नांगर

जग सगळे बनले रणकुण्डच भीषण
पातला काय प्रळयाचा निकट क्षण !

लक्षावधि पडती जीवांच्या आहुती
नररुधिराच्या खळखळा नद्या वाहती !

मानवते, का तू बडवुनि घेशी उर ?
उलटले तुझ्यावर तुझेच भस्मासुर

जी दिलीस भौतिक शास्त्रांची खेळणी
त्यांचिया करी, ती शस्त्रे झाली रणी !

संहार होत जो आज पुरा होउद्या
शांतीची किरणे दिसणारच ती उद्या

परतंत्र भारता, शस्त्रहीन तू पण
तव कवण महात्मा करील संरक्षण ?

भडकली आग कुणिकडे ! तयाची धग----
लागून इथे करि जीव कसा तगमग !

भाजला भयानक कोलाहल अंतरी
मी दूर दूर भटकलो पिसाटापरी !

शेवटी गाठिली घारकडयाची दरी
विमनस्क बैसलो एका दरडीवरी

संध्येची होती सौम्य उन्हे पांगली
अन् घारकडयाची दीर्घ पडे साउली

त्या सावलीत लाकडी जुना नांगर
कुणि हाकित होता बळिराजा हलधर

खांद्यावर आसुड, हालवीत खुळखुळा
घालीत तास तो सावकाश चालला

फोडीत ढेकळे फाळ जसा तो फिरे
बैलांच्या नावे गीत तयाचे स्फुरे

त्या श्रमिगीतातिल आशय का समजला ?
’पिकवीनच येथे मी मोत्यांचा मळा !’

तुम्हि याला भोळा खुळा अडाणी म्हणा
तुम्हि हसा बघुनि या दरिद्रनारायणा !

बळराम आणि बळिराजा यांच्या पुन्हा
मज याचे ठायी दिसल्या काही खुणा

हा स्वयंतुष्ट करि जगताचे पोषण
होऊन ’हलायुध’ करितो पण रक्षण

जरि भोळा, याच्या औदार्याची सरी
येणार न कोणा कुबेरासही परी

जाहला कशाचा गर्व तरी आपण ?
की ओळखल्या सृष्टीच्या खाणाखुणा ?

सृष्टीची कोडी सोडविता शेवटी
छांदिष्ट बंधुंनो, भ्रमिष्ट झाली मती

त्या भयासुराची दावुनि कारागिरी
तुम्हि मानवतेची फसगत केली खरी !

किति तुम्हांस कुरवाळुनी लाविला लळा
पण आपण भाऊ कापू सजलो गळा

एकान्त शांत शेतात पहा हलधर
हा ध्येयनिष्ठ हाकितो कसा नांगर !

हा दिसे दरिद्री, चिंध्या अंगावरी
गरिबांस घालितो खाऊ पण भाकरी

गंभीर, धीर हा स्थितप्रज्ञ का ऋषी !
मानिलें ध्येय, कर्तव्य एक की ’कृषि’

घारीपरि घाली विमान घिरटया वर
ये ऐकू याला त्याची नच घरघर !

ते बाँम्ब घटोत्कचनाशक शक्तीसम
पण स्फोट व्हावया ठरले ते अक्षम

रणगाडयांचा ये ऐकू नच गोंधळ
घनगर्ज गर्जती तोफा-हा निश्चळ !

त्या रणनौका, ते छत्रीधर सैनिक
ते पाणतीर, काही न तया ठाउक

या संहाराचा प्रेरक अग्रेसर
त्या माहित नाही कोण असे हिटलर !

क्रांतीची त्याने कदर न केली कधी
काळासहि त्याने जुमानले नच कधी

ही युद्धे म्हणजे घटकेची वादळे
का नांगर याचा थांबणार त्यामुळे !

लोटली युगे किति, तो ग थांबला कधी
येतील युगे किति, थांबेल न तो कधी

होतील नष्ट शस्त्रास्त्रे केव्हातरी
हा अखंड, अक्षय, अभंग नांगर परी !

जो जगन्नियंता विश्वंभर ईश्वर
धनधान्ये करितो समृद्ध जग सुंदर

हे पवित्र त्याचे प्रतीक हा ’नांगर’
वंदितो त्यास जो बळिराजा हलधर !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

भा. रा. तांबे


खोकली माय

हिवायाचं थंड वारं

बोरी पिकल्या रानांत

आली जयगावामधीं

आली खोकल्याची सात

रस्त्यांवर वावरांत

लोक खोकल्यांत येडे

घरोघरीं खोकलंनं

जसे वाजती चौघडे

अरे, घेतले औसदं

नही राहे कुठें बाकी

तरी जायेना खोकला

सर्वे वैद्य गेले थकी

सर्वे वैद्य गेले थकी

आतां जावा कुठें तरी?

करे मनांत इचार

कोनी गांवाचा कैवारी अरे, गांवाचा कैवारी

होता मोठा हिकमती

मेहेरूनच्या रस्त्यानं

जात व्हता कुठे शेतीं

"कसा आला रे खोकला

म्हने आवंदाच्या सालीं"

गांवच्याच शिववर

कोन्ही म्हातारी भेटली

तशी म्हातारी बोलली

"कांहीं धर्म वाढ बापा

इडापीडा या गांवाची

व्हई जाईन रे सपा"

तव्हां गांवचा कैवारी

काय बोले म्हातारीले

"माझ्या गांवचा खोकला

सर्वा दान केला तुले."

ऐकीसनी म्हतारी बी

तव्हां पडे भरमांत

म्हने 'घेनंच पडीन

दान आलं जें कर्मात !'

मंग घेतला खोकला

सर्व गांव झाडीसनी

आन् बसे खोकलत

सदा गया खल्ळीसनी

गेला गेला सर्व निंघी

गांवामधला खोकला

अशा खोकल्याचा वांटा

म्हतारीनं उचलला

खोकला निंघीजायासाठीं

ध्रती म्हतारीचे पाय

हात जोडती रे लोक

खोक्ली माय खोक्ली माय

मेहेरूनच्या वाटेनं

जरा वयव रे पाय

तुले दिशीन रस्त्याले

तठे आतां खोक्ली माय


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

इंफाळ

"इंफाळ-जंगलातल्या चिमुकल्या फुला,

मोकळे करुनि सांगतो मनोगत तुला

एकलेपणा मज असह्य हा जाहला

तू विरंगुळा एकल्या जिवाला मला !

मी जखमी होउन खंदकात या पडे

मज टाकुनि गेले बांधव मम कुणिकडे ?

चहुबाजू धूसर दिसति नागटेकडया

उद्‌ध्वस्त त्यांमधे नागांच्या झोपडया

ओतितो आग तोफांचा भडिमार हा

की प्रलयंकर भूकंप होत हा महा !

सर गोळ्यांचे सोडिती यंत्रबंदुका

कित्येक चाटुनी जाती या खंदका

चढउतार भारी, किर्र रान भोवती

बेधडक त्यातुनी रणगाडे धावती

हे वनदेवीच्या मुला, नवल हे पण

या वणव्यातुन वाचलो कसे आपण ?

घरदार सोडुनी लष्करची चाकरी

का धरिली, ते तुज कसे सांगु मी तरी ?

मी कृष्णा-खोर्‍यातला मराठा गडी

या ब्रह्मी आघाडीत घेतली उडी

बोलोत शिपाई भाडोत्री मज कुणी

लढतोच तरी तळहाती शिर घेउनी

हा कुणी कुणास्तव जिंकायाचा लढा

मज याचा अजुनी झाला नच उलगडा !

इंफाळ दिशेचा सर्द वात वाहतो

कुजबुजुनी कानी काय मला सांगतो ?

रणघोष ’चलो दिल्ली’ चा हा ऐक रे !

’जयहिंद !’ हाक तव बंधूंची ऐक रे !

ते शत्रु नाहित---हिंदपुत्र फाकडे

ते सज्ज जाहले जाया दिल्लीकडे !

स्वातंत्र्यरवीला द्यायाला अर्ध्य हे

रक्ताला आहे बोलावित रक्त हे !

इंफाळ दिशेचा वारा हे हृद्गत--

सांगून म्हणे, ’ये, तुझे असो स्वागत !’

ही हाक कुणाची ? मातेची हाक ही !

ऐकून संचरे मनी चेतना नवी

घायाळ पाखरु तडफड तडफड करी

पण येत उडाया नाही त्या अंबरी !

असहाय तसा रे झालो मी सर्वथा

ही सांगु कुणा मी मनची माझ्या व्यथा !

सह्याद्री माझा माहित नाही तुला

नसशील ओळखत रानजाइच्या फुला

तुज पाहुनि होते त्यांची मधुर स्मृती

रे हास हास ! तव कौतुक करु मी किती !

जखमेतुनि गेले गळुनि रक्त घळघळा

रे थकलो मी, नच अधिक बोलवे मला

ती येइल गाडी ’अँम्ब्युलन्स’ अवचित !

मज घेउन जाइल, होइल ताटातुट !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गस्तवाल्याचा मुलगा

चांदने फिकटले, तिनकांडे मावळले

तरि पाय आमुचे घरास नव्हते वळले

लागल्या व्हावया लांब लांब तरुछाया

जणु काय पसरिती भुताटकीची माया !

क्षितीजावर नव्हती अजुनि ’चांदणी’ आली

पक्ष्यांची किलबिल सुरुहि नव्हती झाली

अद्याप जगाची निद्रा नव्हती सुटली

परि झोप अम्हांला निशाचरांना कुठली !

चावडीपुढे रंगात तमाशा आला

करि बहार शाहिर होनाजीचा चेला

लावण्या, गौळणी ऐकुनि मानस रिझले

घटकाभर अमुचे स्मरण घराचे बुजले

’धनि रामपारबी व्हाया नव्हं का आला !

तांबडं फुटल, ’ धर्माजी बोलुनि उठला

मग बोलत बोलत घरा परतलो आम्ही

परि कान ऐकती ललकार्‍या त्या नामी !

अंगणात छाया दिसे घराची पडली

जणु त्यावर त्याची माया-पाखर जडली

त्यातून प्रगटली एक चिमुकली मूर्ती

हळुहलू यावया लागे पुढती पुढती

थरकले हृदय, थबकले आमुचे पाय

हा भुताटकीचा चमत्कार की काय !

धर्माजी बोले, ’घ्या देवाचे नाव

भेटेल तो जर का त्यावर अपुला भाव !

डावलू नका जी, बघा तरी न्याहळुनी

सांगुन का होते कधि देवाची करणी !’

तो ’बा-बा-बा-बा !’अशी बोबडी वाणी

ती बाळमूर्ति मग बोले मंजुळवाणी

आश्चर्य-भीति-हर्षाचे-वादळ उठले

क्षणभरच मनी, मग संशय सारे फिटले

धावलो पुढे, ओरडलो, ’माझ्या बाळा !’

पोटाशी धरुनी घट्ट, चुंबिले त्याला

’तू’ बालक होउनि देवा, देशी भेटी

इतुके का आहे पुण्य आमुच्या गाठी !’

धर्माजी दुरुनी पडला त्याच्या पाया

गहिवरुनी हृदयी लागे नेत्र पुसाया

तो सताड उघडे दिसे घराचे दार

माउलीस होती झोप लागली गाढ !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

रानफुले

मन फुले हर्षुनी रानफुले पाहुनी

सृष्टिची मुले साजिरी गोजिरी गुणी !

शिकविले यांस हो गोड हसाया कुणी ?

मिळविले सुखाचे निधान हे कोठुनी ?

ही इथे डोलती पिवळी ’तरवड फुले’

निष्पर्ण ’किरळ’ शेंदरी फुलांनी खुले

भुइवरी उमलली शुभ्र ’कळइची ’ फुले

कुणि यक्षिणिने का मोती हे विखुरले !

डोकावति मधुनी चंद्रापरि ’चांदिल’

तर कुठे झळकती झेंडूंचे मंदिल !

शोभती किती जांभळी निळी ’रुइफुले’

की सृष्टिसतीच्या कानांतिल चौफुले !

तृणफुले उमलली ठायि ठायि चिमुकली

नावेही त्यांची अवगत नसती मुळी

क्षण फुलून क्षणभर दुसर्‍यांना फुलविणे

का यास्तव यांचे क्षणभंगुर हे जिणे !

"रमतात यक्षिणी का तुमच्या संगती !

ही फुलपाखरे तुमच्याशिच रंगती

किति सृष्टीची करमणूक करता तुम्ही

चर्येवर तुमच्या गोड हसू नेहमी !

भावंड एक मी दुःखी कष्टी, मला

हसवून एकदा फुलवा जीवनकळा !

सहवास सुखाचा तुमचा मज लाभला

तर फुलून गाणे गाइल माझा गळा !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या