फुलांची पखरण

टिप फुलें टिप ! माझे गडे ग ! टिप फुलें टिप !
पहा फुलांची पखरण झिप ! ॥ध्रु०॥

किती सुखाची सकाळ
किती मौजेची ही वेळ;
दिशा या फांकती,
फुलें हीं फुलतीं,
पक्षी हे बोलती;

सगळयाही सृष्टिनें पहा निद्रा ती टाकिली,
प्रीती ती आशेसंगें खेळाया लागली;
तर, आनन्दें या झाडांखालीं

टिप फुलें टिप !

किती सकाळ ही सुन्दर,
जसें मुलींचें माहेर ---
जगाचे ते व्याप
दुरि तैसे संताप
मनिं न शिरे मुळिं पाप,
पुण्याची ही वेळ पहा गें ! सूर्यानें उजळीली,
आशेचिया ग वेलीवरती गाणीं तीं फुललीं;
तर, मौजेनें या वेलींखालीं

टिप फुलें टिप !

सकाळ जाइल संपून,
मग तापेल तें ऊन;
मग धन्दे कराल,
पण, फुलें हीं विसराल !
सूख कैसें पावाल ?

फिरूनी ऐशीं वेळ गडे ग ! कधिं तरि ती येइल का ?
गडे !

आनन्दामधिं आस आपुला काळ कधीं जाइल का ?
म्हणुनिम, असे जों बहर तोंवरी

टिप्‍ फुलें टिप्‍ !

पहा फुलांचि पखरण छिपू !
माझे गडे ग !
टिप फुलें टिप !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ५-१२-९१

पुष्पाप्रत

फुला, सुरम्य त्या उषेचिया सुरेख रे मुला,
विकास पावुनी अतां प्रभाव दाव मापुला;
जगांत दुष्ट दर्प जे भरून फार राहिले,
तयांस मार टाकुनी सुवासजाल आपलें

तुझ्याकडे पहावयास लागतील लोक ते,
प्रीतिचें तयांस सांग तत्त्व फार रम्य तें :---
जिथें दिसेल चारुत तिथें बसेल आवडी,
मेळवा म्हणून सत्य चारुतेस तांतडी.

तुझ्यांतल्या मधूस मक्षिकेस नेऊं दे लुदून,
स्वोपयोगबद्धतेमधून जा तधीं सुदून;
जगास सांग अल्प मी असूनिही, पराचिया
जागतों हिता स्वह्रद्यदानही करूनियां.

बालिका तुला कुणी खुडील कोमलें करें,
त्वद्वीय हास्यभंग तो तधीं घडेल काय रे !
मृत्युची घडी खुडी जधीं जगीं कृतार्थ ते
तधीं तिहीं न पोंचणं जराहि शोकपात्र ते !

वा, लतेवरीच शीघ्र शुष्कतेस जाइ रे,
रम्य दिव्य जें तयास काल तूर्ण नेइ रे;
दुःख याविशीं कशास मन्मनास होतसे ?
उदात्त कृत्य दिव्य तें क्षणीं करून जातसे.

जा परंतु मी तुला धरीन आपुल्या मनीं,
मुके त्वदीय बोल बोलवीन सर्वही जनीं;
अम्हां भ्रमिष्ट बालकांस काव्यदेवतेचिया
जीव निर्जिवांतलाहि नेमिलें पहावया !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
-पंचचामर
- १८८९

संध्याकाळ

संध्याकाळ असे : रवी उतरतो आहे समुद्रावरी,
त्याचें बिम्ब सुरेख चुम्बिल पहा लाटांस या लौकरी;
मातीला मिळूनी गळूनि पडलें तें पुष्प जाई जसें,
लोपाला लहरींत मंडलहि हें आईल आतां तसें.

आकाशीं ढग हे पहा विखुरले, त्यांच्यावरी सुन्दर
रंगाच्या खुलती छटा, बघुनि त्या येतें स्वचित्तावरः---
हा मृत्युंगत होतसे दिवस, तन्मस्तिष्कपिंडांवरी
येतो अक्षयमोक्षसिन्धुलहरी तेजोयुता यापरी !

पक्षी हे घरटयांकडे परतुनी जातात कीं आपुलें;
त्यांलागीं किलबील शब्द करुनी आनंद देतीं पिलें;
गाई या कुरणांतुनी परततां हंबारवा फोडितो,
त्यांचे उत्सुक वत्स त्यांस अपुल्या दीनस्वरें बाहती.

आनन्दी दिसती युवे, फिरकतो जे या किनार्‍यावरी,
घ्याती ते निज सुन्दरीस, गमतें उल्हासुनी अन्तरी;
जी ही मन्दिरर जि पैल दिसते, तीच्या गवाक्षांतुनी
झाल्या त्या असतील ह्रष्ट युवतीं चित्तीं असें आणुनीः---
“ अस्तालागुनि जातसे दिनमणी; रात्री अहा येतसे !

रात्री !  जादु किती विलक्षण तुझे नामामधें गे वसे !
प्रेमाचें ह्र्दयीं उषीं कुमुद जें संकोच गे पावलें
देसीं त्यास विकास ! - चित्त म्हणुनी नाथाकडे लागलें ! ”

संध्येला प्रणयी तुम्ही जन सुखें द्या हो दुवा; मी करीं
हेवा तो न मुळीं; नसे प्रणय तो माझ्याहि का अन्तरीं ?
आहें मी घर सोडुनी पण दुरी; चित्तीं म्हणूनी असें
मी संध्यासमयीं उदास; अथवा व्हावें तरी मीं कसें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- सावंतवाडी, जानेवारी १८९३

फूलपांखरू

( अंजनीगीत )

जेथें हिरवळ फार विलसते,
लताद्रुमांची शोभा दिसते,
तेथें फुलपांखरूं पहा हे----
सुंदर बागडतें !

कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,
गन्धयुक्त अवकाशामधुनी,
पुष्पपरागा सेनित हिंडे ---
मोदभरें करुनी !

तरल कल्पना जशी कवीची,
सुन्दर विषयांवरुनी साची
भ्रमण करी, गति तशीच वाटे---
फुलपांखराची !

वा मुग्धेची जैशी वृत्ति
पतिसहवासस्वप्नावरती
विचरे फुलपांखराची तशी---
हालचालही ती !

निर्वेधपणें इकडे तिकडे
वनश्रींतुनी अहा ! बागडे;
त्याचा हेवा ह्रदयीं उपजुनि
मन होई वेडें !

तिमिरीं आम्हीं नित्य रखडणें,
विवंचनांतचि जिणें कंठणे,
पुष्पपतंगस्थिति ही कोठुनि---
आम्हांला मिळणें !

असे यास का चिन्ता कांहीं ?
यास ’ उद्यां ’ चा विचार नाहीं,
अकालींच जो आम्हां न्याया---
मृत्युमुखीं पाही !

बहु सौख्याची कुसुमित सृष्टि,
तींत वसे हें, न कधीं कष्टी,
ग्रीष्माचे खर रूप विलोकी---
नच याची दृष्टि !

‘ सर्व विनाशी असतो, प्राणी ’
ही मज खोटी वाटे वाणी;
फूलपांखरूं---मरण पाहिलें---
आहे कां कोणी ?

( वसंततिलका )

जें रम्य तें बधूनियां मज वेड लागे
गाणें मनांत मग होय सवेंचि जागें;
गातों म्हणून कवनीं फुलपांखरातें,
व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनातें.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १७-८-१८९२

दिवाळी

विश्वेशें करुनी कृपा सकरुणें दुष्काळदैत्यावरी
पर्जन्यास्त्र नियोजुनी पळविलीं आहेत दुःखे दुरी;
आतां मंगल पातले दिवसही दीपोत्सवाचे भले,
गाणें सुस्वर पाहिजे तर तुवां हे शारदे ! गाइलें.

दीनें ज्यांविण वाटतात सुदिनें सार्‍याहि वर्षांतलीं,
नांवानें जरि दुर्दिनें, सुखद जीं होतीं पुढें चांगलीं;
तीं येऊन बरींच, वृष्टि करुनी त्यांहीं दिली भूवरी,
तेणें सांप्रत पाहतां दिसतसे सृष्टी अहा साजिरी.

सस्यांचा बरवा अनर्घ्य हिरवा शालु असे नेसली,
जाईची जुइची गळां धरितसे जी रम्य पुष्पावली
ती भालीं तिलकांकिता शशिमुखी आतां शरत्सुन्दरी,
माथां लेवुनि केवडा विचरते घेऊनि पद्यें करीं !

जो गोपाळ गमे प्रभातसमयीं गाई वनीं चारितां,
वाटे रव्युदयीं नदीवर मुनी अर्ध्यास जो अर्पितां,
जो भासे दिवसां कृषीवल शिरीं खोंवूनियां लोंबरें,
तो आतां ऋतु शारदीय बहुधा शेतांतुनी संचरे.

राजा जो धनधान्यदायक असे साचा कुबेरापरी,
त्या श्रीमंडित शारदीय ऋतुची राणी देवाळी खरी;
रूपैश्वर्यगुणाढय ती जवळ ये; द्याया तिला स्वागता
सारेही शुभ योजनांत गढले---कांहीं नुरे न्यूनता !

भिंती रंगविल्या नव्या फिरुनियां, केलीं नवीं आंगणें,
वीथी झाडुनि, रान काढुनि दिसे सर्वत्र केराविणें;
दारीं उंच दिले दिवे चढवुनी, हंडया घरीं लाविल्या,
लोकीं शक्त्यनुरूप आत्मसदनीं भूषा नव्या जोडिल्या.

बाजारांत जमाव फार मिळुनी गर्दी जडाली असे,
गन्ध्याला निजसंग्रहास निकितां विश्राम कांहीं नसे;
उंची कापड, दागिने सुबकही, मेवे, फटाके चिनी,
यांचा विक्रय होतसे घडकुनी वस्तू न चाले जुनी !

माहेराप्रत कन्यका स्मितमुखी उत्कण्ठिता पातल्या,
त्या मातापितरां सहर्ष दुहिता, भावां स्वसा भेटल्या;
आले साम्प्रत भेटण्यास वडिलां दूरस्थ ते पुत्रही,
सोहाळे श्वशुरालयीं अनुभवूं आले नवे जांवई !

बाळांहीं निजपुस्तकांस अवघ्या आहे दिलेली रजा;
कांहीं काढुनि खेळ नाचुनि मुलें तीं मारिताती मजा;
तों गेहामधुनी खमंग निघुनो ये वास; तेणें उगी
तीं होऊन, हळूच आंत शिरतो--” दे माउली बानगी !”

आतां भौमचतुर्दशी पुढलिया वारीं असे पातली,
तों रात्रीं निजतां बनो छबुकली मातेप्रती बोलली ---
“ माला आइ उथाव लौकर बलं, अंगास मी लाविन
दादाच्या, म्हनुनी गले ! उथव तूं हांका मला मालुन !”

सारेही पहिल्या दिनीं उठूनियां मोठया पहांटे जन
स्नानें मंगल लौकरी उरकिती सौगन्धिकें चचुंन;
ज्या ठायीं असती दिवाळसण ते, तेथून वाद्यें पहा
निद्रेंतून दिवाळिला उठविण्या तीं वाजताती अहा !

त्यांच्या मंजुरवें न जागृत झणीं होईल ती वाटलें,
यालागीं शिलगावुनीं जणुं गमे देती फटाके मुलें;
‘ ठो ठो ’ आणिक ’ फाड फाड ’ उठती तों नाद अभ्यंतरीं,
त्यांहीं सत्वर जाहली हंसत ती जागी दिवाळी पुरी !

रांगोळया रमणीय काढूनि पहा, त्या मांडल्या पंगती !
पक्वान्नें कदलीदलांवरि अहा ! नेत्रांस संपोषिती;
पाटांच्या मधुनी जलार्थ असती पात्रें रुप्याचीं, तिथें
नेसूनी जन मोलवान वसनें होतात कीं बैसते.

घेऊनी घृत, दुग्ध तें, विपुल ते गोधूमही, साखर
प्रेमानें महिलाजनीं बनविलीं खाद्यें किती सुन्दर;
त्यांची साम्प्रत रेलचेल अगदीं पात्रांत जी होतसे,
तुष्टी आणिक पुष्टि ती वितरुनी प्रीती दुणावीतसे.

रांगोळया दिसती प्रदोषसमयीं दारापुढें काढिल्या,
दीपांच्या सदनापुढें उजळुनी पंक्ती तशा लाविल्या;
त्यांच्या ज्योति असंख्य त्या बघुनियां वाटे असें अन्तरीं :---
तारा या गगनांतुनी उतरल्या कीं काय भूमीवर !

बाळें सर्व फटाकडया उडविती चित्तांत आनन्दुनी,
जाडे बारहि लाविती, धडधडां त्यांता उठे तो ध्वनी,
मोठे बाणहि, चन्द्रज्योति मधुनी, त्या फूलबाज्या, नळे,

दारूकाम असें अनेकविध तें दृष्टी पडे, लाविलें.
लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होससे.
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अर्चीतसे,
साध्याला विसरून लोक धरितो भक्ती कसे साधनीं ---
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी !

लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होससे,
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अचींतसे,
साध्याला विसरून लोक धरिती भक्ती कसे साधनीं ---
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी !

आतां भार नसे कुणास, पण तो शिंक्यास भारी असे,
हातां काम नसे, परन्तु पडतें तोंडास तें फारसें;
कोणा मार नसे, तरी पण शिरीं तो सोंगटयांच्या बसे;
कोणा त्रास नसे, परन्तु नयनां तो गागरें होतसे !

