नवरसमंजरी - करुणरस

कुठे लिहिल्या कविता न पाच-सात
एकदाच्या छापिल्या मासिकात;
तोच बोले, 'शाहीर जाहलो मी,
महाराष्ट्रा हलवीन रोमरोमी!'

पुढे सरली कंगाल काव्यकंथा,
येरु बोले, 'टीकाच लिहिन आता !
मस्त झाली आहेत बडी धेंडे !
एकएकांची फोडतोंच तोंडे !'

हाति बाळाच्या लागता कुर्‍हाड
जिते राहिल का एक तरी झाड?
तसे टीकेचे लागताच वेड,
मोठमोठ्यांचा काय पुढे पाड?

'अमुक लेखक करितोच उसनवारी,
तमुक लोळतस बिछान्यात भारी!
तमुक ओढतसे रोज विड्या फार,'
असे टीकेचे चालले प्रहार !

चारचौघांची परी करुनि चोरी,
येरु सजवी लेखनाची शिदोरी!
शिव्या द्यायाही शब्द न स्वतांचे
कसे वर्णू दारिद्र्य मी तयाचे?

असो; येरू जाहला सुप्रसिद्ध,
लेखनाची संपली त्यास हद्द !
म्हणे, 'आता होईन पत्रकार,
देशभक्तीच्या अखाड्यांत वीर !'

येरु घेई बगलेत जाड ग्रंथ,
आणि सुतक्यासम जाइ मार्गि संथ !
धुवट बगळ्यासम दिसे वरुनि शांत,
कोण जाणे परि अंदरकी बात?

मोठमोठ्यांच्या बसुनि कच्छपात,
बने मुत्सद्दी चार आठवड्यात !
लिहू लागे गंभीर, 'लेखमाला'!
'तीन खंडी' जाहला 'बोलबाला'!

'जाहिराती', 'संस्कार', वृत्त', 'पोंचा'-
हातखंडा लिहिण्यात होय त्याचा!
'स्फुटा' वरती जो टाकणार हात-
तोच मागुनि दुर्दैव हाणि लाथ!

'जहालांचा भुरकाच तिखट -जाळ'.
येरु बोले, 'मज नको कधी काळ!'
'मवाळांचा आळणी दूधभात,
बरा आता बैसेन ओरपीत!'

येरु संन्यासी होइ (करुनि क्षौर)
बांधि आश्रम रानात कुठे दूर !
भोवताली जमवुनी चार शिष्ट,
काळ घालवितो 'काव्यविनोदात.'

'मनी आले ते होइ सर्व पूर्ण!'
हेच येरूला एक समाधान.
शांत ही अजुनी न चित्त हाय!
परी धंदा उरला न! करू काय?

देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी,
परी कारुण्यमूर्तीला द्याच या मोक्ष लोकरी !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा