गायीची करुण कहाणी

रवि मावळला, निशा पातली, शांत दिसे हे जग
संपुन कामाची भगभग
तमे हळुहळु पहा पसरिले पट काळेसावळे
त्यात त्रिभुवन गुरफटविले
गगनी लुकलुकती तारका
अवलोकनास सुखकारका
न परी अंधकार-हारिका
चांदोबा बालकानंदकर आज दिसेना वरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

“वियेल आजी गाय आपुली, बाबा! सोडू नका
कोणी लाविल तिजला ढका
भरलेले गोजिचे दिवस तिज पाडस होइल नवे
आम्ही खेळू मग त्यासवे
गोजी दूध बहुत देइल
खर्वस, आई! तू करिशिल
आम्हां नाही ना म्हणशिल
गंमत होइशल मोठीच करु मजा अता लौकरी”
प्रभु तव कठोर करणी खरी।।

बाप म्हणे निज मुलांस “मजला विचार करणे पडे
गोजिस उपवास घरी घडे
दोन चार दिन जातिल अजुनी चिंता काहि न करा
देवा हृदयामाजी स्मरा
जाइल जर गाय फिरावया
तृण तिज मिळेल ते खावया
काडी एक न घरि द्यावया”
ऐसे बोलुन विचारपूर्वक दावे करि तो दुरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

मंद मंद पाउले टाकिते धेनु सुखाने चरे
पोटी गर्भ वाटले फिरे
प्रसवसमय ये जवळ तिचा मग तृण खाणे संपले
पोटी कळा, अंग तापले
पुढती तदगति ती खुंटली
तेथे गरिब गाय थबकली
पथ गाडिया असे पदतळी
विचार तो न, प्रसववेदना तिजला कष्ट करी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

दहा वाजुनी गेले होते रात्रीचा समय तो
अधिकचि अंधकार दाटतो
त्या मार्गाने गाडी जाई वेळ तिची ती असे
परि ते धेनुमानसी नसे
पुढचे कोणाला कळतसे
मी मी म्हणणारा चुकतसे
ही तर गाय बिचारी असे
या मार्गाने जाइल गाडी विचार न तदंतरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

रागाने फणफणे भगभगे गाडी येई जवे
येणे जाहिर करि निजरवे
उशीर झाला जणु जायाला बेफामपणा दिसे
स्वैरिणि धावपळ करीतसे
‘मार्गातून दूर हो सरा
जरि परिसाल न होइल चुरा
जावे लागे मग यमपुरा’
प्रचंड ऐसा घोष करित ये, घसा न बसतो परी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

हाकेवरती गाडी आली शब्द तिचा ऐकला
धेनुस टाकवे न पाउला
सर्व गर्भ बाहेर न आला प्रसवसमयवेदना
होत्या होत तिला दारुणा
जो जो निकट गाडि येतसे
तो तो चित्त तिचे उलतसे
बळ हलण्यास जागचे नसे
मरणाचा अति दु:खद आला विचार धेन्वंतरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

मृत्युभयाने धेना दचकली, खचली, थरके मन
मानस मृदुल निघे पोळून
बहुतेक तिचा गर्भ येत चो बाहेरी भितिने
तो तिज गाठिलेच गाडिने
विलंब पळभर तेथे नसे
करुणा दया न काही वसे
झरझर गाडी ती जातसे
जसा विजेया लोळ कोसळे गदारोळ ती करी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

दीन गायिने मरणकाळचा हंबरडा फोडिला
गगनी विलयाला पावला
जवळ न कोणी करुणासागर म्हणती परमेश्वर
परि ते कठिण तदीयांतर
अंग च्छिन्नभिन्न जाहले
चेंदुन जाइ वत्स कोवळे
तेथे रक्त-तळे तुंबले
क्रूर गाडिने बळी घेतला घेइ असे कितितरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

वज्रालाही पत्थरासही पाझर फुटते तदा
पाहुन धेनूची आपदा
प्रात:काळी करुण दृश्य ते पाहुन पुलकित जन
भरती पाण्याने लोचन
हळहळताती नारीनर
करिती गमन मग घरोघर
वदती किती एक परस्पर
सुखदु:खाच्या द्वंद्वामधुनी सुटली ही लौकरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

केविलवाणी करुण कहाणी धन्यास जेव्हा कळे
मानस त्याचे शोके जळे
म्हणे मनी “निज बाळाचे नच हितवच मी ऐकिले
कटु हे फळ मज देवे दिले”
येती अश्रू डोळ्यांतुन
स्फुंदस्फुंदत बाळकगण
घरात रडती नारीजन
असे कोण तारिता, मारणे त्याच्या चित्ती जरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर,१९२८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा