तरीही केधवा

दोघांत आजला
अफाट अन्तर
जुळून पाकळ्या
उडाल्या नंतर-
जीवनावाचून
जळला अंकुर
प्रश्नहि राहिला
राहिले उत्तर !

संग्रामी आजला
शोधतो जीवित
उरींचे ओघळ
दाबून उरात-
उठती भोवती
धुळीचे पर्वत
अखण्ड फिरते
वरून कर्वत !
वादळी रणांत
करणे कोठून
नाजूक भावांचे
लालनपालन-
तरीही केधवा
पडता पथारी
थडगी दुभंग
होतात अंतरी-
आठवे तुझ्या ते
प्रीतीचे मोहळ
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा