गोष्टी घराकडील

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !--
आहे घरासचि असें गमतें मनांस,
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

ही देख म्हैस पडवैमधिं बांधलेली
रोमथभाग हळु चावित बैसलेली.
मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे !

डोळयांत बोट जरि घालूनि पाह्‍शील
अंधार तो अधिकची तुजला दिसेल ! --
अंधार-- जो फलक होत असे अम्हांस
चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास !

आवाज ’ किरं ’ रजनी वदतेच आहे,
’घों घों ’ असा पवन नादहि बोलताहे;
ऐके पलीकडुनि बेडुक शेतभातीं
पर्जन्यसूक्त सगळे मनमोख्त गाती ?

हीं चारपांच चढूनी हळु पायठाणें
या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
हें ऐक रे ’ टकटका ’ करितें घडयाळ
या शान्ततेंत गमतें कुटितेंच टाळ !

डावीस हा बघ निरेखूनि एक माचा
निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझ्या.
त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोनें !
तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें !

तातास या बघुनि या ह्रदयांत खातें,
होऊन हें ह्रदय विव्हळ सर्व जातें !
त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
नाणूं तयास मग कां वद आंसवांनीं ?

ताताचिया बघ गडया उजवे कडेला
बापू असे तिथ बेरें अमुचा निजेला,
अज्ञान तो चपलधी परि बाल आहे
त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे !

बापू ! गडया ! ध्वज उभा करशील काय ?
तूं देशकारण करूं झटशील काय ?
बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?

मित्र ! घरीं सुदुढ हस्त मदीय फार,
दारास आडसर घट्ट असेल थोर,
दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं,
सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊं !

मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
येथें हवा मधुर, निश्वबनांत येई,
नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
वाटेवरी चतुरशिंगिचिया न तैशी !

मित्रा ! असा हळूच ये उजवे
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस,
निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
हर्षाचिया न उकळया फुटती कुणास

ती एक खाट अवलोक समोर आतां
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता,
तीचे कुशींत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बधुनि ती मज हर्ष होय,

मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
आलीस तूं खचित गे असशील माते !--
मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते
जातील का फिटूनियां तव पुत्रहस्तें ?

खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या,
गोष्टी जयांस कथितां न पुर्‍याच झाल्या !
ती कोण दूर दिसते ?-- निजली असूनी
जी श्वास टाकित असे मधूनीमधूनी !

कान्ताच ही मम ! -- अहा ! सखये ! मदीय
स्वप्नें अंता तुज गडे ! दिसतात काय ?--
आतां असो ! पण पुढें तुजला दिसेत
स्वप्ने तुझीं मग समग्र तुला पुसेन !

मागील दारीं सखया ! तुळशीस आतां
वन्दूं, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें !
येऊं घरा परत खासगिवालियाचे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- वसंततिलका
- २२ जुलै १८८७

नैऋत्येकडील वारा

जे जे वात नभांत या विचरती पुण्यप्रदेशावरी
नैऋंत्येकडला तयांत वितरी सौख्यास या अंतरीं;
येतां तो मम चित्त हें विसरुनी प्रत्यक्ष वस्तूंप्रति
अर्धोन्मीलित लोचनीं अनुभवी स्वप्नस्थिती आगुती !

तो वारा मम जन्मभूमिवरुनी येतो जवें वाहत,
हें माझ्या ह्रदयांत येउनि सवें मी ठाकलों चिन्तित;
माझ्या जन्मधरेचिया मग मनीं रूपास मी आणितों,
तीचे डोंगर उंच खोलहि नद्या डोळयांपुढें पाहतों,

मोठे उच्च, शिला किती पसरल्या सर्वत्र ज्यांच्यावरी,
तुंगे तीं शिरलीं यदीय शिखरें तैशीं नभाभीतरीं,
आस्वर्गांत चढती सदोदित महात्म्यांचीं जशीं मानसें,
या दृष्टीपुढते पुनः बघतसें अद्रीय ते हो असे !

ज्यांच्या रम्य तटांवरी पसरल्या झाडया किती सुन्दर,
ज्यांच्या थोर शिलांतुनी धबधबां जाती तसे निर्झर
वाणीचे कविदुर्दशांमधुनिया ते ओघ यावे जसे;---
या दृष्टीपुढते पुनः बघतसें अद्रीय ते हो असे !

त्यांचे उंच शिरांवरी विलसती किल्ले मराठी जुने,
देवी पालक त्यांतल्या मज पुनः धिक्कारिती भाषणें !---
“ कोठें पूर्वज वीर धीर तव ! तूं कोणीकडे पामरा !
ये येथें इतिहासपत्र पडकें वाचूनि पाहीं जरा !”

जागोजाग विराजती चलजलें पाटस्थलें तीं किती,
केळी, नारळि, पोफळी, फणस ते, आंबे तिथे शोभती;
पक्षी त्यांवरुनी नितान्त करिती तें आपुलें कुजित,
स्वप्नीं हे बघतां फिरूनि, मन हे होतें समुत्कण्ठित.

जागोजागहि दाटल्या निबिड कीं त्या राहटया रानटी.
रे पाईरहि, खैर, किंजळ, तिथें आईनही वाढती,
वेली थोर इतस्ततः पसरुनी जातात गुंतून रे,
चेष्टा त्यांमधुनी यथेष्ट करिती नानापरी वानरें !

जन्मस्थान मदीय सुन्दर असे त्या माल्यकूटांतल्या
आनन्दें वनदेवता मधुर जीं गानें भलीं गाइल्या
मज्जन्मावसरास, तीं पवन हा वेगें महा तेथुनी
मातें पोंचवितो, तयां अपुलिया पंखावरी बाहुनी !

“ गाऊं या ! ह्रदयांत या अमुचिया प्रीती असे दाटली !
गाऊं या ! ह्रदयांत या अमुचिया कां स्फूर्ति ही बाढली ?
वाग्देवीसुत जन्मला अपुलिया ग्रामांत; यालगुनी
जैजैकार करा, सुरां परिसवा हा मंगलाचा ध्वनि !”

वेगानें जगदुद्धरानदिचिया तीरांहुती वात तो
आशीर्वाद मदीय तातजननी यांचे मला आणितो;
वात्सल्यांस तयांचिया परिसुनी माझ्या मनीं येतसें---
‘ तान्हा बाळचि राहतों तर किती तें गोड होतें असें !’

आईच्या नयनांत नित्य मग मी स्वर्गास त्या पाहतों,
ताताकावरि नित्य मी मग जगद्राज्यासना भावितों,
कां हो यापरि वाढलों फुकट मी ? हा---हंत ! मी नष्ट हा !
तान्हा बाळचि राहतों तर किती तें गोड होतें अहा !

जन्मा येउनि मी उगा शिगविलें आई ! तुला हाय गे !
ताता ! भागविलें तुला फुकट मीं मत्पोषणीं हाय रे !
वार्धक्यीं सुख राहिलें, विसरणें तुम्हांस कोणीकडे !
झालों कष्टद मात्र---या मम शिरीं कां वीज ती ना पडे ?

पुष्पें वेंचित आणि गोड सुफलें चाखीत बागांतुनी
जेथें हिंडत शैशवीं विहरलों निश्चिन्त मी, तेथूनी ---
हा वारा ममताप्रसाद मजला आजोळचा आणितो;
चित्तीं विव्हल होतसें स्मरुनि, मी मातामहां वन्दितों !

बन्धूचींहि मला तशीं पवन हा आशीर्वचें आणितो,
चिन्ताग्रस्त तदीय पाहुनि मुखा अश्रूंस मी गाळितों !
भाऊ रे ! तुजलागिं लाविन कधीं मी हातभारा निज ?
तूतें सेवुनि मी सुखें मग कधीं घेईन का रे निज ?

श्वासांहीं लिहिलीं, विराम दिसती ज्यामाजि बाष्पीय ते
प्रीतीचें बरचें समर्थन असे संस्पृह्य ज्यामाजि तें,
कान्तेचीं असलीं मला पवन हा पत्रें अतां देतसे;
डोळे झांकुनि वाचितां त्वरित तीं सम्मूढ मी होतसे !

आतां प्रेमळ तीं पुनः परिसतों थोडीं तिचीं भाषणें,
चित्तीं आणुनि मी तिला अनुभवीं गोडीं तिचीं चुम्बनें !
ओठां हालवितां न मी वदतसें मागील संवाद तो;
मी काल क्रमुनी असा, जड जगा काडीवजा लेखितों !

नाहीं चैन तुला मुळी पडत ना माझ्याविना मत्प्रिये ?
तूतें आठविल्याविना दिवसही माझा न जाई सये !
केव्हां येतिल तीं दिनें न करण्या ताटातुटी आपुली ?
केव्हां त्या रजनी ?--- जियांत विसरूं मीतूंपणाला मुळीं !

माझ्या जन्मधरेपुढें दिसतसे वार्राशि विस्तीर्ण तो,
त्याचें रम्य तरंगतांडर पुनः पाहुनि आल्हादतों,
जें ह्रद्रम्य तरंगतांडव मला तैशापरी वाटतें,
अज्ञेयावरतीं जसें क्षणिक हें अस्तित्व हो खेळतें !

या अब्धीवरतूनि जात असतां बाल्यांत नौकेंतुनी,
गाणीं जीं म्हटलीं मला निजविण्या वारिस्थ देवीगणीं,
त्यांचे सूर अतां अलौकिक असे जे वात हा आणितो ---
ते ऐकून अहा ! सुषुप्ति चिर ती ध्यायास मी इच्छितों !

प्रीति या जगतांत कंटकयुता ही एक बल्ली असे,
शूलालोपणयूप त्यावरिल ही कीर्ति ध्वजा कीं दिसे;
तेव्हां या जगतीं नकोत मजला ते भोग भोगायला,
वाटे नाटक शोकसंकुल असें जीवित्व हें जायला !

देवी सागरिका ! तुम्हीं तर अतां गायनें गाइजे,
त्यांच्या धुंद अफुगुणें किरकिर्‍या बाळास या आणिजे
निद्रा दीर्घ---जिच्यामधी न कसली स्वप्नें कधी येतिल,
ती निद्रा निजतां न मन्नयन हे ओले मुळी होतिल !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मासिक मनोरंजन,एप्रिल-मे १८९८

आईकरितां शोक

अन्तरले पाय तुझे हाय हाय माते ! ॥ध्रु०॥
मागें तव दर्शन मजलागुनी जहालें,
तदनन्तर लोटूनियां दिवस फार गेले:

फिरुनि तुझ्या चरणांतें
उत्सुक मी बघण्यातें
असतां, अन्तींहि न ते

दिसले कीं---अहह ! पूर येत लोचनातें !
अन्तरलें पाय तुझे हाय हाय माते !
फिरुनि तुझें कोठें तें तीर्थरूप पाहूं !
पादरजीं लोळुनि तव धन्य केंवि होऊं !

जनकामागें जागृत
जननी गे तूं दैवत
उरलिस, तीही साम्प्रत

गेलिस सोडुनि आम्हां दिन बालकांतें ।
अन्तरले पाय तूझे हाय हाय माते !
कठिण जगीं या बघती छिद्र काक सारे,
करुणेचें कोठेही नसे लेश वारें

तुझ्यासनें क्षमा दया
प्रीतिहि गेली विलया !
मदपराध घालुनियां ---

पोटीं, नुरलें कोणी प्रेम करायायें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !
कष्ट दिले तुजला मीं फार फार आई !
त्यांची मजकडुनि फेड जाहली न कांहीं !

दुर्भग मी असा असें,
म्हणुनि दुःख वाटतसे,
कठ फार दाटतसे !

रडतों गुडघ्यांत म्हणुनी घालुनी शिरातें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०१

दुर्मुखलेला

माझें शुष्क खरेंच हें मुख गुरो ! आहे, तया पाहुती
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधीं हौउनी;--
हें सर्वां उघडें  असूनि वदुनी कां तें तुम्हीं दाविलें ?
तेणें भूषण कोणतें मग तुम्हां संप्राप्त तें जाहलें ?

याचें तोंड कुरुप हें विधिवशात्‍ गाईल काव्यें नदीं,
तेणें सर्वहि डोलतील जन हे हषें कदाचित भुवि !”
विद्यासंस्कृत त्या तुझ्या, क्षणभरी, मस्तिष्कतन्तूंवरी
येता नम्र विचार हा तुज भला होता किती तो तरी !

जे मुंग्या म्हणुनी मनीं समजशी या मंडळीभीतरीं,
ते पक्षी उडतील होउनि गुरो ! योमीं न जाणों न जाणों वरी !
राखेचीं ढिपळें म्हणोनि दिसतीं जीं तीं उद्यां या जना
भस्मीसात्‍ करणार नाहींत, अशी तुम्ही हमी द्याल का ?

माझ्या दुर्मुखल्या मुखामधुनि या, चालावयाचा पुढें
आहे सुन्दर तो सदा सरसवाङनिष्यन्व चोहींकडे !
तुम्हीं नाहिं तरी सुतादि तुमचे धातील तो प्राशुनी !
कोणीही पुसणार नाहिं, ’ कवि तो होता कसा आननीं ?’


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित

कविता आणि कवि

( श्लोक )

अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे ? पुसतों तुम्हांला

युवा जसा तो युवतीस मोहें
तसा कवी हा कवितेस पाहे ;
तिला जसा तो करितो विनंती
तसा हिला हा करितो सुवृत्तीं.

लाडीगुडी चालव लाडकीशीं
अशा तर्‍हेनें, जरि हें युव्याशीं
कोणी नसे सांगत, थोर गौरवें
कां तें तुम्ही सांगतसां कवीसवें ?

करूनियां काव्य जनांत आणणें,
न मुख्य हा हेतु तदीय मी म्हणे;
करूनि तें ते दंग मनांत गुंगणें,
तदीय हा सुन्दर हेतु मी म्हणें,

सभारुची पाहुनि, अल्प फार,
रंगीं नटी नाचवि सूत्रधार;
त्याचें तयाला सुख काय होय ?
तें लोकनिन्दाभयही शिवाय !

नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जो ह्रदयांत याची;
पढीक तीचे परिसूनि बोल
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल.

स्वभावभूयिष्ठ जिच्यांत माधुरी,
अशी तुम्हांला कविता रुचे जरी;
कवीस थोडा कवितेबरोबरी,--
न जाच वाटेस तयाचिया तरी,

तयाचिया हो खिडकीचिया, उगे,
खालीं, तुम्ही जाउनि हो रहा उभे,--
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि, पावाल तुम्ही मुदाला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ३० डिसेंबर १८८६.

कवितेचें प्रयोजन

” शान्तीचें घर सोडुनी प्रखर त्या हाटीं प्रयत्नाचिया,
प्रीतीचाहि निकुंज सोडुनि रणीं जीवित्व नांवाचिया,
सर्वांहीं सरमावणें झटुनियां हें प्राप्त झालें असे;
या वेळे न कळे कवे ? तुज सुचे गाणें अहा रे कसें !

” माता ही सुजला स्वभूमि सुफला, तीच्या परी लेंकरीं
खायाला पुरतें पहा नच मिळे कीं हाल आहे पुरा;
झांकायास तनूस वस्त्रहि न तें आतां पुरेसें मिळे;
या वेळेस कसें कवे ! तुज सुचे गाणें न मातें कळे !’

हें कोणी म्हणतां जवें कविमनीं खेदोर्मि हेलावल्या,
नेत्रांतून सवेंचि बाष्पसरिता वाहावया लागल्या;
त्याचा स्त्रैणपणा असा प्रकटला वाटेल कोणा, परी
धीरोदात्त असेचि तो श्रुत असे हें दूरही भूवरी !

