नवरसमंजरी - शांतरस

जेव्हा होतिल शब्द धेडगुजरी भाषेतुनी नाहिसे,
बुद्धीचे 'अरबी' समुद्र सगळे जातील की आटुनी!
स्फूर्तीच्या गिरण्याहि बंद सगळ्या होतील काव्यांतुनी
शांतीचे झरतील निर्झर तदा स्वच्छंद पीयूषसे!

जेव्हा होतिल ते पसार सगळे शाहिरकंपू कुठे,
काव्याचीहि खलास होइल सदा पैदास साप्ताहिकी!
जेव्हा बेचव अर्थशून्य सु (शु?) निते भुकेल कोणी न की,
तेव्हा शांतिरसाभिषिंचित अहा ! होतील सारस्वते!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा