिल्नूर । कांहीच गे, न समजे ।

जरि या मराठमोळ्या । शिवबास बोधा व्हावा,

तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ जुलै १९२८

लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे



कुणि नाही ग कुणी नाहीं
आम्हांला पाहत बाई ।
झोंपे मंडळि चोंहिकडे ,
या ग आतां पुढे पुढें
थबकत, थबकत
'हुं' 'चूं' न करित,
चोरुं गडे, थोडे कांही
कोणीही पहात नाही ।



या वरच्या माळ्यावरतीं
धान्याची भरलीं पोतीं,
जाउं तिथें निर्भय चित्तीं
मारूं पसे वरच्यावरती.
उडवुनि जर इकडे तिकडे
दाणे गोटे द्याल गडे
किंवा चोरुनि घेतांना
वाजवाल जर भांड्यांना,
जागी होउन
मग यजमानिण
फसेल सगळा बेत बरें ।
चळूं नका देऊं नजरे



एखादी अपुल्यामधुनी
या धंद्यांत नवी म्हणुनी
लज्जामूढा भीरुच ती
शंसित जर झाली चित्तीं
तर समजावुनि
अथवा भिववुनि
धीट तिला बनवा बाई,
करुं नका उगिचच घाई.



आशा ज्या वस्तुचि चित्तीं
तीच हळुच उचला वरती.
डब्यांत जर थोडे असलें
घेउं नका बाई , सगळे,
मिळे म्हणोनी
उगाच लुटुनी
यजमानिण जरि ती बाला,
करूं नका शंकित तिजला.



जपून असले खेळ करूं
ओटिंत जिन्नस खूप भरू.
लागतां न कोणा वास
'हाय' म्हणुनि सोडूं श्वास
प्रभातकाळी
नामनिराळीं
होउनियां आपण राहूं
लोकांच्या मौजा पाहुं ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोळ्याचें गाणे

आला खुशींत् समिंदर , त्याला नाही धिर,

होडीला देइ ना ठरू,

ग सजणे , होडीला बघतो धरूं ।

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,

सफेत् फेसाचि वर खळबळ,

माशावाणी काळजाची तळमळ

माझि होडी समिंदर , ओढी खालीवर,

पाण्यावर देइ ना ठरू,

ग सजणे, होडीला बघतो धरूं ।

तांबडं फुटे आभाळान्तरीं,,

रक्तावाणी चमक पाण्यावरी,

तुझ्या गालावर तसं काइ तरी ।

झाला खुळा समिंदर , नाजुक होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू,

ग सजणे , होडीला बघतो धरु ।

सुर्यनारायण हंसतो वरी,

सोनं पिकलं दाहि दिशान्तरीं,

आणि माझ्याहि नवख्या उरीं ।

आला हांसत समिंदर , डुलत फेसावर,

होडिंशीं गोष्टी करूं,

ग सजणे, होडीला बघतो धंरु ।

गोर्‍या भाळी तुझ्या लाल चिरी ,

हिरव्या साडीला लालभडक धारीं,

उरीं कसली ग. गोड शिरशिरी ?

खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,

चाले होडी भुरुभुरु ,

ग सजणे, वार्‍यावर जणुं पांखरु ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १७ जानेवारी १९२८

तिमदन

तिजला जणू छबि आपुली रतिची दुजी प्रत वाटते,

मदनाहुनी तिळ्ही कमी निजरूप त्या नच भासतें

नवयौवनी दोघें जंई हीऊ एकमेकां भेटती,

'जय आपुला ' ही खातरी दोघेहि चित्तीं मानिती .।

निजरूपमोहिनिजालका पसरावया ती लागतें,

गुलगूल कोमल बोलणी फ़ांसे तयाचे गोड ते ।

' जय आपुला '- दुसरा गडी झाला पुरेपुर गारद,

मनिं मानुनीं हे पारधी करिती परस्पर पारध ।

राजा निसर्गा सर्व ही अति थोर गम्मत वाटते ,

विजयोत्सवी दोघां बघु अनिवार हासूं लोट्तें ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २ जानेवारी १९२७

दोन चुंबने

पूर्णेन्दू पिवळा हळू हळु असे झाडावरी ठेपला,

झाडे सर्सर्नाद गूढ करिती-एकान्तही वाढला.

तेंव्हा येऊनिया जुन्या स्मृति मनी हो वृत्ति वेडीखुळी,

प्रेमाची दुसरी धनीण अरला होती परी लाभली.

प्रीतीचा पहिला बहार नवलें होता जिला अर्पिला,

मूर्ती येइनि आज मन्मनि तिची झाले कसेसें मला.

तेव्हा ही पहिलीच ती समजुनी वेगे हिला चुंबिले ।

'आहा' , प्रेमभरे वदे , ' मर किती प्रेमात आलिंगिलें ।'

भोळा भाव हिचा बघुन नयनीं झाली उभी आसवें,

आणि चुम्बुनिया हिला पुनरपी प्रेमास केले नवे ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २१ एप्रिल १९२७

माझे गाणें

वसुधामाई माझी जननी, हृदयिं तिच्या बिलगुन,
सदा मी जगालाच गाइन.

बाळांच्या गोंडस गालांचे चुंबन,
युवतीयुवकांचे सुगाढ आलिग्ङन ,
वृध्दांच्या प्रेमळ अश्रुंचें सिंचन,
सारें माझ्या गानिं साठवे घ्या, घ्या , तें वाटुन,
सदा मी जगालाच गाइन.

प्रेमाचा मी सागर, आणिक वैराचा डोग्ङर,
दयाळू आणिक अति निष्ठुर.
अर्भकांवरी आपुलें शौर्य दावुन
अबलांना दुबळ्या जुलमाने गांजुन,
सत्तेचे चाबुक गरिबांवर ओढुन,
अश्रु उधळीले जगतीं कोणी, त्यांना मीं शापिन,
सदा मी जगालाच गाइन .

अज्ञाताच्या अमर्याद या दर्यावर भडकुन ,
चालले मानवताजीचन,
दैवाच्या लाटा येउनिया कोठुन
सवंगडी आपुले टाकितील उलथुन
हें मनांत माझ्या राहि कसें डांचुन
म्हणुनिच माझें विसरुनि ' मी' पण, प्रेमाने रंगुन
सदा मी जगालाच गाइन.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२७