सोन्याचे सरले अहा ! दिवस ते, आली निशा ही कशी !
सौख्याचा नद तो सुकून पडलों या दुःखपंकीं फशीं !
कालक्रीडीत हें बघूनि रडला, हें व्यस्त कांहीं नसे;
प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवींचा असे,

बाष्पान्तीं तरलस्वरें मग कवी निश्वासुनी बोलिला ---
जो पूर्वीं गुण पुण्यभूमिवरि या अत्यन्त वाखाणिला,
तें हें दिव्य कवित्य दुर्विधिवशें हीनत्व कीं पावलें,
त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें !

” गाणें जें परिसावया कविपुढें राजेशही वांकले,
यन्नादेंच लहान थोर सगळें गुंगून वेडावले,
त्याला मान नसे, नसो पण, अतां त्याची अपेक्षा नसे ---
हें कोणी म्हणतां विषाद अहिसा मन्मानसाला डसे !

” आलेल्या दुरवस्थितींतुनि तुम्ही उत्तीर्ण व्हाया जरी,
जद्योगीं रत व्हावया धरितसां सौत्सुक्य चित्तीं तरी,
गाण्यानें कविच्या प्रभाव तुमचा वर्धिष्णुता घेइल,
स्फुर्तिचा तुमच्या पिढयांस पुढल्या साक्षी कवी होइल !

” हातीं घेउनियां निशाण कवि तो पाचारितो बान्धवां ---
‘ या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा !’
प्रेतेंही उठवील जी निजरवें, ती तो तुतारी करी,
आतां नादवती, निरर्थ तर ती त्याची कशी चाकरी ?

” आशा, प्रेम तसेंच वीर्य कवनीं तो आपल्या गाइल;
गेलें वैभव गाउनि स्फुरण तो युष्मन्मना देइल,
द्या उत्तेजन हो कवीस, न करा गाणें तयाचें मुकें;
गाण्यानें श्रम वाटतात हलके, हेंही नसे थोडकें;

“ आतां जात असे दुरी शिथिलता अस्मत्समाजांतुनी,
याची खूणच गान जें निघतसें तें साच जाणा मनीं;
तारा ताणिलियावरी पिळुनियां खुंटयास वाद्याचिया,
त्याच्यांतून अहा ! ध्वनी उमटती जे गोड ऐकावया !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १८९३

काव्य कोणाचें ?

“ कवे ! कोणीं हें काव्य लिहीयेलें ?”
“ मींच ---” कविनें प्रतिवचन बोलिजेलें,

“ बरें तर ! हें वाचून अतां पाहूं,
श्लोक सुन्दर यांतील सदा गाऊं.”

मनीं वाचक तों दंग फार झाला,
क्लृप्ति आढळली सरस एक त्याला;

म्हणे कविता “ ही रम्य फार आहे ?”
वदे कवि “ ती मम पंक्ति कीं नव्हे ते.”

पुढें वर्णन पाहून रेखलेलें,
वाचकाचें रममाण चित्त झालें;

कविस शंसी तो “ धन्य ! ” अशा बोलें
त्यास “ वर्णन मम न तें ” कवी बोले.

“ काव्य लिहिलें हें सत्य तूं असून,
“ नव्हे माझें हें --- नव्हे तें ” म्हणुन

सांगसी, तर परकीय कल्पनांतें
तुवां घेउनि योजिलें, गमे मातें,”

‘ नव्हे ऐसेंही ?’ कवी वदे त्यातें,
“ काव्य लिहिले मीं खरें, परी मातें

शारदेनें जो मंत्र दिला कानीं,
तसें लिहिलें मीं;--- काव्य तिचें मानीं !”

“ दिव्य शक्तीनें स्फुरें गंध पुष्पीं,
रंग खुलतीही तिनें इंद्रचापीं;

सृष्टिमाजीं जें रम्य असे कांहीं
तीच कारण त्या शक्ति असे पाहीं ”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- भडगांव, ७ ऑगस्ट १८९७