भ्राते ते भगिनीगृहाप्रत सुखें जाती बिजेचे दिनीं,
त्यांचा बेत सुरेख ठेवुनि तयां ओंवाळिती भामिनी,
तेही त्यांस उदार होउनि मनीं ओंवाळणी घालिती,
प्रेमग्रंथिस वाढर्य बंधुभगिनी या वासरीं आणिती

खाणें आणि पिणें, विनोद करणें, गाणेंहि वा खेळणें,
जैसें ज्यांस रुचेल त्यापरि तुम्हीं या उत्सवीं वागणें;
मी सन्ध्यासमयीं खूशाल गिरणातीरावरी बैसुनी
कालक्षेप करीन उन्मन असा वेडयापरी गाउनी !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- शके १८२२, भडगांव १९००

मजुरावर उपासमारीची पाळी

धारेवरी जाउनि देव पोंचला.
हा रंगही मावतेस साजला,
सर्वत्र ही मौज पहा ! दिसे; परी
माझ्याच कां दुःख भरे बरें उरीं ?

सार्‍या दिनीं आजचिया नसे मुळीं
हातास माझ्या कवडीहि लाभली;
पोटा, करोनी मजुरीस मी भरीं;
कोणीं दिलें आज न काम हो परी !

हीं मन्दिरें हो खुलतात चांगलीं;
माझ्या वडिलींच न काय बांधिलीं ?
मी मात्र हो आज मरें भुकेमुळें ;
श्रीमंत हे नाचति मन्दिरीं भले !

हेवा तयांचा मजला मुळीं नसे,
जाडी मला भाकर ती पुरे असे;
कष्टांत देवा ! मरण्यास तत्पर,
कां मारिसी हाय ! भुकेमुळें तर ?

( सर्वांस देवा ! बघतोसि सारखा,
होतोस कां रे गरिबांस पारखा ? )
कांहींस सुग्रास सदन्न तूं दिलें,
साधी अम्हां भाकरही न कां मिळे ?

घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रती
जाती अहा ! पक्षि सुखी घरीं किती;
बाळांस हें दावुनि कारभारिण
कैसें तयां देत असेल सांगुत ?---

पक्षी जसे हे घरटयास चालती
घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रति,
घेवोनि अन्ना, तुमचा तसा पिता
येईल तो लौकरि हो, रडूं नका !”

हे लाडके ! आणिक लाडक्यांनो !
दावूं तुम्हां तोंड कसें फिरोन ?
जन्मास मी काय म्हणोनि आलों ?
येतांच वा कां न मरोनि गेलों ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- इंद्रवंशा
-जानेवारी १८८९

रूढि-सृष्टि-कलि

( रूढि राज्य करीत आहे, तिच्या जुलमी अंमलाखालीं लोक नाडले जात आहेत, तरी ते सृष्टीच्या नियमांस अनुसरण्यास नाखूष असून ‘ शास्त्राद्रूढिर्बलीयसी ’ असलीं वेडगळ मतें अलंघनीय मानीत आहेत. लोक, ज्याला कलि म्हणून भितात, तो त्यांच्या बर्‍याकरितां रूढीचा पाडाव करण्यासाठीं झपाटयानें ग्रंथप्रसार करीत आहे. तेव्हां लौकरच रूढिअक्का राम म्हणतील; आणि सृष्टीला लोक भजूं लागतील, असा रंग दिसत आहे. )

अज्ञानें फुगली, कुरूप अगदीं झाली, दुरी चालली
सृष्टीपासुनि रूढि; ती मग असत्सिंहासनीं बैसली.
सारे लोक पहा ! परंतु तिचिया पायीं कसे लागती,
ही कन्या दितिची असूनि इजला देवीच कीं मानिती !

देते शाप जनांप घोर, जुलमी ही दुष्ट राणी जरी,
तीं आशीर्वचनें शुभेंच गमती या मूर्ख लोकां तरी !
सृष्टीचे अमृतध्वनि दुरुनि जे कानांवरी त्यांचिया,
येती, ते परिसूनि मूर्ख सगळे घेतात चित्तीं भया !

सृष्टीनें निज भृत्य एक बलवान‍ रूढीवरी प्रेषिला,
त्याला लौकिक मूर्ख हा ‘ कलि ’ अशा नांवें म्हणूं लागला !
त्यानें कागद घेउनी सहज जे रूढीकडे फेंकिले,
त्यांहीं आसन तें तिचें डळमळूं आहे पहा लागलें !

येवी तूर्ण कले ! तुझ्या विजय तो अस्त्रांस त्या कागदी,
गाडूं ही मग रूढि विस्मृतिचिया त्या खोल खाडयामधीं !
साधो ! नांव तुझें खचीत बदलूं, बोलूं न तूतें ’ कली ’
जैजैकारुनि सृष्टिला, घ्वनि तिचा तो एक मानूं बली


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- दादर, ९ मार्च १८९१